Friday, October 2, 2015

सोमनाथ भारती प्रकरणाचा अन्वयार्थ

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे कायदामंत्री राहिलेले सोमनाथ भारती यांना, पत्नीचा छळ केल्याबद्दल झालेली अटक, त्यासाठी न्यायालयाला घ्यावी लागलेली कठोर भूमिका आणि तत्पूर्वीचा नाट्यमय घटनाक्रम अनेक प्रश्‍न उपस्थित करणारा आहे. स्वत:ची अटक टाळण्यासाठी भारतींनी केलेला आटापिटा, ती अगदीच टळत नाहीय् हे बघून नाइलाजाने पत्करलेली शरणागती, मग न्यायालयात आपला वकील येईपर्यंत त्यांनी लढवलेला किल्ला, गर्भवती असलेल्या पत्नीवर कुत्रा सोडून त्याकरवी तिला त्रास देण्याच्या आरोपाचा त्यांनी केलेला इन्कार...सारेच अजब आहे. समाजातील अन्याय, अत्याचाराविरुद्ध पेटून उठणारी, समाजमन चेतवणारी, निदान तसे करण्याचा दावा करणारी, स्वत:ला सामाजिक चळवळीचे अध्वर्यू मानणारी, समाज-राजकारणातली अग्रेसर मंडळी स्वत:च्या घरात मात्र ‘अशी’ विपरीत वागत असेल, तर मग त्यांच्या कल्पनेतल्या सामाजिक परिवर्तनासाठी आशेने बघायचे कुणाकडे? शिवाय, घरात असे वागणार्‍यांना अधिकार तरी काय उरतो समाजातल्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध बोलण्याचा? त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा?भा


आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे कायदामंत्री राहिलेले सोमनाथ भारती यांना, पत्नीचा छळ केल्याबद्दल झालेली अटक, त्यासाठी न्यायालयाला घ्यावी लागलेली कठोर भूमिका आणि तत्पूर्वीचा नाट्यमय घटनाक्रम अनेक प्रश्‍न उपस्थित करणारा आहे. स्वत:ची अटक टाळण्यासाठी भारतींनी केलेला आटापिटा, ती अगदीच टळत नाहीय् हे बघून नाइलाजाने पत्करलेली शरणागती, मग न्यायालयात आपला वकील येईपर्यंत त्यांनी लढवलेला किल्ला, गर्भवती असलेल्या पत्नीवर कुत्रा सोडून त्याकरवी तिला त्रास देण्याच्या आरोपाचा त्यांनी केलेला इन्कार...सारेच अजब आहे. समाजातील अन्याय, अत्याचाराविरुद्ध पेटून उठणारी, समाजमन चेतवणारी, निदान तसे करण्याचा दावा करणारी, स्वत:ला सामाजिक चळवळीचे अध्वर्यू मानणारी, समाज-राजकारणातली अग्रेसर मंडळी स्वत:च्या घरात मात्र ‘अशी’ विपरीत वागत असेल, तर मग त्यांच्या कल्पनेतल्या सामाजिक परिवर्तनासाठी आशेने बघायचे कुणाकडे? शिवाय, घरात असे वागणार्‍यांना अधिकार तरी काय उरतो समाजातल्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध बोलण्याचा? त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा?

भारतीय कुटुंबव्यवस्थेत महिलांवरचा अत्याचार तसा नवा नाहीच. महिला म्हणून या घटकावर पदोपदी होणारा अन्याय सर्वपरिचित आहे. विशेषत: स्वत:ला समाजातील विविध क्षेत्रातील स्वनामधन्य नेते म्हणवून घेत, समाजात मिरवणार्‍या मंडळींनी स्वत:च्या घरातील महिलावर्गाची चालवलेली हेटाळणीही नवखी नाही इथे. नवरा पामेला ऍण्डरसनचा असो की मग सुनंदा पुष्करचा, तो पाश्‍चिमात्य डेनिस रॉडमॅन असो, की मग हिंदी चित्रपटातला शक्ती कपूर, या लोकांनी महिलांशी करावयाच्या वर्तणुकीची लज्जास्पद उदाहरणे घालून दिली आहेत. या देशातील सामान्य माणसांनी तर काय, परंपरेच्या नावाखाली तिचे स्थान ‘ताडन के अधिकारी’ म्हणून निश्‍चित करून टाकले होतेच, पण मग इथल्या कथित बड्या, सुशिक्षित मंडळींचे काय? त्यांनी त्यांच्या वागणुकीतून आदर्श निर्माण करायचे सोडून ‘असे’ का वागावे? झोपडीत राहणार्‍या महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या कहाणीची नवलाई नाहीच इथे, पण जे लोक उच्चभ्रू म्हणून वावरतात, स्वत:ला कुठल्याशा सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता मानतात, स्वत:ची तशी प्रतिमा निर्माण करण्यात यशही मिळवतात, स्त्री-पुरुष समानतेचा डांगोरा पिटतात, व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याचे दावे करतात, त्यांनी का वागावे असे?
या समाजात महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोज घडतात. कधी हुंड्यासाठी छळ, तर कधी दिल्लीत भर रस्त्यावर सामूहिक बलात्कार. कधी पुरुषार्थाच्या नावाखाली नवर्‍याने केलेली मारहाण, तर कधी सार्वजनिक ठिकाणी बसणारे धक्के. कधी मुलगा जन्माला घातला नाही म्हणून टोमणे, तर कधी सासरहून पैसे आणण्याचा तगादा. एकीकडे लेकीला लक्ष्मीचा अवतार मानत तिला थेट गाभार्‍यातले स्थान बहाल करणारे लोक आम्हीच आणि तिला ‘ताडन के अधिकारी’ ठरविणारे लोकही आम्हीच. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’चा मंत्र जपणारे लोकही आम्हीच आणि तिला अपमानित करणारे लोकही आम्हीच.
आता हेच बघा ना! परवा तो राजदचा उमेदवार, आपण बिहारची निवडणूक लढविणार असल्याच्या वास्तवाचे भान विसरून एका मुलीसोबत चारचौघात बेभान होत नाचला. भविष्यात आपण कोणती जबाबदारी स्वीकारायला निघालो आहोत आणि आता चारचौघात आपण नेमके कसे वागताहोत, याचे जराही स्मरण त्याला राहिले नाही. असल्या बेजबाबदार नेत्याने आपले नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करावे का, असा प्रश्‍न गयातील टेकारी मतदारसंघातल्या लोकांना आता पडला पाहिजे. या उमेदवाराच्या पराभवातून लोकांच्या मनातील संतप्त भावनाही व्यक्त झाल्या पाहिजेत. तसे घडले तरच असल्या धेंडांना सार्वजनिक ठिकाणी महिलांशी करावयाच्या वर्तणुकीचे योग्य धडे मिळतील.
राजदच्या या उमेदवाराचे कारनामे कमी होते की काय म्हणून उत्तर प्रदेशातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी बारबालांसोबत लगावलेले ठुमके आणि त्यांच्यावर केलेल्या पैशाच्या उधळणीचे रेकॉर्डिंग नुकतेच व्हायरल झाले आहे. आता दोष राजदच्या उमेदवाराला द्यायचा, की बारबालांवर नोटा उडविणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना? की अलीकडे एकूणच अनियंत्रित होत चाललेल्या सामाजिक परिस्थितीला? ज्यांनी या मुलींना त्या नरकातून बाहेर काढायचे, तेच जर आपले कर्तव्य विसरून त्यांच्यासोबत संगीताच्या तालावर थिरकायला लागले, तर बारबालांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची स्वप्नं लोकांनी बघायची तरी कुणाच्या भरवशावर?
सोमनाथ भारती कोण आहेत? ते दिल्लीचे माजी कायदा मंत्री आहेत. विद्यमान आमदार आहेत. त्यांना कायदा कळतो. स्वत:ला चळवळीतला कार्यकर्ता म्हणवून घेत असले, तरी ते बर्‍यापैकी ‘राजकारणी’ आहेत. समाजातील अन्यायाविरुद्ध त्यांनीही आवाज ‘बुलंद’ केला होताच कधीकाळी. त्यांनी त्यांच्या घरात चालविलेल्या अन्यायाविरुद्ध कुणी आवाज बुलंद करायचा आता? राहिला प्रश्‍न केजरीवालांचा, तर त्यांनी तर लागलीच रंग बदलले आहेत. कालपर्यंत भारती ज्यांच्या गळ्यातले ताईत होते, त्या केजरीवालांना आता सोमनाथांमुळे पक्षावर गदा आलेली अजीबात नको आहे. बहुधा सौ. भारतींनी केलेल्या आरोपाचे गांभीर्य अरविंदबाबूंच्याही ध्यानात आले असावे. बहुतेक त्यामुळेच त्यांनी सोमनाथांबाबत विरोधाची ही भूमिका जाहीरपणे घेतली असावी. पण, त्यांच्या या भूमिकेमागील कारण सौ. भारतींना न्याय देण्याचे नसून, स्वत:च्या पक्षावर आलेले संकट टाळण्याची त्यांची ही क्लृप्ती होती, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्यामागील, सोमनाथ भारतींना माध्यमांसमोर फटकारण्यामागील भूमिकेलाही राजकारणाची किनार आहे. त्यांना चिंता आपल्या पक्षाच्या प्रतिमेची आहे. कुठल्याही एखाद्या नेत्यामुळे पक्षावर कुठलेही बालंट आलेले त्यांना नको आहे. त्यांनी भारतींना दिलेली चिथावणी केवळ तेवढ्यासाठी आहे. त्यामुळे सोमनाथांनी अन्याय करताच केजरीवाल सौ. भारतींच्या साथीने उभे राहिल्याचा अर्थ त्यांच्या भूमिकेतून दुर्दैैवाने काढता येत नाही.
या देशातील महिलांचा एक मोठा वर्ग असा आहे की, ज्यांना सौंदर्याची निदान परिभाषा तरी कळते, पण महिलांचा एक वर्ग इथे असाही आहे, ज्यांना लक्स, रेक्सोना साबण अजूनही ठाऊक नाही. लिप्स्टिक, परफ्यूम माहीत नाही. इतकेच काय, नवर्‍याने बेदम मारहाण केली तर तक्रार नोंदवायला पोलिस ठाणे गाठायचे असते, या आपल्या अधिकाराचीही कल्पना तिला नसते. बहुधा त्या अधिकारांबाबतच्या अधिक जागरूकतेमुळेच पाश्‍चिमात्य देशातील महिलांवरील अत्याचाराच्या पोलिसांकडे दाखल प्रकरणांची संख्या अलीकडे सतत वाढतेय्. त्या तुलनेत आपल्याकडे तक्रारींची संख्या कमी आहे. आपण लोकही त्यातच समाधान मानत राहिलो. पण, अन्याय होऊनही पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत, अशी प्रकरणे कितीतरी मोठ्या संख्येत असल्याचे भीषण वास्तव आपल्याला जराही अस्वस्थ करीत नाही, हे खरे दुर्दैव आहे. गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी, शिक्षित-अशिक्षित असे सारे भेद मोडून स्त्रियांवरील अत्याचार आपले अस्तित्व राखून आहे इथे.
सोमनाथ भारतींच्या संदर्भातील प्रकरण हे केवळ एक उदाहरण आहे. बड्या धेंडांच्या घरातील महिलांच्या वास्तविक अवस्थेचे, अत्याचार करणार्‍यांद्वारे काढल्या जाणार्‍या पळवाटांचे, त्यांनी त्यांच्या सोयीने लावलेल्या कायद्याच्या अर्थ-अन्वयार्थाचे. या देशातली प्रत्येक बडी व्यक्ती, मग ती राजकारणातली असो की उद्योग जगतातली, इथला कायदा त्यांच्यासाठी नाहीच, त्यांनी त्याचे पालन करण्याची मुळीच गरज नाही, असा समज झालेला असतो त्यांचा. त्यांच्या दृष्टीने कायदा सर्वसामान्यांनी पाळायचा, बड्यांनी थोडीच तो पाळायचा असतो? भारतींचाही समज तसाच होता. स्वत: कधीकाळी कायदामंत्री राहूनही... बहुधा त्यामुळेच त्यांनी सर्वांत पहिले प्रयत्न केला, तो कायद्याच्या कठोर अंमलबजावणीतून सूट मिळविण्याचा. शक्यतो बायकोच्या तक्रारीची वाट कशी लागेल आणि आपल्यावरील कारवाई कशी टळेल याचा.
केलेल्या अन्यायाच्या सबळ पुराव्यांचे दाखले देत न्यायालयाने सोमनाथ भारतींना या प्रकरणी अटकपूर्व जामीन नाकारला. न्यायालयात शरण येण्यास टाळाटाळ करण्याच्या त्यांच्या भूमिकेलाही लगाम बसला तो न्यायालयाच्या ठाम भूमिकेमुळेच. त्यामुळे राजकारणाच्या वलयात त्यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न आता कुणालाही करता येणार नाही. शेवटी काय, मोर्चाचे नेतृत्त्व करताना सरकार आणि व्यवस्थेविरुद्ध ओरडणे सोपे असते. त्याबरहुकूम स्वत: वागणे मात्र कठीण... सोमनाथ भारती प्रकरणाचा अन्वयार्थ तरी तोच आहे...

No comments:

Post a Comment