Thursday, August 18, 2016

मुफ्तमे मिली आझादी...



‘‘मुफ्तमे मिली आझादीको बहोत सस्ता समझते है लोग!’’ कुठल्याशा चित्रपटात नानाच्या खर्ड्या आवाजात व्यक्त झालेली ती उद्विग्न भावना मन अस्वस्थ करून जाते अजूनही. खरंच आहे. आमच्या पिढ्यांनी कुठे अनुभवले पारतंत्र्य? परकीयांच्या राजवटीचा अन् त्यांच्या जुलमांचा अनुभव घेतला कुठे आम्ही? त्यामुळे ना अंगावर शहारे आणणार्‍या गगनभेदी घोषणांची किंमत आम्हाला ठावूक, ना हसत हसत फासावर जाणार्‍या शहीदांच्या बहादुरीचे आम्हाला कौतुक! सैन्यात दाखल होऊन सीमेवर शत्रूंविरुद्ध लढण्याचे झेंगट नको की सार्वजनिक जीवनात कायद्याच्या पालनाची जबाबदारी. आम्ही फक्त बेलगाम, बेफाम वागणार. या देशाबद्दलचे आमच्या मनातले प्रेम, आदर, देशभक्ती व्यक्त व्हायलाही मुहूर्त लागतो राव आम्हाला. कारगिलच्या युद्धाची वार्ता कानी पडली की मग आमची देशभक्ती कशी ओसंडून वाहाते. स्वातंत्र्य अन् प्रजासत्ताक दिनाला रस्त्यांवर उतरून बेभान नाचत सुटायचे. खांद्यावर तिरंगा फडकावत दुचाकीवरून निघालेल्या तरुणाईच्या झुंडीने रस्ता अडवून धरत, नियम पायदळी तुडवत, कर्कश्श आवाजात ओरडत सुटायचे. परवानगी न घेता रॅलीज काढून ‘स्वातंत्र्य’ साजरे करायचे. याला देशभक्ती म्हणायचे की मस्ती? काही वर्षांपूर्वीपर्यंत, धूळ झटकून राष्ट्रभक्तिपर गीतांच्या ध्वनिमुद्रिका निदान बाहेर पडायच्या या राष्ट्रीय सणांच्या मुहूर्तावर. पण आता तर राष्ट्रीय सणांच्या दिवशी सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीची जागा अडवून लावलेल्या डीजेच्या भन्नाट आवाजात बेताल नाचायला तरुणाईला ‘शांताबाई’ अन् ‘झिंगाट’चा तालही पुरेसा असतो. अशी असते देशभक्ती? हे दृश्य बघण्यासाठी गेले भगतसिंह फासावर? यासाठी भोगल्या सावरकरांनी अंदमानातल्या मरणयातना? लोकमान्य टिळक याचसाठी गेले मंडालेच्या तुरुंगात? भविष्यातले हे चित्र बघण्यासाठी श्रीमंती थाट सोडून कमरेला पंचा गुंडाळला माहात्म्यानं? स्वातंत्र्यदिनी रॅली काढायची अन् त्यातही तिरंगा खांद्यावर घेऊन घराबाहेर पडायचे म्हटल्यावर पोलिसांची परवानगी हवी कशाला? कोण अडवणार आपल्याला? याच दिवशी नाही का देश स्वतंत्र झाला होता! त्याचा आनंद साजरा करायला कोण कशाला कोणाची परवानगी घेणार? 


‘‘मुफ्तमे मिली आझादीको बहोत सस्ता समझते है लोग!’’ कुठल्याशा चित्रपटात नानाच्या खर्ड्या आवाजात व्यक्त झालेली ती उद्विग्न भावना मन अस्वस्थ करून जाते अजूनही. खरंच आहे. आमच्या पिढ्यांनी कुठे अनुभवले पारतंत्र्य? परकीयांच्या राजवटीचा अन् त्यांच्या जुलमांचा अनुभव घेतला कुठे आम्ही? त्यामुळे ना अंगावर शहारे आणणार्‍या गगनभेदी घोषणांची किंमत आम्हाला ठावूक, ना हसत हसत फासावर जाणार्‍या शहीदांच्या बहादुरीचे आम्हाला कौतुक! सैन्यात दाखल होऊन सीमेवर शत्रूंविरुद्ध लढण्याचे झेंगट नको की सार्वजनिक जीवनात कायद्याच्या पालनाची जबाबदारी. आम्ही फक्त बेलगाम, बेफाम वागणार. या देशाबद्दलचे आमच्या मनातले प्रेम, आदर, देशभक्ती व्यक्त व्हायलाही मुहूर्त लागतो राव आम्हाला. कारगिलच्या युद्धाची वार्ता कानी पडली की मग आमची देशभक्ती कशी ओसंडून वाहाते. स्वातंत्र्य अन् प्रजासत्ताक दिनाला रस्त्यांवर उतरून बेभान नाचत सुटायचे. खांद्यावर तिरंगा फडकावत दुचाकीवरून निघालेल्या तरुणाईच्या झुंडीने रस्ता अडवून धरत, नियम पायदळी तुडवत, कर्कश्श आवाजात ओरडत सुटायचे. परवानगी न घेता रॅलीज काढून ‘स्वातंत्र्य’ साजरे करायचे. याला देशभक्ती म्हणायचे की मस्ती? काही वर्षांपूर्वीपर्यंत, धूळ झटकून राष्ट्रभक्तिपर गीतांच्या ध्वनिमुद्रिका निदान बाहेर पडायच्या या राष्ट्रीय सणांच्या मुहूर्तावर. पण आता तर राष्ट्रीय सणांच्या दिवशी सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीची जागा अडवून लावलेल्या डीजेच्या भन्नाट आवाजात बेताल नाचायला तरुणाईला ‘शांताबाई’ अन् ‘झिंगाट’चा तालही पुरेसा असतो. अशी असते देशभक्ती? हे दृश्य बघण्यासाठी गेले भगतसिंह फासावर? यासाठी भोगल्या सावरकरांनी अंदमानातल्या मरणयातना? लोकमान्य टिळक याचसाठी गेले मंडालेच्या तुरुंगात? भविष्यातले हे चित्र बघण्यासाठी श्रीमंती थाट सोडून कमरेला पंचा गुंडाळला माहात्म्यानं? स्वातंत्र्यदिनी रॅली काढायची अन् त्यातही तिरंगा खांद्यावर घेऊन घराबाहेर पडायचे म्हटल्यावर पोलिसांची परवानगी हवी कशाला? कोण अडवणार आपल्याला? याच दिवशी नाही का देश स्वतंत्र झाला होता! त्याचा आनंद साजरा करायला कोण कशाला कोणाची परवानगी घेणार? नागपुरात दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या रॅली निघाल्या. घोषणा देत, जोराने ओरडत, हातातला तिरंगा उंच फडकावत या रॅलीतील तरुणांच्या झुंडी एका चौकात एकमेकांसमोर येऊन उभ्या ठाकल्या, तर आपल्यासारखेच देशभक्त बघून एकमेकांना रस्ता तरी द्यायचा ना त्या सर्वांनी? तर नाही! एकमेकांचा रस्ता अडवून बसले बेटे! सर्वांनाच जोर चढला होता. प्रकरण हमरीतुमरीवर येण्याची चिन्हे दिसू लागली. साहजिकच आहे, देशभक्तीत अग्रेसर कोण याची कसोटी लागल्याशिवाय देशभक्तांमधून पुढे आधी नेमके कुणी जायचे हे ठरणार कसे? त्यातला एक शहाणा तर शेजारच्या सिटी बसच्या टपावर जाऊन नाचू लागला. दोन गटांच्या वादात मुख्य रस्त्यावरची वाहतूक पुरती खोळंबली असताना, ती दुर्लक्षून काहींनी रस्त्यावरच ताल धरून नाचायला सुरुवात केली. पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या ‘सुजाण’ नागरिकांच्या राष्ट्रभक्तीला आवर घालत त्यांना एकमेकांपासून दूर नेत परिस्थिती सावरली. ज्यांच्या नेतृत्वात या रॅलींचे आयोजन झाले, त्यांना तर तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती. त्यांच्यासह काही लोकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. आणखी एका ठिकाणी डीजेचा आवाज भलामोठा करून धिंगाणा घालणार्‍या काही लोकांविरुद्धही गुन्हे दाखल करण्याची वेळ आली पोलिसांवर. अन् मग झिंग उतरली त्यांच्या राष्ट्रभक्तीची. अशी असते देशभक्ती? इतकी उथळ अन् तितकीच टाकाऊ? असले ओंगळवाणे प्रदर्शन मांडून घडवायचे असते त्याचे दर्शन? कायदा मोडीत टाकून, दुसर्‍यांची गैरसोय करत, इतरांचा विचारही न करता घातलेल्या धुडगुसाला स्वातंत्र्यदिन ‘साजरा’ करणे तरी कसे म्हणायचे? आताशा तर फॅशन झाली आहे, तरुणाईने अशा तर्‍हेने उन्माद मांडण्याची. क्रिकेटच्या मॅचमधला भारताचा विजय असो की मग गणतंत्रदिनाचा मुहूर्त. कुठल्याशा गल्लीतून चार-दोन तरुणांची टोळी निघते. मुख्य रस्त्यांवर येते. मग डबलसीटच्या नियमाचेही भान जपले जात नाही, की त्यांच्या बेभान होत ओरडण्याला मर्यादाही राहात नाही. अशा रॅलीतून एकत्र निघाले की मग वाहनांच्या वेगावर नियंत्रण राखण्याचीही गरज इथे कुणाला वाटत नाही. बरं टोळी राष्ट्रभक्तांची असल्याने आणि राष्ट्रभक्तीचे प्रदर्शन घडवून ते या देशावर जणू उपकारच करीत असल्याने त्यांना कुणी अडविण्याचाही प्रश्‍नच शिल्लक राहात नाही. त्यामुळे हे लोक रस्त्यावर उतरले की बाजूला होत यांना रस्ता मोकळा करून देणे एवढेच काय ते शिल्लक राहाते सर्वसामान्यजनांच्या. या सामान्यजनांची चूक एवढीच की मनात राष्ट्रभक्तीचा भाव असला तरी धिंगाणा घालत त्याचे असले ओंगळवाणे प्रदर्शन मांडणे त्यांना जमत नाही. मनातला हा भाव त्यांच्या कृतीतून सतत झळकत असतो. ते चौकावरच्या ट्राफिक सिग्नलचा नियम मोडून भुर्रकन् निघून जात नाहीत कधी अन् हातातल्या चॉकलेटचे रॅपर भर रस्त्यावर फेकत नाहीत ते कधी. उशिरा येऊन रांग मोडून पुढे जाण्यासाठी मुजोरीही करीत नाहीत ते, किंवा मग देशभक्ती अशी उफाळून यायला कुठलासा मुहूर्तही लागत नाही त्यांना. ध्वज अन् राज्यघटनेचा पूर्ण सन्मान राखत वागतात, जगतात ते! सिनेमा थेटर असो की मग क्रिकेटचे मैदान. राष्ट्रगीताची धून सुरू असताना टवाळक्या करीत नाहीत ते. जे कायम देशभक्तीचा भाव मनात जपतात त्यांना त्याचे असले प्रदर्शन मांडण्याची गरज नसते. समाजातला एक वर्ग हा मुहूर्त साधून धुडगूस घालण्यात रमलेला असताना रक्तदान शिबिराचे आयोजन करून आदर्श निर्माण करण्यात गुंतलेली असते काही मंडळी. पण दुर्दैव असे की माध्यम जगतातील बातम्यांमध्ये त्यांचे स्थान कुठल्याशा कोपर्‍यात अन् धिंगाणा घालणार्‍यांना मात्र जागा ‘टॉप’वर मिळालेली असते. हे दुर्दैव आमच्या समाजाचे अन् देशाचेही आहे. आमच्या आवडी-निवडीचा दर्जाच मुळात सुमार आहे. म्हणूनच मग खर्‍या देशभक्तांच्या तुलनेत हे उपरे भाव खाऊन जातात. खर्‍या भावभक्तीला इथे काडीचीही किंमत मिळत नाही अन् प्रदर्शनासाठी मांडलेला देशभक्तीचा देखावा मात्र भाव खाऊन जातो. या तरुणाईला तरी काय दोष द्यायचा? त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ कुणी, कधी समजावून सांगितला? सार्‍या कॉन्व्हेंट संस्कृतीची तर्‍हा तपासून बघा! नेमकी झेंडावंदनाच्या दिवशीच सुटी असते लहान मुलांना. ज्यांच्यावर संस्कार घडावेत, ज्यांना हौस असते, त्या लहानग्यांना शाळेत येऊच द्यायचे नाही अन् ज्यांना यायचेच नाही त्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना मात्र झेंडावंदानाला उपस्थित राहाण्याची सक्ती. लहानपणापासून सवय लागल्याशिवाय ध्वजारोहणाचे महत्त्व कळावे तरी कसे या पिढीला? म्हणूनच मग हवेत दिमाखात फडकणार्‍या तिरंग्याला सलामी देण्यापेक्षाही तो खांद्यावर घेऊन मिरवण्यात फुशारकी अन् राष्ट्रभक्तिपर गीतांपेक्षाही ‘शांताबाई’च्या तालावर थिरकण्यात मजा वाटू लागली आहे तरुणाईला. मुहूर्त स्वातंत्र्यदिनाचा असला तरीही. कारण त्यांच्या लेखी स्वातंत्र्याचे मोल तेवढेच आहे! दुर्दैवी असले तरी वास्तव हेच आहे. खरंच आहे. ‘‘मुफ्तमे मिली आझादीको बहोत सस्ता समझते है लोग!’’

No comments:

Post a Comment