Saturday, December 26, 2015

ऑनलाईन शॉपिंग

हे खरे आहे की, आपल्या देशातली करप्रणाली आणि व्यापार्‍यांची लुटारू वृत्ती यामुळे एखाद्या वस्तूची बाजारातील किंमत त्याच्या निर्मितीच्या मूळ किमतीशी कधीच मेळ खात नाही. बहुदा म्हणूनच कवडीमोल किमतीत तयार होणारी शीतपेये येथील बाजारात निर्मितीच्या शंभरपट किमतीत सर्रास विकली जातात! बहुदा म्हणूनच सार्वजनिक स्त्रोतांमधून मिळवलेल्या पाण्याची बॉटलही अवाच्या सवा दराने ग्राहकांच्या माथी मारली जाते. या बाबी आहेतच. त्यामुळेच बाजारभावापेक्षा स्वस्त दरात वस्तू उपलब्ध करून देण्याचे ऑनलाईन शॉपिंगवाल्यांचे दावे ग्राहकांना भुरळ घालताहेत. पण, या व्यवस्थेने जो धक्का इथल्या किरकोळ बाजाराला, अगदी बड्या मॉल्सलादेखील देणे आरंभिले आहे, ते पुढील काळात निर्माण होऊ घातलेल्या संकटांचे संकेत आहेत. मोठ्या शहरांतील मॉल्समधल्या वर्दळीवर त्याचा परिणाम होतोय्. छोट्या दुकानांना त्याचा फटका अधिकच जाणवतोय्. कुटुंबासहित बाजाराला जाण्याची मौजही ऑनलाईन शॉपिंगची नवी व्यवस्था हिरावून घेणार की काय, असे वाटू लागले आहे. बाजारात येणार्‍यांची संख्या कमी झाली तर त्याचा फटका केवळ दुकानदारांनाच नाही, तर या ग्राहकांच्या भरवशावर जगणार्‍या पार्किंगपासून तर चहावाल्यापर्यंत आणि कुठल्याशा कोपर्‍यात बसणार्‍या एखाद्या चांभारापासून तर पाणीपुरीवाल्यापर्यंत, सर्वांनाच तो सहन करावा लागणार आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील सहजीवनाच्या, एकमेकांना साह्यभूत ठरत त्यांना आधार देण्याच्या संकल्पनेला बसणारा तो मोठा धक्का असणार आहे. 
बाजारात जायची गरजच नाही. तिथं गेल्यावर गाडीच्या पार्किंगची झंझट, मग गर्दीतून मार्ग काढत रांगेत उभं राहणं, वस्तूंची निवड करण्यात वेळ दवडणं, मग बिलिंग, पैशाची देवाण-घेवाण, जरासे खाणे-पिणे, मग घराच्या दिशेने परतीचा प्रवास... छे! छे! ते म्हणतात यातलं काहीच करायचं नाही. बस्स! इंटरनेटवर जायचं. वेगवेगळ्या साईट्‌स धुंडाळायच्या. आपल्याला हव्या त्या वस्तूच्या चित्रावर क्लिक करायचं, ऑर्डर नोंदवायची, जमलंच तर पैसेही ‘कार्ड पेमेंट’ पद्धतीनं जमा करायचे. सारे काही घरबसल्या! आपल्या ऑर्डरची क्षणभरात नोंद होते. वस्तू केव्हा रवाना होईल, केव्हा पोहोचेल, याची माहिती मिळते. लोक खूश. अशी ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे, म्हटल्यावर घराबाहेर पडून शॉपिंगमध्ये कुणी कशाला वेळ घालवणार? तरुणाई तर जाम खूश आहे या व्यवस्थेमुळे. आधीच आयटीपुढे जगातल्या इतर सार्‍या गोष्टी थिट्या वाटणारी ही पिढी सार्‍या जगात जन्माला आली आहे सध्या. त्यात बोटांवर खेळता येईल असं इंटरनेटचं खुळखुळं प्रत्येकाच्या हाती लागलं आहे. त्याच्या वापराच्या वागवेगळ्या क्लृप्त्याही जगजाहीर होताहेत दरदिवसाला. इलेक्ट्रिकचं बिल, टेलिफोनचं बिल, विद्यापीठाचे अर्ज, रेल्वेचं तिकीट, हॉटेलचं रिझर्व्हेशन... सार्‍याच बाबी अशा घरातून बाहेर न पडताच फत्ते होऊ लागल्यात म्हटल्यावर, घराबाहेर पडण्याची तसदी घेणार कोण? त्यात आता भर पडतेय् ती ऑनलाईन मार्केटिंगची. कालपरवापर्यंत दूरचित्रवाणीवरच्या त्या टेलिशॉपिंगच्या जाहिरातींना कोण मूर्खजन प्रतिसाद देत असतील, असा भोळा प्रश्‍न चेहर्‍यावर घेऊन बसलेल्या भाबड्या समुदायासाठी ‘ऑनलाईन शॉपिंग’ नावाच्या व्यवस्थेने या देशातल्या बाजारपेठेवर मागील काळात घडवलेले परिणाम चकित करणारे ठरावेत.
खिशातल्या रुमालापासून तर पायातल्या जोड्यांपर्यंत, अंगात घालावयाच्या कपड्यांपासून तर दिवाणखान्यात सजवावयाच्या सोफ्यापर्यंत, स्वयंपाकघरातल्या भांड्यांपासून तर बेडरूममधल्या चादरींपर्यंत सर्वच वस्तू लोकांना घरपोच उपलब्ध करून देणार्‍या वेगवेगळ्या, बड्या व्यावसायिक संस्थांनी अक्षरश: धुमाकूळ घातलाय् सध्या भारतीय बाजारपेठेत. अगदी इतका की, ‘हा’ मार्ग सोडून प्रत्यक्षात बाजारात जाऊन खरेदी करणारे लोक मूर्ख ठरू लागलेत काहींच्या लेखी! या यंत्रणांमुळे इथल्या प्रचलित बाजारपेठेत निर्माण केलेली परिस्थिती केवळ गंभीरच नाही, तर चिंताजनक ठरणार आहे भविष्यात.
असल्या ऑनलाईन बाजाराची गरज आहे की नाही, त्याचा खरोखरीच उपयोग आहे की नाही, सध्याच्या स्पर्धेच्या, धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात ऑनलाईन शॉपिंग करणार्‍यांची संख्या सतत वाढत असताना, त्याच्या उपयोगितेवर कुणी प्रश्‍नचिन्ह उभे करावे का, या बाबी आहेतच. शिवाय निर्माता ते ग्राहक या दरम्यानची फळी मोडीत काढून या वस्तू विकल्या जात असल्याने, त्या स्वस्तातही विकता येताहेत संबधितांना. आता ग्राहकांना माल स्वस्तात मिळत असेल, तर त्यावर कुणी आक्षेप नोंदविण्याचा प्रश्‍नच नाही. पण, भारतीय अर्थव्यवस्था अशी कुणाच्या तरी एकाच्या फायद्याचा विचार करणारी कधीच राहिलेली नाही. पूर्वीच्या बारा बलुतेदारांची रचना बघितली तरी एकमेकांच्या साह्याने अर्थार्जन होईल आणि प्रत्येकाला व्यवस्थितपणे जीवन जगता येईल, अशीच ती व्यवस्था होती. आता वस्तूंच्या बदल्यात वस्तू पुरविणारी पद्धती अस्तित्वात नसली, प्रत्येक बाबतीत चुकारा पैशानं होऊ लागला असला, तरी सहजीवनपद्धती अद्याप हद्दपार झालेली नाही आपल्या समाजातून. त्यामुळे एकमेकांना सांभाळून घेणारी, साह्यभूत ठरणारीच भूमिका असते सर्वांची. मंदिराच्या सभोवताल लागणारी हार-फुलं-प्रसादाची दुकानं असोत वा मग बड्या बड्या संस्थांना चहाचा पुरवठा करणारा छोटासा टपरीवाला असो, एकमेकांच्या गरजा पूर्ण करत, साह्यभूत ठरत जगण्याचे मार्ग धुंडाळणारी ही व्यवस्था आहे. मात्र, ऑनलाईन शॉपिंगमुळे निर्माता ते ग्राहक या दरम्यानच्या मधल्या फळीचे उच्चाटन होऊ लागले आहे. भारतासारख्या देशाची विशाल लोकसंख्या लक्षात घेता, या प्रभावित फळीतील लोकांची संख्याही अतिशय मोठी आहे. म्हणूनच ऑनलाईन शॉपिंगचा परिणाम या पुढील काळात तीव्रतेने ‘जाणवणारा’ ठरणार आहे. त्या मालिकेतील लोक बेरोजगार होण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. आता कुठे इथले थोडेसेच लोक ऑनलाईन शॉपिंगच्या दिशेने वळले आहेत, अमेरिकेसारख्या देशाच्या तुलनेत तर हे प्रमाण अगदीच कमी आहे, तरीही त्याचा परिणाम धक्कादायक ठरतो आहे. पुढील काळात हे प्रमाण आणखी वाढले, तर त्याच्या किती घातक परिणामांना इथल्या व्यवस्थेला सामोरे जावे लागेल, याचा विचार होणे गरजेचे झाले आहे.
हे खरे आहे की, आपल्या देशातली करप्रणाली आणि व्यापार्‍यांची लुटारू वृत्ती यामुळे एखाद्या वस्तूची बाजारातील किंमत त्याच्या निर्मितीच्या मूळ किमतीशी कधीच मेळ खात नाही. बहुदा म्हणूनच कवडीमोल किमतीत तयार होणारी शीतपेये येथील बाजारात निर्मितीच्या शंभरपट किमतीत सर्रास विकली जातात! बहुदा म्हणूनच सार्वजनिक स्त्रोतांमधून मिळवलेल्या पाण्याची बॉटलही अवाच्या सवा दराने ग्राहकांच्या माथी मारली जाते. या बाबी आहेतच. त्यामुळेच बाजारभावापेक्षा स्वस्त दरात वस्तू उपलब्ध करून देण्याचे ऑनलाईन शॉपिंगवाल्यांचे दावे ग्राहकांना भुरळ घालताहेत. पण, या व्यवस्थेने जो धक्का इथल्या किरकोळ बाजाराला, अगदी बड्या मॉल्सलादेखील देणे आरंभिले आहे, ते पुढील काळात निर्माण होऊ घातलेल्या संकटांचे संकेत आहेत. मोठ्या शहरांतील मॉल्समधल्या वर्दळीवर त्याचा परिणाम होतोय्. छोट्या दुकानांना त्याचा फटका अधिकच जाणवतोय्. कुटुंबासहित बाजाराला जाण्याची मौजही ऑनलाईन शॉपिंगची नवी व्यवस्था हिरावून घेणार की काय, असे वाटू लागले आहे. बाजारात येणार्‍यांची संख्या कमी झाली तर त्याचा फटका केवळ दुकानदारांनाच नाही, तर या ग्राहकांच्या भरवशावर जगणार्‍या पार्किंगपासून तर चहावाल्यापर्यंत आणि कुठल्याशा कोपर्‍यात बसणार्‍या एखाद्या चांभारापासून तर पाणीपुरीवाल्यापर्यंत, सर्वांनाच तो सहन करावा लागणार आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील सहजीवनाच्या, एकमेकांना साह्यभूत ठरत त्यांना आधार देण्याच्या संकल्पनेला बसणारा तो मोठा धक्का असणार आहे.
दिल्लीतील मोबाईल, टीव्ही विक्रेत्यांनी नुकतीच आपापल्या कंपन्यांकडे मांडलेली कैफियत बरीच बोलकी आहे. ऑनलाईन शॉपिंगवाल्यांना कशा वस्तू स्वस्तात उपलब्ध करून देता आणि आम्हाला का महाग विकायला लावता? हे असंच सुरू राहिलं तर ‘आम्ही कसं जगायचं?’ असा त्यांचा सवाल आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय तरुणांनी कपडे विकत घेण्यासाठी स्वीकारलेला ऑनलाईन शॉपिंगचा मार्ग कापडाच्या छोट्या-छोट्या दुकानदारांना कसा फटका देऊन जातोय्, याचा गोहाटीतील अभ्यासाअंती जाहीर झालेला निष्कर्षही नेमका याच सवालाकडे अंगुलिनिर्देश करणारा आहे.
संख्या जराशी मोठी वाटत असली, तरी अजूनही एकूण लोकसंख्येच्या तुलनेत इंटरनेट वापरणार्‍यांचे प्रमाण या देशात कमी आहे. त्यापैकीही शंभर टक्के लोक सध्या ऑनलाईन शॉपिंगचा उपयोग करीत नाहीयेत्. असे असताना जर त्याचे परिणाम ‘जाणवू लागले’ असतील, तर मग ही संख्या आणखी वाढल्यावर परिस्थिती काय असेल, या धोक्याच्या संकेतांची नोंद आताच घ्यायला हवी. घरबसल्या या वस्तू उपलब्ध होऊ लागल्या आहेत हे खरेच, पण ‘कमी किंमत’ हे ऑनलाईन शॉपिंगला मिळणार्‍या प्रतिसादाचे आणखी एक मुख्य कारण आहे. करप्रणाली तयार करणारी यंत्रणा आणि नफाखोर व्यापारी या दोघांसाठीही ही धोक्याची घंटा आहे...

No comments:

Post a Comment