Saturday, December 12, 2015

सलमानला ‘न्याय’ मिळाला, नरुल्लाचं काय?

तब्बल तेरा वर्षे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयाने दिलेला ‘न्याय’ लोकांच्या नजरेत अविश्‍वसनीय ठरावा, हे कुणाचे अपयश आहे? न्यायालयाने जाहीर करूनही सलमान निर्दोष असल्याचे काही केल्या मनाला पटत नाही. हा कशाचा परिणाम आहे? हा निकाल अशा पद्धतीने आला, याचेही इथे कुणाला आश्‍चर्य वाटत नाही. उलट सलमानला शिक्षा झाली असती, तरच नवल ठरले असते, असे लोकांना का वाटावे? अपघात प्रकरणात अडकलेल्या सलमानला बखुटं धरून आणण्यापेक्षा त्याला जवळून बघायला मिळाल्याच्या आनंदात मग्न राहिलेली पोलिस यंत्रणा सबळ पुरावे गोळा करून त्याला गजाआड धाडतील, याबाबत लोकांच्या मनात सुरुवातीपासूनच शंका होती. परवाच्या निकालानंतर ती अधिक दृढ झाली. या सार्‍या त्रुटी फक्त सलमानच्याच प्रकरणात कशा ‘राहून जातात’ अन् सुट्यांच्या सवलतींचा पाऊस केवळ संजय दत्तवरच कसा बरसतो, हे कोडे काही सुटत नाही, आमच्यासारख्या पामरांना पडलेले! सलमान ‘पुराव्यांअभावी निर्दोष’ ठरविण्यात आला आहे. आरोपीच्या पिंजर्‍यात अशी बडी व्यक्ती उभी राहिली की पुरावे हमखास कमी कसे पडतात, हे कुतूहलही अजून तसेच राहिले आहे बघा आम्हा बापुड्यांच्या मनातले! 
भरधाव वेगातली एक गाडी रस्ता सोडून फुटपाथवरून सुसाट आली. तिथे झोपलेल्यांना चिरडून निघून गेली. त्यात एका मजुराचा मृत्यू झाला. काही लोक जखमी झाले. गाडी सलमान खान नावाचा, तमाम भारतीयांनी डोक्यावर घेतलेला, चित्रपटातला एक हिरो चालवत होता म्हणे! तब्बल तेरा वर्षे या प्रकरणी सुनावणी चालली. तेरा वर्षांनंतर ज्याला दोषी ठरवून सेशन कोर्टाने पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती, त्या सलमान खानला उच्च न्यायालयाने परवा ‘बाईज्जत’ बरी केले...
ज्या आधारे सेशन कोर्टाने दोषी ठरवले ते सलमानविरुद्धचे सारे मुद्दे सहा महिन्यांतच उच्च न्यायालयाने केराच्या टोपलीत टाकले. ‘पोलिसांनी योग्य पद्धतीने चौकशी केली नाही. योग्य पुरावे सादर केले नाहीत. दोषी ठरवण्याइतपत पुरावे सलमानविरुद्ध आढळले नाहीत,’ अशी कारणे न्यायालयाने या प्रकरणी पुढे केली आहेत. जनमानस आणि माध्यमांच्या दबावात न्यायालयाचे निर्णय ठरत नसतात, हेही न्यायाधीश महोदयांनी ठामपणे सांगितले आहे. चांगलं आहे. न्यायव्यवस्था अशीच असली पाहिजे. कुणालाही न जुमानणारी. कुणाच्याही दबावात काम न करणारी. पण मग या प्रकरणात सलमान नसेल, तर दोषी कोण आहे, हे तरी स्पष्ट व्हायला हवे ना!
एक अपघात घडून जातो, त्यात एक गरीब माणूस जीव गमावून बसतो. काही लोकांच्या वाट्याला कायमचे अपंगत्व येते. कुणीही त्यांच्या वार्‍याला उभे राहात नाही. कारण या अपघाताला कारणीभूत ठरलेली व्यक्ती श्रीमंत, प्रसिद्ध अशी सेलेब्रेटी असते.
या देशातली न्यायव्यवस्था सर्वसामान्यांच्या व्यक्तिगत जीवनात हस्तक्षेप करू लागली आहे की काय, अशी भीती मधल्या काळात वाटू लागली होती. कारण, त्याच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींबाबत न्यायालयच दिशादर्शन करू लागले होते. कोळसा घोटाळा, टू-जी घोटाळ्यातली न्यायव्यवस्थेची भूमिका किंवा मग ही व्यवस्था झुगारणार्‍या सहारा कंपनीच्या मालकाला फटकारण्याचा प्रकार बघितल्यानंतर न्यायव्यवस्थेबद्दल निर्माण होऊ लागलेली आदराची भावना संजय दत्त, सलमानच्या प्रकरणात लयाला जाते की काय, असे वाटू लागले आहे. अशी कशी संजय दत्तला कारागृहातून घरी जाण्याची परवानगी मिळते वारंवार अन् असा कसा सलमान निर्दोष सुटतो एवढ्या गंभीर प्रकरणात?
सलमानला निर्दोष मुक्त करण्याच्या न्यायालयाच्या निकालानंतर संपूर्ण भारतीय समाजात उमटलेल्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत. इथली न्यायव्यवस्था पैशानं विकली-विकत घेतली जाऊ शकते, असे सामान्य माणसाला वाटणे किंवा संजय दत्त-सलमान प्रकरणातला घटनाक्रम बघितल्यानंतर त्याची तशी भावना होणे, योग्य नाही. ‘बरं झालं आज सलमान निर्दोष सुटला, नाही तर पैशाच्या ताकदीवरचा माझा विश्‍वासच उडाला असता’, ही सोशल मीडियावरून फिरणारी टॅगलाईन बरीच बोलकी आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतात त्याप्रमाणे त्याचा प्रभाव निकालाच्या प्रक्रियेवर पडू नयेच, पण या प्रकरणात एकदा दोषी ठरवला गेलेला सलमान सहा महिन्यांतच निर्दोष कसा ठरतो, हे कोडे आहेच की! गाडी सलमान चालवत होता की आणखी कोणी हा प्रश्‍न नाहीच. मुद्दा हा आहे की, या घटनेत नरुल्ला नावाचा मजूर ठार झाला, तरी तेरा वर्षांनंतरही कारवाई कुणावरच झालेली नाही. आता ती होण्याची शक्यताही नाही. अशी कशी पोलिस यंत्रणा अन् अशी कशी इथली न्यायव्यवस्था?
गाडी सलमानच चालवीत असल्याची सुरुवातीला पोलिसांची खात्री पटते. मग ‘मी गाडी चालवत नव्हतो’, असे तो म्हणतो तर त्याच्यावरही न्यायालयाचा विश्‍वास बसतो! कारण गाडी सलमान चालवत होता, हे सिद्ध करण्याची जबाबदारी असलेली पोलिस यंत्रणा त्यात अपयशी ठरते. घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार मानल्या गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलच्या एकमेव साक्षीवर अवलंबून राहात सलमानला शिक्षा देणे न्यायालयाला मान्य नाही अन् सलमानच्या गाडीत उपस्थित असलेला गायक कमाल खान याची साक्ष पोलिसांनी नोंदविली नाही, याबाबतही कुणाला आक्षेप घ्यावासा वाटत नाही. या घटनेतला महत्त्वपूर्ण साक्षीदार असलेल्या रवींद्र पाटील याचे मृत्यू प्रकरणही इथे कुणालाच संशयास्पद वाटत नाही. गाडी सलमान चालवत नव्हता, तर मग कोण चालवत होता? की आपोआपच पळत होती त्याची गाडी? तो ड्रायव्हर कुठाय्? त्याचं नाव का नाही वदवून घेतलं पोलिसांनी इतक्या दिवसांत सलमानकडून. त्याला तरी शिक्षा झाली असती ना आतापर्यंत! पण तेही घडलेले नाही या प्रकरणात. हा सारा प्रकार बघितल्यानंतर सलमानची निर्दोष सुटका होईल याची तजवीज इथल्या यंत्रणेनेच तर केलेली नव्हती ना, असा प्रश्‍नही स्वाभविकच निर्माण होतो. हा प्रश्‍न अधिक घातक आहे. इथली यंत्रणा पैशापुढे लोळण घेते, आरोपी बडी आसामी असेल तर मग सारेच त्याच्यापुढे माना तुकवतात, इथे सेलेब्रेटींना कधीच शिक्षा होत नाही, झाली तरी ती नावापुरती असते, हा सर्वसामान्यांच्या मनातला समज अधिक पक्का करणारा तो सवाल आहे.
तब्बल तेरा वर्षे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयाने दिलेला ‘न्याय’ लोकांच्या नजरेत अविश्‍वसनीय ठरावा, हे कुणाचे अपयश आहे? न्यायालयाने जाहीर करूनही सलमान निर्दोष असल्याचे काही केल्या मनाला पटत नाही. हा कशाचा परिणाम आहे? हा निकाल अशा पद्धतीने आला, याचेही इथे कुणाला आश्‍चर्य वाटत नाही. उलट सलमानला शिक्षा झाली असती, तरच नवल ठरले असते, असे लोकांना का वाटावे? अपघात प्रकरणात अडकलेल्या सलमानला बखुटं धरून आणण्यापेक्षा त्याला जवळून बघायला मिळाल्याच्या आनंदात मग्न राहिलेली पोलिस यंत्रणा सबळ पुरावे गोळा करून त्याला गजाआड धाडतील, याबाबत लोकांच्या मनात सुरुवातीपासूनच शंका होती. परवाच्या निकालानंतर ती अधिक दृढ झाली. या सार्‍या त्रुटी फक्त सलमानच्याच प्रकरणात कशा ‘राहून जातात’ अन् सुट्यांच्या सवलतींचा पाऊस केवळ संजय दत्तवरच कसा बरसतो, हे कोडे काही सुटत नाही, आमच्यासारख्या पामरांना पडलेले! सलमान ‘पुराव्यांअभावी निर्दोष’ ठरविण्यात आला आहे. आरोपीच्या पिंजर्‍यात अशी बडी व्यक्ती उभी राहिली की पुरावे हमखास कमी कसे पडतात, हे कुतूहलही अजून तसेच राहिले आहे बघा आम्हा बापुड्यांच्या मनातले!
अपघात घडला. त्यात एक जण दगावला, इतर चार कायमचे अपंग झाले, तरी या प्रकरणात दोषी कोणीच नसल्याचा निष्कर्ष निघतो, निदान दोषी व्यक्तीपयर्ंंत पोहोचण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचे तरी स्पष्ट होते. सलमान नाही, मग दोषी कोण, हा प्रश्‍न आता तेरा वर्षांनंतर नव्याने उभा राहिला आहे. त्याचे उत्तर मिळण्याची शक्यता सुतराम नाही, याची जाणीव असतानाही, त्यांच्या बाजूने कुणीच उभे राहाणार नाही, याची पूर्ण खात्री असतानाही या प्रकरणात न्याय सलमानला मिळाला, असे ज्याला वाटायचे ते वाटू द्या, पण या अपघातात मृत पावलेल्या नरुल्लावर मात्र तेरा वर्षांच्या न्यायालयीन प्रकियेनंतरही अन्यायच झाला आहे, हे कोण नाकारू शकेल? कायद्याचा कीस पाडत सलमानवरील कारवाई टाळण्यात त्याच्या हुशार वकिलांना यश लाभले असले, तरी या अपघातामुळे कायम अपंगत्व वाट्याला आलेल्यांवर मात्र दुर्दैवाने अन्यायच झाला आहे. खंत फक्त एवढीच आहे की, कायद्यातील तरतुदींचा अगदीच व्यवस्थितपणे दुरुपयोग करून घेत सलमानला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणार्‍यांना या उपेक्षितांवरील अन्यायाची जराही दखल घ्यावीशी वाटत नाहीय्...

2 comments:

  1. पैसा बोलतोय सेलिब्रीटीजचे सर्व गुन्हे माफ होण्याच लाभकारी साधन झालय. भ्रष्टाचारावर वेसन घालणं अशक्यच. वकिलांची फौज उभी करून दिवसाला लाखो उडवणार्या सलमानसाठी पैसा, प्रशासन हातचा मळ होता. मूढ तर जनताच आहे जी अशांना डोक्यावर चढवते.

    ReplyDelete
  2. पैसा बोलतोय सेलिब्रीटीजचे सर्व गुन्हे माफ होण्याच लाभकारी साधन झालय. भ्रष्टाचारावर वेसन घालणं अशक्यच. वकिलांची फौज उभी करून दिवसाला लाखो उडवणार्या सलमानसाठी पैसा, प्रशासन हातचा मळ होता. मूढ तर जनताच आहे जी अशांना डोक्यावर चढवते.

    ReplyDelete