Wednesday, February 25, 2015

कर्नाड साहेब....

आम्ही बापुडे गोरगरीब लोक. आपण मोठे कलावंत. या क्षेत्रातली आपली जाण मोठीच. आपल्या अभिनयकौशल्याचेही भारी कौतुक आहे आमच्या मनात. त्यात आपली विचारसरणी डावी का उजवी, याचा विचारही कधी मनात येत नाही बघा आमच्या. पण परवा असल्या शिव्यांवरच्या बंदीला जेव्हा तुम्ही ‘उजव्या विचारांच्या प्रभावाचे फलित’ ठरवलंत, तेव्हा तुमच्यापुढे नतमस्तक होण्यावाचून पर्यायच उरला नाही आमच्यापुढे. तेव्हाच समाजातील शिव्याशापांचे आपल्या लेखी असलेले महत्त्वही कळले; आणि त्याचे साहित्यजगतातील स्थानही.....एरवी उगाच कुणाच्या तोंडून माय-बहिणीच्या शिव्या कानावर पडल्या की जीव गुदमरतो सभ्य लोकांचा. मूर्ख आहेत लेकाचे. या शिव्यांचे साहित्यवर्तुळातले महत्त्व ठावूक नसल्यामुळे होत असेल कदाचित तसे! पण आता तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाने समजावून सांगितल्यावर बदलतील बघा विचार त्यांचे. काळ बदलला याची खंत नाही कर्नाड साहेब, आपल्यासारखी जाणती माणसंही त्यांना मूर्ख ठरवायला निघाली आहेत, हे जास्त वेदनादायक आहे.

शिव्यांचे नैतिक समर्थन करीत, त्यास विरोध करणार्‍यांना पाऽऽर मूर्खांच्या बाजारात काढत, त्यांच्या थोबाडीत हाणत ज्येष्ठ कलावंत गिरीश कर्नाड यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे गोडवे नव्याने गायिले आहेत. साहित्याचा बाज राखणार्‍या (?) शिव्यांवर चित्रपट सेंसॉर बोर्डाने लादलेले बंधन आणि त्या माध्यमातून चालवलेल्या मॉरल पोलिसिंगलाही त्यांनी कडाडून विरोध केला आहे. शेक्सपिअरपासून तर अन्य जवळपास सर्वच बड्या साहित्यिकांनी आपल्या साहित्यात समाजातील प्रचलित शिव्यांचा सर्रास वापर केला आहे. त्यामुळे अशी बंदी लादली गेली, तर ते सारे साहित्य निकाली काढावे लागेल, असा युक्तिवादही गिरीश कर्नाडांनी साहित्यातील शिव्यांचे कडवे समर्थन करताना केला आहे.
झाले काय की, चित्रपटातल्या संवादातून अलीकडे शिव्यांचा वापर काहीसा वाढला आहे, असा ठपका ठेवत आपल्या सेंसॉर बोर्डाने चित्रपटात वापरू नयेत अशा शिव्यांची म्हणे एक यादीच तयार केली आहे. अपवाद वगळला तर अलीकडचे सारेच चित्रपट बघताना, आपले सेंसॉर बोर्ड काही काम करते की नाही, असा प्रश्‍न पडतो. कारण बोर्डाने पास केल्यावरही कित्येक ‘बोल्ड सीन्स’ चित्रपटात तसेच ‘राहून गेल्याचे’ जाणवते कित्येकदा. त्यामुळे असल्या दृश्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या किंवा ‘ए’ प्रमाणपत्र बहाल करून कुठलाही धिंगाणा सहजपणे घालू देणार्‍या सेंसॉर बोर्डाच्या सदस्यांच्या कार्यपद्धतीवर एरवीही प्रश्‍नचिन्ह आहेच. शिवाय असले बोल्ड सीन कायम ठेवून नुसत्या शिव्यांवर घातलेली बंदी तरी कुठल्या उपयोगाची, असा प्रश्‍नही उपस्थित होतोच. पण म्हणून काहीच करायचे नाही, असाही त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे चित्रपटातील कथानकातून अथवा संवादातून शिवीगाळ कमी करण्याच्या प्रयत्नांचे झाले तर समर्थन आणि कौतुकच व्हायला हवे.
पण जणू काय शिव्यांवर बंदी घालून मोठा कहरच केला असल्याच्या थाटात कर्नाड सेंसॉर बोर्डावर बरसलेत. परवा पुण्यात सेंसॉर बोर्डाच्या या निर्णयाला ‘मध्यमवर्गीय धर्मनिष्ठ’ ठरविताना गिरीश कर्नाडांची कथित ‘उच्चवर्गीय’ विचारसरणी काही लपून राहिली नाही. उजव्या विचारसरणीवर घसरण्याची संधी यानिमित्ताने कर्नाडांनी साधून घेतली, एवढाच खरं तर त्याचा अर्थ. मनात विचार आला, खरंच शिव्यांवरची बंदीही अशी ‘मध्यमवर्गीय’, ‘धर्मनिष्ठ’ वगैरे ठरू शकते? पण आता कर्नाडांनी ठरवलंय् म्हटल्यावर त्यावर आक्षेप कोण नोंदवणार? तेव्हा सेंसॉर बोर्डाच्या सदस्यांनो, खबरदार! यापुढं कुठल्याही वाईट गोष्टींवर बोट ठेवाल तर! चालू द्या जसं चाललंय् तसं. खजुराहोतल्या मूर्ती कायम ठेवता अन् साहित्यातल्या शिव्यांवर मात्र आक्षेप नोंदवता?

जिसके बम मे है दम, जो ददद है वो ददद ले, वरना ददद दुंगा.... अशाच काही वाक्यांबद्दल बोलताहात ना कर्नाड साहेब आपण? असल्या वाक्यांचा प्रचुर मात्रांत झालेला वापरच अपेक्षित आहे ना तुम्हाला? त्यातून साहित्याचा बाज अन् चित्रपटाचा दर्जा राखला जाईल, हा तुमच्या मनातला विश्‍वास खरंच कौतुकास्पदच आहे! शिवाय त्यातून आपले समाजमन ध्वनित होत असल्याचा तुमचा दावा कायम आहे तो आहेच. अधूनमधून असल्या शिव्या पेरल्या नाहीत तर चित्रपट लोकप्रिय ठरणार नसल्याचे आपले गणित सर्वसामान्यांना अनाकलनीय असले, तरी बहुधा तेच वास्तव असावे, असे वाटते. अलीकडच्या चित्रपटातील असल्या शिव्यांचा समावेश असलेल्या संवादाची फेक आणि गाण्यातील त्यांचा वापर बघितल्यानंतर आपल्या चिंतनाची खात्री पटते.
आम्ही बापुडे गोरगरीब लोक. आपण मोठे कलावंत. या क्षेत्रातली आपली जाण मोठीच. आपल्या अभिनयकौशल्याचेही भारी कौतुक आहे आमच्या मनात. त्यात आपली विचारसरणी डावी का उजवी, याचा विचारही कधी मनात येत नाही बघा आमच्या. पण परवा असल्या शिव्यांवरच्या बंदीला जेव्हा तुम्ही ‘उजव्या विचारांच्या प्रभावाचे फलित’ ठरवलंत, तेव्हा तुमच्यापुढे नतमस्तक होण्यावाचून पर्यायच उरला नाही आमच्यापुढे. तेव्हाच समाजातील शिव्याशापांचे आपल्या लेखी असलेले महत्त्वही कळले; आणि त्याचे साहित्यजगतातील स्थानही.....
एरवी उगाच कुणाच्या तोंडून माय-बहिणीच्या शिव्या कानावर पडल्या की जीव गुदमरतो सभ्य लोकांचा. मूर्ख आहेत लेकाचे. या शिव्यांचे साहित्यवर्तुळातले महत्त्व ठावूक नसल्यामुळे होत असेल कदाचित तसे! पण आता तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाने समजावून सांगितल्यावर बदलतील बघा विचार त्यांचे. काय कमाल आहे ना कर्नाड साहेब, बहुधा काळाचा महिमा असावा तो. गुलाबाची दोन फुलं वार्‍याची एक झुळूक आली की एकमेकांना भिडलेली दाखवत प्रेमी युगुलांच्या मिलनाचा संदेश देणारी ती जुनी माणसं मूर्ख ठरतील पडद्यावरील आताच्या लॉंग किसच्या जमान्यात. काळ बदलला याची खंत नाही कर्नाड साहेब, आपल्यासारखी जाणती माणसंही त्यांना मूर्ख ठरवायला निघाली आहेत, हे जास्त वेदनादायक आहे.
कुटुंबातील लोकांनी एकत्र बसून बघावेत असे चित्रपट निघत नाहीयेत् अलीकडे. संवाद आणि गीतांतील शब्द आणि त्याच्या दर्जाबद्दल काय बोलावे? आणि आता तर तुम्ही शिव्यांचेही समर्थन करायला निघालात. चित्रपटाचे विषय, कथानक, पटकथा, संवाद, अभिनय, गीते यापेक्षाही आपल्यालेखी शिव्यांचे महत्त्व अधिक असल्याची बाब खरंच आश्‍चर्यजनक आहे कर्नाड साहेब! आपले मोठेपण मान्य असूनही अन् आपल्या विचारांचे डावेपण कबूल असूनही आपले हे मत मात्र काही केल्या मान्य होत नाहीय् बघा!

No comments:

Post a Comment