Friday, April 29, 2016

लाचखोर कॉंग्रेसची मुजोरी!

ज्यांनी कोळशापासून तर अटलाण्टापर्यंत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले, ज्यांनी टुजीपासून तर कॉमन वेल्थ गेम्सपर्यंत सर्वदूर खाबूगिरी केली, त्यांना ३६० कोटींच्या लाचेच्या प्रकरणाची जराही भीती न वाटणे हे तर ओघानेच आले. ज्यांनी कालपर्यंत कित्येक कोटींचे घोटाळे अगदी सहज पचवले, त्यांनी परवाच्या या आरोपांनी आपण जराही घाबरलेलो नसल्याचे छातीठोकपणे सांगणे यात नवल ते नाहीच! पण, त्यांनी या देशातील जनतेला गृहीत धरण्याची बाब मात्र आक्षेपार्ह आहे. आम्ही काय करायचे ते केले, पण आमच्यावर आरोप कराल तर याद राखा, अशा आशयाची भाषा कुणाच्या तोंडी येणे, हे त्यांनी इथल्या सर्वसामान्य माणसाला गृहीत धरण्याचाच प्रकार आहे. इथे अस्तित्वात असलेली लोकशाही व्यवस्था अव्हेरण्याचाही तो एक भाग आहे. कुठल्याही प्रकरणात इतर कुणाचेही नाव गोवले गेले तरी कुणाचेच काही बिघडत नाही. अगदी पंतप्रधानपदावर असताना डॉ. मनमोहनसिंगांचे नाव कोळसा घोटाळ्यात चर्चेत आले, तरी कुणालाच त्यात आक्षेपार्ह वाटले नाही. पण, हेच नेहरू-गांधी घराण्याशी संबंधित व्यक्तीबाबत घडले की, मात्र या पक्षातील प्रत्येकाचेच पित्त खवळते. राजाच्या बचावार्थ रिंगणात उतरणार्‍या प्याद्यांची संख्या मग अचानक वाढते. इटलीतील न्यायालयात उघडकीस आलेले सत्य मांडण्याचा प्रयत्न केला, तरी कॉंग्रेसच्या नेत्यांना खपत नाही? तसला प्रयत्न करणार्‍याची मुस्कटदाबी करण्यासाठी सरसावतात एकजात सारे? वर पुन्हा, आपण कुणालाच घाबरत नसल्याचा तोरा असतो त्यांच्या बोलण्यात? कुणाच्या जिवावर चालली आहे सोनिया आणि त्यांच्या चमच्यांची ही मुजोरी?
‘‘मी कुणालाच घाबरत नाही!’’ -ही सोनियांच्या मुखातून उद्धृत झालेली भाषा केवळ मुजोरीची नाही, ती कॉंग्रेसच्या नैसर्गिक स्वभावाची निदर्शक आहे. ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदीत भारतातील काही लोकांना लाच देण्यात आल्याच्या प्रकरणात, इटलीतील न्यायालयात चर्चेत आलेली काही नावे कॉंग्रेस पक्षातील सोनिया, अहमद पटेलांसह इतर काही नेत्यांच्या भोवती फिरणारी आहेत. हा काही विरोधकांनी केलेला राजकीय आरोप नाही, की त्यांना अडचणीत आणण्यासाठी कॉंग्रेस पक्षातूनच कुणी उलटवलेला डाव नाही. दस्तुरखुद्द सोनियांच्या माहेरदेशातील न्यायव्यवस्थेतून उघडकीस आलेले ते धडधडीत सत्य आहे! कोट्यवधीच्या या व्यवहारात लाच देणारी माणसं इटलीत शिक्षा भोगताहेत, तर मग ती लाच स्वीकारणार्‍या भारतातील कुणावरच काहीच कारवाई का होत नाही, हा खरा सवाल आहे. पण, या बोचर्‍या प्रश्‍नाचे उत्तर देण्याची जबाबदारी टाळून, आपण कुणालाच भीक घालत नसल्याची माजोरी भाषा सध्या सोनिया बोलताहेत. 
जिथली एकतृतीयांश जनता दारिद्र्यरेषेखालील जीवन जगते, त्या देशातल्या गोरगरिबांचे प्रतिनिधित्व करणार्‍या राजकीय नेत्यांची हौस फिटवण्याकरिता त्यांच्या हवाई सफरीसाठी महागडे, अलिशान हेलिकॉप्टर्स विकत घेण्याचा निर्णय होतो. त्यासाठी नेमक्या इटलीतील कंपनीशी सौदा होतो. सौदा झाला तेव्हा सत्तेत नेमकी कॉंग्रेस असते अन् त्या पक्षाचे अध्यक्षपद सोनियांकडे असते आणि सोनियांचे नाते नेमक्या त्याच इटलीशी असते... हा सारा योगायोग कुणी जाणीवपूर्वक जुळवून आणलेला नाही. सौदा झाला हे खरे आहे नि लाच दिली-घेतली गेल्याचा आरोप तर खुद्द इटलीतील न्यायालयात सिद्ध झाला आहे! ज्या व्यवहारात तब्बल ३६० कोटी रुपयांची लाच दिली गेली, तो सौदा किती मोठा असेल, याची कल्पना करा. इतक्या मोठ्या रकमेची लाच दिली म्हणून इटलीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताहेत. प्रकरण न्यायालयात दाखल झाले आहे. तिकडे चर्चा होईपर्यंत इकडे कुणाला कानोकान खबरही होत नाही. पण, प्रकरणे दाबण्याची इकडच्यासारखी व्यवस्था नसल्याने तिकडे इटलीत मात्र त्यावर विस्तृत चर्चा झाली; आणि कित्येकांचे पितळ उघडे पडण्याची वेळ आली. 
नेत्यांच्या हवाई सफरीसाठी महागडे हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याची खरंच काही गरज होती का, सौदा किती मोठा होता, लाचेची रक्कम नेमकी कुणाचे खिसे गरम करून गेली... असल्या प्रश्‍नांची सरबत्ती तर ओघाने होईलच; पण एकूणच या सार्‍या प्रकरणात कॉंग्रेस पक्षाने आणि खुद्द सोनियांनी ज्या मुजोरीचा प्रयोग चालवला आहे, तो खरोखरीच आक्षेपार्ह आहे. लोकशाही व्यवस्थेत, सत्ताधारी कुणालाच घाबरत नसल्याची भाषा बोलत असतील, तर त्याला मुजोरी नाही तर काय म्हणायचे? याबाबत सुब्रह्मण्यम् स्वामींनी संसदेत काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना बोलूच न देण्याची, सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची तर्‍हा या पक्षाचे नेते अनुसरतात. हा तमाशा नेमका कशासाठी चाललाय्, हे चाणाक्ष लोकांच्या केव्हाच ध्यानात आले आहे. पण, ‘सौ चुहें खाके बिल्ली हजला जाण्याची’ जी कॉंग्रेसी नौटंकी सध्या सुरू आहे, त्यावरून इटलीच्या न्यायालयातील चर्चा खरी असल्याची ग्वाहीच अप्रत्यक्षपणे मिळू लागली आहे. 
ज्यांनी कोळशापासून तर अटलाण्टापर्यंत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले, ज्यांनी टुजीपासून तर कॉमन वेल्थ गेम्सपर्यंत सर्वदूर खाबूगिरी केली, त्यांना ३६० कोटींच्या लाचेच्या प्रकरणाची जराही भीती न वाटणे हे तर ओघानेच आले. ज्यांनी कालपर्यंत कित्येक कोटींचे घोटाळे अगदी सहज पचवले, त्यांनी परवाच्या या आरोपांनी आपण जराही घाबरलेलो नसल्याचे छातीठोकपणे सांगणे यात नवल ते नाहीच! पण, त्यांनी या देशातील जनतेला गृहीत धरण्याची बाब मात्र आक्षेपार्ह आहे. आम्ही काय करायचे ते केले, पण आमच्यावर आरोप कराल तर याद राखा, अशा आशयाची भाषा कुणाच्या तोंडी येणे, हे त्यांनी इथल्या सर्वसामान्य माणसाला गृहीत धरण्याचाच प्रकार आहे. इथे अस्तित्वात असलेली लोकशाही व्यवस्था अव्हेरण्याचाही तो एक भाग आहे. कुठल्याही प्रकरणात इतर कुणाचेही नाव गोवले गेले तरी कुणाचेच काही बिघडत नाही. अगदी पंतप्रधानपदावर असताना डॉ. मनमोहनसिंगांचे नाव कोळसा घोटाळ्यात चर्चेत आले, तरी कुणालाच त्यात आक्षेपार्ह वाटले नाही. पण, हेच नेहरू-गांधी घराण्याशी संबंधित व्यक्तीबाबत घडले की, मात्र या पक्षातील प्रत्येकाचेच पित्त खवळते. राजाच्या बचावार्थ रिंगणात उतरणार्‍या प्याद्यांची संख्या मग अचानक वाढते. इटलीतील न्यायालयात उघडकीस आलेले सत्य मांडण्याचा प्रयत्न केला, तरी कॉंग्रेसच्या नेत्यांना खपत नाही? तसला प्रयत्न करणार्‍याची मुस्कटदाबी करण्यासाठी सरसावतात एकजात सारे? वर पुन्हा, आपण कुणालाच घाबरत नसल्याचा तोरा असतो त्यांच्या बोलण्यात? कुणाच्या जिवावर चालली आहे सोनिया आणि त्यांच्या चमच्यांची ही मुजोरी? कुणासाठी खरेदी झाले हे हेलिकॉप्टर्स? जनतेच्या जिवावर मौज करणार्‍या नेत्यांसाठी? जिथे लक्षावधी लोकांना एकवेळच्या खाण्याची ददात आहे, त्या देशातल्या नेत्यांना ही चैन परवडते तरी कशी? आणि आता लाचेच्या प्रकरणाची चर्चाही झालेली नकोय् यांना? 
तसेही या घराण्यातल्या प्रत्येकालाच हा देश आपली खाजगी मालमत्ता वाटत राहिला आहे. त्या भावनेतूनच त्यांनी किमान पाच दशकं इथला कारभार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या चालवला. तो कारभार चालवताना ना इथल्या राजकीय विरोधकांची त्यांनी कधी तमा बाळगली, ना इथल्या सामान्य माणसाचे हित त्यांनी कधी जपले. बहुधा त्यामुळेच की काय, पण त्यांच्या सत्तेच्या काळात ‘गरिबी हटाव’चा नारा दिला गेला वेगळ्याच लोकांसाठी आणि प्रत्यक्षात श्रीमंती लाभली ती वेगळ्याच समूहाला! राज्यघटनेची सतत ग्वाही देत इथले कायदे पायदळी तुडवताना तर त्यांनी कशाचीच पत्रास बाळगली नाही. ना कॉंग्रेस पक्षाच्या तिजोरीतून नॅशनल हेरॉल्डला पाचशे कोटी रुपये काढून देताना त्यांना काही वावगे वाटले, ना देशातील इतर नेत्यांच्या बरोबरीने रॉबर्ट वढेरांना उच्च दर्जाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात त्यांना कधी काही गैर वाटले. आता अटलाण्टा प्रकरणात लाच स्वीकारली जाण्याची बाबही त्यांना त्याच सहज वळणार न्यायची आहे. जणू यात फारसे महत्त्वाचे काहीही घडलेले नसल्याचे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. यातील धगधगते वास्तव कवडीमोल ठरवण्याचा हा डाव आहे. राजकीय वळण देत या सौद्यामागे दडलेल्या ‘व्यवहाराचे’ गांभीर्य नष्ट करण्याचे हे षडयंत्र आहे. हे करतानाही यांची भाषा मगरुरीची आहे. इथली व्यवस्था, इथली यंत्रणा, इथले कायदे न जुमानण्याची माजोरी त्यातून ध्वनित होते. इटलीतील न्यायव्यवस्था काही भारत सरकार नियंत्रित करीत नाही. उलट, जोडलेच जायचे असतील तर इटलीशी संंबंध सोनियांचेच जोडले जाऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर, तिथल्या न्यायालयातील चर्चेचे संदर्भ भारतातील तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाशी आणि त्याच्या शीर्षस्थ नेत्यांशी जोडले जात असतील आणि तरीही ती चर्चा, त्यातील आरोप, तथ्य फालतू ठरवण्याचे प्रयत्न कुणी करत असेल, तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी ही भूमिका स्वीकारणे समजण्यासारखे आहे. पण, मग पुढारलेपण मिरवणार्‍या आणि सध्याच्या सरकारच्या सर्जनशीलतेवर ऊठसूट प्रश्‍न उपस्थित करणार्‍या कथित पुरोगाम्यांचे काय? या प्रकरणी ते आवाज उठवणार, की त्यांनाही कॉंग्रेसची मुजोरी मान्य आहे, हेही स्पष्ट झाले पाहिजे... 

Friday, April 15, 2016

क्रिकेट चालू द्या, आम्हीच जगणे थांबवतो!

तसेही क्रिकेट बंद करून कसं चालेल? तो तर तुमच्या-आमच्या- सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय! राहिला प्रश्‍न आम्हा दुष्काळग्रस्तांचा, तर आमचं आम्ही बघून घेऊ. गरज पडली तर आम्ही आमचं जगणं थांबवू. पण, क्रिकेटचा खेळ कुठल्याही अडथळ्याविना पार पडला पाहिजे. दुष्काळाचा क्रिकेटशी काय संबंध, असा प्रश्‍न आपणच विचारू शकता गावस्करसाहेब. मूर्ख आहेत ते लोक, जे मराठवाड्यातल्या पाण्याच्या दुर्भिक्षाने अस्वस्थ होत कोर्टात धाव घेताहेत. बळीराजाच्या नशिबी आलेल्या वेदना त्यांनी न्यायालयात मांडल्या म्हणून निदान इथे दुष्काळ असल्याची जाणीव तरी सार्‍या देशाला झाली. अन्यथा लोक तसेही तुमच्या संगतीने क्रिकेटच्या रंगात रंगायला तयार झाले आहेतच. पावसाच्या बरसण्याचं काय, नंतरही बघता येईल कधीतरी. क्रिकेटच्या मैदानावरील चौकार, षट्‌कारांची बरसात अधिक महत्त्वाची, नाही का द्रविडसाहेब?खरे आहे गावस्करसाहेब तुमचे म्हणणे. काही लोक ऊठसूठ त्या आयपीएलच्या मागे लागतात. काय आहे ना साहेब, आयपीएल हा इथल्या काही लोकांनी मांडलेला क्रिकेटचा बाजार असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. त्या आडून लोकांच्या क्रिकेटवेडाचा गैरफायदा उठवण्याचा कुणाचातरी डावही एव्हाना जगजाहीर झाला आहे. मूठभर लोकांचे त्यातून साधणारे हितही आताशा उजेडात आले आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळ दुर्लक्षून, चाललेला क्रिकेटचा बाजार निदान कडक उन्हाळ्यात तरी इथून इतरत्र हलवावा, या न्यायालयाच्या आदेशावरून, सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड या क्रिकेटपटूंचा झालेला तिळपापड अनाकलनीय आणि बराच बोलकाही आहे. याच राज्यातले रहिवासी असूनही, इथल्या दुष्काळाबाबतची त्यांची ही कोरडी भूमिका दुर्दैवी अन् तेवढीच असमर्थनीय आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एकीकडे चित्रपटजगतातील काही ‘नाम’वंतांना डोळ्यांतले अश्रू आवरता आवरत नाहीयेत्. दुष्काळ पाचवीला पूजलेल्या शेतकर्‍यांच्या वाट्याला आलेल्या आत्महत्येच्या परिस्थितीने त्यांची मनं हेलावली आहेत. असे असताना, या राज्यातल्या क्रिकेटजगतातील लोकांना मात्र, एखाद्या सामन्यातून मिळालेली रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीत जमा करण्याची सूचना करण्याची वेळ न्यायालयावर येते, याहून दुर्दैव दुसरे ते काय असणार? त्यामुळे, गावस्कर अन् द्रविडसाहेब, तुम्ही चालू द्या तुमचा खेळ. तसेही क्रिकेट बंद करून कसं चालेल? तो तर तुमच्या-आमच्या- सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय! राहिला प्रश्‍न आम्हा दुष्काळग्रस्तांचा, तर आमचं आम्ही बघून घेऊ. गरज पडली तर आम्ही आमचं जगणं थांबवू. पण, क्रिकेटचा खेळ कुठल्याही अडथळ्याविना पार पडला पाहिजे. दुष्काळाचा क्रिकेटशी काय संबंध, असा प्रश्‍न आपणच विचारू शकता गावस्करसाहेब. मूर्ख आहेत ते लोक, जे मराठवाड्यातल्या पाण्याच्या दुर्भिक्षाने अस्वस्थ होत कोर्टात धाव घेताहेत. बळीराजाच्या नशिबी आलेल्या वेदना त्यांनी न्यायालयात मांडल्या म्हणून निदान इथे दुष्काळ असल्याची जाणीव तरी सार्‍या देशाला झाली. अन्यथा लोक तसेही तुमच्या संगतीने क्रिकेटच्या रंगात रंगायला तयार झाले आहेतच. पावसाच्या बरसण्याचं काय, नंतरही बघता येईल कधीतरी. क्रिकेटच्या मैदानावरील चौकार, षट्‌कारांची बरसात अधिक महत्त्वाची, नाही का द्रविडसाहेब?
खरे आहे गावस्करसाहेब तुमचे म्हणणे. काही लोक ऊठसूठ त्या आयपीएलच्या मागे लागतात. काय आहे ना साहेब, आयपीएल हा इथल्या काही लोकांनी मांडलेला क्रिकेटचा बाजार असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. त्या आडून लोकांच्या क्रिकेटवेडाचा गैरफायदा उठवण्याचा कुणाचातरी डावही एव्हाना जगजाहीर झाला आहे. मूठभर लोकांचे त्यातून साधणारे हितही आताशा उजेडात आले आहे. क्रिकेटपायी वेडे होणारे लोक आम्ही. पण, या देशातल्या राजकारण, उद्योग आणि चित्रपटजगतातील काही लोकांनी पाऽऽर धंदा करून टाकला आमच्या त्या वेडाचा. या धंद्यामुळे खिसे भरून वाहू लागलेला पैशाचा ओघच त्यांना सभोवतालची दुष्काळी परिस्थिती विसरायला भाग पाडतो. ज्याची जगाच्या पाठीवर कुठेही नोंद होत नाही, अशा आयपीएलचा एक सामना इथून दुसरीकडे गेला, तर राज्याच्या तिजोरीत जाणार्‍या कराचे नुकसान होईल ही भाषा, क्रिकेटच्या धंद्यातून कमावलेल्या पैशातूनच कुणाच्यातरी तोंडी आली आहे. ‘‘राज्यातला दुष्काळ गंभीरच. त्यामुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या करावी ही बाबही दुर्दैवीच. पण त्याचा क्रिकेटशी काय संबंध?’’ हा गावस्करांना पडलेला प्रश्‍न क्रिकेटपटूंचे कोडगेपणा स्पष्ट करणारा आहे. तसं पाहिलं तर मग मुंबईत राहणार्‍या नाना पाटेकरांचा तरी मराठवाड्यातल्या दुष्काळाशी काय संबंध? पण, उगाच टेन्शन घेतात ते तिथल्या दुष्काळी परिस्थितीचं. उगाच जीव कासावीस होतो त्यांचा शेतकर्‍यांच्या विधवांचे उदासवाणे चेहरे बघितले की. त्यांना नाही ना जमलं साहेब, तुमच्यासारखं कोडगेपणानं वागत आपल्याच विश्‍वात रमणं. त्यामुळे तुम्ही चालू द्या तुमचं. शेतकर्‍याचं काय, तो मेला तरी चालेल, पण क्रिकेट कुठल्याही स्थितीत बंद पडता कामा नये. लोडशेडिंगमुळे गावंच्या गावं अंधारात राहिली तरी चालतील, पण क्रिकेटचा खेळ रात्रीच्या वेळी लख्ख उजेडातच व्हायला हवा. इकडे पिण्यासाठी पाणी नसलं तरी चालेल, पाण्यासाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीवर लाठ्या बरसविण्याची वेळ पोलिसांवर आली तरी चालेल, पण बीअर तयार करणार्‍या कारखान्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, याची काळजी प्रशासनातले अधिकारी घेतातच की! सामान्य माणसावर उद्भवलेल्या परिस्थितीशी त्यांनातरी कुठे काय घेणेदेणे असते? तुमचाही सवाल थोड्याफार फरकाने त्याच वळणावर जाणारा आहे. स्वत:च्याच विश्‍वात रमलेल्या, उर्वरित जगाशी नाते नसलेल्या लोकांच्या तोंडी शोभावा असा. 
गेल्या तीन वर्षांपासून या सार्‍या परिसरावर निसर्गाची अवकृपा होतेय्. पाऊस नेहमीपेक्षा कमी पडतोय्. जेव्हा हवा, नेमका तेव्हा तो येत नाही आणि जेव्हा नको तेव्हा मात्र तो हमखास बरसतो. पेरण्यांच्या वेळी बरसावा म्हणून आस लावून बसावं, तर तो खात्रीने दगा देतो अन् कापणीच्या वेळी नको असताना मात्र तो तेवढ्याच दमदारपणे धो धो कोसळतो. यात कुणाचाच दोष नाही हे मान्यच. निसर्गाचा लहरीपणा मानवी शक्तीच्या मर्यादेपलीकडचा आहे, हेही खरंच. पण, उद्भवलेल्या स्थितीत कसं वागायचं, हे ठरवणं तर माणसांच्या हातात आहेच ना, गावस्कर सर! तुम्ही मुंबईत राहा की खान्देशात. चित्रपटक्षेत्रात वावरा की मग क्रिकेटच्या. पण, प्राप्त परिस्थितीत माणूस म्हणून कसं वागायचं, हे तर ठरवता आलं पाहिजेच ना प्रत्येकाला? माणसांना माणुसकीच्या पातळीवर उतरता आलं ना, की मग दुष्काळाचा क्रिकेटच्या खेळाशी काय संबंध, हा प्रश्‍नच मनात उद्भवणार नाही इथे कुणाच्या. अडचणीत असलेल्या समाजातल्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचीच भाषा असेल प्रत्येकाच्या ओठावर. त्यांना मदत करा, हे सांगायला मग कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाची गरज उरणार नाही. आणि खरंच सांगा गावस्कर, द्रविडसाहेब, त्या पाटेकरांच्या नाना अन् अनासपुरेंच्या मकरंदाला तरी कोणत्या न्यायालयाने आदेश दिलेत हो, दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याचे? अलीकडच्या काळात कित्येक सामाजिक संस्था सरसावल्या आहेत शेतकर्‍यांच्या मदतीसाठी, न्यायालयाने एका शब्दाने त्यांना काही सुचवलेले नसताना; आणि लोकांच्या जिवावर कोट्यवधी रुपये कमावणार्‍या क्रिकेट संस्थांना मात्र दुष्काळग्रस्तांना मदत करा, असे सांगावे लागते न्यायालयाला? परिस्थिती लक्षात घेऊन चार-दोन सामने दुसरीकडे घ्यायला सांगितलं तर एवढा संताप व्हावा या राज्यातल्या क्रिकेटपटूंचा? ज्यांना या महाराष्ट्रानं ‘आपले’ खेळाडू म्हणून कायम डोक्यावर घेतलं, त्यांच्या लेखी त्यांच्या महाराष्ट्रातली दुष्काळाची गंभीर स्थिती इतकी कवडीमोल ठरावी, ही बाब दुर्दैवीच म्हटली पाहिजे आणि राहिला प्रश्‍न आयपीएलचे सामने दरवेळी वादग्रस्त ठरवले जाण्याचा, तर त्याला जबाबदार कोण, याचा शोध या क्रिकेटपटूंनीच घेतला पाहिजे. आज दुष्काळी परिस्थिती मराठवाड्यात उद्भवली असली, तरी त्याचा सामना करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्याचा क्रिकेटशी काय संबंध, क्रिकेटची मॅच न खेळल्याने प्रश्‍न सुटतील का, असले प्रतिप्रश्‍न विचारण्याची ही वेळ नव्हे. सार्‍या जगाचा पोशिंदा आपल्या अस्तित्वाची लढई लढत असताना, त्याच्या वेदना अव्हेरून कुणाला क्रिकेटच्या आनंदात रममाण व्हावेसे वाटणे, केवळ अयोग्यच. आम्ही ज्यांना कायम डोक्यावर घेतले, त्या जबाबदार क्रिकेटपटूंकडून तरी असले वागणे अपेक्षित नाही. अन्यथा, तुम्ही कशाला क्रिकेट खेळणे थांबवता, आम्हीच आमचे जगणे थांबवतो, असे म्हणण्याची वेळ दुष्काळग्रस्तांवर येईल...! 

Saturday, April 9, 2016

दुष्काळाच्या तोंडावर आयपीएलची दिवाळी

क्रिकेटला कुणाचाच विरोध नाही. क्रिकेटच काय, त्याच्या पवार-ललित मोदींनी मांडलेल्या बाजारालाही कुणाचा विरोध नाही. अगदी पवारांच्या पुढाकाराने परवा बारामतीतील स्टेडियमच्या उद्घाटनाचा शानदार सोहळा पार पडला त्यालाही कुणाची आडकाठी नाही. पण मग मराठवाड्यातल्या दुष्काळाची चिंता कोणी वाहायची? एकट्या मुख्यमंत्र्यांनी? दुष्काळाच्या या परिस्थितीत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या अन्य मंत्र्यांनी जिवाचे रान करायचे अन् शरद पवारांनी बारामतीत सचिन तेंडुलकर अन् रहाणेच्या उपस्थितीत स्टेडियमच्या उद्घाटनाच्या सोहळ्यात वेळ घालवायचा? राधाकृष्ण विखे पाटलांनी राजकीय आरोपांची पतंगबाजी करायची? शेवटी या प्रकरणात न्यायालयाला भावना व्यक्त करावी लागली. सामना होणारच असेल, तर लोकांना महागात पाणी विका अन् त्या पैशाचा वापर दुष्काळग्रस्तांसाठी करा, अशी मागणी करण्याची वेळ याचिकाकर्त्यावर आली. नेते बेताल वागू लागले की अन्य कुणालातरी जबाबदारीने वागावे लागणारच ना! दुष्काळ विसरून क्रिकेटमध्ये रमलेल्या पवारांनाही जाण व्हावी या जबाबदारीची कधीतरी...! 
शरद पवार आणि ललित मोदी यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या क्रिकेटच्या आयपीएल सामन्यांपुढे यंदा महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी स्थिती थिटी ठरली आहे. तिकडे संपूर्ण मराठवाडा पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करीत असताना यांनी चालवलेली आयपीएलची दिवाळी सामान्य माणसालाच काय, अगदी न्यायालयाला देखील आवडलेली नाही. या स्पर्धेच्या आयोजकांनी जनाची आणि मनाची दोन्ही राखत या दुष्काळग्रस्त परिस्थितीची जरा तरी काळजी वाहावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना जी सणसणीत चपराक न्यायालयाच्या माध्यमातून अनेकांच्या थोबाडीत हाणली गेली आहे, त्यानंतरही चित्र फारसे बदलण्याची शक्यता दिसत नाही. तसाही क्रिकेटचा बाजार मांडून बसलेल्यांना राज्यातील दुष्काळाशी काय घेणेदेणे? पण स्वत:ला या राज्यातील राजकारणाचा कर्ताधर्ता मानणार्‍या आणि ग्रामीण जीवनाशी नाळ जुळली असल्याचा कायम दावा करणार्‍या ‘जाणत्या राजाला’ही क्रिकेटपुढे दुष्काळ दुय्यम वाटावा, ही बाब अधिक दुर्दैवी आहे. 
यंदा संपूर्ण राज्य, विशेषत: सारा मराठवाडा गंभीर दुष्काळाचा सामना करतोय्. लातूरसारख्या भागात रेल्वेने पाणी पुरविण्याची स्थिती उद्भवली आहे. या पार्श्‍वभूमीवर क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी होणारा पाण्याचा अपव्यव आक्षेपार्ह ठरतो. पण या बड्या नेत्यांना ते सांगणार कोण? आणि सांगण्याचा प्रयत्न कुणी केलाच तर हे ऐकून घेतील याची तरी शाश्‍वती इथे आहे कुणाला? त्यांनी तर या खेळाचा केव्हाच ‘धंदा’ करून टाकला आहे. आनंदापेक्षाही त्यातून मिळणार्‍या पैशाकडेच सर्वांचे लक्ष लागले असल्याने दुष्काळाच्या पेकाटात लाथ मारून सर्वांनी क्रिकेटच्या सेलेब्रेशनवर आणि त्याआडून मिळणार्‍या पैशावर लक्ष केंद्रित केलेले दिसते. बरं अडचण अशी की मायबाप रसिकांनीच या व्यापार्‍यांना क्रिकेटचा बाजार मांडण्याची परवानगी दिलेली. ते आम्हाला लुटण्याचा डाव मांडतात आणि लोक लुटण्यासाठी आपले खिसे मोकळे करून सामोरे जातात त्यांना. मग पाणी, विजेच्या अपव्ययासारखे ‘गौण मुद्दे’ लक्षात राहतील कुणाच्या? इथे अंतिम सामन्याच्या निकालापासून तर इतर सामन्यातील चौकार, षटकार, विकेटपर्यंत सार्‍याच गोष्टी मैदानावरच्या खेळाडूंऐवजी मैदानाबाहेरचे सटोडिये ठरवतात, ही बाब पुरती ठावूक असतानाही हजारो लोक वेडे होत क्रिकेटवरील प्रेमापायी जीव ओवाळून टाकतात त्या सामन्यावर. अशात तिकडे लातुरात पाण्यासाठी लागलेल्या रांगा आणि मराठवाड्यात कित्येक ठिकाणी पाण्यासाठी उडालेल्या झुंबडीवर लाठीमार केल्या जाण्याच्या घटनेपेक्षाही मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील हिरवळ कुणाच्यातरी लेखी अधिक महत्त्वाची ठरते. यातही दुर्दैवाची बाब अशी की, या आयोजनाचे नियोजन खूप अगोदर झाले असल्याचे फालतू कारण पुढे करून सामना रद्द न करण्याची भावनिक विनंती मान्य करण्यावाचून न्यायालयापुढेही दुसरा पर्याय उरत नाही. आणि मग, असले सामने आयोजित करताना इथल्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव जपण्याची थोडीशीही गरज तुम्हाला वाटत नाही का, अशी फटकार हाणण्यापलीकडे दुसरे काहीच करता न येण्याची हतबलता दस्तुरखुद्द न्यायालयाच्या वाट्याला येते. मग प्रत्यक्षात दुष्काळाचा सामना करणार्‍या मराठवाड्यातील जनतेला मनातील संतापाला कशी वाट मोकळी करून देता येईल? 
तिकडे पाण्यासाठी लोकांची पायपीट चालली असताना, इकडे मैदानावरची हिरवळ कायम राखण्यासाठी चाललेली धडपड, तिकडे या देशातली कित्येक गावे अजून अंधारात असताना, इकडे दिवसाच्या लख्ख उजेडातील खेळ टाळून रात्रीच्या कृत्रिम उजेडात खेळण्याचा चाललेला अट्टहास कुणालाही आक्षेपार्ह वाटत नाही. कारण, खेळापेक्षाही सेलेब्रेशन, आर्थिक कमाईच्या माध्यमाचे स्वरूप याच लोकांनी क्रिकेटला प्राप्त करून दिले आहे. हे सेलेब्रेशन साजरे करणार्‍यांची अन् त्यांच्या पाठीराख्यांची संख्या एवढी मोठी आहे की, यातील गैरप्रकारांविरुद्ध बोलणार्‍यांनाही आवाज उरला नाही. क्रिकेटच्या सट्ट्याची बातमी कधीतरी खळबळ निर्माण करून जाते, तेवढेच. वर्षानुवर्षे हेच चालले आहे. याही वेळी त्यांच्या बेताल वागण्याची कुणी दखल घेण्याचा प्रश्‍नच उद्भवणार नव्हता. पण कुणीतरी हिंमत करून न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यांची बेजबाबदार वर्तणूक चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. आणि मग लोकांच्या मनातला संताप न्यायालयाच्या माध्यमातून व्यक्त झाला. ज्याची जगाच्या पाठीवर कोणत्याच रेकॉर्डमध्ये नोंद होत नाही, ज्याला काही मूठभर लोकांच्या खाजगी व्यवसायापलीकडे फारसे महत्त्व नाही, अशा आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांपलीकडे ज्यांना नागरिकांचे दु:ख, त्यांच्या समस्या कवडीमोल वाटतात, त्यांच्या कानाखाली सणसणीत आवाज काढण्याचे काम शेवटी न्यायालयाला करावे लागले आहे. क्रिकेटचे सामने आयोजित करताना आणि त्यावर पैशापासून इतर सार्‍या नैसर्गिक, अनैसर्गिक स्रोतांची उधळण करताना जरा इथल्या दुष्काळी परिस्थितीचीही जाण ठेवा, हे पवारांसारख्या कथित ‘जाणत्या राजा’लाही कानपिचक्या देऊन अन्य कुणीतरी सांगण्याची गरज पडते, यावरून क्रिकेटच्या बाजारातून त्यांना मिळणार्‍या लाभाची कल्पना यावी. त्या लाभापुढे त्यांनी मातीमोल ठरवलेल्या जनभावनांची आणि त्याची त्यांनीच उडविलेली खिल्लीही ध्यानात यावी. 
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून सार्‍या राज्याला गंडवल्यानंतर छगन भुजबळ कारागृहातून दुष्काळाची काळजी वाहण्याची नौटंकी करताहेत. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कुठल्याशा सिंचन प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी आपल्या त्या पत्रातून भुजबळ करतात आणि इकडे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना क्रिकेटच्या वेडापायी दुष्काळाच्या त्याच संकटाचा विसर पडतो, ही अगम्य किमया केवळ पवारांसारखे राजकीय नेतेच घडवू शकतात. 
क्रिकेटला कुणाचाच विरोध नाही. क्रिकेटच काय, त्याच्या पवार-ललित मोदींनी मांडलेल्या बाजारालाही कुणाचा विरोध नाही. अगदी पवारांच्या पुढाकाराने परवा बारामतीतील स्टेडियमच्या उद्घाटनाचा शानदार सोहळा पार पडला त्यालाही कुणाची आडकाठी नाही. पण मग मराठवाड्यातल्या दुष्काळाची चिंता कोणी वाहायची? एकट्या मुख्यमंत्र्यांनी? दुष्काळाच्या या परिस्थितीत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या अन्य मंत्र्यांनी जिवाचे रान करायचे अन् शरद पवारांनी बारामतीत सचिन तेंडुलकर अन् रहाणेच्या उपस्थितीत स्टेडियमच्या उद्घाटनाच्या सोहळ्यात वेळ घालवायचा? राधाकृष्ण विखे पाटलांनी राजकीय आरोपांची पतंगबाजी करायची? शेवटी या प्रकरणात न्यायालयाला भावना व्यक्त करावी लागली. सामना होणारच असेल, तर लोकांना महागात पाणी विका अन् त्या पैशाचा वापर दुष्काळग्रस्तांसाठी करा, अशी मागणी करण्याची वेळ याचिकाकर्त्यावर आली. नेते बेताल वागू लागले की अन्य कुणालातरी जबाबदारीने वागावे लागणारच ना! दुष्काळ विसरून क्रिकेटमध्ये रमलेल्या पवारांनाही जाण व्हावी या जबाबदारीची कधीतरी...! 

Friday, April 1, 2016

देश सोडणारे पळपुटे...

पण मग भारतातल्या श्रीमंतांचे कुठे घोडे मारले गेले होते? इथे तर ना युद्धाची परिस्थिती, ना अराजक माजलेले. मग तरीही त्यांना का सोडावासा वाटावा हा देश? भारत सरकारच्या आर्थिक मदतीच्या बळावर शिकण्यासाठी म्हणून विदेशात गेलेली तरुणाई तिथल्या झगमगाटाला भुलते, मग भारतात परतण्याचा त्यांचा बेत अलबतच रद्द होतो, ही बाब तितकीशी नवलाईची राहिलेली नाही आता. आजघडीला निदान पावणेदोन लाख भारतीय विद्यार्थी विदेशात शिकायला गेले आहेत कुठल्यातरी देशात. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यातील किती लोक भारतात परत येतील याचा अंदाज, त्यांच्या शिक्षणासाठी लक्षावधी रुपये खर्च करणार्‍या सरकारला सुद्धा बांधता येत नाही, हे वास्तव तितकेच दुर्दैवी आहे. त्यांच्या कृतघ्नतेची चर्चा करावी तेवढी कमीच ठरेल. पण केवळ इथले वातावरण भावले नाही म्हणून देश सोडायला निघालेल्यांचे काय? भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा त्यांनी कधी मनापासून म्हटलीच नव्हती का? गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, या ओळींमधून व्यक्त होणार्‍या भावनांनी कधी साद घातलीच नाही, या लोकांच्या मनाला? खिशात पैसा खुळखुळू लागला की प्रत्येक जण अशी बाहेर देशात रमण्याची स्वार्थी भाषा बोलू लागला, तर इथे कुणी राहायचं? अन् कुणासाठी आमच्या सैनिकांनी सीमेवर शत्रूंशी लढायचे? या देशात मिळत नाही असं सुख, चैन आणि उपभोगासाठी देशाच्या सीमा ओलांडणार्‍यांच्या तुलनेत वैराग्य अनुभवणारी इथली संतांची परंपरा खुजी ठरवायची का मग? 
या देशात आपल्याला राहण्याजोगे वातावरण नसल्याचे आणि इथल्या राहणीमानाचा दर्जा सुमार असल्याचे कारण पुढे करून तब्बल चार हजार लोकांनी मागील काळात दुसर्‍या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच समोर आला आहे. एकीकडे या देशात राहून, इथल्या सार्‍या व्यवस्थांचा उपभोग घेऊनही ‘भारत भाता की जय’ म्हणण्याची लाज वाटणारा मोठा समुदाय या देशात मोठ्या दिमाखात मिरवत असताना, आता या देशात राहण्याची लाज वाटू लागलेल्यांची संख्याही हळूहळू वाढत असल्याची दुर्दैवी वस्तुस्थिती समोर येतेय्. तिकडे इराक, सीरिया सारख्या युद्धग्रस्त देशातील लोकांनी सततच्या युद्धजन्य परिस्थितीला कंटाळून तो देश सोडण्याचा निर्णय घेणे एकवेळ समजण्यासारखे आहे, पण भारतासारख्या एरवी शांतताप्रियतेची ओळख लाभलेल्या देशात जन्माला आलेल्या काही लोकांना आपल्या अतिश्रीमंत थाटाला साजेशा अशा वातावरणाचा शोध असणे, इथल्या राहणीमानाला योग्य दर्जा लाभला नसल्याचा साक्षात्कार त्यांना होणे आणि परिणामस्वरूप त्यांनी हा देश सोडून इतर कुठल्याशा देशात स्थायिक होण्याचा मार्ग पत्करणे, हा सारा प्रकारच अजब मानवी प्रवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे. विशेषत: भारतीय नागरिकांमध्ये, आपण अतिशय गरीब देशात जन्माला आलो असल्याची आणि इथल्यापेक्षा बाहेरच्या जगात अधिक सुख, समृद्धी, जीवनमानाचा उच्च दर्जा असल्याची साक्ष पटते आणि मग जगातील अन्य सारे देश भारतापेक्षा अधिक सरस ठरविण्याची अहमहमिका त्यांच्यात सुरू होते. यात आपल्या लोकांना नालायक ठरवत या देशाच्या नावे बोटे मोडण्याचा, इथल्या व्यवस्थेला शिव्यांची लाखोली वाहण्याचा, इथल्या राजकीय नेत्यांना शिव्या हासडण्याचा त्यांचा जाहीर कार्यक्रम यथासांग पार पडतो. कुठे ते अन् कुठे आपण, कुठे त्यांची प्रगती अन् कुठे आपली दयनीय अवस्था, कुठे त्यांचे विज्ञानाच्या साथीने वेगवानपणे सुसाट पळणे आणि कुठे आपले ते जाती-पातीच्या, कर्मकांडाच्या विळख्यात अडकून पडणे, कुठे तो तिथला श्रीमंतीचा झगमगाट अन् कुठे ते आपले गरिबीत खितपत पडणे अशा विविधांगी तुलनेत कित्येकांना आपलाच देश खुजा वाटू लागतो. इथे राहणेही नकोसे वाटू लागते. काहींसमोर याही परिस्थितीशी लढत नाईलाजाने इथेच जगण्यावाचून पर्याय नसतो, तर काहींना हातात खुळखुळणार्‍या पैशाच्या बळावर त्यातून सुटका मिळवण्याचा मार्ग सहज स्वीकारता येतो. आपला देश आपल्या लायकीचा नसल्याच्या दुर्दैवी भावनेतून मग येथून पलायनाचा कुणाचा तरी निर्णय होतो. 
मुळातच हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा प्रश्‍न आहे. पृथ्वीतलावर आपला कुठे जन्म व्हावा हे कुणाच्याच हातात नसतं. पण जगातल्या ज्या कुठल्या देशात आपला जन्म झाला असेल, तिथल्या भूमीशी नाते सांगण्याची परंपरा सारेच जोपासत असतील, असे कुठे आहे? गेल्या काही वर्षांत फ्रान्स, चीन, ग्रीस, रशिया, स्पेन, ब्राझील, इराक, सीरिया आदी देशांमधून शेकडो लोक कायमचे बाहेर पडले आहेत. कुठे ख्रिश्‍चन-मुस्लिमांमध्ये निर्माण झालेला गंभीर तणाव, तर कुठे युद्धाच्या सावटामुळे लोकांनी आपला देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण मग भारतातल्या श्रीमंतांचे कुठे घोडे मारले गेले होते? इथे तर ना युद्धाची परिस्थिती, ना अराजक माजलेले. मग तरीही त्यांना का सोडावासा वाटावा हा देश? भारत सरकारच्या आर्थिक मदतीच्या बळावर शिकण्यासाठी म्हणून विदेशात गेलेली तरुणाई तिथल्या झगमगाटाला भुलते, मग भारतात परतण्याचा त्यांचा बेत अलबतच रद्द होतो, ही बाब तितकीशी नवलाईची राहिलेली नाही आता. आजघडीला निदान पावणेदोन लाख भारतीय विद्यार्थी विदेशात शिकायला गेले आहेत कुठल्यातरी देशात. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यातील किती लोक भारतात परत येतील याचा अंदाज, त्यांच्या शिक्षणासाठी लक्षावधी रुपये खर्च करणार्‍या सरकारला सुद्धा बांधता येत नाही, हे वास्तव तितकेच दुर्दैवी आहे. त्यांच्या कृतघ्नतेची चर्चा करावी तेवढी कमीच ठरेल. पण केवळ इथले वातावरण भावले नाही म्हणून देश सोडायला निघालेल्यांचे काय? भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा त्यांनी कधी मनापासून म्हटलीच नव्हती का? गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, या ओळींमधून व्यक्त होणार्‍या भावनांनी कधी साद घातलीच नाही, या लोकांच्या मनाला? खिशात पैसा खुळखुळू लागला की प्रत्येक जण अशी बाहेर देशात रमण्याची स्वार्थी भाषा बोलू लागला, तर इथे कुणी राहायचं? अन् कुणासाठी आमच्या सैनिकांनी सीमेवर शत्रूंशी लढायचे? या देशात मिळत नाही असं सुख, चैन आणि उपभोगासाठी देशाच्या सीमा ओलांडणार्‍यांच्या तुलनेत वैराग्य अनुभवणारी इथली संतांची परंपरा खुजी ठरवायची का मग? कुष्ठरोग्यांपासून तर वेश्यांच्या पोरांच्या सुखात आपलं सुख धुंडाळणारी, त्यांच्या चेहर्‍यावरच्या समाधानासाठी आपलं आयुष्य वेचणारी माणसं वेडी आहेत का मग? की बाहेरच्या देशात जायला पैसा नाही म्हणून थांबले आहेत हे सारे लोक इथं या देशात? अन् पैशाच्या जोरावर हवेत उडणारे पळपुटे खूप शहाणे ठरतात का त्यांच्या तुलनेत? 
उपभोगातच सुख शोधणार्‍यांच्या व्यवहारी लोकांच्या गर्दीत मूर्ख ठरतील कदाचित इथल्या समाजासाठी आयुष्य वेचण्याकरता ‘तिकडे’ जाऊनही ‘इकडे’ परतलेली माणसं! त्यांना नाही जमलं ते व्यवहारी शहाणपण. ‘सारे जहॉं से अच्छा हिंदोस्तॉं हमारा’ या फक्त कागदावरच्या नीरस ओळी ठरल्यात काही लोकांसाठी. अन् काही ध्येयवेड्या माणसांच्या अंगावर उगाच काटा उभा राहातो, राष्ट्रगीताची नुसती धून वाजली तरी. इथले दारिद्र्य, जगण्याची संथ गती अन् साधेपणातही सौंदर्य शोधण्याची महात्मा गांधींची भूमिका केव्हाच मागे पडली अन् श्रीमंतीच्या मागे बेधुंद होत धावू लागलेत लोक. संथ गतीत सौंदर्य शोधण्याची गांधींची कल्पना खुळचटपणाची ठरतेय् काहींच्या लेखी. ते तर वेगाच्याही मागे सुसाट धावत सुटलेत. सारा देश स्वतंत्र व्हावा म्हणून समरात लढणारे लोक मूर्ख अन् त्यांनी इंग्रजांच्या तावडीतून मुक्त केलेला स्वतंत्र देश सोडून स्वत:च्या सुखासाठी भटकंतीला निघालेले तेवढे शहाणे ठरताहेत. यांच्या रक्षणासाठी काही लोक प्राणपणाने देशाच्या सीमेवर लढताहेत अन् त्यांच्या बलिदानाला बेदरकारपणे लाथ मारून काही लोक घर सोडून बाहेर पडताहेत.
अर्थात, कोणी कुठे राहायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. पण निदान जाताना या देशाची बदनामी करून, स्वत:च्या पळपुटेपणाचे ओंगळवाणे समर्थन तरी करू नये कुणी. हा देश गरीब, भिकार्‍यांचा, घाणेरडा वगैरे होताच काही लोकांच्या लेखी... आता तो राहाण्याच्या लायकीचाही राहिला नसल्याचा कांगावा करून कुणी इथून बाहेर पडत असेल, तर तो इथल्या मातीला आई मानणार्‍यांचा, तिच्या रक्षणार्थ प्राणपणाने लढण्याचा निश्‍चय करून बसलेल्या कोट्यवधी लोकांचा धडधडीत अपमान आहे. या बेदरकार वागणुकीचे निदान समर्थन तरी होऊ नये. हा देश नव्हे, तेच या देशात राहाण्याच्या लायकीचे नाहीत, हेच त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे...