Friday, March 4, 2016

... तेथे कर माझे जुळती!

शिवना नावाच्या छोट्याशा गावातील ही घटना. दोघे भाऊ. कुटुंबाचा सांभाळ करण्याच्या जबाबदारीचे ओझे वाहताना ‘मोठा माणूस’ बनण्याचे थोरल्याचे स्वप्न केव्हाच धुळीस मिळाले होते. निदान धाकट्याने तरी त्या स्वप्नांची पूर्ती करावी, आकाशाला गवसणी घालावी, जग मुठीत घ्यावे. मूठभरच असली, तरी त्या स्वप्नांनी सारा आसमंत व्यापून टाकावा. आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी मोठ्या भावाने बघितलेल्या स्वप्नांशी पैज लावायला धाकटाही एव्हाना तयार झालेला. त्यानं स्वप्नं बघायची, यानं ती गाठण्याचा चंग बांधायचा. स्वत:च्या वाट्याला आलेली धूळधाण विसरून त्यानं, याचं आयुष्य फुलवण्याची गाठ मनाशी बांधायची. याच्या डोळ्यांनी त्यानी स्वप्नं बघायची. एकाची तर झाली, पण दुसर्‍याच्या आयुष्याची वाताहात होऊ नये म्हणून दोघांनी मिळून धडपड करायची... असं छान चाललं होतं दोन भावांचं. पण बहुधा असं सारं चांगलं चांगलं चाललेलं नियतीला कधीच भावत नाही. संधी मिळेल तेव्हा त्यात खोडा घालण्याचा डाव ती साधतेच! इथेही तसंच घडलं. धाकट्यासाठी चाललेली थोरल्याची धडपड एक दिवस थांबली. इहलोकीची त्याची यात्रा अर्ध्यावरच संपली. बरं, घडीही बघा कशी परीक्षेची निघाली, घरात मोठ्या भावाचे कलेवर पडलेले अन् दिवस लहान्याच्या दहावीच्या पहिल्या पेपरचा! गहन प्रश्‍न उभा ठाकलेला. शाळेत जाऊन पेपर सोडवायचा, की अंत्यसंस्कार पहिले आटोपायचे? बहुतेकदा बड्या व्यक्तींपेक्षा सर्वसामान्य माणसं आपल्या समस्यांवरचे उपाय अत्यंत साधेपणाने, परिस्थितीला साजेसे असे शोधतात. कांदा महाग झाला की तो विकत कसा घ्यायचा या विवंचनेत मध्यमवर्गीय लोक सापडलेले असताना, गरीब माणूस मात्र कांद्याविना निभवण्याचा निर्णय घेऊन क्षणात मोकळा होतो.
आज पाहिले मरण
गेला भांबावून प्राण
माझ्या ज्ञानाचे कुंपण
स्मशानात...
बा. सी. मर्ढेकर म्हणतात. एखाद्या जिवलगाचा, जवळच्या माणसाचा मृत्यू मन हेलावून टाकतो. सैरभैर करतो. अंतर्मुख करतो. काय करावं काही सुचत नाही अशा प्रसंगात. पण, अशाही परिस्थितीत ज्याला मनाची स्थिती अविचल राखता आली, याही स्थितीत ज्याला अवधान राखता आले, तो खरंच ग्रेट! अविरत साधनेतून सिद्ध झालेल्या संन्यस्त जीवनात कदाचित एखाद्याला असे ठामपणे, निग्रहाने उभे राहता येईलही कदाचित, पण सामान्य माणसाचं काय? त्यातही त्याग, बलिदान, तप, साधना अशा बोजड शब्दांशी ज्यांचा किंचितसाही संबंध कधी आला नाही, अशा कोवळ्या वयातील एका बालकाने, त्याच स्थितप्रज्ञतेचा प्रत्यय घालून देण्याचा प्रसंग घडतो, तेव्हा थोड्या थोड्या गोष्टींनी बिथरणार्‍या, मृत्यूच्या घटनांचा भावनिक व्यापार मांडणार्‍या तमाम मंडळीला आपसूकच चपराक बसते. 
औरंगाबादजवळच्या शिवना नावाच्या छोट्याशा गावातील ही घटना. दोघे भाऊ. कुटुंबाचा सांभाळ करण्याच्या जबाबदारीचे ओझे वाहताना ‘मोठा माणूस’ बनण्याचे थोरल्याचे स्वप्न केव्हाच धुळीस मिळाले होते. निदान धाकट्याने तरी त्या स्वप्नांची पूर्ती करावी, आकाशाला गवसणी घालावी, जग मुठीत घ्यावे. मूठभरच असली, तरी त्या स्वप्नांनी सारा आसमंत व्यापून टाकावा. आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी मोठ्या भावाने बघितलेल्या स्वप्नांशी पैज लावायला धाकटाही एव्हाना तयार झालेला. त्यानं स्वप्नं बघायची, यानं ती गाठण्याचा चंग बांधायचा. स्वत:च्या वाट्याला आलेली धूळधाण विसरून त्यानं, याचं आयुष्य फुलवण्याची गाठ मनाशी बांधायची. याच्या डोळ्यांनी त्यानी स्वप्नं बघायची. एकाची तर झाली, पण दुसर्‍याच्या आयुष्याची वाताहात होऊ नये म्हणून दोघांनी मिळून धडपड करायची... असं छान चाललं होतं दोन भावांचं. पण बहुधा असं सारं चांगलं चांगलं चाललेलं नियतीला कधीच भावत नाही. संधी मिळेल तेव्हा त्यात खोडा घालण्याचा डाव ती साधतेच! इथेही तसंच घडलं. धाकट्यासाठी चाललेली थोरल्याची धडपड एक दिवस थांबली. इहलोकीची त्याची यात्रा अर्ध्यावरच संपली. बरं, घडीही बघा कशी परीक्षेची निघाली, घरात मोठ्या भावाचे कलेवर पडलेले अन् दिवस लहान्याच्या दहावीच्या पहिल्या पेपरचा! गहन प्रश्‍न उभा ठाकलेला. शाळेत जाऊन पेपर सोडवायचा, की अंत्यसंस्कार पहिले आटोपायचे? बहुतेकदा बड्या व्यक्तींपेक्षा सर्वसामान्य माणसं आपल्या समस्यांवरचे उपाय अत्यंत साधेपणाने, परिस्थितीला साजेसे असे शोधतात. कांदा महाग झाला की तो विकत कसा घ्यायचा या विवंचनेत मध्यमवर्गीय लोक सापडलेले असताना, गरीब माणूस मात्र कांद्याविना निभवण्याचा निर्णय घेऊन क्षणात मोकळा होतो. कुसुमावती देशपांडे यांच्या ‘कला धोबीण’मधूनही सामान्य माणसांनी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी निवडलेल्या, त्यांच्यादृष्टीने सुयोग्य अशा उपायांचा प्रत्यय येतो. कुसुमावतींच्या कथेतील कला धोबीण, नवरा मेल्यावर तिसर्‍याच दिवशी, परीटघडीचे कपडे पोहोचवायला अन् दुसरे कपडे मिळवायला घरोघरी जाऊ लागते, तेव्हा कुसुमावतींना प्रश्‍न पडतो की, एवढ्या दु:खाच्या प्रसंगात हिला कसं शक्य झालं असेल हे? पण, ती कला धोबीणच त्याचं उत्तर देते. ती म्हणते, ‘‘बाई, नवरा मेल्याच्या दु:खात दोन दिवस गेले. पण, वीतभर पोटाची खळगी भरायची, अठराविश्‍वे दारिद्‌‌र्य असलेल्या घराचा सारा डोलारा सांभाळायचा तर दु:खात रमून कसे चालेल? परिस्थितीशी लढायला पदर कंबरेला खोचून मैदानात तर उतरावेच लागेल ना?’’ कुसुमावतींनी विचार केला, आपण मध्यमवर्गीय माणसं कायम उत्सवात रमणारी. अगदी मृत्यूचाही सोहळा साजरा करायला आवडते आपल्याला. पण, ज्यांचा घास हाता-तोंडाशी असतो, त्यांना कसे परवडणार असले सोहळे अन् त्यात रमणे? म्हणूनच कला धोबिणीने शोधलेला तिच्या दु:खावरचा व्यवहारी उपाय अधिक महत्त्वाचा. तिला आणता आलेलं अवसान उसनं नव्हतंच. परिस्थितीनं तिला शिकवलं होतं. त्यातूनच तिला ती हिंमत लाभली होती. 
शिवन्यातल्या संदीप सोनवणेनंही स्वत:पुरता निर्णय घेत, वाट्याला आलेल्या संकटावर मात केली. आधी अंत्यसंस्कार की आधी परीक्षेचा पेपर, या प्रश्‍नाचे उत्तर त्याने स्वत:पुरते निश्‍चित केले होते. पहिले दहावीचा पेपर मग अंत्यसंस्कार. निर्णय झाला. त्याची अंमलबजावणीही झाली. कुठलाही तत्त्वांचा मुलामा नाही, बडेजाव नाही, घेतलेल्या निर्णयाचा गवगवा नाही. एरवी बड्याबड्या मंडळीलाही एवढा मोठा निर्णय इतक्या सहजपणे घेणे शक्य झाले नसते कदाचित! मृत्यू म्हटला की, हळवी होतात माणसं. अनेकदा बेभान होऊन वागतात अशा प्रसंगात लोक. अशा कठीण प्रसंगी अवधान राखणं सर्वांना जमतेच असं नाही. सोनवणे कुटुंबातील संदीपने मात्र धीरगंभीर वृत्तीचा परिचय दिला. आधी कर्तव्य मग भावना, असा क्रम ठरवताना त्याला जराही अडचण जाणवली नाही. 
‘मढे झाकोनिया करीती पेरणी’ या तुकोबांच्या अभंगातून ध्वनित होणारा अर्थ तरी वेगळे काय सांगतो? घरात कुणाचा मृत्यू झाला असेल, तर मढे झाकून ठेवत शेतातल्या पेरणीचे कर्तव्य प्रथम पार पाडणार्‍या बळीराजाची भूमिका, उपरोक्त प्रसंगात संदीपने पार पाडली आहे. ज्यानं जिवापाड जपलं, क्षितिजापलीकडली स्वप्नं आपल्यासाठी बघितली, ज्याची सारी धडपड केवळ आपल्यासाठी होती, त्या थोरल्या भावाच्या स्वप्नांची पूर्तता परीक्षेचा पेपर न देऊन कशी होऊ शकणार होती? संदीपनं ते जाणलं. पहिले परीक्षेचा पेपर देण्याचा निर्णय त्यानं घेतला. वय, गुण, ज्ञान, अनुभवाने मोठ्या असलेल्या व्यक्तीलाही हा, एरवी छोटासा वाटणारा, पण प्रत्यक्षात खूप मोठा असलेला निर्णय घेता आला असताच याची ग्वाही देता येत नाही. नियतीने निर्माण केलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे सर्वांनाच जमते असे नाही. 
केसरीचा अग्रलेख लिहीत असतानाच, आजारी पडलेल्या पत्नीच्या निधनाची वार्ता समजते. माहिती समजल्यावर माडीवरून खाली उतरलेले लोकमान्य, ‘‘परमेश्‍वराची इच्छा!’’ एवढे बोलून पुन्हा माडीवर जाऊन राहिलेला अग्रलेख पूर्ण करतात आणि लेखन पूर्ण झाल्यावर मग पार्थिवाबाबतचे अन्य विधी पूर्ण करतात. ही बाब कठीण परिस्थितीत मनाची अविचलता कायम राखण्यात मिळालेल्या एखाद्याच्या यशाचे सामर्थ्य सिद्ध करणारी असते. हे सामर्थ्य साधनेतून, अनुभवसंपन्नतेतून लाभत असेल कदाचित! टिळकांच्या ठायी ते होते. अन्यथा नुसती वार्ता एकून कुणी बेचैन झाले असते. धावाधाव, रडारड सुरू झाली असती. पण, त्याही परिस्थितीत हातातल्या कामाला प्राधान्य देऊन, प्राधान्यक्रमाने ते पूर्ण करणारे टिळक विरळाच! तुलना नाही, पण शिवन्यातला संदीप परवा असाच वागला- मोठा माणूस असल्यासारखा. एरवी त्याच्या मोठेपणाची नोंद कुणी घेईलच याची शाश्‍वती नाही. पण, सार्‍या जगाने दखल घ्यावी असंच त्याचं वागणं होतं त्या दिवशीचं- निश्‍चल. निरलस. ठाम. धीरगंभीर... एका सामान्य माणसाच्या असामान्यत्वाला सलाम करायला लावणारं! जराशा दु:खाने अस्थिर होणार्‍या, बेलगाम होत आपल्या वेदनेचा बाजार मांडणार्‍या, त्या दु:खातच रममाण होणार्‍यांच्या गर्दीला चपराक लगावणारं...!

No comments:

Post a Comment