Friday, November 13, 2015

मॅगी पुन्हा बाजारात...

न्यायालयाने मॅगीच्या पुनर्तपासणीचे आदेश दिले होते. काय झाले त्याचे? कधी झाली ही तपासणी? तपासणीचा निकाल लागलाही इतक्या लवकर? फक्त सर्वसामान्य लोकांचीच प्रकरणे निकाली लागत नाहीत इथे इतक्या त्वेरेने. गर्भश्रीमंतांची प्रकरणे बरी तातडीने निकाली लागतात! दुसरा प्रश्‍न असा की, बंदीमुळे बाजारात मालच येत नव्हता, तर तपासणी कशाची झाली? आणि आधीचे रिपोर्टस् खोटेही ठरले लागलीच? आणि आता न्यायालयाने बंदी उठविण्याचीच देर की, पाच मिनिटांत साठ हजार पॉकिटं विकली जातील एवढा माल बाजारात आणलाही या कंपनीने? इतक्या कमी वेळात तयार होऊ शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात हा माल? आणि देशभरातल्या बाजारपेठेत तो उपलब्धही होऊ शकतो अल्पावधीत? याचा अर्थ हे उत्पादन तयार करण्याची प्रक्रिया गेले काही दिवस सुरू राहिली होती. बंदी अंमलात असताना माल तयार कसा झाला? कशाच्या जोरावर? न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार, या विश्‍वासाच्या बळावर? आला कुठून हा विश्‍वास? कुठून आली शासकीय यंत्रणेला खोटं ठरविण्याची ताकद? आणि आम्ही मूर्ख लोक! यापैकी एकही सवाल निर्माण होत नाही आमच्या मनात? जणूकाय गेल्या सहा महिन्यांत मॅगी खाल्ली नाही, तर जीव चालला होता आमचा, अशा थाटात तुटून पडतोय् आम्ही आता मॅगीवर? 
आज चाळीशीत असलेली आणि त्यापूर्वीचीही पिढी मॅगी खाऊनच लहानाची मोठी झाली. त्यांना बाळकडू पाजले गेले ते मॅगीचेच! त्या वेळी आजी नातवाला मांडीवर बसवून घास भरवायची ते मॅगीचे आणि आई कौतुकानं खाऊ घालायची तीही मॅगीच! या पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या तमाम मंडळींना मॅगीशिवाय काही म्हणून काहीच दुसरं ठाऊक नव्हतं. बस्स! मॅगी, मॅगी आणि मॅगीच...!!
काय म्हणता, हे सारं खोटं आहे? यातलं काही म्हणून काहीच खरं नाही? पण, ती टीव्हीवरची बया तर तेच सांगतेय्. तिच्या लेखी तर तुमची-आमची पिढी जगलीच मुळात मॅगी खाऊन! तिच्या लेखी आपल्या जीवनातली आजवरची सारी परिवर्तनं मॅगीनंच घडविली. या जाहिरातीतल्या दाव्यानुसार, मॅगीएवढा लोकप्रिय दुसरा कुठलाच पदार्थ कधी अस्तित्वातच नव्हता आणि ज्या कारणावरून हा खाद्य पदार्थ परवा बाजारातून हटविण्यात आला, ती सारी कारणं तद्दन फालतू आहेत. बंदी लादली जाण्याचा तो सारा घटनाक्रम खोटा आहे. लहान मुलांचा एकमेव आवडता पदार्थ म्हणून ज्यांनी स्वत:ची ख्याती करून घेतली, त्या मॅगीचा आऊटडेटेड माल बाजारात सापडला तो आरोप खोटा, त्यात शिशाचे प्रमाण एका मर्यादेबाहेर आढळले ती वस्तुस्थिती खोटी, या देशाचे अन्न व औषधी प्रशासन खोटे. फक्त नेस्ले नामक कंपनीचे या उत्पादनाचे उत्पादक तेवढे खरे! त्यांचे दावे तर काय, बावन्नकशी सोनेच!! बाकी या देशातल्या नागरिकांच्या आरोग्याचं काय, त्याच्याशी तर कुणालाही खेळ मांडता येतो इथे. मग कोकाकोलात कीटकनाशक सापडलं काय किंवा कॅडबरीच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्या काय, त्यानं कुणाचंच काही बिघडत नाही. व्हीव्हीआयपी नसलेल्या तमाम सर्वसामान्य लोकांचा जीव कुत्र्या-मांजरांसारखा मातीमोल असतो इथे. तो गेला काय किंवा राहिला काय, कुणाचंच काही बिघडत नाही. बहुधा म्हणूनच मग मॅगीसारखी उत्पादने चार-सहा महिन्यांच्या कालावधीतच स्वत:वरचे आरोप खोटे सिद्ध करून, स्वच्छ चारित्र्याची प्रमाणपत्रे स्वत:च स्वत:ला बहाल करवून घेत बाजारपेठेत दाखल होतात. लोकं काय, इतरांनी मूर्ख बनविण्यासाठीच जन्म झालाय् त्यांचा. एखादा अमिताभ आणून उभा केला की, अळ्या विसरून कॅडबरी स्वीकारली जाते अन् अभिनेत्री म्हणून स्मृती इराणी यांनी आवाहन केलं की, कीटकनाशक असलेला कोलाही धडाधड विकला जातो. आता मॅगीवरही उड्या पडताहेत. यंदा तर कुठलाही ब्रॅण्ड ऍम्बॅसेडर वापरण्याचीही गरज पडली नाही मॅगीच्या उत्पादकांना. त्यावरूनही पाठ थोपटून घेताहेत नेस्ले कंपनीचे मालक. बंदी उठल्यानंतर त्यांनी बाजारात आणलेल्या ‘वेलकम कीट’ला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद बराच बोलका आहे. स्नॅपडीलच्या काऊंटर्सवर ठेवल्या ठेवल्या साठ हजार मॅगी किट्‌स विकल्या गेल्याची बातमी आहे. गेले सहा महिने या देशातले लोक बेचैन झाले होते. जणू ते मॅगीची आतुरतेने वाट बघत ताटकळत उभे राहिले होते, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. निदान नेस्लेच्या मालकांनी चित्र तरी तसेच निर्माण केले आहे.
ज्या देशात लक्षावधी केसेस वर्षानुवर्षे सुनावणी अन् निकालासाठी खितपत पडल्या आहेत, अगदी तीन वर्षांपूर्वीच्या दिल्लीतल्या त्या गाजलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींनाही अद्याप शिक्षा सुनावली गेलेली नाही, त्या देशात मॅगीच्या मालकांनी दाखल केलेली केस मात्र तातडीने दखल घेण्याजोगी ठरते. त्यावरचा निकालसुद्धा तेवढ्याच तत्परतेने लागतो. ‘अपेक्षेप्रमाणे’ निकाल नेस्लेच्या बाजूनं लागला. ते ‘निर्दोष’ ठरवले गेले. ज्यानं या उत्पादनांवर बंदीची कारवाई केली, ज्यांच्या आदेशाबरहुकूम मॅगी देशभरातील बाजारपेठेतून मागे घेण्यात आली, ती सरकारी यंत्रणा कुचकामी, खोटी ठरवली गेली. त्यांच्या लायकी आणि विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उभे केले गेले. अर्थात, सरकारी व्यवस्थेच्या अशा दयनीय अवस्थेसाठी इथे कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. नेस्लेच्या मालकांना तर नाहीच नाही. आमच्याही लेखी ती यंत्रणा पायदळी तुडवण्याच्याच लायकीची राहिली आहे.
न्यायालयाने मॅगीच्या पुनर्तपासणीचे आदेश दिले होते. काय झाले त्याचे? कधी झाली ही तपासणी? तपासणीचा निकाल लागलाही इतक्या लवकर? फक्त सर्वसामान्य लोकांचीच प्रकरणे निकाली लागत नाहीत इथे इतक्या त्वेरेने. गर्भश्रीमंतांची प्रकरणे बरी तातडीने निकाली लागतात! दुसरा प्रश्‍न असा की, बंदीमुळे बाजारात मालच येत नव्हता, तर तपासणी कशाची झाली? आणि आधीचे रिपोर्टस् खोटेही ठरले लागलीच? आणि आता न्यायालयाने बंदी उठविण्याचीच देर की, पाच मिनिटांत साठ हजार पॉकिटं विकली जातील एवढा माल बाजारात आणलाही या कंपनीने? इतक्या कमी वेळात तयार होऊ शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात हा माल? आणि देशभरातल्या बाजारपेठेत तो उपलब्धही होऊ शकतो अल्पावधीत? याचा अर्थ हे उत्पादन तयार करण्याची प्रक्रिया गेले काही दिवस सुरू राहिली होती. बंदी अंमलात असताना माल तयार कसा झाला? कशाच्या जोरावर? न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार, या विश्‍वासाच्या बळावर? आला कुठून हा विश्‍वास? कुठून आली शासकीय यंत्रणेला खोटं ठरविण्याची ताकद? आणि आम्ही मूर्ख लोक! यापैकी एकही सवाल निर्माण होत नाही आमच्या मनात? जणूकाय गेल्या सहा महिन्यांत मॅगी खाल्ली नाही, तर जीव चालला होता आमचा, अशा थाटात तुटून पडतोय् आम्ही आता मॅगीवर?
खरंच मॅगी खाऊन लहानाच्या मोठ्या झाल्या या देशातल्या पिढ्या? त्यात प्रमाणाबाहेर धातू वापरला गेल्याच्या आरोपाची कुणालाच चिंता नाही, त्यांना आनंद होतोय्, तो आरोप खोटा ठरविला गेल्याचा आहे. कारण आता त्यांना नाक वर करून बाजारात आपलं उत्पादन आणता येणार आहे. त्यावर तुटून पडणार्‍या वेड्यांची इथे कमतरता नाही, हे तर तेही ओळखून आहेत. लोकांना मूर्ख बनवणे फार सोप्पे आहे, हेही ते जाणून आहेत. म्हणूनच आरोग्याला घातक असलेली शीतपेये इथे बिनदिक्कतपणे विकली अन् पिली जातात. आता मॅगीही तशीच विकली अन् खाल्ली जाईल. त्यासाठी लोकांच्या भावनांना हात घालणार्‍या जाहिराती तयार झाल्या आहेत. त्याचा माराही एव्हाना सुरू झाला आहे. आपली आजी आपल्याला काही विष खाऊ घालत नव्हती, ती तर मॅगी खाऊ घालत उलट आपलं संगोपन करीत होती, अशा आशयाची ती जाहिरात लवकरच आपल्या मनोविश्‍वावर ताबा मिळवेल. आणि बंदीसाठी कारणीभूत ठरलेले शिसे किंवा एक्सपायरी डेट संपल्यानंतरही नेस्लेची उत्पादने विक्रीसाठी बाजारात ठेवून आपल्या आरोग्याचा त्यांनी मांडलेला बाजार क्षणात विस्मरणात जाईल लोकांच्या. सहा महिन्यांपूर्वी गेलेली पत पुन्हा मिळवेल मॅगी. राहिला प्रश्‍न लोकांची पत आणि त्यांच्या विश्‍वासाचा, तर त्याची किंमत आहे कुणाच्या लेखी इथे? ती सर्वांच्याच दृष्टीने कवडीमोल आहे. सरकार, सरकारी यंत्रणा, मॅगीची उत्पादक कंपनी आणि खुद्द लोकांच्याही लेखी...!

1 comment:

  1. magila good bye kara. Magipeksha Aaplya sevaya farach uttam.

    ReplyDelete