Friday, July 10, 2015

राणे निघाले लढाईला...!

राणेसाहेब, एक करा. आता मशाल खांद्यावर घेऊन भ्रष्टाचाराविरुद्धच्या वारीला निघालाच आहात, तर जरा एकदा मागे वळून बघा. कोळसा घोटाळ्यातले डॉ. मनमोहनसिंग, कॉमन वेल्थ घोटाळ्यातले सुरेश कलमाडी, आदर्श घोटाळ्यातले अशोकराव, शेतकर्‍यांना लूटणारे आमदार, शेतकरी आत्महत्याग्रस्त भागासाठी आलेल्या निधीतूनही खिसे भरणारे, भाकड गायी शेतकर्‍यांच्या माथी मारून निधी घशात घालणारे तत्कालीन मंत्री, कोट्यवधी रुपये खर्च करूनही तलावांची कामे अपूर्ण राहिल्याची जराही खंत न बाळगणारे अजितदादा.... आणि हो! ते आपले छगन, सुनील, गुलाबराव, सुरेशदादा, यांपैकी कुणी आपल्या या लढाईत सहभागी होतात का बघा. घ्या त्यांनाही आपल्या या लढ्यात सहभागी करून. जरा साद घाला पक्षातल्या सार्‍या सवंगड्यांना. म्हणावं या, सहभागी व्हा भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढाईत. आता घोटाळा करून ‘आदर्श’ बनलेले अशोकराव अन् दिल्लीतल्या महाराष्ट्र भवनासाठी मुंबईत एफएसआय देण्याची अभिनव कल्पना मांडणारे छगनराव या लढाईत कोणत्या तोंडाने सहभागी होतील, हा प्रश्‍न आहेच. पण, तसे असेल ना राणेसाहेब, तर मग तुम्हीही ही लढाई लढण्याच्या भानगडीत पडू नका. कारण स्वकीय भ्रष्टाचार्‍यांच्या या गर्दीत विरोधकांवर तुटून पडण्याचे बळ गवसणार नाही बघा तुम्हाला! आणि तसे झाले तर फुसका बार व्हायचा तुमच्या त्या आवेशाचा अन् लढाईचाही...


नारायण राणे बोलले. हो! दस्तुरखुद्द राणेसाहेब बोलले. म्हणाले, सारे मंत्री भ्रष्ट आहेत महाराष्ट्रातले. आता स्वत: राणेसाहेब बोलताहेत म्हटल्यावर त्यावर आक्षेप कोण नोंदवणार? गेल्या नजीकच्या काळात विधानसभेच्या दोन दोन निवडणुकी हरल्यामुळे तसेही साहेबांचे राज्याच्या कारभाराविषयीचे, कार्यपद्धतीबद्दलचे चिंतन काहीसे वाढलेले, अधिक गहिरे झालेले असणार. ज्या विलासरावांच्या, ज्या अशोकरावांच्या, ज्या पृथ्वीराजबाबांच्या नेतृत्वात त्यांनी मंत्री म्हणून काम केले, त्या काळातील एकाही भ्रष्टाचाराची नोंद साहेबांनी कधी घेतल्याचे स्मरत नाही. पण, सध्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारमधील भ्रष्टाचाराचे मात्र साहेबांना अल्पावधीतच बरेच आकलन झालेले दिसते. अर्थात, म्हणून कालपर्यंतच्या भ्रष्टाचाराकडे त्यांनी कानाडोळा केल्याचा निष्कर्ष कुणी काढू नये. त्यांच्या तेव्हा मौन साधण्यावर किंवा आताच्या बरळण्यावर लोकांच्या प्रतिक्रिया उमटणारच. साहेब त्यांच्या शैलीत त्या आरोपांचा सोक्षमोक्षही लावतील, याबाबतही कुणाच्या मनात शंका नाही. जे सोनिया गांधींना खडे बोल सुनावताना मागेपुढे पाहत नाहीत, कशाची म्हणून तमा बाळगत नाहीत, त्यांनी विरोधी पक्षाच्या सरकारवर कोरडे ओढताना कुणाची पत्रास बाळगण्याचे कारणच नाही मुळी! त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्धची त्यांच्या मनात असलेली चीड, त्यांच्या मनातला प्रचंड संताप जर आता व्यक्त होणार असेल, तर तो थोपवून धरण्याची इथे कुणाचीही बिशाद नाही, हेच खरे! महाराष्ट्रभर दौरे करून, आरोपांचा तुफान मारा करून सरकारला सळो की पळो करून सोडण्याच्या त्यांनी जाहीर केलेल्या निर्धाराचीही दखल सार्‍या महाराष्ट्राला आता घ्यावीच लागणार आहे...
भाजपा-सेनेच्या नेत्यांना राज्य करता येत नाही, असा दावा आहे साहेबांचा! हे जर खरं असेल, इथे फक्त आणि फक्त कॉंग्रेसलाच राज्यकारभार चालवता येतो, असाही ओघानेच त्यांचा दावा असेल, तर खरंच सांगा राणेसाहेब, पंधरा वर्षांची सत्ता हातून का गेली मग तुमच्या? इतकी वर्षे मुजोरी करूनही कोकणातल्या निवडणुकीत पराभव का वाट्याला आला तुमच्या? आता परवाच्या मुंबईतल्या निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांचा नकार का पदरात पडला तुमच्या? पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद पदरी पडण्याचं जवळपास नक्की झालं असताना माशी कुठे शिंकली नेमकी? बांद्र्यातल्या निवडणुकीत आपल्या विजयाच्या आड नेमके कोण आले होते, याची पुरेपूर कल्पना आली असेल ना, राणेसाहेब एव्हाना आपल्याला?
अजून स्वत:च्या पक्षाच्या घाणेरड्या राजकारणातून बाहेर पडू न शकलेले राणेसाहेब, जेव्हा इतर पक्षातल्या बारा भानगडींबाबत, तिथल्या गटबाजीबद्दल बोलू लागतात, तेव्हा तो विषय आपसूकच विनोदाचा होऊन जातो आणि राहिला प्रश्‍न भ्रष्टाचाराचा, तर त्याविरोधात बोलण्याचा आपल्याला किती नैतिक अधिकार आहे, याची चाचपणी करून घ्यावी साहेबांनी एकदा. एका गरीब शेतकर्‍याकडून पैसे उकळणार्‍या आपल्या आमदाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुखांना न्यायालयाने चपराक हाणली ती, पदाचा गैरवापर केला म्हणून, हे काय राणेसाहेबांना ठाऊक नाही? त्यांच्या पक्षाच्या सध्याच्या प्रदेशाध्यक्षांना त्या वेळी मुख्यमंत्रिपदावरून ज्या आरोपावरून हाकलण्यात आले, तो आदर्श घोटाळा म्हणजे काय सुवर्णपदक देऊन गौरव करावा अशी कामगिरी होती राणेसाहेब? मग त्या वेळी भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठविण्याची भाषा बोलला नाहीत आपण कधी? मंत्रिमंडळातले आपले स्थान कायम राखण्याच्या, जमलंच तर मुख्यमंत्रिपद मिळविण्याच्या धडपडीत मशगूल राहिलात आपण तेव्हा. त्यामुळे सीमेवर लढणार्‍या सैनिकांच्या नावावर आदर्श घोटाळ्यात मुंबईतील महागड्या सरकारी जमिनीची खाजगी रीत्या झालेली सामूहिक लूट आणि ती लाटणार्‍यांच्या राजकीय नेते-सरकारी अधिकार्‍यांच्या गर्दीचा बरा विसर पडला आपल्याला? अगदी परवा-परवापर्यंत ज्यांच्या नेतृत्वात आपण काम केलंत, त्या पृथ्वीराज चव्हाणांच्या कामाची ‘गती’ काय अगदीच स्पृहणीय होती? आताच्या सरकारला सामान्य माणसाच्या विकासाशी काही घेणेदेणे नाही, असे आपले मत असेल, तर चव्हाणांच्या नेतृत्वात त्या सामान्य माणसाची खूप प्रगती झाल्याचा दावा आहे की काय आपला? आणि त्याही वेळी सामान्य माणसावर होणार्‍या अन्यायाविरुद्धचा आपल्या मनातला संताप जाहीरपणे व्यक्त झाल्याची उदाहरणे वानगीपुरतीही सापडत नाहीत हो राणेसाहेब! आणि सत्ता हातून जाताच लागलीच जनहिताचे गोडवे गाऊ लागलात आपण? अचानक लोकांच्या कामांचे स्मरण झाले आपल्याला? तुमच्या दृष्टीने उद्धव ठाकरे अकार्यक्षम असतील, तर मग पृथ्वीराज चव्हाणांना काय त्यांच्या कर्तबगारीचे बक्षीस दिले लोकांनी त्यांच्या हातून सत्ता हिसकावून? महानगरपालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंनी मुंबई बकाल केल्याचा आपला आरोप असेल, तर कालपर्यंत राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसने त्या शहरासाठी काय केले, याचा आलेख मांडता येईल राणेसाहेब तुम्हाला कधीतरी? ऊठसूठ तुम्ही ठाकरेंना अकार्यक्षम ठरवायचे अन् त्यांनी तुम्हाला ‘कोंबडीचोर’ म्हणून हिणवायचे, या असल्या दर्जाहीन भांडणात इथे कुणालाच रस नाही. लोकांना राजकारणाची तर्‍हा पुरती ठाऊक आहे त्यांच्याही अन् तुमच्याही. त्यांना राजकारण करता येत नसल्याचा, तुमच्या भाषेत त्या दृष्टीने ते अगदीच बालिश असल्याचा तुमचा आरोप असेल, तर कणकवलीतल्या कालपर्यंतच्या निवडणुकी तुम्ही काही गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने जिंकलेल्या नाहीत, हेही सर्वज्ञात सत्य आहे.
प्रश्‍न तो नाहीच. प्रश्‍न आहे तुम्ही हाती घेतलेल्या मोहिमेचा. प्रश्‍न आहे, तो तुम्ही स्वीकारलेल्या व्रताचा. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईचा. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा? जे कालपर्यंत भ्रष्टाचारात आकंठ बुडाले होते, त्या कॉंग्रेस पक्षाच्या एका नेत्याचा भ्रष्टाचाराविरुद्ध एल्गार? शोभत तर नाहीच, पण विश्‍वासही बसत नाही ना राव! कॉंग्रेस कुठे, साधनशुचिता कुठे? राणे कुठे, भ्रष्टाचाराला विरोध कुठे? कशाचा कशाशी काही संबंध?
राणेसाहेब, एक करा. आता मशाल खांद्यावर घेऊन भ्रष्टाचाराविरुद्धच्या वारीला निघालाच आहात, तर जरा एकदा मागे वळून बघा. कोळसा घोटाळ्यातले डॉ. मनमोहनसिंग, कॉमन वेल्थ घोटाळ्यातले सुरेश कलमाडी, आदर्श घोटाळ्यातले अशोकराव, शेतकर्‍यांना लूटणारे आमदार, शेतकरी आत्महत्याग्रस्त भागासाठी आलेल्या निधीतूनही खिसे भरणारे, भाकड गायी शेतकर्‍यांच्या माथी मारून निधी घशात घालणारे तत्कालीन मंत्री, कोट्यवधी रुपये खर्च करूनही तलावांची कामे अपूर्ण राहिल्याची जराही खंत न बाळगणारे अजितदादा.... आणि हो! ते आपले छगन, सुनील, गुलाबराव, सुरेशदादा, यांपैकी कुणी आपल्या या लढाईत सहभागी होतात का बघा. घ्या त्यांनाही आपल्या या लढ्यात सहभागी करून. कसं आहे ना राणेसाहेब, दरवेळी तुम्हाला एकटं पाडण्याची तर्‍हा आहे यांच्या राजकारणाची. मुख्यमंत्रिपदाच्या निवडीची वेळ आली की तुम्ही पडता बाजूला! प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळीही तुम्ही आपले बाजूलाच. बांद्र्यात निवडून न येण्याची खात्री असताना मात्र, तोफेसमोर द्यायला नाव नारायण राणेंचं. तेव्हा यावेळी सावध व्हा! जरा साद घाला पक्षातल्या सार्‍या सवंगड्यांना. म्हणावं या, सहभागी व्हा भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढाईत. आता घोटाळा करून ‘आदर्श’ बनलेले अशोकराव अन् दिल्लीतल्या महाराष्ट्र भवनासाठी मुंबईत एफएसआय देण्याची अभिनव कल्पना मांडणारे छगनराव या लढाईत कोणत्या तोंडाने सहभागी होतील, हा प्रश्‍न आहेच. पण, तसे असेल ना राणेसाहेब, तर मग तुम्हीही ही लढाई लढण्याच्या भानगडीत पडू नका. कारण स्वकीय भ्रष्टाचार्‍यांच्या या गर्दीत विरोधकांवर तुटून पडण्याचे बळ गवसणार नाही बघा तुम्हाला! आणि तसे झाले तर फुसका बार व्हायचा तुमच्या त्या आवेशाचा अन् लढाईचाही...

No comments:

Post a Comment