Tuesday, July 22, 2014

या वाघाची तर शेळी झाली!

मुळात राजीनामा देताना राणेंनी व्यक्त केलेली खंत बरीच बोलकी आहे. मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखवून त्यांना शिवसेनेतून बाहेर तर काढण्यात आले, पण नंतरच्या काळात त्यांचे पाऽऽर खोबरे करण्यात आले. पण इतके दिवस राणेंनी मूग गिळून तो अवमान सहन केला. आज ना उद्या मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडेल या आशेने. पण कॉंग्रसनेही या नेत्याचे पाणी जोखले होते. त्यांची ताकद कोकणच काय, कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदूर्गच्या पलीकडे नसल्याचे वास्तव नेत्यांच्याही ध्यानात आले होते. म्हणूनच ते यांना झुलवत राहिले अन् हेही झुलत राहिले. सोनियांच्या विरोधात त्यावेळी नाही नाही ते बोलणार्‍या या नेत्याला त्या पक्षाने मंत्रिपद तर दिले. मात्र, मुख्यमंत्रिपद आजच काय, पण भविष्यातही कधी मिळणार नाही, याची गाठ तेव्हाच बांधली होती. राणेंसारख्या एका हुशार नेत्याला त्याची कल्पना नव्हती, असे कसे म्हणता येईल? त्यामुळे त्याचा राग कधीतरी व्यक्त होणारच होता. फक्त त्याचा मुहूर्त मुलाच्या पराभवातून जनभावना स्पष्ट झाल्यानंतरचा निश्‍चित झाला, एवढेच! शिवसेनेतल्या एका वाघाची या काळात कॉंग्रेसने पाऽऽर शेळी केल्यावर...!
अखेर महाराष्ट्राचे ‘उद्योग’ मंत्री नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कायम दादागिरी करून हुकुमत गाजवली, त्या शिवसेनेतून बाहेर पडल्यावर इतकी वर्षे सतत सत्तेत राहिल्याने त्यांना आलेला माज लोकांनी पाऽऽर उतरवला आहे. खरं तर २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीतच जनतेने राणे यांना त्यांची ‘जागा’ दाखवून दिली. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेचा त्याग केला आणि नंतर कॉंग्रेसची सोबत केली, त्यात स्वाभिमानाचा भाग होता कुठे? स्वाभिमान असता, तर कधीकाळी मुख्यमंत्री राहिलेला माणूस दुसर्‍या कुण्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात साधा मंत्री बनून राहिला असता असा? पण तरीही त्यावेळच्या त्यांच्या सेनात्यागाला मुलामा मात्र त्यांच्यावर झालेल्या कथित अन्याय अन् स्वाभिमानाचा देण्यात आला होता.
मुळात, ते स्वत:ला म्हणवून घेत असले तरी, प्रत्यक्षात संपूर्ण राज्याचा नेता त्यांना कधी होताच आलं नाही. कोकणाच्या, त्यातही कणकवली अन् सिंधुदूर्गच्या बाहेर ज्यांना कधी पडता आलं नाही, त्यांच्याकडे संपूर्ण राज्याचा नेता म्हणून कसं बघता येईल? पण तरीही ते स्वत:ला सार्‍या राज्याचा नेता समजत राहिले. त्यांचे वागणे, बोलणे, त्यांचा तोराही त्याच थाटातला राहिला. तीच अकड, तीच मुजोरी, तोच माज. तरी बरं गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांना त्यांची पातळी कळून चुकली होती. नव्हे, त्यांच्या दहशतीला कंटाळलेल्या लोकांनी ती व्यवस्थितपणे त्यांच्या लक्षात आणून दिली होती. जेथे वर्षानुवर्षे निवडणूक जिंकली, त्या कणकवलीतही यावेळी त्यांना लाज राखता आली नाही. ज्या कोकणाचे ते स्वनामधन्य नेते आहेत, तिथल्या अकरापैकी एकच जागा गेले वेळी राणेंच्या नेतृत्वात कॉंग्रेसला जिंकता आली आणि ती जागा होती स्वत: नारायण राणेंची. स्वत:ला सोडून अन्य एकही पक्षकार्यकर्ता ज्यांना त्यावेळी वातावरण अनुकूल असताना निवडून आणता आला नाही, त्यांच्या नेतृत्वावर तरीही लोकांनी विश्‍वास ठेवायचा? आता २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पोराचा पराभव वर्मी लागल्याने चवताळलेले नारायण राणे ज्याला त्याला दूषणे देत सुटले आहेत. आरोपांचा धुराळा उडवीत निघाले आहेत. राष्ट्रवादीने दगा दिला, मुख्यमंत्र्यांनी मदत केली नाही, अमुक कुणी काम केले नाही, तमुक कोणी मतदान केले नाही. सार्‍या कोकणात म्हणे त्यांचीच चलती आहे. राणेंच्या शब्दापलीकडे तिथे म्हणे पानही हलत नाही. तरीही ते मुलाला निवडून आणू शकले नाहीत? बरं इतर मतदारसंघांचे जाऊ द्या, पण त्यांच्या स्वत:च्या कुडाळ विधानसभा मतदारसंघातही पोरगा शिवसेनेपेक्षा माघारला, त्याची दूषणे कुणाला द्यायची? पण स्वत:च्या चुका शोधण्याची फुरसत साहेबांना आहे कुठे? यांनी कुजका विनोद सांगितला तरी हास्याचे फव्वारे उडविणार्‍या अन् यांनी काहीही बोललं तरी मानाच डोलावणार्‍या हुजर्‍यांचीच यांच्या दरबारात भरती. मग मतदारसंघातले धगधगते वास्तव यांना सांगणार कोण?
बरं अपयश केवळ कोकणातच पदरी पडले असे नाही. मुंबई महानगरपालिकेच्या गेले वेळच्या निवडणुकीत पक्षाने सारी मदार नारायण राणेंवर सोडली होती. कल्याण डोंबिवलीच्या मनपा निवडणुकीतही कॉंग्रेसची सारी सूत्रे त्यांच्याच हातात एकवटलेली होती. तरीही पक्षाला यशाच्या दारापर्यंत नेऊन सोडू शकले नाहीत ‘दादा!’ पण त्या निवडणुकीतला पक्षाचा पराभव त्यांच्या तितकासा जिव्हारी लागला नाही, जितका तो लोकसभा निवडणुकीत मुलाच्या पराभवामुळे लागला. नाही म्हणायला, गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतले नेतेही त्यांना भीक घालत नाहीयेत्. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर ज्या जोशात त्यांचा कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला, तो थाट नंतरच्या काळात कायम राहिला नाही. ज्यांच्या जिवावर शिवसेनेला धडा शिकवला, ते सोबतीही हळूहळू दूर जाऊ लागले. एकेकाळी स्वत: मुख्यमंत्री राहिलेल्या राणेंना दुसर्‍याच्या नेतृत्वातले मंत्रिपद स्वीकारून अपमान सहन करावा लागला. त्या अपमानाची रीतभात परवा-परवापर्यंत कायम होती अन् अपमान सहन करून मंत्रिपदावर कायम राहण्याची राणेंची तर्‍हाही तशीच कालपर्यंत कायम होती. या काळात मंत्रिमंडळात क्रमांक दोनची जागा, बैठकीत बसायला मिळणारी मुख्यमंत्र्यांच्या बाजूची खुर्ची, एवढीच काय ती त्यांच्यासाठी जमेची बाजू. बाकी, महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या महसूल विभागातून त्यांना केव्हाच हद्दपार करण्यात आले होते. गाजर समोर धरले जात असले, तरी मुख्यमंत्रिपद नेहमीच त्यांना गवसणी घालत राहिले आहेे. आणि आता तर राज्यात कॉंग्रेसच्या नेतृत्वात सत्ता स्थापन होण्याची शक्यताही कधी नव्हे एवढी धूसर झालेली आहे. तिकडे कणकवली अन् कुडाळमध्येही अलीकडच्या निवडणुकीतल्या निकालातून लोकांच्या संतापाचा भडका जाणवण्याइतपत स्पष्टपणे व्यक्त झालेला. इतक्या वर्षात या परिसरात कोकणाचा कमी अन् राणेंचाच विकास अधिक झाल्याची बाब एव्हाना लोकांच्याही ध्यानात आली आहे. मारहाण, धमक्या या माध्यमातून या परिसरात वाढलेले त्यांचे प्रस्थ, त्यांचेच उद्योग, त्यांच्याच शैक्षणिक संस्था, लोकांचा विरोध झुगारून जैतापुरात वीज केंद्र उभारण्याचा त्यांचाच घाट, विरोधकांना चिरडून टाकण्याची भाषा, त्यांना सळो की पळो करून सोडण्याचा दावा सांगणारा दर्प, विरोध करण्यासाठी उठलेले हात कलम करण्याची उर्मट माजोरी... लोक काहीच विसरलेले नाहीत यातले. कालपर्यंतच्या त्यांच्याच वागणुकीचे प्रत्युत्तर लोकांच्या वागणुकीतून मिळू लागलेय् आता. बहुधा धूर्त राणेंना जनामनातला हा कल एव्हाना कळून चुकला आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा हे वरवरचे नाटक आहे. वास्तवात ध्यानात आलेले अंध:कारमय राजकीय भवितव्य, हेच या राजीनाम्याचे मूळ कारण आहे.
राजीनामा सादर करताना, त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेली जनतेच्या न होणार्‍या कामांचे कारणही लटके आहे. पक्षश्रष्ठींनी दिलेले, मुख्यमंत्री बनविण्याचे आश्‍वासन पूर्ण न झाल्याने आपण नाराज असल्याचेही राणेंनी स्पष्ट केले आहे. दिल्लीतल्या नेत्यांनी आश्‍वासन दिले, ते पूर्ण होण्याची वाट राणे तब्बल नऊ वर्षांपर्यंत बघत राहिले? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर विरोधकच काय, पण सहकारी पक्षही नाराज असताना आजवर कधी ब्र न काढणार्‍या राणेंना आता अचानक ती कार्यपद्धती आक्षेपार्ह वाटू लागली? मुख्यमंत्र्यांच्या कामाचा वेग संथ आहे, ते फायली लवकर निकाली काढत नाहीत, त्यामुळे लोकांची कामे होत नाहीत, हे सार्‍या महाराष्ट्राला केव्हाच कळाले असताना त्यांच्या शेजारी बसणार्‍यांना ते इतक्या उशिरा कळावे अन् अचानक त्यांना जनहिताचे स्मरण व्हावे आता? विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या संभाव्य पराभवाची चिंता आणि तो होऊ नये म्हणून कठोर पावलं उचलण्याची उपरती त्यांना लोकसभा निवडणुकीत मुलाचा पराभव झाला नसता, तर झाली असती?
मुळात राजीनामा देताना राणेंनी व्यक्त केलेली खंत बरीच बोलकी आहे. मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखवून त्यांना शिवसेनेतून बाहेर तर काढण्यात आले, पण नंतरच्या काळात त्यांचे पाऽऽर खोबरे करण्यात आले. पण इतके दिवस राणेंनी मूग गिळून तो अवमान सहन केला. आज ना उद्या मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडेल या आशेने. पण कॉंग्रसनेही या नेत्याचे पाणी जोखले होते. त्यांची ताकद कोकणच काय, कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदूर्गच्या पलीकडे नसल्याचे वास्तव नेत्यांच्याही ध्यानात आले होते. म्हणूनच ते यांना झुलवत राहिले अन् हेही झुलत राहिले. सोनियांच्या विरोधात त्यावेळी नाही नाही ते बोलणार्‍या या नेत्याला त्या पक्षाने मंत्रिपद तर दिले. मात्र, मुख्यमंत्रिपद आजच काय, पण भविष्यातही कधी मिळणार नाही, याची गाठ तेव्हाच बांधली होती. राणेंसारख्या एका हुशार नेत्याला त्याची कल्पना नव्हती, असे कसे म्हणता येईल? त्यामुळे त्याचा राग कधीतरी व्यक्त होणारच होता. फक्त त्याचा मुहूर्त मुलाच्या पराभवातून जनभावना स्पष्ट झाल्यानंतरचा निश्‍चित झाला, एवढेच! शिवसेनेतल्या एका वाघाची या काळात कॉंग्रेसने पाऽऽर शेळी केल्यावर...!

No comments:

Post a Comment