Tuesday, July 29, 2014

आता मराठी वरवंटा फिरवा!

दुर्दैव असे की, या परिस्थितीतही महाराष्ट्रातले प्रत्येकच सरकार आजवर केवळ शिखंडीची भूमिका बजावत राहिले आहे. कॉंग्रेस अन् नेहरूंच्या दुराग्रहापायी इथे भाषावार प्रांतरचना झाली. सार्‍या देशानं मुकाट्यानं तो निर्णय मान्य केला. ‘आम्हाला संयुक्त महाराष्ट्रात राहायचे आहे’, असे स्पष्टपणे सांगणारा बेळगाव महानगरपालिकेत १९४८ मध्ये मंजूर झालेला ठराव धुडकावून, जनभावना पायदळी तुडवून बेळगावचा तत्कालीन म्हैसूर राज्यात समावेश करण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्राच्या मागणीवरून महाजन समिती स्थापन झाली खरी, पण त्यासाठीही नंतरची दोन दशकं जावी लागलीत. मराठी अस्मितेसाठी चाललेला सेनापती बापटांचा लढा कर्मदरिद्री नेत्यांच्या अवसानघातकी धोरणांमुळे अपयशाच्या गर्तेत खितपत पडला. राज्यनिर्मितीचे निकष फक्त बेळगावच्याच बाबतीत थिटे पडले, तरी फजल अली कमिशनच्या सदस्यांना मराठीजनांच्या तीव्र भावना लक्षात आल्या नाहीत की, महाजन समितीच्या बहिर्‍या सदस्यांनाही बेळगाव, निपाणी, कारवारमधल्या लोकांचा टाहो ऐकू गेला नाही. बेळगावसह ८०० गावांत मराठी भाषक माणसं राहतात. ते मराठी बोलतात. मराठी लिहितात. मराठी संस्कृती केवळ जपतच नाहीत, तर जगतात, हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट अन् धगधगते वास्तव विसरून केंद्र सरकारच्या समित्यांतले लोक थंड हवेच्या अलिशान खोल्यांमध्ये बसून निर्णय घेऊ लागले. हजारो लोक जिवाच्या आकांताने, आम्हाला महाराष्ट्रात राहायचे म्हणून ओरडून सांगत असताना, यांचा अट्टहास मात्र त्यांना कर्नाटकात जखडून ठेवण्याचा होता. आज टीपेला पोहोचलेला विरोध कधीतरी मावळेल, अशा आविर्भावात जगणार्‍यांचा तेव्हाही झाला अन् आजही भ्रमनिरासच होतोय्. मराठी बाणा अजून तसाच कायम आहे. पाठीवर लाठ्या खाऊन, छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलून, हौतात्म्य पत्करूनही इथल्या मराठीजनांनी अस्मितेचा लढा कायम ठेवला आहे. आज तब्बल ६६ वर्षांनंतरही त्या लढ्याची धार जराशीही बोथट झालेली नाही. तीच जिद्द, तीच धार, तोच बाणा अन् तीच मागणी अजूनही कायम आहे. 
खूप झालेत साहित्य सम्मेलनातले ठराव अन् सरकारी भाषेतले निर्वाणीचे इशारे. आता कृती हवी. मराठीजनांवर केवळ भाषेच्या आधारावर कायम अन्यायाचा वरवंटा फिरविणार्‍या कन्नडिगांना आता त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. जी कळते त्याच भाषेत त्यांना समजावण्याची वेळ आता आली आहे. कर्नाटक सरकारची ही कोणती तर्‍हा आहे? तिकडे केंद्रातले सरकार, भारतीय राज्यघटना, न्याय व्यवस्था अशा सार्‍याच यंत्रणांना भाषक अस्मिता जपण्याचा नागरिकांचा अधिकार मान्य असताना, इथे कर्नाटकात तर लोकांची मातृभाषाच नाकारण्याचा प्रयत्न होतोय्.
 राष्ट्रभाषेप्रमाणेच कुठल्याही राज्याच्या राजभाषेचा मान राखला गेला पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. पण ज्या कन्नडिगांना स्वभाषेपुढे राष्ट्रभाषेचा मान कधी राखता आला नाही, ते राजभाषेच्या गौरवार्थ दुसर्‍यांच्या मातृभाषेचा धडधडीत अपमान करायला सरसावले आहेत; आणि दुर्दैव असे की, या परिस्थितीतही महाराष्ट्रातले प्रत्येकच सरकार आजवर केवळ शिखंडीची भूमिका बजावत राहिले आहे. कॉंग्रेस अन् नेहरूंच्या दुराग्रहापायी इथे भाषावार प्रांतरचना झाली. सार्‍या देशानं मुकाट्यानं तो निर्णय मान्य केला. ‘आम्हाला संयुक्त महाराष्ट्रात राहायचे आहे’, असे स्पष्टपणे सांगणारा बेळगाव महानगरपालिकेत १९४८ मध्ये मंजूर झालेला ठराव धुडकावून, जनभावना पायदळी तुडवून बेळगावचा तत्कालीन म्हैसूर राज्यात समावेश करण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्राच्या मागणीवरून महाजन समिती स्थापन झाली खरी, पण त्यासाठीही नंतरची दोन दशकं जावी लागलीत. मराठी अस्मितेसाठी चाललेला सेनापती बापटांचा लढा कर्मदरिद्री नेत्यांच्या अवसानघातकी धोरणांमुळे अपयशाच्या गर्तेत खितपत पडला. राज्यनिर्मितीचे निकष फक्त बेळगावच्याच बाबतीत थिटे पडले, तरी फजल अली कमिशनच्या सदस्यांना मराठीजनांच्या तीव्र भावना लक्षात आल्या नाहीत की, महाजन समितीच्या बहिर्‍या सदस्यांनाही बेळगाव, निपाणी, कारवारमधल्या लोकांचा टाहो ऐकू गेला नाही. बेळगावसह ८०० गावांत मराठी भाषक माणसं राहतात. ते मराठी बोलतात. मराठी लिहितात. मराठी संस्कृती केवळ जपतच नाहीत, तर जगतात, हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट अन् धगधगते वास्तव विसरून केंद्र सरकारच्या समित्यांतले लोक थंड हवेच्या अलिशान खोल्यांमध्ये बसून निर्णय घेऊ लागले. हजारो लोक जिवाच्या आकांताने, आम्हाला महाराष्ट्रात राहायचे म्हणून ओरडून सांगत असताना, यांचा अट्टहास मात्र त्यांना कर्नाटकात जखडून ठेवण्याचा होता. आज टीपेला पोहोचलेला विरोध कधीतरी मावळेल, अशा आविर्भावात जगणार्‍यांचा तेव्हाही झाला अन् आजही भ्रमनिरासच होतोय्. मराठी बाणा अजून तसाच कायम आहे. पाठीवर लाठ्या खाऊन, छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलून, हौतात्म्य पत्करूनही इथल्या मराठीजनांनी अस्मितेचा लढा कायम ठेवला आहे. आज तब्बल ६६ वर्षांनंतरही त्या लढ्याची धार जराशीही बोथट झालेली नाही. तीच जिद्द, तीच धार, तोच बाणा अन् तीच मागणी अजूनही कायम आहे. पण मुकी, बहिरी सरकारेच का अशी बेलगाम वागताहेत तेच कळत नाही. का कुणास ठावूक, पण इतक्या वर्षांत केंद्रात इतकी सरकारे बदलली, तरी अद्याप कुणालाच हा प्रश्‍न सोडवता येत नाहीय्. कानडी विरोध झुगारून बेळगावात वर्षानुवर्षे मराठी महापौर बहुमताने निवडून येत असल्याचे, तिथल्या विधानसभेतही या भागातून मराठी माणसंच आमदार म्हणून निवडून जात असल्याचे वास्तव यांना कधी जाणवले नाही? इतकी वर्षे कर्नाटकात राहूनही, सतत अन्याय सहन करूनही, मराठीचे अस्तित्व कायम राखण्यासाठीची तिथल्या मराठीजनांची धडपड दिल्ली, बंगळुरू अन् मुंबईतील राज्यकर्त्यांना कधीच जाणवली नाही? मराठी अस्मिता बेचिराख करायला निघालेल्या कर्नाटक सरकारची बेमुर्वतखोरी चेपून काढण्याची गरज दिल्लीत बसलेल्यांना कधीच वाटली नाही? तिथल्या शाळा, तिथल्या संस्था, तिथले फलक, तिथली संस्कृती यातून येणारा मराठी मातीचा गंध लक्षात येऊनही तो दुर्लक्षित करणारी निलाजरी नाटकं कशासाठी? कानडी अस्मिता जपण्यासाठी चाललेला बंगळुरू सरकारचा बाणा मराठी अस्मितेवर घाला घालून जातो, तो कुणालाच कसा दिसत नाही? अन् मुंबईत बसलेल्या नेत्यांनाही आपल्या माणसांची लढाई कधीच कशी ध्यानात येत नाही? महाराष्ट्र दिनाच्या दूर पूर्वसंध्येला मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन काळे झेंडे दाखविणारी माणसं अन् आम्हाला तुमच्या मुलखात सामावून घ्या म्हणत दिली जाणारी काळीज चिरणारी त्यांची आर्त हाक मराठी राज्यकर्त्यांच्याही लक्षात येत नाही? कुणासाठी लढला सेनापती बापटांनी तेव्हाचा लढा? कुणासाठी लढताहेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक? कुणासाठी त्या १०५ वीरांनी हौतात्म्य स्वीकारलं?
 या लढ्यात कर्नाटक सरकारची भूमिका जितकी वेदनादायक आहे, त्याहीपेक्षा महाराष्ट्र सरकारची षंढ भूमिका अधिक संतापजनक आहे. तिकडे सरकार कोणत्याही पक्षाचे असो, मराठीजनांवर हल्ले करण्याच्या त्यांच्या पक्षविरहित भूमिकेत कधी तसूभरही फरक पडलेला नाही. याउलट महाराष्ट्रातले नेते मात्र कायम राजकीय पक्षांच्या चार भिंतींच्या आत राहूनच कर्नाटकी अत्याचाराचा तमाशा बघत राहिले. यांना फक्त निषेधाचे ठराव मंजूर करण्यातच पुरुषार्थ वाटत राहिला. तिकडे प्रत्यक्ष मैदानात मराठी माणसाचे रक्त सांडत राहिले, तरी यांच्या धमन्यांतले रक्त कधी सळसळलेच नाही. तिथला विरोध पत्करून, किंबहुना झुगारून मराठीपण शाबूत ठेवण्याच्या चालविलेल्या प्रयत्नांना मराठी म्हणविणार्‍या महाराष्ट्र सरकारकडून कधी ठोस असा पाठिंबा मिळालाच नाही. ते प्रत्यक्षात लढत राहिले अन् हे पाठिंब्याची, निर्वाणीची, लढ्याची भाषा तेवढी बोलत राहिले. आता परवा येळ्ळूर गावातले फलक हटविण्याचेच प्रकरण घ्या! महाराष्ट्राचा उल्लेख असलेले या गावातले मराठी फलक हटविण्यासाठी कन्नडिग पोलिसांनी मराठीजनांवर अक्षरश: हल्ला केला. जगातला सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्‍न असल्याच्या आणि तो जणू आत्ता, या क्षणी तातडीने सोडविणे गरजेचे असल्याच्या थाटात छावणी तयार करून, पोलिस बळाचा वापर करून गावातले हे फलक हटविण्यात आले. त्याला विरोध करणार्‍यांना नेहमीप्रमाणे तुडविण्याची, लाठ्यांनी बडविण्याची भूमिका स्वीकारली गेली. घरात शिरून लोकांवर लाठीहल्ला करण्यात आला. लोक जुमानत नाहीत, सरकारी आदेश मानत नाहीत, प्रशासनाने हटविलेले फलक त्यांनी पुन्हा उभारल्याचे बघून पोलिसांनी दुसर्‍या दिवशी पुन्हा कारवाई केली. यावेळी त्या हरामखोरांनी महिलांवरही काठ्या उगारल्या. अर्थात संघर्षाची सवय जडलेली अन् मराठी अस्मितेसाठी जीवन पणाला लावलेली मातृशक्ती जराही डगमगली नाही. पण हातात बांगड्या भरलेल्या महाराष्ट्र सरकारच्या तोंडून मात्र या आया-बहिणींसाठी अजून चकार शब्द निघालेला नाही की, निषेधाचा साधा सूरही राज्यकर्त्यांकडून उमटल्याचे ऐकिवात नाही. कर्नाटक सरकारबद्दल काय बोलावे? त्यांनी तर लाज-लज्जा बासनात गुंडाळूनच ठेवली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अजून न्यायालयात निकाली लागलेला नसल्याचे भानही त्यांना राहिलेले नाही. ज्या गावांवर, ज्या नागरिकांवर ‘आपले’ असण्याचा तिथल्या सरकारचा दावा आहे, त्या ‘आपल्या लोकांना’ वागविण्याची रीत ‘अशी’ असते? लाठ्या हाणणारी? बंदुकी ताणणारी?
 दूरवरच्या बेळगावात विधानसभा भवन उभारण्याचा मुद्दा असो वा मग तिथल्या महापौरांना काळे फासण्याचा, कर्नाटक सरकारने कायम अन्यायाचा कानडी वरवंटा इथल्या मराठी जनांवर फिरवला आहे. आता गरज, त्याला त्याच तोडीचे उत्तर देणार्‍या मराठी बाण्याचा प्रत्यय देणार्‍या वरवंट्याची आहे...

Tuesday, July 22, 2014

या वाघाची तर शेळी झाली!

मुळात राजीनामा देताना राणेंनी व्यक्त केलेली खंत बरीच बोलकी आहे. मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखवून त्यांना शिवसेनेतून बाहेर तर काढण्यात आले, पण नंतरच्या काळात त्यांचे पाऽऽर खोबरे करण्यात आले. पण इतके दिवस राणेंनी मूग गिळून तो अवमान सहन केला. आज ना उद्या मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडेल या आशेने. पण कॉंग्रसनेही या नेत्याचे पाणी जोखले होते. त्यांची ताकद कोकणच काय, कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदूर्गच्या पलीकडे नसल्याचे वास्तव नेत्यांच्याही ध्यानात आले होते. म्हणूनच ते यांना झुलवत राहिले अन् हेही झुलत राहिले. सोनियांच्या विरोधात त्यावेळी नाही नाही ते बोलणार्‍या या नेत्याला त्या पक्षाने मंत्रिपद तर दिले. मात्र, मुख्यमंत्रिपद आजच काय, पण भविष्यातही कधी मिळणार नाही, याची गाठ तेव्हाच बांधली होती. राणेंसारख्या एका हुशार नेत्याला त्याची कल्पना नव्हती, असे कसे म्हणता येईल? त्यामुळे त्याचा राग कधीतरी व्यक्त होणारच होता. फक्त त्याचा मुहूर्त मुलाच्या पराभवातून जनभावना स्पष्ट झाल्यानंतरचा निश्‍चित झाला, एवढेच! शिवसेनेतल्या एका वाघाची या काळात कॉंग्रेसने पाऽऽर शेळी केल्यावर...!
अखेर महाराष्ट्राचे ‘उद्योग’ मंत्री नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कायम दादागिरी करून हुकुमत गाजवली, त्या शिवसेनेतून बाहेर पडल्यावर इतकी वर्षे सतत सत्तेत राहिल्याने त्यांना आलेला माज लोकांनी पाऽऽर उतरवला आहे. खरं तर २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीतच जनतेने राणे यांना त्यांची ‘जागा’ दाखवून दिली. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेचा त्याग केला आणि नंतर कॉंग्रेसची सोबत केली, त्यात स्वाभिमानाचा भाग होता कुठे? स्वाभिमान असता, तर कधीकाळी मुख्यमंत्री राहिलेला माणूस दुसर्‍या कुण्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात साधा मंत्री बनून राहिला असता असा? पण तरीही त्यावेळच्या त्यांच्या सेनात्यागाला मुलामा मात्र त्यांच्यावर झालेल्या कथित अन्याय अन् स्वाभिमानाचा देण्यात आला होता.
मुळात, ते स्वत:ला म्हणवून घेत असले तरी, प्रत्यक्षात संपूर्ण राज्याचा नेता त्यांना कधी होताच आलं नाही. कोकणाच्या, त्यातही कणकवली अन् सिंधुदूर्गच्या बाहेर ज्यांना कधी पडता आलं नाही, त्यांच्याकडे संपूर्ण राज्याचा नेता म्हणून कसं बघता येईल? पण तरीही ते स्वत:ला सार्‍या राज्याचा नेता समजत राहिले. त्यांचे वागणे, बोलणे, त्यांचा तोराही त्याच थाटातला राहिला. तीच अकड, तीच मुजोरी, तोच माज. तरी बरं गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांना त्यांची पातळी कळून चुकली होती. नव्हे, त्यांच्या दहशतीला कंटाळलेल्या लोकांनी ती व्यवस्थितपणे त्यांच्या लक्षात आणून दिली होती. जेथे वर्षानुवर्षे निवडणूक जिंकली, त्या कणकवलीतही यावेळी त्यांना लाज राखता आली नाही. ज्या कोकणाचे ते स्वनामधन्य नेते आहेत, तिथल्या अकरापैकी एकच जागा गेले वेळी राणेंच्या नेतृत्वात कॉंग्रेसला जिंकता आली आणि ती जागा होती स्वत: नारायण राणेंची. स्वत:ला सोडून अन्य एकही पक्षकार्यकर्ता ज्यांना त्यावेळी वातावरण अनुकूल असताना निवडून आणता आला नाही, त्यांच्या नेतृत्वावर तरीही लोकांनी विश्‍वास ठेवायचा? आता २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पोराचा पराभव वर्मी लागल्याने चवताळलेले नारायण राणे ज्याला त्याला दूषणे देत सुटले आहेत. आरोपांचा धुराळा उडवीत निघाले आहेत. राष्ट्रवादीने दगा दिला, मुख्यमंत्र्यांनी मदत केली नाही, अमुक कुणी काम केले नाही, तमुक कोणी मतदान केले नाही. सार्‍या कोकणात म्हणे त्यांचीच चलती आहे. राणेंच्या शब्दापलीकडे तिथे म्हणे पानही हलत नाही. तरीही ते मुलाला निवडून आणू शकले नाहीत? बरं इतर मतदारसंघांचे जाऊ द्या, पण त्यांच्या स्वत:च्या कुडाळ विधानसभा मतदारसंघातही पोरगा शिवसेनेपेक्षा माघारला, त्याची दूषणे कुणाला द्यायची? पण स्वत:च्या चुका शोधण्याची फुरसत साहेबांना आहे कुठे? यांनी कुजका विनोद सांगितला तरी हास्याचे फव्वारे उडविणार्‍या अन् यांनी काहीही बोललं तरी मानाच डोलावणार्‍या हुजर्‍यांचीच यांच्या दरबारात भरती. मग मतदारसंघातले धगधगते वास्तव यांना सांगणार कोण?
बरं अपयश केवळ कोकणातच पदरी पडले असे नाही. मुंबई महानगरपालिकेच्या गेले वेळच्या निवडणुकीत पक्षाने सारी मदार नारायण राणेंवर सोडली होती. कल्याण डोंबिवलीच्या मनपा निवडणुकीतही कॉंग्रेसची सारी सूत्रे त्यांच्याच हातात एकवटलेली होती. तरीही पक्षाला यशाच्या दारापर्यंत नेऊन सोडू शकले नाहीत ‘दादा!’ पण त्या निवडणुकीतला पक्षाचा पराभव त्यांच्या तितकासा जिव्हारी लागला नाही, जितका तो लोकसभा निवडणुकीत मुलाच्या पराभवामुळे लागला. नाही म्हणायला, गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतले नेतेही त्यांना भीक घालत नाहीयेत्. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर ज्या जोशात त्यांचा कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला, तो थाट नंतरच्या काळात कायम राहिला नाही. ज्यांच्या जिवावर शिवसेनेला धडा शिकवला, ते सोबतीही हळूहळू दूर जाऊ लागले. एकेकाळी स्वत: मुख्यमंत्री राहिलेल्या राणेंना दुसर्‍याच्या नेतृत्वातले मंत्रिपद स्वीकारून अपमान सहन करावा लागला. त्या अपमानाची रीतभात परवा-परवापर्यंत कायम होती अन् अपमान सहन करून मंत्रिपदावर कायम राहण्याची राणेंची तर्‍हाही तशीच कालपर्यंत कायम होती. या काळात मंत्रिमंडळात क्रमांक दोनची जागा, बैठकीत बसायला मिळणारी मुख्यमंत्र्यांच्या बाजूची खुर्ची, एवढीच काय ती त्यांच्यासाठी जमेची बाजू. बाकी, महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या महसूल विभागातून त्यांना केव्हाच हद्दपार करण्यात आले होते. गाजर समोर धरले जात असले, तरी मुख्यमंत्रिपद नेहमीच त्यांना गवसणी घालत राहिले आहेे. आणि आता तर राज्यात कॉंग्रेसच्या नेतृत्वात सत्ता स्थापन होण्याची शक्यताही कधी नव्हे एवढी धूसर झालेली आहे. तिकडे कणकवली अन् कुडाळमध्येही अलीकडच्या निवडणुकीतल्या निकालातून लोकांच्या संतापाचा भडका जाणवण्याइतपत स्पष्टपणे व्यक्त झालेला. इतक्या वर्षात या परिसरात कोकणाचा कमी अन् राणेंचाच विकास अधिक झाल्याची बाब एव्हाना लोकांच्याही ध्यानात आली आहे. मारहाण, धमक्या या माध्यमातून या परिसरात वाढलेले त्यांचे प्रस्थ, त्यांचेच उद्योग, त्यांच्याच शैक्षणिक संस्था, लोकांचा विरोध झुगारून जैतापुरात वीज केंद्र उभारण्याचा त्यांचाच घाट, विरोधकांना चिरडून टाकण्याची भाषा, त्यांना सळो की पळो करून सोडण्याचा दावा सांगणारा दर्प, विरोध करण्यासाठी उठलेले हात कलम करण्याची उर्मट माजोरी... लोक काहीच विसरलेले नाहीत यातले. कालपर्यंतच्या त्यांच्याच वागणुकीचे प्रत्युत्तर लोकांच्या वागणुकीतून मिळू लागलेय् आता. बहुधा धूर्त राणेंना जनामनातला हा कल एव्हाना कळून चुकला आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा हे वरवरचे नाटक आहे. वास्तवात ध्यानात आलेले अंध:कारमय राजकीय भवितव्य, हेच या राजीनाम्याचे मूळ कारण आहे.
राजीनामा सादर करताना, त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेली जनतेच्या न होणार्‍या कामांचे कारणही लटके आहे. पक्षश्रष्ठींनी दिलेले, मुख्यमंत्री बनविण्याचे आश्‍वासन पूर्ण न झाल्याने आपण नाराज असल्याचेही राणेंनी स्पष्ट केले आहे. दिल्लीतल्या नेत्यांनी आश्‍वासन दिले, ते पूर्ण होण्याची वाट राणे तब्बल नऊ वर्षांपर्यंत बघत राहिले? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर विरोधकच काय, पण सहकारी पक्षही नाराज असताना आजवर कधी ब्र न काढणार्‍या राणेंना आता अचानक ती कार्यपद्धती आक्षेपार्ह वाटू लागली? मुख्यमंत्र्यांच्या कामाचा वेग संथ आहे, ते फायली लवकर निकाली काढत नाहीत, त्यामुळे लोकांची कामे होत नाहीत, हे सार्‍या महाराष्ट्राला केव्हाच कळाले असताना त्यांच्या शेजारी बसणार्‍यांना ते इतक्या उशिरा कळावे अन् अचानक त्यांना जनहिताचे स्मरण व्हावे आता? विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या संभाव्य पराभवाची चिंता आणि तो होऊ नये म्हणून कठोर पावलं उचलण्याची उपरती त्यांना लोकसभा निवडणुकीत मुलाचा पराभव झाला नसता, तर झाली असती?
मुळात राजीनामा देताना राणेंनी व्यक्त केलेली खंत बरीच बोलकी आहे. मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखवून त्यांना शिवसेनेतून बाहेर तर काढण्यात आले, पण नंतरच्या काळात त्यांचे पाऽऽर खोबरे करण्यात आले. पण इतके दिवस राणेंनी मूग गिळून तो अवमान सहन केला. आज ना उद्या मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडेल या आशेने. पण कॉंग्रसनेही या नेत्याचे पाणी जोखले होते. त्यांची ताकद कोकणच काय, कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदूर्गच्या पलीकडे नसल्याचे वास्तव नेत्यांच्याही ध्यानात आले होते. म्हणूनच ते यांना झुलवत राहिले अन् हेही झुलत राहिले. सोनियांच्या विरोधात त्यावेळी नाही नाही ते बोलणार्‍या या नेत्याला त्या पक्षाने मंत्रिपद तर दिले. मात्र, मुख्यमंत्रिपद आजच काय, पण भविष्यातही कधी मिळणार नाही, याची गाठ तेव्हाच बांधली होती. राणेंसारख्या एका हुशार नेत्याला त्याची कल्पना नव्हती, असे कसे म्हणता येईल? त्यामुळे त्याचा राग कधीतरी व्यक्त होणारच होता. फक्त त्याचा मुहूर्त मुलाच्या पराभवातून जनभावना स्पष्ट झाल्यानंतरचा निश्‍चित झाला, एवढेच! शिवसेनेतल्या एका वाघाची या काळात कॉंग्रेसने पाऽऽर शेळी केल्यावर...!

Wednesday, July 9, 2014

न्यायमूर्तीसाहेब, निदान तुम्हीतरी...!

डॉ. दाभोळकरांचा खून ही खरं तर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी बाब. पण त्यावर बोट ठेवणार कोण? इथे तर प्रत्येकालाच कथित ‘जातीयवाद्यांना’ कोंडीत पकडून खुनाच्या या घटनेचा पुरेपूर ‘उपयोग’ करून घेण्याची घाई झालेली. त्यामुळे मारेकर्‍यांना ताब्यात घेऊन घटनेमागील कारणांचा शोध घेण्यापेक्षाही, त्यानंतर ठोस निष्कर्षाप्रत येण्यापेक्षाही मुख्यमंत्र्यांना सनातन वर बंदी घालण्याची गरज अधिक महत्त्वाची वाटली. असे केले की त्याचा राजकीय लाभ मिळू शकतो, याचे ठोकताळे मनात पक्के असल्याने, जो तो ऊठसूट जातीयवाद्यांवर वार करायला सरसावला होता. जणू काय खून करणार्‍यांशी आताच बोलणे झाले असल्याच्या थाटात मीडियातले स्वयंघोषित पंडितही खुनामागील कारणांची आपापल्या परीने मीमांसा करीत होते. मीडियाच्या लेखी ‘तज्ज्ञ’ असलेली मंडळी त्यावेळच्या चर्चेत आपले ज्ञान पाजळत होती... आता जवळपास वर्ष लोटले आहे. दाभोळकरांचे मारेकरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. आता मीमांसेची ती अविरत बडबड बंद झाली असली, तरी मारेकरी गवसत नसल्याबद्दल कुणीच ओरड करायला तयार नाही. हे सरकारचे, पोलिस प्रशासनाचे अपयश असल्याचे वास्तव मांडण्याचीही कुणाची तयारी नाही. आता वर्षभरानंतर एका न्यायमूर्तींची प्रतिक्रिया समोर येते, तर ती ही प्रशासनाला पाठीशी घालणारीच?
प्रबळ सरकार आणि भले मोठे पोलिस दल अस्तित्वात असतानाही डॉ. दाभोळकरांचे मारेकरी सापडत नाहीत, याचा अर्थ समाजातील काही प्रवृत्तींचा त्या मारेकर्‍यांना पाठिंबा असल्याचे सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायमूर्तींचे परवाचे विधान मुख्यमंत्र्यांप्रमाणेच बरेचसे राजकीय वळणावर जाणारे आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी नाही का, तेव्हा कथित जातीयवाद्यांवर आरोप करून मोकळे होण्याचा मार्ग स्वीकारला होता? त्यांना मुळीच न सोडण्याची भाषाही वापरली होती. सनातन सारख्या संस्थांवर बंदी घालण्याची घोषणाही त्यांनी त्यावेळी केली होती. नंतरच्या काळात त्यातले काहीएक झाले नाही, हे त्यांच्या कार्यशैलीला साजेसेच असावे कदाचित. पण, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका कार्यकर्त्याचा पुण्यात ऐन सकाळी खून होतो. खून करून आरोपी पसार होतात. पुरोगामी महाराष्ट्राच्या तल्लख बुद्धीच्या पोलिसांना नंतरचे वर्षभर ते सापडत नाहीत, याची जराशी लाज वाटून घ्यायचे सोडून प्रशासनाचा एक भाग असलेल्या न्यायव्यवस्थेलाही आता मारेकर्‍यांच्या पाठीशी उभी ठाकलेली प्रवृत्ती अधिक ताकदवान वाटू लागली असेल, तर सरकारच्या अपयशावर कोरडे ओढण्याची जबाबदारी नेमकी कुणी पार पाडायची, असा प्रश्‍न उपस्थित होतो. डॉ. दाभोळकरांचा खून ही खरं तर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी बाब. पण त्यावर बोट ठेवणार कोण? इथे तर प्रत्येकालाच कथित ‘जातीयवाद्यांना’ कोंडीत पकडून खुनाच्या या घटनेचा पुरेपूर ‘उपयोग’ करून घेण्याची घाई झालेली. त्यामुळे मारेकर्‍यांना ताब्यात घेऊन घटनेमागील कारणांचा शोध घेण्यापेक्षाही, त्यानंतर ठोस निष्कर्षाप्रत येण्यापेक्षाही मुख्यमंत्र्यांना सनातन वर बंदी घालण्याची गरज अधिक महत्त्वाची वाटली. असे केले की त्याचा राजकीय लाभ मिळू शकतो, याचे ठोकताळे मनात पक्के असल्याने, जो तो ऊठसूट जातीयवाद्यांवर वार करायला सरसावला होता. जणू काय खून करणार्‍यांशी आताच बोलणे झाले असल्याच्या थाटात मीडियातले स्वयंघोषित पंडितही खुनामागील कारणांची आपापल्या परीने मीमांसा करीत होते. मीडियाच्या लेखी ‘तज्ज्ञ’ असलेली मंडळी त्यावेळच्या चर्चेत आपले ज्ञान पाजळत होती... आता जवळपास वर्ष लोटले आहे. दाभोळकरांचे मारेकरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. आता मीमांसेची ती अविरत बडबड बंद झाली असली, तरी मारेकरी गवसत नसल्याबद्दल कुणीच ओरड करायला तयार नाही. हे सरकारचे, पोलिस प्रशासनाचे अपयश असल्याचे वास्तव मांडण्याचीही कुणाची तयारी नाही. आता वर्षभरानंतर एका न्यायमूर्तींची प्रतिक्रिया समोर येते, तर ती ही प्रशासनाला पाठीशी घालणारीच?
सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी दाभोळकर हत्या प्रकरणात परवा पुण्यात व्यक्त केलेली भावना समजा एक वेळ मान्यही केली. मान्य केले की डॉ. दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ अमान्य असणार्‍या समाजघटकांनीच त्यांचा खून केला; आणि आता समाजातलेच काही लोक त्या मारेकर्‍यांना पाठीशी घालत पोलिसांपासून त्यांना दडवून ठेवताहेत. पण मग गोखले साहेब, महाराष्ट्राची पोलिस यंत्रणा काय करीत आहे? त्यांना कुणी रोखलं या सर्व प्रवृत्तींचा नायनाट करून मारेकर्‍यांना पकडून फासावर लटकाविण्यापासून? मुळात या प्रकरणात पोलिस यंत्रणा पुरती अपयशी ठरली आहे. इथेच नाही, या राज्यातल्या गेल्या काही वर्षांतल्या कित्येक प्रकरणांत असे अपयशच पोलिसांच्या पदरी पडले आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईत तीन बॉम्बस्फोटांची मालिका घडली. आरोपींचा अद्याप पत्ता नाही. पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटाचे तरी आरोपी गवसलेत पोलिसांना? तेही नाही. गोखले साहेब, इथे कोणत्या प्रवृत्ती आडव्या आल्यात पोलिस यंत्रणेच्या? नेमक्या दाभोळकर प्रकरणातच त्या कशा आडव्या येताहेत? आणि समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही सामाजिक प्रवृत्ती येतच असतील आडव्या, तर त्यांना ठेचून काढण्याची जबाबदारी कुणाची? ती जबाबदारी पार पाडायचे सोडून हतबलपणे रडगाणे का गात बसलेत स्वत:ला बुद्धिजीवी म्हणवून घेणारे सारे लोक? प्रशासन धड चालविता येत नसलेले लोक राजकीय नेते गृमंत्रालयाचा कारभार चालवतात. लायकीपेक्षाही राजकीय लागेबांधे यातून इथे पोलिस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या होतात. कायदेशीर कारवाईतही दरवेळी जात, धर्म, राजकीय पक्ष आडवा येतो इथे. म्हणूनच मग आमदाराशी मुजोरी करणारा पोलिस उपनिरीक्षक निलंबित होतो अन् नियम तोडून भरधाव वेगात गाडी चालवणारे आ. क्षितिज ठाकूर कॉलर टाईट करून त्याच्याविरुद्ध छातीठोकपणे तक्रार गुदरतात. असल्या यंत्रणेकडून काय अपेक्षा करणार आहात न्यायमूर्ती महोदय? दाभोळकरांच्या हत्येच्या वेदना इथे प्रत्येकाच्याच मनात आहेत. घटनेनंतर आपले मुख्यमंत्री ज्या दमदारपणे बोलत होते, ते बघून वाटले बस्स! आता तासाभरात गुन्हेगाराचं बखुटं धरून आणणार हे! मीडियातली चर्चा तर अशी काही रंगली होती की, जणू प्रश्‍नकर्त्यांसह, त्यात सहभागी प्रत्येक जण दाभोळकरांनी चालविलेल्या चळवळीचा पाईक होता. पण... मुख्यमंत्र्यांचा तो आवेश अन् कथित समाजसुधारकांचा तो बाणा... सारेच पोकळ निघाले. यंत्रणेचे अपयश वळचणीला ठेवून कथित प्रवृत्तींवर वार करायला निघालेल्यांच्या या गर्दीत निदान न्यायमूर्तींनी तरी सामील होऊ नये ना गोखले साहेब!

Tuesday, July 1, 2014

सावधान! दहशतवाद अण्वस्त्रसज्ज होतोय्!

अमेरिकेला दहशतवादाची जाणीव व्हायला, त्याचे गांभीर्य कळायला कित्येक वर्षे जावी लागलीत. तिथल्या दोन इमारती जमीनदोस्त व्हाव्या लागल्यात. पण तोवर भारतासारखे जगातले इतर कित्येक देश दहशतवादाचा सामना करताना वेगवेगळ्या स्वरूपात त्याचे परिणाम भोगत राहिले होते. लष्कर-ए-तोयबा असो, वा मग इंडियन मुजाहिदीन, त्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनी दरवेळी केवळ हादरण्याचाच अनुभव इथल्या सरकारांनी घेतला अन् जवळची लोकं कायमची गमावल्याचे दु:ख वाट्याला आले, ते सर्वसामान्य निष्पाप लोकांच्या! बरं ज्यांनी इतरांच्या कुरघोड्या करण्यासाठी या दहशतवादाला खतपाणी घातले, त्याही देशांचे फार बरे चाललेले आहे, असेही नाही. पाकिस्तान, इराक ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत. ज्यांचे लाड पुरवताना कधीकाळी पाकिस्तानातील नेत्यांना फुरसत होत नव्हती, आज त्याच तालिबान्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्याची वेळ तिथल्या सरकारवर आली आहे. नेमके हेच इराकमध्येही घडत आहे. सीरियाविरुद्ध लढण्यासाठी समाजातल्या सुन्नी घटकाला भडकवून आयएसआयएस नावाची दहशतवादी संघटना तयार करताना, तिला दिवसागणिक वाढताना बघताना, त्यांच्या माध्यमातून शत्रूंची शकले पडताना बघून इराकच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, आता तीच जमात आपल्याच देशाच्या मुळावर उठली आहे. आपल्याच देशाचे अस्तित्व संपवायला सरसावली आहे. 
तिकडे अर्धाअधिक इराक दहशतवाद्यांच्या ताब्यात गेला असताना, आयएसआयएस नावाचे त्याच देशाने जन्माला घातलेले दहशतवादाचे भूत आता त्याच्याच मानगुटीवर बसलेले असताना, जगभरातील नावाजलेल्या दहशतवादी संघटनांनी ठिकठिकाणी महाविनाश घडविण्यास सक्षम अशी शस्त्रे मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले असल्याचे वृत्त येऊन धडकले आहे. याचा भविष्यातील परिणाम काय असेल कुणास ठावूक, पण मुस्लिम राष्ट्रांच्या आशीर्वादाने, त्यांच्या छत्रछायेखाली, त्यांच्या सहमतीने जन्माला आलेली दहशतवादाची पिलावळ आता त्याच देशांच्या अस्तित्वावर घाला घालू लागली असल्याचे धगधगते वास्तव नव्याने जगापुढे आले आहे. केवळ लोकांचे मुडदे पाडून, रक्ताचा सडा टाकून, वेगवेगळ्या देशातली प्रशासने हादरवून, तिथली सरकारे अस्थिर करून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याची या संघटनांची धडपड नेमकी कशासाठी? यांना दहशतवादाची पाळेमुळे रुजवायची आहेत, ती नेमकी कशासाठी? अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारती धाराशायी करून, हजारो लोकांचे बळी घेऊन दहशतवाद्यांनी नेमके काय सिद्ध केले? मुंबईवर २६/११ चा हल्ला करून काय दाखवले लष्कर-ए-तोयबाने जगाला? धार्मिक चौकटीच्या पलीकडे जाऊन दहशतवाद हिंसाचाराच्या कुशीत विसावू लागलाय् अलीकडे. कधी काळच्या स्वत:च्या स्वातंत्र्याच्या उद्देशाने तयार झालेल्या या कथित ‘जिहादी’ टोळ्या आता दुसर्‍यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी टपलेल्या दिसताहेत. स्वत:चे अस्तित्व पणाला लावून सरकारकडून हवे ते घडवून आणण्यापेक्षाही घडविलेल्या बॉम्बस्फोटांतून रक्ताच्या थारोळ्यात साचलेला प्रेतांचा खच बघण्यात आसूरी आनंद मिळू लागलाय् या टोळ्यांच्या म्होरक्यांना. त्या आसूरी आनंदाच्या लाटेत स्वातंत्र्याचे उद्दिष्ट अन् धर्माची तत्त्वे केव्हाच वाहून गेलीत. तरीही जिहादाच्या या लढाईला रंग आणि आवरणं मात्र अजूनही धर्माचीच लाभली आहेत.
अमेरिकेला दहशतवादाची जाणीव व्हायला, त्याचे गांभीर्य कळायला कित्येक वर्षे जावी लागलीत. तिथल्या दोन इमारती जमीनदोस्त व्हाव्या लागल्यात. पण तोवर भारतासारखे जगातले इतर कित्येक देश दहशतवादाचा सामना करताना वेगवेगळ्या स्वरूपात त्याचे परिणाम भोगत राहिले होते. लष्कर-ए-तोयबा असो, वा मग इंडियन मुजाहिदीन, त्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनी दरवेळी केवळ हादरण्याचाच अनुभव इथल्या सरकारांनी घेतला अन् जवळची लोकं कायमची गमावल्याचे दु:ख वाट्याला आले, ते सर्वसामान्य निष्पाप लोकांच्या! बरं ज्यांनी इतरांच्या कुरघोड्या करण्यासाठी या दहशतवादाला खतपाणी घातले, त्याही देशांचे फार बरे चाललेले आहे, असेही नाही. पाकिस्तान, इराक ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत. ज्यांचे लाड पुरवताना कधीकाळी पाकिस्तानातील नेत्यांना फुरसत होत नव्हती, आज त्याच तालिबान्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्याची वेळ तिथल्या सरकारवर आली आहे. नेमके हेच इराकमध्येही घडत आहे. सीरियाविरुद्ध लढण्यासाठी समाजातल्या सुन्नी घटकाला भडकवून आयएसआयएस नावाची दहशतवादी संघटना तयार करताना, तिला दिवसागणिक वाढताना बघताना, त्यांच्या माध्यमातून शत्रूंची शकले पडताना बघून इराकच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, आता तीच जमात आपल्याच देशाच्या मुळावर उठली आहे. आपल्याच देशाचे अस्तित्व संपवायला सरसावली आहे. सरकारची ताकद आणि कमजोरी दोन्ही ठावूक झाल्याने आणि दहशतवादी कृत्ये करताना देशाचा नकाशा प्रशासनापेक्षाही काकणभर अधिकच पाठ झाल्याने एकापाठोपाठ एक शहरं या टोळ्या ताब्यात घेऊ लागल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत अमेरिकेची सावध भूमिका संशयास्पद आहेच. पण, आज जगभरात फोफावलेला दहशतवाद हा जगातल्या कुठल्या ना कुठल्या देशाच्या सत्ताधारी नेत्यांच्या पापाचे फळ असल्याच्याच निष्कर्षाप्रत यावे लागते. बहुधा म्हणूनच आता सार्‍या जगाने एकत्रितपणे त्याचा सामना करण्याची वेळ आली आहे. नव्हे, तीच काळाची निकड झाली आहे.
एकीकडे इराक, पाकिस्तानसारख्या देशांविरुद्ध उलटलेल्या स्थानिक दहशतवादी टोळ्यांनी तिथली तिथली सरकारे अक्षरश: जेरीस आणली असताना जगातल्या इतर देशांविरुद्ध कायम फूत्कारणार्‍या टोळ्या आता आपल्या कार्यकक्षा रुंदावण्याच्या योजना आखताहेत; आणि दुर्दैव असे की, स्वत: दहशतवादाचे दुष्परिणाम भोगले असले, तरी पाकिस्तानची भारताविरुद्ध आणि इराकची सीरियाविरुद्ध लढण्याची खुमखुमी अद्याप जिरलेली नाही. त्यासाठी अजूनही याच दहशतवादी टोळ्या त्यांना त्यांच्या हाताशी हव्या आहेत. त्यामुळेच दहशतवादाचे अस्तित्व मुळापासून संपविण्याची तयारी त्यांचीही दिसत नाही. या देशांची ही मानसिकता, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे त्यांचे डावपेच दहशतवाद्यांनी हेरले नसतील, असे कसे म्हणता येईल? उलट त्याची पुरेपूर जाणीव असल्यानेच तालिबानी आणि आयएसआयएससारख्या संघटना आपले अस्तित्व आणि भविष्याबाबत निश्‍चिंत आहेत. उलट आपल्या अस्तित्वाबाबत पूर्ण खात्री असल्याने आपल्या टोळ्यांच्या भविष्यातील विस्ताराच्या योजना आखण्यात ते मशगूल आहेत. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर ‘लष्कर’चे आपल्या देशातील अस्तित्वच नाकारणार्‍या पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून या दहशतवादी संघटनेने आपले कार्य विस्तारले आहे. जमात-उद-दवा नामक संघटनेच्या जिहादी मनसुब्यांचा उल्लेख एका पाकिस्तानी लेखकाच्या एका पुस्तकातून नुकताच उद्धृत झाला आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मानला जाणारा हाफिज सईद याच्या जमात-उद-दवा नामक संघटनेला अमेरिकेने नुकतेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. तर आपली हवाई आणि सागरी ताकद वाढविण्यासाठीच्या क्लृप्त्या लढविणे ‘जमात’ ने नुकतेच आरंभले आहे. संघटनेच्या बळाच्या वाढीची दहशतवाद्यांची ही युक्ती काही कुठल्याशा देशाची सत्ता हस्तगत करण्यासाठी योजलेली नाही, हे तर सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. मग का वाढवायचीय् या टोळ्यांना आपली ताकद? का विस्तारायच्या आहेत त्यांना आपल्या कार्यकक्षा? का हवी आहे त्यांना नवीन कार्यकर्त्यांची भरती? तर ते सारे यासाठी की, त्यांना अजून क्रूर कृत्ये भविष्यात करायची आहेत. जगभरातल्या विविध देशांमध्ये येत्या काळात अजून हिंसाचार घडवायचा आहे. नरसंहार करायचा आहे... त्यासाठी गरज पडली तर अण्वस्त्रसज्ज देखील त्यांना व्हायचे आहे... दहशतवाद्यांची ही तयारी म्हणजे, भारतासारख्या कायम दहशतवादाच्या सावटात वावरणार्‍या देशांसाठी धोक्याचा गंभीर इशारा आहे. बांगलादेशच्या सीमेवरून होणारी घुसखोरी, चीनच्या सीमेवरून होत असलेले अतिक्रमण, या पार्श्‍वभूमीवर दहशतवादाच्या या नव्या सज्जतेचाही सामना करण्याची तयारीही भारतातील सरकारला येत्या काळात करावी लागणार आहे. एकूण, पुढील काळ आव्हानात्मक असल्याचेच हे संकेत आहेत.
खरे तर दहशतवादाचा सामना करण्यासाठी, नव्हे तो मुळासकट निखंदून काढण्यासाठी केवळ बाधित देशांनीच नव्हे, तर सार्‍या जगानेच आता पुढाकार घ्यायला हवा. जोवर पाकिस्तान भारताच्या खोड्या काढतोय् तोवर दुरून तमाशा बघायचा, शांततेच्या गप्पा हाणायच्या आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला की मात्र रान माजवायचे, ही अमेरिकन खेळी या प्रकरणी उपयोगाची नाही. कुणाचे तरी पाठबळ, कुणाचा तरी मदतीचा हात हेच दहशतवाद्यांची पाळेमुळे रुजण्याचे मूळ कारण आहे. कुठलेही कारण नसताना त्याविरुद्ध लढण्याची वेळ आलेले भारतासारखे देश तर त्याविरुद्ध लढतीलच, पण भविष्यात आपलाही इराक, पाकिस्तान होऊ नये, असे वाटत असेल, तर दहशतवाद्यांना जन्माला घालणार्‍या देशांनीच आता आपल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे...