Saturday, July 13, 2013

रिकामा सरकारी बंगला आणि ढोबळेसाहेबांचा कणखर बाणा


आपली सरकारी यंत्रणा भारी लबाड अन् बेरकी आहे बघा. कालपर्यंत खुर्ची होती तुमच्याकडे तर सलाम ठोकायचेत तुम्हाला. आता पद गेल्यावर कसे फितूर झालेत सारे. दारातून लाल दिव्याची गाडी हलत नाही अन् बंगला रिकामा करण्याची वेळ येत नाही, तोच उलटलेत सारे तुमच्यावर. आता बंगला सरकारी म्हटल्यावर सारी सरंजामशाही सरकारचीच असणार. त्यात नवल कसले? इतके दिवस तुम्ही त्या बंगल्यात राहिलात. तिथल्या वातावरणात रुळलात. सारा बांगला सरकारी असूनही तुम्हाला ‘आपला’ वाटू लागला. तिथल्या एकूणएक वस्तूंशी जुळलेले नाते अंतर्मनात रुजले. या पार्श्‍वभूमीवर बंगला सोडताना गळ्यात दाटलेला हुंदका... या सार्‍या बाबींचे महत्त्व कळावे ते तुमच्यासारख्या हळव्या हृदयाच्या, कविमनाच्या साहित्यिकाला. रूक्ष मनाच्या, पीडब्ल्यूडीत काम करणार्‍या येर्‍यागबाळ्यांचे थोडीच काम आहे ते. पांढरे कागद काळे करत कसेबसे नोकरीतले दिवस चाललेत त्यांचे. मनाच्या पाट्या अजून कोर्‍या आहेत त्यांच्या. सजीवांचे अजिवांशी जडणारे नाते त्यांना कुठले आलेय् कळायला!




प्रति,
आदरणीय लक्ष्मणराव ढोबळे
मा. आमदार.
सप्रेम नमस्कार.
सरकारी बंगल्यातल्या चार-दोन वस्तू इकडे तिकडे झाल्यावरून परवा प्रसारमाध्यमांनी केलेला आपला उद्धार जराही नाही आवडला आपल्याला. चार आण्यांचं दिसलं की, बारा आण्यांचं छापायची अन् दाखवायचीच सवयच जडलीय् या खुळ्यांना. आता आमदार म्हणजे कोण? जनतेचे सेवक! सरकार कुणाचं? जनतेचं. जे सरकारचं, ते जनतेचं. जे जनतेचं ते सरकारचं. मग सरकारचं ते तुमचंही नाही का? तर हे मान्य करायलाच तयार नाहीत वेडे. आता बघाना! तुम्ही या राज्याचे मंत्री होतात. केवढी मोठी जबाबदारी सोपवली होती पवारसाहेबांनी तुमच्यावर. कुणीतरी कान भरलेत त्यांचे आणि रागावलेत ते तुमच्यावर. हिरावून घेतली लाल दिव्याची गाडी...
आपली सरकारी यंत्रणा भारी लबाड अन् बेरकी आहे बघा. कालपर्यंत खुर्ची होती तुमच्याकडे तर सलाम ठोकायचेत तुम्हाला. आता पद गेल्यावर कसे फितूर झालेत सारे. दारातून लाल दिव्याची गाडी हलत नाही अन् बंगला रिकामा करण्याची वेळ येत नाही, तोच उलटलेत सारे तुमच्यावर. आता बंगला सरकारी म्हटल्यावर सारी सरंजामशाही सरकारचीच असणार. त्यात नवल कसले? इतके दिवस तुम्ही त्या बंगल्यात राहिलात. तिथल्या वातावरणात रुळलात. सारा बांगला सरकारी असूनही तुम्हाला ‘आपला’ वाटू लागला. तिथल्या एकूणएक वस्तूंशी जुळलेले नाते अंतर्मनात रुजले. या पार्श्‍वभूमीवर बंगला सोडताना गळ्यात दाटलेला हुंदका... या सार्‍या बाबींचे महत्त्व कळावे ते तुमच्यासारख्या हळव्या हृदयाच्या, कविमनाच्या साहित्यिकाला. रूक्ष मनाच्या, पीडब्ल्यूडीत काम करणार्‍या येर्‍यागबाळ्यांचे थोडीच काम आहे ते. पांढरे कागद काळे करत कसेबसे नोकरीतले दिवस चाललेत त्यांचे. मनाच्या पाट्या अजून कोर्‍या आहेत त्यांच्या. सजीवांचे अजिवांशी जडणारे नाते त्यांना कुठले आलेय् कळायला!
तर ढोबळेसाहेब, सांगायचा मुद्दा असा की, तुमचे मंत्रिपद गेले. लाल दिव्याची गाडी गेली. मनाची तयारी होत नव्हती. पण, तरीही सरकारी बंगला सोडावा लागला. जिवाची केवढी घालमेल झाली असणार तुमच्या. पण, ते कोरड्या मनाने जगणार्‍या चाकरमान्यांना कसे कळणार? ते आपले निघाले बंगला रिकामा होताच सरकारी ड्युटी करायला. तुम्ही बंगला रिकामा करणार असल्याची सूचना त्यांना मिळाली होतीच. पण, तुम्ही तो पूर्णपणे ‘रिकामा’ केल्याचे बघून ते पुरते चाट पडले. बघतात तर काय, दारं, खिडक्यांवरचे पडदे गायब! छतावरचा पंखाही नाही. स्वयंपाकघरात जाऊन बघावे, तर सरकारी सिलेंडरही जागेवर नाही. अगदी हात धुवायचे बेसिनही दिसेना, तेव्हा मात्र त्यांचे धाबे दणाणले. सामान चोरीला गेलं म्हणावं, तर अलीकडे पडदे, पंखे, बेसिन असले सामान चोरून नेत नाहीत होत हो चोर. मग काय झालं असेल? सरकारी अधिकारी ते. अकलेचे तारे तोडण्यात त्यांचा हात कुणी धरावा? आता पाणी पुरवठा विभाग तुमच्याचकडे होता म्हणून आठवले बघा. पाण्याचे स्रोतच उपलब्ध नसलेल्या गावात पाण्याच्या टाक्या बांधून काढण्याचा विक्रम या विभागाच्या अधिकार्‍यांनी केल्याचे ज्ञात असेलच आपल्याला. तर असल्या कित्येक किमया करण्यात तरबेज असलेल्या सरकारी अधिकार्‍यांनी आपण सोडलेला बंगला पूर्णपणे ‘रिकामा’ बघून काही निष्कर्ष काढले. साहेबांना वर्दी दिली. खुज्या मनाच्या वेड्या अधिकार्‍यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याची तयारीही चालवली होती बघा!
खरं तर हा सारा सरकारी मामला तुमच्यात आणि सार्वजनिक बांधकाम विभागात चालला होता. माध्यमांनी त्यात नाक खुपसायचं काही गरज होती का? पण, हे बेटे नाही तिथं कडमडतात. जरासं कुठे खुट्ट झालं की, लागलीच यांचे कान टवकारतात. सूत दिसायचीच देर की, यांनी स्वर्ग गाठलाच समजा! याही प्रकरणात सार्‍या माध्यमांनी उड्या घेतल्या. ढोबळेंनी सरकारी बंगल्यातून सात लाखांचे सामान नेल्याच्या वावड्या उठल्या. बातमी वार्‍यासारखी सगळीकडे पसरली. तुम्हाला बदनाम करण्याचा, तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न तुमच्याच काही राजकीय विरोधकांनी चालवला असल्याचे गणित मांडले गेले. साराच संभ्रम निर्माण झाला होता. बरं, ही चाल कॉंग्रेसवाल्यांनी खेळली म्हणावे, तर बांधकाम विभाग आपल्या राष्ट्रवादीच्याच अखत्यारित आहे. आपले मित्र असलेले छगनराव भुजबळ त्या खात्याचा कारभार बघताहेत. तरीही ‘माजी मंत्र्यांनी सात लाखांचे सामान लंपास’ केल्याची ‘बातमी’ बाहेर आली.
कानांवर विश्‍वासच बसेना. लक्ष्मणराव ढोबळे म्हणजे वारकरी माणूस. ज्ञानोबा, तुकोबांची गाथा कीर्तनातून मांडणारा सच्च्या दिलाचा कार्यकर्ता. अण्णाभाऊ साठेंनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा पाईक. खिडक्यांचे पडदे अन् हात धुवायचे बेसिन असले सामान त्यांच्या खिजगणतीतही बसत नाही. पण, या सार्‍या वस्तू बंगल्यात नसल्याची वार्ताही खरी होती. मनावर दगड ठेवून या वावड्यांवर विश्‍वास ठेवावा लागणार असे वाटत असतानाच, आपण मोठ्या दिलानं केलेला खुलासा वाचनात आला अन् जीव भांड्यात पडला.
मंत्रिपदावरून तुम्हाला काढल्यानं तुमचे समर्थक पार संतापले होते. त्यांनीच मनात साचलेला पक्षावरचा राग व्यक्त करण्यासाठी बंगल्यातल्या सामानाची तोडफोड केली. सामान अस्ताव्यस्त केले. सरकारी मालकीच्या संपत्तीची अशी नासधूस तुमच्याच्याने बघवली गेली नाही. ती इतरही कुणाच्या नजरेस पडू नये याची काळजी घेत अत्यंत जड अंत:करणाने तुम्ही सारे सामान बंगल्यातून हलवले. आता सात लाखांच्या किमतीचे नवीन सामान घेऊन सजवलेला बंगला पूर्ववत सरकारच्या स्वाधीन करण्याची कल्पना तुम्ही जाहीर केली आहे. तसे छगनरावांना यापूर्वीच कळवल्याचेही तुम्ही सांगितलंत. पण, मग आधीच ठाऊक असतानाही छगनरावांनी आपल्या अधिकार्‍यांना याची कल्पना का देऊ नये? त्यांचे अधिकारी का ही बातमी सगळीकडे सांगत सुटलेत? तसे बरे चालले आहे ना हो, तुमचे आणि छगनरावांचे? नाही, रिकाम्या बंगल्याची बातमी अगदी व्यवस्थितपणे बाहेर आली, म्हणून आपली शंका. दुसरं काय नाय. म्हणजे बंगल्यात एवढी तोडफोड झाली, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता नाही अन् सामान नेल्याची बातमी मात्र सार्‍या राज्याला कळवायची ‘व्यवस्था!’ तुम्हा मोठ्या लोकांच्या राजकारणाचं आम्हा बापुड्यांना काही कळतच नाही बघा.
तर लक्ष्मणराव, आता कसं हायसं वाटलं बघा. तुम्हाला चोर ठरवायला निघालेल्यांच्या चांगलीच थोबाडीत हाणलीत तुम्ही. तुमच्या उदार आणि कणखर बाण्याचं दर्शन घडलं त्यातनं. सामान लंपास केलं म्हणता, हे घ्या, असं म्हणत सात लाख रुपये त्या पीडब्ल्यूडीच्या तोंडावर अस्से फेकून मारणार तुम्ही. स्वाभिमान म्हणतात तो हा. नाही तर तुमच्या पक्षाचे काही लोक नुसतीच बिरुदावली मिरवतात पक्षाच्या या घोषवाक्याची. तुम्ही मात्र इतरांपेक्षा वेगळे निघालात. एक मात्र खरे की, एवढा गाजावाजा होण्यापूर्वीच तुम्ही हे काम करून टाकायला हवं होतं. मागावर असलेल्या लोकांना मग संधीच मिळाली नसती. पण, यातून एक राजकारण मात्र तुम्हीही साधलंच म्हणा. तुमचे मंत्रिपद काढल्याने तुमचे समर्थक किती खवळले होते, संतापले होते, हे यानिमित्ताने साहेबांच्या कानावर गेलेच असणार. सात लाखांच्या तुलनेत ते जास्ती महत्त्वाचं आहे. पण, एक सांगा ढोबळेसाहेब! मंत्रिपद असताना शेकडो कार्यकर्त्यांना ज्या सरकारी बंगल्याने सांभाळले, पद गेले म्हणून त्यातल्या सामानाची तोडफोड करून राग व्यक्त करण्याची ही कुठली तर्‍हा तुमच्या समर्थकांची? ती काहीशी न्यारी आणि अनाठायी आहे असे नाही वाटत आपल्याला? तसे वाटत असेल, तर आपल्या या समर्थकांची समजूत काढायला हवी कधीतरी. नाही तर भविष्यात मंत्रिपद लाभताच पाच-दहा लाख रुपये बाजूला काढून ठेवावे लागतील तुम्हाला. बंगला सोडताना सरकारकडे भरावयाची नुकसानभरपाई म्हणून...!

तुमचा
एक समर्थक/ कार्यकर्ता

No comments:

Post a Comment