Tuesday, December 31, 2013

अरेरे! काय वेळ आली कम्युनिस्टांवर!

 भारतीय लोकमानस आणि लोकशाही चमत्कारिक आहे. आणिबाणी लादणार्‍या इंदिरा गांधींवर चप्पल फेकून संताप व्यक्त करणार्‍यांनीच नंतर त्यांना निवडून देत डोक्यावर घेतल्याच्या घटनेचा हा सारा देश साक्षीदार आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, त्याप्रमाणे पुंगी वाजवणार्‍या कुठल्याही गारुड्याच्या भोवती उभे राहण्याची इथल्या जनतेची मानसिकता आहेे. आज ही पुंगी केजरीवाल वाजवताहेत, म्हणून लोक त्यांच्या भोवती गर्दी करून उभे आहेत. यात केजरीवालांना कमी लेखण्याचा वा आम आदमी पार्टीचे नेत्रदीपक यश अव्हेरण्याचा प्रयत्न नाही. पण सोशल मीडियाच्या भरवशावर सामाजिक चळवळी उभ्या राहात नाहीत, हे निदान कारतांसारख्या वैचारिक बैठक लाभलेल्या नेत्यांनी तरी अमान्य करू नये. अण्णा हजारेंनी रामलीला मैदानावर उभारलेल्या आंदोलनाला लाभलेला प्रचंड जनाधार दोनच महिन्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या त्यांच्या आंदोलनाला का लाभला नाही, या प्रश्‍नाचे उत्तर इथल्या जनतेच्या मानसिकतेत दडले आहे. याच विचित्र मानसिकतेने एका नवख्या पक्षाला दिल्लीत सत्तेच्या दारात नेऊन सोडले. पण एरवी फेसबुक, ट्वीटरच्या पलीकडे न जाणार्‍या, मतदानाच्या दिवशी मतदानाला जाण्याऐवजी सुटी एन्जॉय करणार्‍यांच्या भरवशावर समाजपरिवर्तनाच्या लढाया कशा उभारणार कारत साहेब?


काय वेळ आलीय् बघा भारतातल्या कम्युनिस्ट नेत्यांवर! जे कालपर्यंत सामान्य माणसाच्या हक्काची भाषा बोलत होते, त्यांच्या साठीच्या लढ्याचा एल्गार करत होते, लढाईचा शंखनाद करत होते, समाजातील ‘सर्वहारा’ घटकाला न्याय देण्यासाठी संघटनेचे अस्तित्व पणाला लावण्याचा दावा करत होते, त्या कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांना ‘आम आदमी पार्टी’कडून धडे घेण्याची गरज पडावी, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, शिका जरा त्यांच्याकडून काही, असे म्हणण्याची वेळ दिग्गज कम्युनिस्ट नेत्यांवर यावी, हा त्या पक्षाच्या विचारधारेचा पराभव आहे की मधल्या काळात मार्क्स, लेनीन, माओच्या विचारांपासून भरकटलेल्यांना ताळ्यावर आणण्याचा तो केविलवाणा प्रयत्न आहे, हे स्पष्ट व्हायला हवं.
ज्या पक्षाचे अस्तित्व शतकाच्या उंबरठ्यावर आहे, ज्याच्या अस्तित्वाला विचारांचा भक्कम पाया लाभला आहे, मार्क्स, लेनीनच्या विचारांच्या पायावर ज्याच्या कारभाराचा डोलारा उभा आहे, तो पायाच मुळात ठिसूळ झाला असल्याची अन् हा डोलारा केव्हाही कोसळू शकतो अशी भीती तर कम्युनिस्ट नेत्यांना अलीकडे वाटू लागलेली नाही ना?
सुमारे आठ दशकांची परंपरा लाभलेल्या एका पक्षावर काल-परवा निर्माण झालेल्या एका नवख्या राजकीय पक्षाकडून धडे गिरवण्याची वेळ यावी, यातच बहुधा सारे आले. सोशल मीडियाचा वापर करून आम आदमी पार्टीला लाभलेल्या क्षणिक यशाच्या मोहात पडण्याचा मोह बोजड विचारांच्या पखाली शतकानुशतकं वाहणार्‍यांनाही आवरता येऊ नये, हे कशाचे द्योतक मानायचे?
जरा त्या आम आदमी पार्टीकडून काही शिका, असा संदेश मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव प्रकाश कारत यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे. केवळ तेरा महिन्यांचे अस्तित्व लाभलेल्या एका पक्षाला दिल्लीच्या निवडणुकीत लाभलेले घवघवीत यश अन् देशाच्या राजधानीची त्याच्या हातात गेलेली सूत्रे, याच्या मोहात पडले कारत साहेब, की हेवा वाटतोय् त्यांना ‘आप’ च्या या ‘इन्स्टंट’ यशाचा?
कम्युनिस्ट पक्षाला विचारांच्या जोरावर जे वर्षानुवर्षे करता आले नाही, ते आम आदमी पार्टीने अवघ्या काही दिवसांत करून दाखवल्याचे, त्यात सोशल मीडियाची भूमिका अत्यंत मोलाची राहिल्याचे अप्रूप त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. पण भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पार्टी या सारख्या, वैचारिक बैठक लाभलेल्या पक्षांनी असल्या मोहात अडकणे मुळीच अपेक्षित नाही. शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फळी, त्यांना लाभलेला विचारांचा मजबूत पाया, यातून समाजपरिवर्तन घडवण्याच्या इराद्याला अलीकडे मर्यादा येताहेत, नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी हाच सोपा मार्ग उरला आहे, अशा निराशाजनक निष्कर्षाप्रत तर आलेले नाहीत ना, कम्युनिस्ट पक्षाचे शीर्षस्थ नेते?
कधी काळी सामान्य माणसाबद्दलची कणव, समाजातील वंचितांंना न्याय देण्याची भाषा, शेतकरी-शेतमजुरांच्या हक्काचा लढा लढण्याची जिद्द, प्रस्थापितांविरुद्धच्या युद्धाचा हुंकार आवळलेल्या मुठीतून अन् आकाशाच्या दिशेने झेपावलेल्या लाल झेंड्यांमधून ध्वनित व्हायचा. त्याच जोरावर महिला, कामगार, युवा, शेतकरी, शेतमजुरांचे लढे रस्त्यावर उतरून लढले गेलेत. संघर्ष झडत गेला. पण दुर्दैवाने काळानुरूप या लढ्यांची धार बोथट होत गेली. विचारांची बैठक ठिसूळ होत गेली. कधीकाळच्या घमासान संघर्षाची तीव्रता कमी होत गेली, नेत्यांना पंचतारांकित व्यवस्थांचा मोह आवरता आला नाही अन् कार्यकर्त्यांना उपाशीपोटी विचारांचा डोलारा सांभाळता आला नाही. यातून मग एकीकडे शस्त्रांच्या जोरावर चाललेल्या नक्षलवाद्यांच्या माओवादी चळवळीच्या विचारांची दिशा भरकटत गेली आणि कथित सुशिक्षित पांढरपेशा कॉम्रेडांच्या गर्दीत गरिबांच्या हक्काची लढाईही वाट हरवून बसली. वंचितांना मिळवून द्यावयाच्या न्यायाचा मुद्दा या दोन्ही आघाड्यांवर केव्हाच मागे पडला अन् भरकटलेल्या या अवस्थेत आपणच हरलेल्या आपल्या लढाईची जाणीव नेत्यांना होऊ लागली. त्याच नैराश्येतून ‘आप’ची ही भलावण तोंडून निघाली असावी कदाचित कारतांच्या!
एकीकडे कम्युनिस्ट पक्षाची ही अवस्था तर, दुसरीकडे समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या पांढर्‍या रंगाच्या टोप्यांना, लाल रंगाच्या टोप्यांनी उत्तर देण्याचा चालवलेला प्रयत्न अनाकलनीय ठरला आहे. मुलायमसिंह यादवांपासून, अखिलेशपर्यंत ज्यांनी कालपर्यंत ‘हिरव्या’शिवाय कुठल्या रंगाला कधी पसंती दिली नाही, प्राधान्य दिले नाही, हिरव्यासाठी इतर सार्‍या रंगांचा कायम दु:स्वास केला, त्यांनाही अचानक लाल रंगांच्या टोप्या डोक्यावर घालून मिरवावेसे वाटले. असे केल्याने लागलीच आम आदमी पार्टीला सडेतोड उत्तर देता येईल, दिल्लीहून उत्तरप्रदेशाच्या दिशेने सुरू झालेल्या त्याच्या प्रभावाची आभा थोपवून धरता येईल, त्या पक्षाच्या पांढर्‍या टोप्यांना निदान आपल्या राज्यापुरता तरी पर्याय देता येईल, असा समज यादवांचा झाला असल्यास आपण बापुडे काय बोलणार त्यांच्यापुढे?
पण प्रकाश कारत आणि मुलायमसिंह यादव यांच्यासारखे नेतेही लोकप्रियतेचा ‘हाच’ मार्ग असल्याच्या निष्कर्षाप्रत आले असतील, हा ‘ट्रेंड’ बदलायचे सोडून तेही सोप्या मार्गाचा अवलंब करायला सरसावले असतील, तर ही खरोखरीच दुर्दैवी बाब म्हटली पाहिजे. ‘आप’ला लाभले, किंवा त्या पक्षाने मिळवले ते यश आपणही त्याच मार्गाने तेवढ्याच सहजतेने मिळवू शकतो, असे या नेत्यांना वाटू लागणे हे एकतर पराभूत मानसिकतेचे द्योतक म्हटले पाहिजे किंवा ज्याच्या जोरावर त्यांनी आजवरचा खडतर प्रवास केला, त्या विचारांवर, त्या कार्यपद्धतीवर त्यांनीच व्यक्त केलेला हा अविश्‍वास तरी म्हटला पाहिजे.
मुलायमसिंहांना त्यांच्या कथित समाजवादी विचारांवर आणि कारतांना त्यांच्या कम्युनिस्ट विचारांवर नवख्या आम आदमी पार्टीच्या पांढर्‍या टोप्या हावी झाल्याचे जाणवू लागले असेल, तर हे चित्र या नेत्यांच्या आजवरच्या राजकीय साधनेवर पाणी फेरणारे आहे.
काळानुसार जगाने बदलले पाहिजे हे खरे आहे. जो काळानुसार बदलत नाही, तो भविष्यात स्वत:चे अस्तित्व गमावून बसतो, हेही तितकेच खरे आहे. पण काळानुसार बदलणे म्हणजे भविष्याचा वेध घेत स्वत:ला बदलत पुढे मार्गक्रमण करणे होय. काळानुरूनप बदलणे म्हणजे स्वत:चा इतिहास विसरणे नव्हे. पण भला मोठा इतिहास लाभलेल्या दोन राजकीय पक्षाचे, तेवढाच मोठा इतिहास लाभलेले दोन नेते आम आदमी पार्टीला लाभलेल्या यशाला पुरते भुललेले दिसताहेत. ‘आप’ चे यश पाहून हे नेते फक्त भुलले आहेत की पाऽऽर बिथरले आहेत, हे त्यांचे त्यांनाच ठावूक!
आम आदमी पार्टीला लाभलेल्या परवाच्या यशामुळे आजच भुरळ पडणे योग्य नाही. निदान मुरलेल्या दिग्गज राजकीय नेत्यांनी तरी हा मोह आवरला पाहिजे. भारतीय लोकमानस आणि लोकशाही चमत्कारिक आहे. आणिबाणी लादणार्‍या इंदिरा गांधींवर चप्पल फेकून संताप व्यक्त करणार्‍यांनीच नंतर त्यांना निवडून देत डोक्यावर घेतल्याच्या घटनेचा हा सारा देश साक्षीदार आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, त्याप्रमाणे पुंगी वाजवणार्‍या कुठल्याही गारुड्याच्या भोवती उभे राहण्याची इथल्या जनतेची मानसिकता आहेे. आज ही पुंगी केजरीवाल वाजवताहेत, म्हणून लोक त्यांच्या भोवती गर्दी करून उभे आहेत. यात केजरीवालांना कमी लेखण्याचा वा आम आदमी पार्टीचे नेत्रदीपक यश अव्हेरण्याचा प्रयत्न नाही. पण सोशल मीडियाच्या भरवशावर सामाजिक चळवळी उभ्या राहात नाहीत, हे निदान कारतांसारख्या वैचारिक बैठक लाभलेल्या नेत्यांनी तरी अमान्य करू नये. अण्णा हजारेंनी रामलीला मैदानावर उभारलेल्या आंदोलनाला लाभलेला प्रचंड जनाधार दोनच महिन्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या त्यांच्या आंदोलनाला का लाभला नाही, या प्रश्‍नाचे उत्तर इथल्या जनतेच्या मानसिकतेत दडले आहे. याच विचित्र मानसिकतेने एका नवख्या पक्षाला दिल्लीत सत्तेच्या दारात नेऊन सोडले. पण एरवी फेसबुक, ट्वीटरच्या पलीकडे न जाणार्‍या, मतदानाच्या दिवशी मतदानाला जाण्याऐवजी सुटी एन्जॉय करणार्‍यांच्या भरवशावर समाजपरिवर्तनाच्या लढाया कशा उभारणार कारत साहेब?

Wednesday, November 27, 2013

तेजपाल तोंड का लपवीत आहेत आता ?

कुणीही कायदा हातात घेऊ नये असे ज्यांना कालपर्यंत वाटत होते, तेच तेजपाल आता कायद्यातल्या पळवाटा शोधत आहेत. आपण कॅमेराबद्ध केला म्हणजे समोरचा माणूस गुन्हेगार ‘सिद्ध झाल्याचा’ निर्णय स्वत:च्या पातळीवर एकतर्फी जाहीर करून सार्‍या जगापुढे त्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍यांना आता का हवीय् कायदेशीर कारवाईतली सवलत? आपण तेवढे शहाणे म्हणवत उर्वरित विश्‍वाला थिटे समजणार्‍यांना आता का पळ काढावा लागत आहे? कालपर्यंत हे उंटावर बसून शेळ्या हाकत होते आणि स्वत:वर शेकली तर तो त्यांना अन्याय वाटू लागला आहे? आता कोण उडवतोय् कायद्याची खिल्ली? यांनी रचले तर ते डावपेच अन् दुसर्‍यांनी रचले की षडयंत्र? यांची वागणूक म्हणजे पत्रकारितेची कार्यपद्धती आणि दुसर्‍यांची वर्तणूक म्हणजे काळावरचा आघात? इतके दिवस कोणाच्या जिवावर चालला तहलका? कोणी खर्च केला त्यासाठीचा पैसा? आता का कपिल सिब्बल तेजपालशी संबंध नाकारत आहेत? तहलकात साठ टक्क्यांची गुंतवणूक तृणमूलच्या खासदाराने का केली? असे कित्येक सवाल लोकांच्या मनात आहेत. 


मोठ्या लोकांची तर्‍हाच काही और असते बघा. त्यांचं गाडं कधीच कुठे अडत नाही. ना प्रशासनात त्यांचे कुठले काम अडत, ना कुठला कायदा कधी त्यांच्या आड येत. सारी यंत्रणा कशी अदबशीरपणे सलाम ठोकायला सिद्ध असते. अशांवर पोलिस कारवाई होण्याचा तर प्रश्‍नच उद्भवत नाही. एखादवेळी चुकून, नाईलाजाने अटक झालीच तरी लागलीच छातीत कळा येतात त्यांच्या आणि सरकारी दवाखान्यातल्या आयसीयूतला पलंगही रिकामाच असतो त्यांच्यासाठी. आता आपल्या तेजपाल साहेबांचंच बघा ना. एका केंद्रीय मंत्र्यांशी जवळीक असल्याची, एका तृणमूल खासदाराची ‘तहलका’मधील साठ टक्क्यांच्या गुंतवणुकीची नुसती बातमीच बाहेर आली, तर सारी यंत्रणा कशी मान तुकवून सेवेत हजर झालीय् त्यांच्या. सार्‍या जगाला त्यांच्या गुन्ह्याची खबर लागली असताना पोलिसांना हुलकावणी देत तेजपाल तोंड लपवत फरार होतात, त्यांच्या वतीने वकील कोर्टात येऊन जामिनाचा अर्ज सादर करतो, पण पोलिसांना मात्र, ते गवसत नाहीत. बलात्कार प्रकरणात गोवा सरकार आणि पोलिसांनी कारवाईचा निर्णय जाहीर केला खरा. पण, पीडित मुलीचा तक्रारअर्जच नसल्याने कारवाईस विलंब झाला. पण, तक्रार आली गुन्हा दाखल होताच, तेजपाल यांनी पळून जाणेच श्रेयस्कर मानले. ते निर्दोष आहेत, असे जर त्यांना वाटत असेल तर मग पोलिस चौकशीला ते कशासाठी घाबरत आहेत?
एक काळ होता की ‘तहलका’ म्हटलं की घाम फुटायचा लोकांना. कोणाकोणाच्या खाजगी आयुष्यात नाही डोकावले तरुणबाबू? याची लफडी, त्याची थेरं, एकाचा भ्रष्टाचार, दुसर्‍याचे काळे धंदे यांनी उघडे पाडायचे. स्टिंग ऑपरेशन की काय म्हणतात ते करायचे. लोकांना गाठायचे. लपूनछपून त्यांची बोलणी कॅमेराबद्ध करायची. मग त्यातून उघड होणार्‍या ‘आतल्या’ गोष्टी ‘बातमी’ म्हणून जगजाहीर करायच्या. आणि जगातली सर्वात महत्त्वाची माहिती उजेडात आणल्याच्या थाटात स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. अशा पद्धतीने तेजपाल यांचा कारभार तब्बल काही वर्षे चालत राहिला. यांच्या कारनाम्यांनी लोक दबकत गेले अन् यांची माजोरी वाढत गेली. इतकी की, सहकारी पत्रकारावर बलात्कार केल्यावरही त्यांना त्याची खंत वाटेनाशी झाली. दोन जीव एकत्र आल्यावर जे व्हायचे तेच आमच्यात घडल्याचे निर्लज्जपणे सांगण्यातही त्यांना कमीपणा वाटला नाही.
आता तर त्यांना एखाद्याबाबत वावड्या उठवणे योग्य नसल्याचे शहाणपण सुचले आहे. कालपर्यंत ज्यांनी लोकांना कैचीत पकडून त्यांच्या इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगली, त्यांना आता स्वत:च्या इभ्रतीबाबत मात्र तसे झालेले मुळीच नको आहे. कालपर्यंत यांनी लोकांविरुद्ध षडयंत्रं रचली ते चाललं, पण आता त्यांच्याविरुद्ध चाललेल्या कारवाया म्हणजे कारस्थान असल्याचा आरोप करत त्यांचा संताप अनावर होत चालला आहे. आपल्याविरुद्धची कारवाई म्हणजे सुनियोजित कट असल्याचा आरोप करणार्‍या तेजपालांनी लोकांची अंडीपिल्ली काय नियोजित कटाविनाच बाहेर काढली? फरक एवढाच आहे, की कालपर्यंत ते जे करत होते, त्यात त्यांना भूषण वाटत होते. आता बाजू त्यांच्यावर उलटल्यावर त्यांना त्यात काळेबेरे दिसू लागले आहे. त्यामागील कटाचा वास येऊ लागला आहे.
आपल्या कार्यालयातल्या एका सहकार्‍यावर बलात्कार केल्याचा आरोप स्वत: मान्य करून, त्याबाबात माफी मागून प्रकरण ‘निपटविण्याचा’ प्रयत्न त्यांनी करून पाहिला. पण त्यानेही काही जमत नाही म्हटल्यावर ते त्या मुलीवरच उलटले. तिच्यावरच प्रत्यारोप करत सुटले. कुणीही कायदा हातात घेऊ नये असे ज्यांना कालपर्यंत वाटत होते, तेच तेजपाल आता कायद्यातल्या पळवाटा शोधत आहेत. आपण कॅमेराबद्ध केला म्हणजे समोरचा माणूस गुन्हेगार ‘सिद्ध झाल्याचा’ निर्णय स्वत:च्या पातळीवर एकतर्फी जाहीर करून सार्‍या जगापुढे त्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍यांना आता का हवीय् कायदेशीर कारवाईतली सवलत? आपण तेवढे शहाणे म्हणवत उर्वरित विश्‍वाला थिटे समजणार्‍यांना आता का पळ काढावा लागत आहे? कालपर्यंत हे उंटावर बसून शेळ्या हाकत होते आणि स्वत:वर शेकली तर तो त्यांना अन्याय वाटू लागला आहे? आता कोण उडवतोय् कायद्याची खिल्ली? यांनी रचले तर ते डावपेच अन् दुसर्‍यांनी रचले की षडयंत्र? यांची वागणूक म्हणजे पत्रकारितेची कार्यपद्धती आणि दुसर्‍यांची वर्तणूक म्हणजे काळावरचा आघात? इतके दिवस कोणाच्या जिवावर चालला तहलका? कोणी खर्च केला त्यासाठीचा पैसा? आता का कपिल सिब्बल तेजपालशी संबंध नाकारत आहेत? तहलकात साठ टक्क्यांची गुंतवणूक तृणमूलच्या खासदाराने का केली? असे कित्येक सवाल लोकांच्या मनात आहेत. लोकं मोठी असली, मंत्र्या-संत्र्यांशी त्यांचे लागेबांधे असले, मोठ्या वर्तुळातल्या चारचौघात त्यांची ऊठबस असली की मग कोणीच त्यांच्या वाट्याला जाण्याची हिंमत करत नाही. अगदी कायदा सुद्धा...! असा समज एव्हाना सर्वसामान्य लोकांच्या मनात घर करून बसला आहे. तेजपाल अगदी सहजपणे फरार होऊ शकल्याने हा समज खरा ठरण्याची शक्यता आहे. केवळ त्यांंनी कॅमेराबद्ध केले म्हणून बंगारू लक्ष्मणांचे एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद गेलेे. त्यांना हवे होते, तर मग आता एका महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून कारवाई झालेली तेजपालांना का नको आहे? ते सोडून इतर सारे कायद्यापुढे समान असल्याचा गैरसमज तर झालेला नाही त्यांना? हा समज त्यांच्या आणि लोकांच्याही मनातून काढून टाकणारी कारवाई आता पोलिस आणि न्याय व्यवस्थेकडून अपेक्षित आहे...

Monday, November 11, 2013

बदललेला इतिहास अन् भूगोल...!

स्वातंत्र्यानंतरही स्वत:ची संस्थाने खालसा करण्यास नकार देणार्‍या हैदराबादच्या निझामला अन् जुनागडच्या संस्थानाला कणखर भूमिका घेत पटेलांनी शिकवलेला धडा कधी आठवेल या नेत्यांना? पाकिस्तान, चीन, बांगलादेशसारख्या शेजारी राष्ट्रांबाबत त्याच कणखर बाण्याचे प्रदर्शन आजवर झाले असते, तर अरुणाचल भारताच्या नकाशातून गायब करण्याची अन् रात्री-बेरात्री थेट सीमेवरून या देशात दहशतवादी घुसवण्याची कुणाची बिशाद होती? पण दुर्दैवाने गांधी, नेहरूंच्या पलीकडे कुणाच्या कर्तृत्वाची जाणीव इथे झालीच नाही कधी कुणाला. एकाच्या शांततेच्या अतिरेकाने सर्वांदेखत देशाचे तुकडे झाले अन् दुसर्‍याच्या साम्यवादी धोरणाच्या प्रेमापायी देशाची अर्थव्यवस्था मोडीत निघाली. पण या काळात ना कधी कुणाला सावरकरांची जाज्वल्य देशभक्ती आठवली, ना सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या स्थापनेमागील भूमिकेचे कधी कुणाला स्मरण झाले. टिळक, भगतसिंह, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, बिरसा मुंडा, राणी लक्ष्मीबाई, मदनमोहन मालवीय, राममनोहर लोहिया, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, वासुदेव फडके ही तर काय बोलून चालून वाळीत टाकलेली माणसं. इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणारी वीरप्पंडिया कोट्टबोम्मन, माथुर्मलिंगम थेवर ही नावं तर लाख प्रयत्न करूनही आठवणार नाहीत यांना. मतांच्या राजकारणात उपयोगी पडतात म्हणून शाहू, फुले, आंबेडकरांची नावे निदान तोंडी लावायला तरी घेतली जातात. ज्यांचे आज एवढे गुणगान चालले आहे, ज्यांच्या कधीकाळी कॉंग्रेसमध्ये असण्याचा सार्थ अभिमान आज कॉंग्रेसजन बाळगताहेत, त्या पटेलांना राजीव गांधींच्या बरोबरीने १९९१ मध्ये भारतरत्न दिले जावे, याचा अर्थ काय? राजीव गांधींच्या फक्त एक वर्षापूर्वी नंबर लागावा एवढेच कर्तृत्व होते बाबासाहेब आंबेडकरांचे?

ज्याची स्थापना करायलाही एका इंग्रज व्यक्तीची गरज पडली होती, त्या कॉंग्रेस पक्षाला या देशाच्या इतिहासाचे स्मरण अलीकडे वारंवार होऊ लागले आहे. कालपर्यंत ‘गांधी’ नावाच्या पलीकडे ज्यांना कधी जावेसे वाटले नाही, त्यांना आता सरदार पटेलांपासून, तर अन्य जुन्या कर्तृत्ववान नेत्यांच्या कर्तबगारीचे आश्‍चर्यजनकरीत्या स्मरण होऊ लागले आहे. नेहरूंच्या तुलनेत जे पटेल कालपर्यंत यांना नेहमीच खुजे वाटले, त्या सरदारांच्या कार्यकर्तृत्वाची जाण कॉंग्रेस नेत्यांना आता अचानक होऊ लागली आहे...

हा देश एकसंध ठेवण्यासाठी प्रसंगी नेहरूंशीही वैरत्व पत्करून पटेलांनी संस्थानिकांना एकत्र आणले होते. ज्यांना फाळणीचा काळा इतिहास टाळता आला नाही, त्या कर्तृत्वशून्य अन् लाचार नेत्यांना आता पटेल कॉंग्रेसचेच असल्याचा साक्षात्कार स्वातंत्र्याच्या साडेसहा दशकांनंतर होऊ लागला आहे. कधीकाळच्या अखंड भारताचा एक एक भूभाग वेगवेगळ्या देशांच्या रूपात कसा आणि का वेगळा झाला, अगदी अलीकडच्या इतिहासात या देशाचे तुकडे कोणी केले, फाळणी नेमकी कुणी आणि का मान्य केली, पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही पंजाब-काश्मीरच्या प्रश्‍नांचे भिजतघोंगडे अजून कायम का आहे, काश्मीरच्या एका भागाला ‘पाकव्याप्त’ म्हणताना इतक्या वर्षांत कुणालाच कधीच जराशीही खंत कशी वाटत नाही, एक अख्खा अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशातून गायब होऊन शेजारच्या चीनच्या हद्दीत दाखवला जातो, तरी इथे कुणा कॉंग्रेसवाल्याचे रक्त खवळत नाही. हरामखोरीच्या या मानसिकतेवर कठोर कारवाई करायचे सोडून, चार-दोन अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करून हा प्रश्‍न निकाली काढण्याची अफलातून तर्‍हा कुणी अंमलात आणली? तिबेटच्या मुद्यावर पंडित नेहरूंचे ‘ते’ जगप्रसिद्ध विधान अजून हा देश विसरलेला नाही. चीनने आपली जी जमीन गिळंकृत केली, त्या जमितीवर गवताचे पाते देखील उगवत नाही, असे संतापजनक विधान नेहरूंनी संसदेत केले होते. ज्यांना त्याचा विसर पडला, तेच दुसर्‍यांना इतिहास शिकवायला निघाले आता?

ज्यांना विस्मरण झालेय्, त्यांनीच लोकांना इतिहासाचा विसर पडल्याची आवई उठवायची?

मुस्लिम मतांवर परिणाम होण्याच्या भीतीने ज्यांना शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटल्याचा इतिहास जाहीरपणे सांगण्याची हिंमत होत नाही, कोथळा बाहेर काढून छत्रपतींनी ज्याला जमिनीवर लोळवला त्या अफझलखानाची प्रतापगडावरची कबर ज्यांना अजूनही अभिमानाने जपावीशी वाटते, ज्यांना राणा प्रतापांच्या शौर्याचे नेहमीच वावडे राहिले अन् रायबरेलीत दंगल पेटविणार्‍या तौकीर रझाचे मात्र सतत कौतुक वाटले, ती कॉंग्रेस दुसर्‍यांना इतिहास शिकवायला निघाली असल्याचे चित्र दुर्दैवी अन् तेवढेच वेदनादायक आहे.

सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही कॉंग्रेसचे सदस्यत्व द्यावे, असा ठराव वर्किंग कमिटीमध्ये पारित करून घेतला होता. तो नेहरूंनी मागे घेण्यास लावला. एका गणतंत्र दिनी रा. स्व. संघाला पथसंचलनात याच कॉंगेसने सहभागी करून घेतले होते. हा इतिहास कॉंग्रेस कसा लपवणार? स्वातंत्र्यानंतरही स्वत:ची संस्थाने खालसा करण्यास नकार देणार्‍या हैदराबादच्या निझामला अन् जुनागडच्या संस्थानाला कणखर भूमिका घेत पटेलांनी शिकवलेला धडा कधी आठवेल या नेत्यांना? पाकिस्तान, चीन, बांगलादेशसारख्या शेजारी राष्ट्रांबाबत त्याच कणखर बाण्याचे प्रदर्शन आजवर झाले असते, तर अरुणाचल भारताच्या नकाशातून गायब करण्याची अन् रात्री-बेरात्री थेट सीमेवरून या देशात दहशतवादी घुसवण्याची कुणाची बिशाद होती? पण दुर्दैवाने गांधी, नेहरूंच्या पलीकडे कुणाच्या कर्तृत्वाची जाणीव इथे झालीच नाही कधी कुणाला. एकाच्या शांततेच्या अतिरेकाने सर्वांदेखत देशाचे तुकडे झाले अन् दुसर्‍याच्या साम्यवादी धोरणाच्या प्रेमापायी देशाची अर्थव्यवस्था मोडीत निघाली. पण या काळात ना कधी कुणाला सावरकरांची जाज्वल्य देशभक्ती आठवली, ना सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या स्थापनेमागील भूमिकेचे कधी कुणाला स्मरण झाले. टिळक, भगतसिंह, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, बिरसा मुंडा, राणी लक्ष्मीबाई, मदनमोहन मालवीय, राममनोहर लोहिया, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, वासुदेव फडके ही तर काय बोलून चालून वाळीत टाकलेली माणसं. इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणारी वीरप्पंडिया कोट्टबोम्मन, माथुर्मलिंगम थेवर ही नावं तर लाख प्रयत्न करूनही आठवणार नाहीत यांना. मतांच्या राजकारणात उपयोगी पडतात म्हणून शाहू, फुले, आंबेडकरांची नावे निदान तोंडी लावायला तरी घेतली जातात. ज्यांचे आज एवढे गुणगान चालले आहे, ज्यांच्या कधीकाळी कॉंग्रेसमध्ये असण्याचा सार्थ अभिमान आज कॉंग्रेसजन बाळगताहेत, त्या पटेलांना राजीव गांधींच्या बरोबरीने १९९१ मध्ये भारतरत्न दिले जावे, याचा अर्थ काय? राजीव गांधींच्या फक्त एक वर्षापूर्वी नंबर लागावा एवढेच कर्तृत्व होते बाबासाहेब आंबेडकरांचे?

इतिहासाचा विसर नेमका कुणाला पडला आहे, तो बदलला कुणी, कधी काळच्या एकसंध भारताच्या नकाशाची शकले पडताना बघ्याची भूमिका कुणी घेतली, हा इतिहास कुणीही विसरलेला नाही. धकाधकीच्या जीवनात चार क्षण निवांतपणे जगण्याचीही फुरसत नसलेला सामान्य माणूस याबाबत कधी काही बोलून दाखवत नाही याचा अर्थ तो या सार्‍या घडामोडींबाबत अनभिज्ञ आहे, असा समज कुणी करून घेत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. रावळपिंडी कुणी घालवली अन् कारगिल कुणी जिंकले, तिबेट कुणी गमावला अन् जुनागढ कुणी खेचून आणला, निवडणुकीत बाबासाहेबांना कुणी पाडले अन् भिंद्रानवालेला कुणी मोठा केला, हा इतिहास अजूनही मनामनात ताजा आहे. नव्हे, खदखदतो आहे. या वैभवशाली देशाच्या सीमारेषा नंतरच्या काळात कशा तोकड्या होत गेल्या, स्थानिकांचे हक्क डावलून बांगलादेशींना या देशात आणि इथल्या मतदारयाद्यांमध्ये स्थान कुणी दिले, हेही कुणी विसरलेले नाही इथे. जे दुसर्‍याला इतिहास शिकवण्याच्या गोष्टी करताहेत, त्यांनी आधी स्वत: इतिहास अभ्यासावा. नरेंद्र मोदींना सातवी, आठवीच्या इतिहासाची पुस्तकं भेट म्हणून पाठविणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी तर तो आवर्जून अभ्यासावा

पटेलांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची आज कळली कॉंग्रेस नेत्यांना, गुजरातेत त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना तिथल्या राज्य सरकारने हाती घेतल्यानंतर? पटेल संघविरोधक होते, असे जर कॉंग्रेसवाल्यांना म्हणायचे असेल मग त्यांच्या कर्तबगारीबद्दलही कॉंग्रेसजनांना आक्षेप का असावा? पण एवढ्या उंचीच्या माणसाला भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यासाठी १९९१ साल का उजाडावे लागले, या प्रश्‍नाचे उत्तर देईल कुणी? जवाहरलाल नेहरू यांना १९५५ मध्ये, शास्त्री १९६६, इंदिराजी १९७१ अन् पटेलांचा नंबर लागला १९९१ मध्ये? का? ज्या दिवशी या प्रश्‍नाचे तमाम देशवासीयांना पटेल असे तर्कशुद्ध उत्तर देता येईल ना, त्याच दिवशी डॉ. मनमोहनसिंहांनी इथल्या जनतेला इतिहासाचे दाखले द्यावेत. पटेलांनी त्यांच्या जीवनात गाठलेल्या यशाच्या उत्तुंग शिखराची शेखी त्यांनी त्याच दिवशी मिरवावी कॉंग्रेसजनांनी.

शब्दांचे अर्थ राजकीय सोयीने लावायचे, इतिहासाचे संदर्भ हवे तसे वापरायचे, माणसं आपापल्या पद्धतीने हवी तेव्हा हवी तशी छोटी किंवा मोठी करायची, ही पद्धत कॉंग्रेसने वापरायची अन् लोकांनी सारे काही ठावूक असतानाही तो प्रकार शिरसावंद्य मानायचा, हे आजवर खपून गेले. आता जनता जाणती झाली आहे. यांच्या राजकारणातले, वागण्या-बोलण्यातले बारकावे तिलाही उमगतात आताशा. आपण बनवू आणि लोक मूर्ख बनतील, या भ्रमात कुणी राहू नये. सार्‍या देशाच्या नजरेत खूप खूप मोठे असूनही सरदार पटेल आजवर कसे दुर्लक्षित राहिले अन् आताच कसे कॉंग्रेसजनांना त्यांचे स्मरण होऊ लागले, हे लोकांच्या चांगलेच ध्यानात आले आहे. देशाचा इतिहास अन् भूगोल बदलविण्याचे पाप कुणाचे, हे तर लोकांच्या केव्हाच लक्षात आले आहे...

Monday, November 4, 2013

मन उद्विग्न अन् अस्वस्थ करणारे प्रश्‍न

विज्ञान, तंत्रज्ञानाने जग फार जवळ आले असले, तरी माणसं मात्र एकमेकांपासून दूर जात असल्याची खंत नवी राहिलेली नाही आता. मनामनातून ती व्यक्त होतेय्. पत्रांची जागा मोबाईलवरच्या एसएमएसने घेतली. मैदानावरचे खेळ संगणकावर आले. अभिनंदन, सांत्वनाच्या भावनाही प्रत्यक्ष भेटीऐवजी ई-मेल अन् व्हाटसऍपवर व्यक्त होऊ लागल्या. पद्धत बदलली अन् बालमनावर रुजविण्याचे संस्कारही. रक्षाबंधन हा खरं तर भावाने बहिणीच्या रक्षणाची शपथ घेत तिच्याकरवी हातात रक्षा बांधून घेण्याचा दिवस. पण, या दिवशी बाहेर पडाल तर एखादी मुलगी तुम्हाला राखी बांधेल आणि मग तुम्ही ‘भाऊ’ बनून जाल. त्यामुळे या दिवशी घरातूनच बाहेर पडू नका! पडलात तरी कुण्या मुलीच्या नजरेस पडू नका. नाही तर तुमचा ‘भाऊ’ झाल्याशिवाय राहणार नाही, असली भीती दाखवणार्‍या जाहिराती कथित लोकल एन्टरटेन्मेंट चॅनल्सवरून कानावर पडल्या की आधुनिकतेच्या नावाखाली नवी पिढी कोणत्या दिशेला नेली जातेय्, याचा अंदाज येतो. जगातल्या कोणत्याही मुलीचे ‘भाऊ’ न बनण्याची शिकवण नेमके कोण अन् कशासाठी देतेय्? आई-वडिलांची शिकवण, लहानपणापासून रुजलेले संस्कार, पाठ्यपुस्तकातले सामाजिक आशय मागे पडून कानावर पडणार्‍या या जाहिरातींचा प्रभावच अधिक प्रभावशाली ठरतोय् अन् बहुधा याच लाटेत भावा-बहिणींच्या नात्याची घट्ट वीणही दिवसागणिक सैल होतेय्.....

नर आणि मादीच्या पलीकडेही जगात स्त्री-पुरुषांमध्ये संबंध असू शकतात आणि ती नातीही खूप सुंदर असू शकतात. त्या नात्यांनाही विषयांच्यापलीकडले भावनिक कंगोरे असू शकतात, हे सार्‍या जगाला शिकवणार्‍या, नव्हे ठणकावून सांगणार्‍या स्वामी विवेकानंदांच्या भारतीय समाजालाच आज त्या शिकवणुकीचा विसर पडू लागलाय् की काय? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही पाठ्य पुस्तकांच्या पहिल्या पानावरची शपथ हळूहळू धूसर तर होत चालली नाही ना? स्त्री-पुरुषांमधली भावनिक नाती पुन्हा एकदा विषयांच्या वावटळीत घरंगळत तर चालली नाहीत ना? रक्षणाची शपथ घेत रक्षाबंधनाला बांधले गेलेले भावाच्या हातावरच्या धाग्यांचे बंधन हळूहळू क्षीण तर होत चाललेले नाहीत ना? शरद ऋतुतल्या बीजेला भावा-बहिणींच्या प्रेमात चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढ व्हावी म्हणून सुरू झालेला, बहिणीने भावाला ओवाळण्याचा प्रघात अलीकडे निरर्थक तर ठरत चाललेला नाही ना...?
मन उद्विग्न अन् अस्वस्थ करणारे प्रश्‍न आहेत हे सारे. सारा भारतीय समाज या अनुत्तरीत प्रश्‍नांच्या विळख्यात सापडल्याचे दुर्दैवी चित्र आहे सर्वदूर. ज्या देशात परस्त्री मातेसमान मानली जाते, जिथे ‘यत्र नार्यस्तु पूज्यंते’...च्या मंत्राला वेदमंत्राच्या पंक्तीत स्थान आहे, त्या देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर का यावा? भर रस्त्यांवर बलात्कार का व्हावेत? रस्त्याने चाललेली कुठलीही तरुणी आपली शारीरिक भूक भागवण्यासाठीच पृथ्वीतलावर धाडण्यात आली असल्याचा ग्रह करून घेत तरुणाई बेभान आणि बेताल का वागू लागली आहे अलीकडे? दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर झाली तरी, पोलिसांच्या कारवाईचा अन् न्यायालयाच्या निकालाचा वचक निर्माण होऊन समाजातील बलात्काराच्या घटनांमध्ये विक्रमी घट झाल्याचे चित्र मात्र नाही. उलट त्या नंतरच्या काळातही बलात्काराच्या घटना सतत वाढल्याची आकडेवारी वेगवेगळ्या अहवालांमधून समोर येतेय्. पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रातली महिलांची सामाजिक दुरवस्था काय वर्णावी! नॅशनल क्राईम रेकॉर्डस्‌च्या एका अहवालानुसार गेल्या काही वर्षात या राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. बलात्कारापासून तर हुंडाबळीपर्यंत सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे.
घरादारांसमोर दिव्यांची आरास मांडली जात असताना, प्रकाशाच्या झगमगाटात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना तिकडे दक्षिणेतल्या एका अभिनेत्रीने एका खासदाराविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदविली आणि नंतर मागेही घेतली. हैदराबादेत एका इंजिनीअर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना अजून ताजी आहे. शेजारच्या समुद्रपुरात एका आदिवासी तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत पेटविल्याच्या क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या घटनेच्या वृत्ताची शाई अजून वाळली नाही. अशात दिंडोशीत एका अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची वेदनादायक बातमी समोर आली आहे...
काय, झालंय् काय आपल्या समाजाला? कशाचा परिणाम आहे हा सारा? केवळ शारीरिक आकर्षणांमुळे भावना चाळवल्या गेल्याचा हा दुष्परिणाम आहे? दूरचित्रवाहिन्या, इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध झालेल्या माहितीच्या मार्‍याची ही परिणती आहे, की एकूणच भारतीय समाजावर आजवर झालेल्या संस्कारांवरच प्रश्‍नचिन्ह उभे करावे लागणार आहे आता? जगातले सर्वाधिक धर्म अस्तित्वात असलेल्या, त्या त्या धर्माची मानवतेची शिकवण खोलवर रुजलेल्या भारतीय समाजावरचे धार्मिक संस्कार इतके कसे तकलादू झाले? नर आणि मादीच्या पलीकडे स्त्री-पुरूषांमधले संबंध जणू मान्यच नसलेल्या पाश्‍चिमात्य संस्कृतीचा पगडा इतका कसा घट्ट बसतोय आपल्या मनावर? कुटुंब नावाची संस्था मजबूत करणारे इथले संस्कार कुठे गेलेत? सामाजिक बंधूभाव मनामनात रुजविणारी ती शिकवण कुठे गेली? की, वेल्थ, वाईन, वूमनच्या त्रिसूत्रीत वाहवत चाललेल्या, त्यापुढे इतर सार्‍या गोष्टी थिट्या मानू लागलेल्या या समाजात इतर सारी नाती, त्या नात्यांचे पावित्र्यही लयाला जात अल्याचे बघण्याची वेळ येणार आहे, जगद्गुरू म्हणविणार्‍या भारतावर?
विज्ञान, तंत्रज्ञानाने जग फार जवळ आले असले, तरी माणसं मात्र एकमेकांपासून दूर जात असल्याची खंत नवी राहिलेली नाही आता. मनामनातून ती व्यक्त होतेय्. पत्रांची जागा मोबाईलवरच्या एसएमएसने घेतली. मैदानावरचे खेळ संगणकावर आले. अभिनंदन, सांत्वनाच्या भावनाही प्रत्यक्ष भेटीऐवजी ई-मेल अन् व्हाटसऍपवर व्यक्त होऊ लागल्या. पद्धत बदलली अन् बालमनावर रुजविण्याचे संस्कारही. रक्षाबंधन हा खरं तर भावाने बहिणीच्या रक्षणाची शपथ घेत तिच्याकरवी हातात रक्षा बांधून घेण्याचा दिवस. पण, या दिवशी बाहेर पडाल तर एखादी मुलगी तुम्हाला राखी बांधेल आणि मग तुम्ही ‘भाऊ’ बनून जाल. त्यामुळे या दिवशी घरातूनच बाहेर पडू नका! पडलात तरी कुण्या मुलीच्या नजरेस पडू नका. नाही तर तुमचा ‘भाऊ’ झाल्याशिवाय राहणार नाही, असली भीती दाखवणार्‍या जाहिराती कथित लोकल एन्टरटेन्मेंट चॅनल्सवरून कानावर पडल्या की आधुनिकतेच्या नावाखाली नवी पिढी कोणत्या दिशेला नेली जातेय्, याचा अंदाज येतो. जगातल्या कोणत्याही मुलीचे ‘भाऊ’ न बनण्याची शिकवण नेमके कोण अन् कशासाठी देतेय्? आई-वडिलांची शिकवण, लहानपणापासून रुजलेले संस्कार, पाठ्यपुस्तकातले सामाजिक आशय मागे पडून कानावर पडणार्‍या या जाहिरातींचा प्रभावच अधिक प्रभावशाली ठरतोय् अन् बहुधा याच लाटेत भावा-बहिणींच्या नात्याची घट्ट वीणही दिवसागणिक सैल होतेय्. या नात्याचे पावित्र्य जपण्याची, ते नव्या पिढीत रुजविण्याची नितांत गरज आज निर्माण झाली आहे. रक्ताची नाती तेवढी ‘जपण्याजोगी’ अन् उरलेला समाज ‘वापरून’ फेकण्याच्या लायकीचा असल्याचा गैरसमज तमाम पुरुषजातीच्या मनातून काढून टाकण्याची जशी गरज आहे, तशीच गरज रक्ताची नाती जपणार्‍या मानवजातीतल्या संबंधातला यांत्रिक आणि व्यवहार्य भाग दूर करण्याचीही आहे. वर्षातले दोन दिवस भावा-बहिणीच्या नात्याची जपणूक करण्याचे. त्या दिवशी राखी बांधून झाली, ओवाळून झाले की उरलेले सारे दिवस समाजातल्या इतर स्त्रियांचा उद्धार करायला आपण मोकळे असल्याचा ग्रह तमाम ‘भाऊरायांच्या’ मनातून काढून टाकण्याचीही आज तेवढीच आवश्यकता आहे. खरं तर आपल्या समाजव्यवस्थेत जन्माला येताच ओघाने येणार्‍या प्रत्येकच नात्याच्या जबाबदारीचे बाळकडू आपल्याला काटेकोर चाकोरीतून नकळत मिळत असते. वेगवेगळ्या नावांची सुंदर झालर लावूनच ती नाती आपल्या वाट्याला येतात. मात्र, ज्यावेळी ही चाकोरी हरवते, झालर उसवली जाते, त्यावेळी केवळ कात तेवढी हाती उरते. अन् व्यवहाराच्या कोरड्या पखाली ओढत जगणार्‍यांची जमात तेवढी निर्माण होते....या कोरडेपणातूनच मग नाती भावा-बहिणीपेक्षाही स्त्री-पुरुषांची तयार होतात. कुठलीही जबाबदारी नको म्हणून रूळत चाललेली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ काय किंवा बलात्कार काय, भावनाशून्य अशा कोरड्या व्यवहारातून निपजलेल्या बाबी त्या...
भावा-बहिणीचं नातं या सार्‍यांपलीकडचं आहे. भगवान श्रीकृष्णानं सुभद्रेशी जपलेलं. त्याच कृष्णाला द्रौपदीच्या मदतीला धावून जाण्यास भाग पाडणारं. रक्तापेक्षाही भावनेच्या बळावर ते शतकानुशतकं जिवंत आहे. रक्ताचं नसलं, तरीही ते मनापासून जपण्याची प्रेरणा जगातल्या कुठल्याही पुरुषाला देण्याची ताकद त्या नात्यात आहे. सध्याच्या जगरहाटीत ते नातंच हरवण्याची भीती निर्माण झाली आहे. ते हरवू न देण्याचा संकल्प आज भाऊबीजेच्या निमित्ताने सारे मिळून करू या.

Tuesday, October 15, 2013

मोहन धारिया... तपस्वी जीवनाचा अस्त!

त्यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वात केंद्रात राज्यमंत्री म्हणून काम केले. जयप्रकाश नारायण आणि इंदिरा गांधी यांच्यातला विसंवाद दूर करण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांमध्ये आघाडीवर असलेल्यांपैकी एक प्रमुख नाव मोहन धारिया यांचे होते. पण आणिबाणी लागू करण्याच्या त्याच इंदिराजींच्या आततायी निर्णयाला स्पष्ट अन् जाहीर विरोध करताना ते तसूभरही मागे सरले नाहीत. इंदिरा गांधींनी आणलेली ३८वी घटनादुरुस्ती म्हणजे संसदीय लोकशाहीचा मुडदा पाडून हुकूमशाहीला दिलेले आवतन असल्याचे सांगताना त्यांची जीभ जराही अडखळली नाही. इंदिराजी म्हणतील तीच पूर्व दिशा मानणार्‍या लाळघोट्यांच्या गोतावळ्यापासून स्वत:ला दूर ठेवत आणिबाणीच्या मुद्यावरून त्यांनी एका क्षणात कॉंग्रेसचा त्याग केला. कधीकाळी महाराष्ट्र आणि देशपातळीवरही कॉंग्रेस पक्षाच्या जडणघडणीचा साक्षीदार राहिलेल्या या कार्यकर्त्याने नंतर प्रजा सोशालिस्ट पार्टीची स्थापना केली. मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात वाणिज्यमंत्री म्हणून काम केले.
महाड तालुक्यातला एक तरुण डॉक्टर बनण्यासाठी म्हणून मोठ्या उमेदीनं घराबाहेर पडला होता. महाविद्यालयात प्रवेश घेऊन झाला होता. बस्स! पाच वर्षे संपली की वैद्यकीय शिक्षण घेऊन तो बाहेर पडणार; आणि एकदा का तो डॉक्टर झाला की मग बघायलाच नको, अशी त्याच्या परतीच्या प्रवासाची स्वप्नं एव्हाना घरच्यांच्या मनात रुंजी घालू लागली होती. पण इकडे त्या तरुणाच्या मनात खदखदणारा लाव्हा मात्र, दुसर्‍याच वाटा धुंडाळीत होता. डॉक्टर होण्यासाठी हाती पुस्तकं घेऊन किती दिवस झाले असतील कुणास ठावूक, पण इंग्रजांना ‘भारत छोडो’ चा इशारा देत महात्मा गांधींनी देशभरातल्या तरुणाईला दिलेली हाक तेवढी कानावर पडली अन् हा तरुण पुस्तकं बाजूला टाकून १९४२ च्या लढ्यात उतरण्यासाठी म्हणून पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बाहेर पडला. तशीही, त्या भारावलेल्या क्षणी शिक्षणाची चिंता होती कुणाला? सळसळत्या तरुणाईला एकाच ध्येयाने झपाटले होते. स्वातंत्र्याच्या... त्यात, हाक महात्म्यानं दिली होती. सारं काही मागे टाकून घराबाहेर पडणार्‍या तरुणांचे अक्षरश: लोंढे रस्त्यावर उतरले होते. ‘या’ तरुणानेही त्याच त्वेरेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली होती...
१९७१ ची गोष्ट असेल. पुण्यात अटलजींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अटलजी आले होते. जिवाचा कान करून त्यांचे भाषण ऐकायला मोठा जनसागर उसळला होता. तत्कालीन जनसंघाचे उमेदवार रामभाऊ म्हाळगी यांचा प्रचार करताना त्यांच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या कॉंग्रेस उमेदवारावर तुटून पडायचे होते. आपल्या आगळ्या शैलीतून अटलजी ते करत होतेच. पण त्यांच्या या ‘तुटून पडण्याला’ही एक ‘उंची’ होती. आरोपांना धार असली तरी, त्यालाही एक दर्जा होता. अलीकडच्या राजकारणात अभावानेच बघायला मिळणारा... त्यात व्यक्तिगत पातळीवरील टीका जाणीवपूर्वक टाळण्यात आली होती. मुळातच तो स्वभावातला गुण असला, तरी त्या दिवशी अटलजी ते जाणीवपूर्वक करत असावेत बहुधा... कारण कॉंग्रेसतर्फे मैदानात उतरलेला उमेदवारही त्याच ‘उंची’चा, त्याच तोडीचा होता. त्यांच्याविरुद्ध कुणीही पातळी सोडून बोलण्याचा प्रश्‍नच उद्भवणार नव्हता. अटलजींनी तर नाहीच नाही. कॉंग्रेसचे ते उमेदवार होते मोहन धारिया...
स्वातंत्र्यलढ्याने धारियांच्या जीवनाची दिशाच पुरती बदलून टाकली होती. डॉक्टर व्हायला म्हणून घराबाहेर पडलेला हा तरुण प्रत्यक्षात वकील झाला. आपल्या समर्थ नेतृत्वातून कामगार चळवळीलाही त्यानं चांगलाच आकार दिला. कित्येक कामगार संघटना तयार केल्या. जंजिरामुक्तीचा लढाही त्याने त्यापूर्वीच लोकसहभागातून उभारला होता. भविष्यात त्यांनी राजकीय क्षेत्रात नाव केले. कॉंग्रेसच्या वतीने संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रतिनिधित्वही केले. महाराष्ट्र प्रदेश आणि अखिल भारतीय कॉंग्रेस समितीत वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्या. पण, जीवन व्यक्तिगत असो, वा मग सार्वजनिक, हा माणूस प्रत्यक्षात फक्त ‘गांधी’च जगला. गांधीजींच्या आचार-विचारांचा त्यांनी कधीच विसर पडू दिला नाही. अगदी शेवटच्या श्‍वासापर्यंत...
त्यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वात केंद्रात राज्यमंत्री म्हणून काम केले. जयप्रकाश नारायण आणि इंदिरा गांधी यांच्यातला विसंवाद दूर करण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांमध्ये आघाडीवर असलेल्यांपैकी एक प्रमुख नाव मोहन धारिया यांचे होते. पण आणिबाणी लागू करण्याच्या त्याच इंदिराजींच्या आततायी निर्णयाला स्पष्ट अन् जाहीर विरोध करताना ते तसूभरही मागे सरले नाहीत. इंदिरा गांधींनी आणलेली ३८वी घटनादुरुस्ती म्हणजे संसदीय लोकशाहीचा मुडदा पाडून हुकूमशाहीला दिलेले आवतन असल्याचे सांगताना त्यांची जीभ जराही अडखळली नाही. इंदिराजी म्हणतील तीच पूर्व दिशा मानणार्‍या लाळघोट्यांच्या गोतावळ्यापासून स्वत:ला दूर ठेवत आणिबाणीच्या मुद्यावरून त्यांनी एका क्षणात कॉंग्रेसचा त्याग केला. कधीकाळी महाराष्ट्र आणि देशपातळीवरही कॉंग्रेस पक्षाच्या जडणघडणीचा साक्षीदार राहिलेल्या या कार्यकर्त्याने नंतर प्रजा सोशालिस्ट पार्टीची स्थापना केली. मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात वाणिज्यमंत्री म्हणून काम केले.
खरं तर, साधी राहणी, शांत, सुस्वभावी, आक्रस्ताळेपणाचा लवलेशही नसलेले, राजकारणात न शोभणारे हे व्यक्तिमत्त्व. ‘गांधी’ रक्ताच्या थेंबाथेंबात भिनलेले. नंतरच्या काळात त्यांनी कित्येक पदं भूषवली. पद्मविभूषणसारख्या कित्येक मानाच्या पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव झाला. त्याची दखल घेतली गेली. पण पुण्याच्या महानगरपालिकेचे साधे सदस्यपद असेल किंवा मग योजना आयोगाचे महत्त्वाचे असे उपाध्यक्षपद, या प्रत्येकच पदावरून काम करताना मोहन धारियांच्या नजरेसमोर राहिला तो सामान्य माणूस. प्रत्येक वेळी त्यांनी विचार केला तो बळीराजाचा. तब्बल पाच दशकं राजकारणात घालवल्यानंतर मोहन धारियांनी पर्यावरण रक्षण हे आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय मानले; आणि जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते त्यासाठी लढत राहिले. पर्यावरणाच्या रक्षणासोबतच हा माणूस शेतकर्‍यांसाठीही त्याच हिरिरीने अन् त्याच ताकदीने लढत राहिला. देशभरातल्या शेकडो शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी अस्वस्थ झालेल्या मोहन धारियांनी सरकारी धोरणांवर बोट ठेवत वयाच्या ८२व्या वर्षी उपोषणाची घोषणा केली, तेव्हा दिल्लीतले सरकार पुरते हादरले. खुद्द पंतप्रधानांना त्या उपोषणाची दखल घ्यावी लागली.
‘वनराई’ आणि मोहन धारिया हे गेल्या तीन दशकांत सार्‍या देशाला ठावूक झालेलं समीकरण आहे. लोकजागृती, जनसहभागातून ओसाड जमिनीचा विकास, सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांमध्ये रेती भरायची अन् त्या पोत्यांनी नदी, नाल्यामंधून वाहून जाणारे पाणी अडवून कमी पैशात गावासाठी सिंचन साकारण्याची किमया त्यांनी करून दाखवली. आजघडीला सार्‍या देशात असे किमान तीन लाख वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. सुमारे सहा हजार कार्यकर्ते या चळवळीशी प्रत्यक्ष रूपात जुळले आहेत. नंतरच्या काळात विषयांची व्याप्ती वाढत गेली अन् चळवळीचेही एका वटवृक्षात रूपांतर झाले. कधी तिने रक्तदानाच्या उपक्रमांना गवसणी घातली, तर कधी सहकाराला स्पर्श केला. कधी महिलांच्या बचतगटाची बांधणी त्यातून झाली, तर कधी ग्रामीण भागाच्या प्रगतीच्या संकल्पाचे मनोरे त्यातून उभारले गेलेत. गावडेवाडी, वरांध, झरी या गावांतून कधीकाळी रोजगारासाठी बाहेर पडलेल्या तरुणाईला पुन्हा गावाकडे खेचून आणण्याची किमया आपल्या उपक्रमांमधून साधत, गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ च्या आर्त हाकेला कृतीतून प्रतिसाद देण्याची त्यांची तर्‍हा म्हणूनच अनुकरणीय ठरली आहे.
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाचे सामाजिक आणि राजकीय जीवनक्षेत्र व्यापणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व मोहन धारिया यांच्या रूपाने आज लोप पावले आहे. समाजवादी विचारांचा एक पथिक आज अनंताच्या प्रवासाला निघाला आहे. आयुष्यभर तत्त्वांसाठी लढलेल्या, झगडलेल्या अन् जगलेल्या एका लढवय्याचे निर्वाण कित्येकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावणारे ठरणार आहे. सुमारे नऊ दशकांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर सोबतीला आलेल्या, विविध कारणांनी मध्येच साथ सोडून गेलेल्या, इतकेच काय पण, कधीच साथीला न आलेल्याही माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा हा आशयघन मृत्यू आहे. कठोर साधनेतून साकारलेल्या आयुष्याच्या या ‘शेवटातून’ निर्मळ समाजकारणाची आणि नीतिमत्तेच्या राजकीय युगाची पुन्हा एकदा ‘सुरुवात’ व्हावी, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसोबतच, प्रसंगी शांत स्वभावाचे गाठोडे खुंटीवर टांगून आणिबाणीच्या निर्णयातून प्रत्ययाला येणारी मगरुरी उलथवून टाकण्याची धारियांची तर्‍हा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी ठरो, हीच या निमित्ताने नियंत्याकडे प्रार्थना...

Saturday, September 21, 2013

लाज कशाकशाची बाळगणार, पवार साहेब!

राज्य तुमचे, राज्यातली  सत्ता तुमची, लाल दिव्यांच्या गाड्या तुम्ही मिरवणार, सत्तेतले सवंगडी तुमचे, त्यांच्यावरची मेहरनजर तुमची, राग-लोभ तुमचा, सत्तेतल्या लाभाचे वाटेकरी तुम्ही, त्यांना घालायच्या वेसणाच्या दोर्‍याही तुमच्याच हाती, धोरणं तुमची, ती राबवणारे प्रशासन तुमचे, फाईली अडवणारे लोक तुमचे, जनतेला दूर लोटणारे, कंत्राटदारांना जवळ करणारे लोकही तुमचेच. ....तरीही या राज्यातली परिस्थिती बदलण्याचा निर्धार व्यक्त लाजीरवाणी असल्याची कबुली  जाणत्या राजाने जाहीरपणे द्यावी, ही खरोखरीच लाज वाटावी अशीच बाब आहे पवार साहेब!

टेबलावर फाईलींचा ढीग साचवण्याचा विक्रम कदाचित चव्हाणांच्या नावे गिनीज बुकात नोंदवला जाईल येत्या काळात! पण तुम्हाला कुठल्या फाईलींविषयी बोलायचे होते, शरदराव! जनहिताच्या फाईल्ससाठी तुम्ही असे जाहीरपणे भांडण्याचा तर प्रश्‍नच उद्भवत नाही. त्याची खात्री आहे जनतेला. मग तरीही कसे बरे रागावलात तुम्ही.. कुठल्या बरे असणार त्या फाईली. बोला ना शरदराव! असे गप्प नका राहू. बोला, बोला! बिल्डरांच्या? जमिनीच्या? लवासाच्या? साखर कारखानदारांच्या? आयपीएलच्या तुम्ही बुडवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या करमणूक कराच्या, तुमच्या अखत्यारीतल्या सहकारी बँकांना मदत देण्याच्या, पुणे-बारामतीतल्या रखडलेल्या कामांच्या, दादांच्या, सुप्रियाताईंच्या, जावईबापूंच्या.... तुमच्या स्वारस्याचेविषय तर एवढेच आहेत. त्याही फाली मुख्यमंत्री अडवून धरतात, म्हणूनच खवळलात ना तुम्ही चव्हाणांवर?



‘‘या राज्यातल्या वाढत्या कुपोषणाची स्थिती अतिशय गंभीर आहे. मला त्याची खरंच लाज वाटते’’. इति शरद पवार.
व्वा. व्वा. मानलं पाहिजे पवारांना. कुपोषणाची एवढी गांभिर्यानं दखल घेणारा नेता या देशाला पहिल्यांदाच गवसला आहे. कौतुकच व्हायलाच हवं. हा जाणता राजा गोरगरिबांच्या नशिबी आलेल्या कुपोषणानं असा व्याकुळ होतो. मनातल्या वेदना व्यक्त केल्यावाचून त्याला राहावत नाही.  एवढा कनवाळू नेता लाभायला भाग्य लागतं.  महाराष्ट्रातील तमाम जनता भाग्यवान असल्याचं यानिमित्तानं स्पष्ट झालं आहे. पण पवार साहेब, आपल्याला या राज्यातल्या, देशातल्या आणखी कोणकोणत्या गोष्टींची लाज वाटते, हे ही जाहीर करून टाका एकदा! सुमारे पाच दशकंराजकारणात, त्यातली निदान चार दशकं या ना त्या स्वरूपात सत्तेत घालवल्यानंतरही या राज्यातली परिस्थिती पवारांना लाजीरवाणी वाटत असेल, तर त्यांच्या नेतृत्त्वाची लाज वाटून घेण्याची वेळ जनतेवरही आली आहे, हे कधी कळेल या जाणत्याराजाला.
पोटात एक, ओठांवर दुसरेच, बोलायचे एक करायचे दुसरेच. ऍण्टीचेंबरमधल्या चर्चेत एक अन् जाहीर सभेत दुसरंच.... बस्स झाली आता ही तर्‍हा. वीट आलाय लोकांना या घाणेरडया राजकारणाचा. यातून आपला बेरकीपणा सिद्ध होत असल्याचा गैरसमज पवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जरूर करून घ्यावा. पण त्यांच्या वागण्या, बोलण्यातून सतत डोकावणारी लबाडी अन् कोडगेपणही  आता लोकांना कळू लागले आहे, हे कधी तर ध्यानात यायला हवे यांच्या!
अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात आला, तर फुकटचं धान्य घरात आल्यानं लोक आळशी होतील अशी भीती जाहीरपणे व्यक्त करणार्‍या पवारांनी संसदेतल्या या विषयावरच्या चर्चेत एका शब्दाने त्या कायद्याला विरोध करू नये? जनतेसमोर त्यांनी जी भीती व्यक्त करत प्रसिद्धी मिळवली, तीच भीती लोकसभेत व्यक्त करताना जीभ का अडखळली पवारांची? तिथे त्यांनी या कायद्याला विरोध का नाही केला? कुणाच्या भीतीने पाय डळमळले त्यांचे? एव्हाना बहुमताच्या जोरावर हा कायदा पारित झाला आहे. आता पवारांची भीती खरी ठरली, स्वस्तातले अन्न, धान्य सहजपणे मिळू लागल्यामुळे लोक खरोखरीच आळशी बनले तर? शिवाय, बाहेर एवढ्या जोरजोरात बोलणार्‍या पवारांनी  संसदेत बाळगलेल्या मौनाचा अर्थ काय काढायचा आम्हा बापुड्यांनी?
तसं बघायला गेलं, तर पवारांना लाज वाटावी अशा कित्येक बाबी इथं वर्षानुवर्षे घडताहेत. कांद्याच्या किंमती वर्षभरातल्या एका विशिष्ट कालावधीतच कशा वाढतात, त्यातून नेमका कोणाचा लाभ होतो, त्या लाभाच्या गणितातले मोहरे, प्यादे अन् राजे कोण असतात, या षडयंत्राच्या लाभाचे भागीदार कोण असतात, पवार म्हणतात त्याप्रमाणे कांद्याच्या किंमती वाढल्या की शेतकर्‍यांना खरंच लाभ होतो, की काही बड्या व्यापारी आणि दलालांच्या फायद्यासाठी निर्माण करण्यात आलेली ही कृत्रिम दरवाढ असते, तरीही शेतकर्‍यांच्या लाभाचा दावा करत पवार कांद्यांच्या दरवाढीला विरोध करणार्‍यांना शेतकरीविरोधी ठरवतात, तेव्हा शेतकर्‍यांच्या आडून राजकारण नेमके कुणाचे सुरू आहे, याचे पितळ त्यांच्याही नकळत उघडे पडलेले असते.
कापसाच्या गाठींच्या निर्यातीवर नेमकी एका विशिष्ट कालावधीतच बंदी कशी लादली जाते, टेक्सटाईल इंडस्ट्रीमधील उद्योजकांनी स्वस्तातला कापूस विकत घेऊन झाला की ही बंदी आपसूकच कशी उठवली जाते, पंधराच दिवसात उठवली जाते तर मग बंद मुळात लादलीच का जाते, कोणाच्या लाभासाठी? यातून कारखानदारांचा मोठा लाभ होत असला, त्यांना स्वस्तात कापूस मिळत असला तरी, निर्यातीतून चार पैसे अधिकचे मिळवण्याच्या शेतकर्‍यांच्या स्वप्नांवर वरवंटा कुणी  फिरवलेला असतो, यात उद्योजकांना मिळणार्‍या लाभाचे वाटेकरी कोणकोण असतात, बाहेर शेतकर्‍यांच्या हिताच्या गप्पा मारून आत त्यांच्या जीवावर नेमके कोण उठलेले असते....अरेच्चा! किती लांबलचक यादी आहे बघा प्रश्‍नांची ही? या प्रश्‍नांच्या उत्तरादाखल समोर येणारी वस्तुस्थिती कुणाकुणासाठी लाजीरवाणी ठरेल, पवार साहेब?
असल्या निर्णयांमधून शेतकर्‍यांचा विकास खुंटीवर टांगणारे लोकच स्वत:ला त्यांचे कैवारी म्हणवून घेत मिरवतात, तेव्हा आडावर बांधलेला दोर गळ्यात लटकावून घेण्याची वेळ बळीराजावर येते. त्याला न्याय द्यायचे सोडून सिंचन प्रकल्पांच्या कोट्यवधी  रुपयांची लूट केली  जाते, कित्येक वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाहीत, गोसीखुर्द सारख्या प्रकल्पांत जमीन गेलेल्या शेतकर्‍यांना पंचेवीस पंचेवीस वर्षे जमिनीचा साधा मोबदला मिळत नाही याचीही लाज कधीतरी, कुणाला तरी वाटली पाहिजे ना पवार साहेब! पश्‍चिम महाराष्ट्रात नुसती पाण्याची टंचाई निर्माण झाली तर लागलीच १९७२च्या भीषण दुष्काळाशी त्याची तुलना करून राज्याच्या आकस्मिक निधीतला पैसा तिकडे वळवला गेला. अन् विदर्भातल्या अतिवृष्टिग्रस्तांना मदत द्यायची म्हटली तर नियमांवर बोट ठेवला जातो. पाहणीसाठी केंद्राची तीन तीन पथकं धाडण्याचा निर्णय होतो. हा भेदभाव लज्जास्पद नाही का शरदराव!
परवा देशाची कृषीमंत्री  विदर्भात आले. पाहणी केली. मदतीबाबत घोषणा झाल्या. काय नवीन सांगितले त्यांनी? पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सरकार मदतीचा म्हणे हात देणार. हे सांगायला शरद पवार दिल्लीहून वर्ध्यात कशाला यायला लागतात? ही तरतूद तर कायद्यातच आहे. ती मदत तर आज ना उद्या तशीही मिळणारच आहे. पवारांनी घोषणा केली किंवा न केली तरी. त्यांची इच्छा असली किंवा नसली तरी. मुळात प्रश्‍न आहे, तो पन्नास टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचा. यंदा पावसाने विदर्भाला धो धो धुतले. थांब थांब म्हणण्याइतका बरसला पाऊस! नको नको म्हणेपर्यंत काळ्या ढगांनी पिच्छा पुरवला. शेतं खरडून गेली. वाहून गेली. पिकं हातून गेली. आता सर्वांनाच मदतीची गरज आहे. पण कागदावरच्या नियमांनी  ५१ टक्के नुकसान झालेला भाग्यवानठरला अन्  ४९ टक्के नुकसान झालेला शेतकरी मात्र, ‘कमनशिबीठरला. गेल्या उन्हाळ्यातल्या पाणीटंचाईचे निमित्त पुढे करून पश्‍चिम महाराष्ट्रात जनावरांसाठीच्या छावण्या आतापर्यंत भर पवासाळ्यातही सरकारी तिजोरीतून छानपैकी चालल्या आहेत. कायद्याच्या कसोटीत बसवून!  मग, या राज्यातले सारे कायदे विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकणाच्याच आड का येतात पवार साहेब! कधीतरी  याही परिस्थितीची लाज वाटू द्या! इतक्या वर्षात हे चित्र आपण बदलू शकलो नाही, याची जराशी खंत वाटू द्या मनाला. राज्याचे नेतृत्त्व करताना, केंद्रात या राज्याचे प्रतिनिधीत्व करताना तुम्ही पश्‍चिम महाराष्ट्राच्या पलीकडे कधी विचारच करू शकला नाही, याची पुरेपूर कल्पना ल ोकांना आहेच, त्याची जाणीव स्वत:लाही होऊ द्या कधीतरी!
परवा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं. रखडलेल्या फाईलींवरून. टेबलावर फाईलींचा ढीग साचवण्याचा विक्रम कदाचित चव्हाणांच्या नावे गिनीज बुकात नोंदवला जाईल येत्या काळात! पण तुम्हाला कुठल्या फाईलींविषयी बोलायचे होते, शरदराव! जनहिताच्या फाईल्ससाठी तुम्ही असे जाहीरपणे भांडण्याचा तर प्रश्‍नच उद्भवत नाही. त्याची खात्री आहे जनतेला. मग तरीही कसे बरे रागावलात तुम्ही.. कुठल्या बरे असणार त्या फाईली. बोला ना शरदराव! असे गप्प नका राहू. बोला, बोला! बिल्डरांच्या? जमिनीच्या? लवासाच्या? साखर कारखानदारांच्या? आयपीएलच्या तुम्ही बुडवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या करमणूक कराच्या, तुमच्या अखत्यारीतल्या सहकारी बँकांना मदत देण्याच्या, पुणे-बारामतीतल्या रखडलेल्या कामांच्या, दादांच्या, सुप्रियाताईंच्या, जावईबापूंच्या.... तुमच्या स्वारस्याचेविषय तर एवढेच आहेत. त्याही फाली मुख्यमंत्री अडवून धरतात, म्हणूनच खवळलात ना तुम्ही चव्हाणांवर? दुखरी नस दबल्याशिवाय तुम्ही असे जाहीरपणे बोलणार नाहीत याची कल्पना आहे त्यांना. शिवाय तुमचा एवढा इंटरेस्टआहे म्हटल्यावर घेतीलच म्हणा, चव्हाण साहेब आता त्या फाईलींची काळजी. पण खरं सांगू? तुमची ही लुटूपुटूची लढाई थांबवा जराशी.  कळतात हो लोकांना आता त्यातली नाटकं. तुमचं लोकांसमोर एक आणि आत दुसरंच असतं हे ही एव्हाना ठावूक झालं आहे सर्वांना.
राज्य तुमचे, राज्यातली  सत्ता तुमची, लाल दिव्यांच्या गाड्या तुम्ही मिरवणार, सत्तेतले सवंगडी तुमचे, त्यांच्यावरची मेहरनजर तुमची, राग-लोभ तुमचा, सत्तेतल्या लाभाचे वाटेकरी तुम्ही, त्यांना घालायच्या वेसणाच्या दोर्‍याही तुमच्याच हाती, धोरणं तुमची, ती राबवणारे प्रशासन तुमचे, फाईली अडवणारे लोक तुमचे, जनतेला दूर लोटणारे, कंत्राटदारांना जवळ करणारे लोकही तुमचेच. ....तरीही या राज्यातली परिस्थिती बदलण्याचा निर्धार व्यक्त लाजीरवाणी असल्याची कबुली  जाणत्या राजाने जाहीरपणे द्यावी, ही खरोखरीच लाज वाटावी अशीच बाब आहे पवार साहेब!
आता बघा ना, तुम्ही दुखरी नस दाबताच कसे पोपटासारखे बोलत सुटलेत मुख्यमंत्री. उलटलेत चक्क तुमच्यावर. म्हणाले, वादग्रस्त, नियमबाह्य फाईलींना जरासा वेळ लागणारच. या नियमबाह्य फाईली तुमच्या असण्याचा तर प्रश्‍नच नाही. खरे ना? मग कुणाच्या फाईलींबाबत तुम्हाला सांगताहेत ते? पंतप्रधान पदाच्या तुमच्या स्वप्नांमुळेच कॉंग्रेस फुटल्याचंही बोलून गेलेत बघा ते. जाऊ द्या पवार साहेब तुम्ही नका मनावर घेऊ. अहो, पंतप्रधान कार्यालयातले एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफीसर ते. त्यांना कुठले आले राजकारण कळायला? खुद्द इंदिराजींपासून कुणाकुणाच्या महत्त्वाकांक्षेपायी कॉंग्रेसमध्ये कधी कधी फूट पडली, हा इतिहास पाऽऽर विस्मरणात गेलाय् त्यांच्या. अगदी अलीकडची तुम्ही घडवलेली फूट तेवढी स्मरणात राहिली आहे त्यांच्या. त्याचाच गाजावाजा करत सुटलेत ते. पण जाऊद्या राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या माणसाची बेताल बडबड राजकीय चातुर्य लाभलेल्या तुमच्यासारख्या मुरलेल्या नेत्याने मनावर घ्यायची मुळीच गरज नाही. पंतप्रधानपदाच्या तुमच्या स्वप्नातही मुळीच खंड पडता कामा नये.तुम्हाला त्या पदावर विराजमान करण्याचा विडा तुमच्या साथीदारांनी उचलला आहेच. २०१४ ची संधी अनायसे तोंडावर आहे. घ्या साधून ती संधी! कॉंग्रेससोबतची तुमची जाहीर लढाई प्रत्यक्षात खोटी खोटी अन् लोकसभेसाठी जास्त जागा पदरी पाडून घेण्याकरता आहे, याची कल्पना आली आहेच जनताजनार्दनाला. राहिला प्रश्‍न जनतेच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रश्‍नांबाबतच्या बाळगावयाच्या लाज-शरमेचा. तर त्याचं बघू पुढे केव्हातरी. सवड मिळालीच तर...!

Tuesday, September 10, 2013

फुकटचे मोबाईल्स कशासाठी?

कधीकाळी हेच लोक एनडीएच्या शायनिंग इंडिया’ संकल्पनेची खिल्ली उडवायचे. त्यावेळी सरकारी तिजोरीतून जाहिरातीवर झालेल्या खर्चावर आक्षेप नोंदवायचे. आता ते स्वत:ही तेच करायला सरसावले आहेत. मोबाईल फोन आणि टॅबलेट घरात आल्याच्या आनंदात लोकांना हा जुना इतिहास आठवणारही नसल्याचा ठाम विश्‍वास या नेत्यांच्या मनात असावा कदाचित. अन्नवस्त्रनिवारारस्तेपाणीविजेसारख्या प्राथमिकगरजांच्या पूर्ततेबाबत अजूनही परिस्थिती समाधानकारक नाही. रोजगाराच्या बाबतीत समस्येच्या गांभिर्याची तीव्रता जराशीही कमी झालेली नाही. भ्रष्टाचाराने बरबटलेली व्यवस्था सुधरवण्याबाबतच्या प्रयत्नांचा लवलेशही इथे सापडत नाही. अशा परिस्थितीत जनतेला पुरवावयाच्या सेवांबाबत प्राधान्यक्रम कोणता असावाज्यांना दोन वेळच्या खाण्याची ददात आहेत्यांना मोबाईल उपलब्ध करून देण्याचा?  उपयोग काय त्यांना त्या डबड्याचा? आणि मुळातच इथे प्रश्‍न हा आहे कीमोबाईल्स वाटणे हे सरकारचे काम आहे कानिवडणुकीच्या ऐन तोंडावर सर्वसामान्य लोकांना खूश करण्यासाठी चाललेला हा धिंगाणा नेमका कशासाठी आहेकोणाच्या जीवावर चाललेय् हे सारेअन् कोणाच्या लाभासाठी?फुकटचे मोबाईल्स कशासाठी?
 
या देशातल्या नागरिकांना पंगु  बनविण्याची एकही संधी न गमावण्याचा चंगच सरकारने बांधलेला दिसतो. देशातल्या ज्या नागरिकांना अजून खायला पुरेसे अन्न मिळत नसल्याचे कारण सांगत सरकारने त्यांना मोफत वा अल्पदरात अन्न धान्य पुरवण्यासाठी कायदा तयार केलातेच सरकार आता त्याच गरीब नागरिकांची तंत्रज्ञानाची निकड भागवण्यासाठी टॅबलेट्स आणि संवादासाठी मोबाईल फोन्स बहाल करणार आहे. मोबाईल फुकटटॉकटाईम फुकट. टॅबलेट फुकटत्याला लागणारे डेटा कार्ड कनेक्शनही फुकट. लोकांना सन्मानाने जगूच द्यायचे नाही. दैनंदिन गरजेच्या वस्तूही फुकटात मिळवायची सवय लावून त्यांना भिकारी बनवायचे एवढेच बाकी ठेवले आहे सरकारने.
आपल्या देशात निवडणुकीची गणितंच काही और असतात. सत्ताधार्‍यांनी पाच वर्षांच्या काळात काय केलंकिती चांगली कामे केलीकुठे शेण खाल्लं याला कोण विचारत नाही. निवडणुकीच्या वर्षात काय घडते याला इथे अधिक महत्त्व असते. या वर्षभरात दिली जाणारी आश्‍वासनंजारी होणार्‍या योजनानेत्यांची भाषणं याला महत्त्व असते. यावेळीही तसंच घडणार आहे. गेल्या चार वर्षात उघडकीस आलेले कोट्यवधी रुपयांचे घोटाळे लोकांच्या विस्मरणात जातील आता. कालपर्यंत आपणच या नेत्यांना वाहिलेली शिव्यांची लाखोलीही विसरतील लोक. आता लोकांच्या लक्षात राहीलसहा चे नऊ झालेले सबसीडीचे सिलेंडर्सगरिबांना मिळणारे मोफत धान्यफुकटचा मोबाईल फोनपदरचा रुपयाही न मोजता मिरवायला मिळणारे टॅबलेट्स... कॉंग्रेसच्या नेत्यांनाही एव्हाना लोकांच्या या मानसिकतेचा पुरता अभ्यास झाला आहे. लोकांना काय भावते हे पुरते ठावूक  झालेय् त्यांना. करोडो रुपयांच्या घोटाळ्यांच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या तुलनेत जनतेला कवडीमोलाचा मोबाईल फोन फुकटात मिळाल्याचा आनंद अधिक महत्त्वाचा वाटतोहे हेरूनच या असल्या लोकप्रिय’ घोषणांचा पाऊस पाडला जातो मग.
कधीकाळी हेच लोक एनडीएच्या शायनिंग इंडिया’ संकल्पनेची खिल्ली उडवायचे. त्यावेळी सरकारी तिजोरीतून जाहिरातीवर झालेल्या खर्चावर आक्षेप नोंदवायचे. आता ते स्वत:ही तेच करायला सरसावले आहेत. मोबाईल फोन आणि टॅबलेट घरात आल्याच्या आनंदात लोकांना हा जुना इतिहास आठवणारही नसल्याचा ठाम विश्‍वास या नेत्यांच्या मनात असावा कदाचित. अन्नवस्त्रनिवारारस्तेपाणीविजेसारख्या प्राथमिकगरजांच्या पूर्ततेबाबत अजूनही परिस्थिती समाधानकारक नाही. रोजगाराच्या बाबतीत समस्येच्या गांभिर्याची तीव्रता जराशीही कमी झालेली नाही. भ्रष्टाचाराने बरबटलेली व्यवस्था सुधरवण्याबाबतच्या प्रयत्नांचा लवलेशही इथे सापडत नाही. अशा परिस्थितीत जनतेला पुरवावयाच्या सेवांबाबत प्राधान्यक्रम कोणता असावाज्यांना दोन वेळच्या खाण्याची ददात आहेत्यांना मोबाईल उपलब्ध करून देण्याचा?  उपयोग काय त्यांना त्या डबड्याचा? आणि मुळातच इथे प्रश्‍न हा आहे कीमोबाईल्स वाटणे हे सरकारचे काम आहे कानिवडणुकीच्या ऐन तोंडावर सर्वसामान्य लोकांना खूश करण्यासाठी चाललेला हा धिंगाणा नेमका कशासाठी आहेकोणाच्या जीवावर चाललेय् हे सारेअन् कोणाच्या लाभासाठी?
राजकीय पक्षांनी हातातली सत्ता कायम ठेवण्याच्या धडपडीत निवडणुकीला तोंड देण्याकरता सरळ सरळ सरकारी तिजोरीत हात घालून स्वत:च्या राजकीय लाभासाठी त्या पैशाची समाजातल्या विशिष्ट वर्गांवर उधळण करण्याची ही कुठली तर्‍हा. हा पैसा करदात्यांच्या खिशातून आलेला आहे. त्यातून जनहिताचीकल्याणाचीलोकोपयगी कामे होणे अपेक्षित आहे. कुण्या एका राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी त्याचा दुरूपयोग होणे मुळीच अपेक्षित नाही. शिवायलोकांना स्वत:च्या पैशाने मोबाईल फोन विकत घेण्याइतके सक्षम करायचे सोडून त्यांना फुकटाची सवय लावण्यात कुठला आला विकासकी मतांसाठी असाच मदतीचा पाऊस पाडून लोकांना मिंधे करण्याचा करण्याचा डाव आहे हा?

Monday, September 2, 2013

गुलामांच्या देशा !


 मुळातच सामान्य भारतीयाची मानसिकताप्रजेची’ आहे. आम्हाला आमच्यावर राज्य करणारा कुणीतरी राजा’ लागतोच. सततच्या विदेशी आक्रमणांमुळे वर्षानुवर्षे कुणाच्यातरी अधिपत्याखाली राहण्याच्या सवयीचाही परिणाम असावा तो कदाचित! त्यामुळे राजा नसला की आम्ही कासावीस होतो. मानसिकता गुलामगिरीची असल्याने आम्हाला नियंत्रित करणारा कुणीतरी असावाही आमचीच गरज होऊन बसली आहे. वेसण घालणारा कुणी असला तरचअन्यथा आम्ही अनियंत्रित होऊन जातो. चौकातल्या सिग्नलवर दूर कुठेतरीकोपऱ्यात उभा असला तरी चालेल. पण ट्राफिक पोलिस आम्हाला हवाच असतो. तो दिसला तरच आम्ही नियमाने वागतो. तो जरासा नजरेआड होऊ द्या आणि मग आपले वागणे बघा. सिग्नल तोडण्याची जणू शर्यत लागल्यागत वागतात सारे. ट्राङ्गिक पोलिसाच्या उपस्थितीतली वागणूक आम्हाला त्याच्या अनुपस्थितीत कायम का ठेवता येत नाहीकायद्याचा धाक नसला की आम्ही असे बेमुर्वतखोर का होतोहा केवळ कायद्याच्या भीतीचास्वयंशासनाचा भाग आहेकी  गुलामगिरीच्या आमच्या मानसिकतेचा?बहुधा आपल्या सर्वांच्याच या वागणुकीची सुरूवात ङ्गार लहानपणापासून होत असावी. कुठल्याही शाळेतला शिक्षक नसलेला एखादा वर्ग बघा. कुणीतरी मुसक्या बांधल्याशिवाय नियम आणि स्वयंशासनाच्या चौकटीत वावरायचेच नसल्याचे ठरवल्यागत वागतो ना आपण सारेच?


काय रे शाळेत नाही गेलाससुट्टी आहे आज. सुट्टीअरे आज तर १५ ऑगस्ट. ध्वजारोहण असेल ना शाळेत. मग तरीही तू इथेच. जायचं नाही का तुला शाळेतअहोकाका करायचं काय शाळेत जाऊनपाच मिनिटांचं झेंडावंदन करायला जायचं म्हटलं तर  तासतासभराची  भाषणं ऐकावी लागतात. मुख्याध्यापक अन् त्यांनी बोलावलेल त्या अन्नोन पाहुण्यांची. त्यात आमच्या शाळेच्या प्रेसिडेंटचं भाषण. तो तर अनअव्हॉयडेबल पार्ट असतोशाळेच्या कुठल्याही कार्यक्रमाचा. बरं तुङ्गान बोअर होत असलं तरी ते संपल्यावर टाळ्या पिटायला आम्हीच. छे! कोणी ऐकायची ती रटाळ भाषणं?
घराबाहेर खेळत असलेला शेजारचा राहुल बोलत होता. अरे पण देशाच्या स्वातंत्र्यदिनाचं वेगळं महत्त्व नाही कात्या कार्यक्रमाला जायला नको आपणइंग्रजांपासून मुक्ती मिळाली होती आपल्याला आजच्या दिवशी. मी सांगण्याचा प्रयत्न केला. हो खरं आहे ते. पण खरं सांगूमला वाटतं इंग्रज इथनं जायलाच नको होते....नवव्या वर्गात शिकणार्‍या राहुलच्या तोंडचे हे वाक्य ऐकून मी पुरता चाट पडलेला. का रे पणआता मलाही त्याचं मत जाणून घ्यायची उत्सूकता होती. बाहेर जायला निघालो होतो खरा. पण त्याचं ते अङ्गलातून वक्तव्य ऐकून तिथेच थबकलो.
तसं काही विशेष नाही. पण  इंग्रज असते ना या देशात अजूनहीतर आपला इंडिया आताच्यापेक्षाही खूप डेव्हलप झाला असता. त्यांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी किती डेव्लपमेंट केली आपल्या देशात. रेल्वेरस्ते. आताचं गव्हर्नमेंट काय करते? ‘जनरेशन नेक्स्टच्या डोक्यात शिरलेलं हे भूत भविष्यातल्या कुठल्या धोक्याची घंटा तर नाही नाअसा प्रश्‍न सहज मनात डोकावून गेला. भ्रष्टाचारानं बरबटलेल्या सध्याच्या  व्यवस्थेवर कुणाचाच म्हणून विश्‍वास राहिलेला नाहीहे खरं असलंतरी आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य अजूनही असायला हवं होतंअसं वाटण्याइतपत नैराश्यानं लोकांच्या मनात घर केलेलं असावं?
अरे पण आपल्या’ विकासासाठी ते’ कशाला हवेतआणि इंग्रजांनी तयार केलेले रस्तेबांधलेले पूलरेल्वे मार्ग हे सारे काही त्यांनी भारतीयांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी  तयार केले नव्हते. त्यांना त्यांचा व्यापार देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवायचा होता. म्हणून त्यांनी या सोयी उभारल्या. त्यासाठी म्हणून त्यांचे गुणगान स्वातंत्र्याच्या पासस्टीनंतरही नवी पिढी करीत असेल,तर यातून सध्याच्या सत्ताधार्‍यांनी बोध घेण्याची गरज आहे. कारण प्रगतीचे मोठमोठे दावे करणार्‍यांच्या थोबाडीत हाणलेली ही जबरदस्त चपराक आहे.
नवव्या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला सध्याच्या सरकारांची इंग्रजांशी तुलना करावीशी वाटणेत्याच्या दृष्टिने इंग्रज अधिक सरस ठरणेयात स्वातंत्र्योत्तर काळातील सत्ताधीशांच्यात्यांच्या धोरणांच्याकार्यपद्धतीच्या यशापयशाचा भाग आहेच. पण त्याहीपेक्षा आमच्या मनात वर्षानुवर्षे रुजलेल्या मानसिकतेचा भाग देखील आहे. मुळातच सामान्य भारतीयाची मानसिकताप्रजेची’ आहे. आम्हाला आमच्यावर राज्य करणारा कुणीतरी राजा’ लागतोच. सततच्या विदेशी आक्रमणांमुळे वर्षानुवर्षे कुणाच्यातरी अधिपत्याखाली राहण्याच्या सवयीचाही परिणाम असावा तो कदाचित! त्यामुळे राजा नसला की आम्ही कासावीस होतो. मानसिकता गुलामगिरीची असल्याने आम्हाला नियंत्रित करणारा कुणीतरी असावाही आमचीच गरज होऊन बसली आहे. वेसण घालणारा कुणी असला तरचअन्यथा आम्ही अनियंत्रित होऊन जातो. चौकातल्या सिग्नलवर दूर कुठेतरीकोपऱ्यात उभा असला तरी चालेल. पण ट्राफिक पोलिस आम्हाला हवाच असतो. तो दिसला तरच आम्ही नियमाने वागतो. तो जरासा नजरेआड होऊ द्या आणि मग आपले वागणे बघा. सिग्नल तोडण्याची जणू शर्यत लागल्यागत वागतात सारे. ट्राङ्गिक पोलिसाच्या उपस्थितीतली वागणूक आम्हाला त्याच्या अनुपस्थितीत कायम का ठेवता येत नाहीकायद्याचा धाक नसला की आम्ही असे बेमुर्वतखोर का होतोहा केवळ कायद्याच्या भीतीचास्वयंशासनाचा भाग आहेकी  गुलामगिरीच्या आमच्या मानसिकतेचा?बहुधा आपल्या सर्वांच्याच या वागणुकीची सुरूवात ङ्गार लहानपणापासून होत असावी. कुठल्याही शाळेतला शिक्षक नसलेला एखादा वर्ग बघा. कुणीतरी मुसक्या बांधल्याशिवाय नियम आणि स्वयंशासनाच्या चौकटीत वावरायचेच नसल्याचे ठरवल्यागत वागतो ना आपण सारेच?
आमच्याप्रगतीसाठी ते’ कशाला हवेत, ‘आमचा’ विकास त्यांनी’ का म्हणून करायचात्यासाठी आम्ही स्वत: सक्षम नाही का,आणि राहिला प्रश्‍न वक्तशीरपणाशिस्तीचातर त्याचे पालन करायला आम्हाला कुणी अडवले आहेत्यासाठी इंग्रजांचेच राज्य कशाला हवे देशावरया सार्‍या प्रश्‍नांच्या उत्तरादाखल व्यक्त होणारी राहुलच्या मनातली भावनाही याच गुलामगिरीचे प्रतिक मानली पाहिजे. या देशात एकाच कुटुंबातील सदस्य ओळीने पंतप्रधान बनतात. एकाच घराण्यातील सदस्य वर्षानुवर्षेतेही लोकशाही पद्धतीने निवडून येतात. राज्य करतात. प्रदीर्घ काळ सत्तेत राहतात. लोकांनाही ते’ सत्तेत राहिलेले हवे असतात. सत्तेत त्या घराण्याचा सहभाग नसेलतर जनताच कमालीची अस्वस्थ होते. यात दोष त्या घराण्यातील सदस्यांना द्यायचा की  गुलामगिरीत धन्यता मानणार्‍या जनताजनार्दनालाहे ज्याचे त्याने ठरवावे. समाजातील अप्रस्थापित, अवर्ण, काळेगरीब,महिला या सर्वच घटकांना त्यांच्यावर सतत होत राहिलेल्या अन्यायाची जाणीव व्हायला आणि त्याविरुद्ध त्यांच्या मनात संघर्षाची ठिणगी पेटायला लागलेला प्रचंड मोठा कालावधीयामागेही गुलामगिरीच्या जडलेल्या सवयीचेच कारण तर नसेल?