Monday, November 4, 2013

मन उद्विग्न अन् अस्वस्थ करणारे प्रश्‍न

विज्ञान, तंत्रज्ञानाने जग फार जवळ आले असले, तरी माणसं मात्र एकमेकांपासून दूर जात असल्याची खंत नवी राहिलेली नाही आता. मनामनातून ती व्यक्त होतेय्. पत्रांची जागा मोबाईलवरच्या एसएमएसने घेतली. मैदानावरचे खेळ संगणकावर आले. अभिनंदन, सांत्वनाच्या भावनाही प्रत्यक्ष भेटीऐवजी ई-मेल अन् व्हाटसऍपवर व्यक्त होऊ लागल्या. पद्धत बदलली अन् बालमनावर रुजविण्याचे संस्कारही. रक्षाबंधन हा खरं तर भावाने बहिणीच्या रक्षणाची शपथ घेत तिच्याकरवी हातात रक्षा बांधून घेण्याचा दिवस. पण, या दिवशी बाहेर पडाल तर एखादी मुलगी तुम्हाला राखी बांधेल आणि मग तुम्ही ‘भाऊ’ बनून जाल. त्यामुळे या दिवशी घरातूनच बाहेर पडू नका! पडलात तरी कुण्या मुलीच्या नजरेस पडू नका. नाही तर तुमचा ‘भाऊ’ झाल्याशिवाय राहणार नाही, असली भीती दाखवणार्‍या जाहिराती कथित लोकल एन्टरटेन्मेंट चॅनल्सवरून कानावर पडल्या की आधुनिकतेच्या नावाखाली नवी पिढी कोणत्या दिशेला नेली जातेय्, याचा अंदाज येतो. जगातल्या कोणत्याही मुलीचे ‘भाऊ’ न बनण्याची शिकवण नेमके कोण अन् कशासाठी देतेय्? आई-वडिलांची शिकवण, लहानपणापासून रुजलेले संस्कार, पाठ्यपुस्तकातले सामाजिक आशय मागे पडून कानावर पडणार्‍या या जाहिरातींचा प्रभावच अधिक प्रभावशाली ठरतोय् अन् बहुधा याच लाटेत भावा-बहिणींच्या नात्याची घट्ट वीणही दिवसागणिक सैल होतेय्.....

नर आणि मादीच्या पलीकडेही जगात स्त्री-पुरुषांमध्ये संबंध असू शकतात आणि ती नातीही खूप सुंदर असू शकतात. त्या नात्यांनाही विषयांच्यापलीकडले भावनिक कंगोरे असू शकतात, हे सार्‍या जगाला शिकवणार्‍या, नव्हे ठणकावून सांगणार्‍या स्वामी विवेकानंदांच्या भारतीय समाजालाच आज त्या शिकवणुकीचा विसर पडू लागलाय् की काय? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही पाठ्य पुस्तकांच्या पहिल्या पानावरची शपथ हळूहळू धूसर तर होत चालली नाही ना? स्त्री-पुरुषांमधली भावनिक नाती पुन्हा एकदा विषयांच्या वावटळीत घरंगळत तर चालली नाहीत ना? रक्षणाची शपथ घेत रक्षाबंधनाला बांधले गेलेले भावाच्या हातावरच्या धाग्यांचे बंधन हळूहळू क्षीण तर होत चाललेले नाहीत ना? शरद ऋतुतल्या बीजेला भावा-बहिणींच्या प्रेमात चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढ व्हावी म्हणून सुरू झालेला, बहिणीने भावाला ओवाळण्याचा प्रघात अलीकडे निरर्थक तर ठरत चाललेला नाही ना...?
मन उद्विग्न अन् अस्वस्थ करणारे प्रश्‍न आहेत हे सारे. सारा भारतीय समाज या अनुत्तरीत प्रश्‍नांच्या विळख्यात सापडल्याचे दुर्दैवी चित्र आहे सर्वदूर. ज्या देशात परस्त्री मातेसमान मानली जाते, जिथे ‘यत्र नार्यस्तु पूज्यंते’...च्या मंत्राला वेदमंत्राच्या पंक्तीत स्थान आहे, त्या देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर का यावा? भर रस्त्यांवर बलात्कार का व्हावेत? रस्त्याने चाललेली कुठलीही तरुणी आपली शारीरिक भूक भागवण्यासाठीच पृथ्वीतलावर धाडण्यात आली असल्याचा ग्रह करून घेत तरुणाई बेभान आणि बेताल का वागू लागली आहे अलीकडे? दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर झाली तरी, पोलिसांच्या कारवाईचा अन् न्यायालयाच्या निकालाचा वचक निर्माण होऊन समाजातील बलात्काराच्या घटनांमध्ये विक्रमी घट झाल्याचे चित्र मात्र नाही. उलट त्या नंतरच्या काळातही बलात्काराच्या घटना सतत वाढल्याची आकडेवारी वेगवेगळ्या अहवालांमधून समोर येतेय्. पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रातली महिलांची सामाजिक दुरवस्था काय वर्णावी! नॅशनल क्राईम रेकॉर्डस्‌च्या एका अहवालानुसार गेल्या काही वर्षात या राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. बलात्कारापासून तर हुंडाबळीपर्यंत सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे.
घरादारांसमोर दिव्यांची आरास मांडली जात असताना, प्रकाशाच्या झगमगाटात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना तिकडे दक्षिणेतल्या एका अभिनेत्रीने एका खासदाराविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदविली आणि नंतर मागेही घेतली. हैदराबादेत एका इंजिनीअर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना अजून ताजी आहे. शेजारच्या समुद्रपुरात एका आदिवासी तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत पेटविल्याच्या क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या घटनेच्या वृत्ताची शाई अजून वाळली नाही. अशात दिंडोशीत एका अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची वेदनादायक बातमी समोर आली आहे...
काय, झालंय् काय आपल्या समाजाला? कशाचा परिणाम आहे हा सारा? केवळ शारीरिक आकर्षणांमुळे भावना चाळवल्या गेल्याचा हा दुष्परिणाम आहे? दूरचित्रवाहिन्या, इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध झालेल्या माहितीच्या मार्‍याची ही परिणती आहे, की एकूणच भारतीय समाजावर आजवर झालेल्या संस्कारांवरच प्रश्‍नचिन्ह उभे करावे लागणार आहे आता? जगातले सर्वाधिक धर्म अस्तित्वात असलेल्या, त्या त्या धर्माची मानवतेची शिकवण खोलवर रुजलेल्या भारतीय समाजावरचे धार्मिक संस्कार इतके कसे तकलादू झाले? नर आणि मादीच्या पलीकडे स्त्री-पुरूषांमधले संबंध जणू मान्यच नसलेल्या पाश्‍चिमात्य संस्कृतीचा पगडा इतका कसा घट्ट बसतोय आपल्या मनावर? कुटुंब नावाची संस्था मजबूत करणारे इथले संस्कार कुठे गेलेत? सामाजिक बंधूभाव मनामनात रुजविणारी ती शिकवण कुठे गेली? की, वेल्थ, वाईन, वूमनच्या त्रिसूत्रीत वाहवत चाललेल्या, त्यापुढे इतर सार्‍या गोष्टी थिट्या मानू लागलेल्या या समाजात इतर सारी नाती, त्या नात्यांचे पावित्र्यही लयाला जात अल्याचे बघण्याची वेळ येणार आहे, जगद्गुरू म्हणविणार्‍या भारतावर?
विज्ञान, तंत्रज्ञानाने जग फार जवळ आले असले, तरी माणसं मात्र एकमेकांपासून दूर जात असल्याची खंत नवी राहिलेली नाही आता. मनामनातून ती व्यक्त होतेय्. पत्रांची जागा मोबाईलवरच्या एसएमएसने घेतली. मैदानावरचे खेळ संगणकावर आले. अभिनंदन, सांत्वनाच्या भावनाही प्रत्यक्ष भेटीऐवजी ई-मेल अन् व्हाटसऍपवर व्यक्त होऊ लागल्या. पद्धत बदलली अन् बालमनावर रुजविण्याचे संस्कारही. रक्षाबंधन हा खरं तर भावाने बहिणीच्या रक्षणाची शपथ घेत तिच्याकरवी हातात रक्षा बांधून घेण्याचा दिवस. पण, या दिवशी बाहेर पडाल तर एखादी मुलगी तुम्हाला राखी बांधेल आणि मग तुम्ही ‘भाऊ’ बनून जाल. त्यामुळे या दिवशी घरातूनच बाहेर पडू नका! पडलात तरी कुण्या मुलीच्या नजरेस पडू नका. नाही तर तुमचा ‘भाऊ’ झाल्याशिवाय राहणार नाही, असली भीती दाखवणार्‍या जाहिराती कथित लोकल एन्टरटेन्मेंट चॅनल्सवरून कानावर पडल्या की आधुनिकतेच्या नावाखाली नवी पिढी कोणत्या दिशेला नेली जातेय्, याचा अंदाज येतो. जगातल्या कोणत्याही मुलीचे ‘भाऊ’ न बनण्याची शिकवण नेमके कोण अन् कशासाठी देतेय्? आई-वडिलांची शिकवण, लहानपणापासून रुजलेले संस्कार, पाठ्यपुस्तकातले सामाजिक आशय मागे पडून कानावर पडणार्‍या या जाहिरातींचा प्रभावच अधिक प्रभावशाली ठरतोय् अन् बहुधा याच लाटेत भावा-बहिणींच्या नात्याची घट्ट वीणही दिवसागणिक सैल होतेय्. या नात्याचे पावित्र्य जपण्याची, ते नव्या पिढीत रुजविण्याची नितांत गरज आज निर्माण झाली आहे. रक्ताची नाती तेवढी ‘जपण्याजोगी’ अन् उरलेला समाज ‘वापरून’ फेकण्याच्या लायकीचा असल्याचा गैरसमज तमाम पुरुषजातीच्या मनातून काढून टाकण्याची जशी गरज आहे, तशीच गरज रक्ताची नाती जपणार्‍या मानवजातीतल्या संबंधातला यांत्रिक आणि व्यवहार्य भाग दूर करण्याचीही आहे. वर्षातले दोन दिवस भावा-बहिणीच्या नात्याची जपणूक करण्याचे. त्या दिवशी राखी बांधून झाली, ओवाळून झाले की उरलेले सारे दिवस समाजातल्या इतर स्त्रियांचा उद्धार करायला आपण मोकळे असल्याचा ग्रह तमाम ‘भाऊरायांच्या’ मनातून काढून टाकण्याचीही आज तेवढीच आवश्यकता आहे. खरं तर आपल्या समाजव्यवस्थेत जन्माला येताच ओघाने येणार्‍या प्रत्येकच नात्याच्या जबाबदारीचे बाळकडू आपल्याला काटेकोर चाकोरीतून नकळत मिळत असते. वेगवेगळ्या नावांची सुंदर झालर लावूनच ती नाती आपल्या वाट्याला येतात. मात्र, ज्यावेळी ही चाकोरी हरवते, झालर उसवली जाते, त्यावेळी केवळ कात तेवढी हाती उरते. अन् व्यवहाराच्या कोरड्या पखाली ओढत जगणार्‍यांची जमात तेवढी निर्माण होते....या कोरडेपणातूनच मग नाती भावा-बहिणीपेक्षाही स्त्री-पुरुषांची तयार होतात. कुठलीही जबाबदारी नको म्हणून रूळत चाललेली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ काय किंवा बलात्कार काय, भावनाशून्य अशा कोरड्या व्यवहारातून निपजलेल्या बाबी त्या...
भावा-बहिणीचं नातं या सार्‍यांपलीकडचं आहे. भगवान श्रीकृष्णानं सुभद्रेशी जपलेलं. त्याच कृष्णाला द्रौपदीच्या मदतीला धावून जाण्यास भाग पाडणारं. रक्तापेक्षाही भावनेच्या बळावर ते शतकानुशतकं जिवंत आहे. रक्ताचं नसलं, तरीही ते मनापासून जपण्याची प्रेरणा जगातल्या कुठल्याही पुरुषाला देण्याची ताकद त्या नात्यात आहे. सध्याच्या जगरहाटीत ते नातंच हरवण्याची भीती निर्माण झाली आहे. ते हरवू न देण्याचा संकल्प आज भाऊबीजेच्या निमित्ताने सारे मिळून करू या.

No comments:

Post a Comment