Friday, November 27, 2015

राहुलबाबा!

तुमच्या या प्रश्‍नावर सरळ नाऽऽही म्हणून उत्तर द्यावं ना त्यांनी? पण, गलबला झाला होऽऽचा! आता आली का पंचाईत! तुमचीही ना थोडीशी गल्लतच झाली बघा राहुलबाबा! तुम्हाला वाटलं समोर सारे कॉंग्रेसचे कार्यकर्ते बसलेत, बुद्धी बासनात गुंडाळून आपल्या हो ला हो म्हणणारे. आपण निघालो की मागेमागे धावणारे. पण झालं भलतंच. तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर समोरून आलंच नाही. जे उत्तर आलं ते तुमचीच फिरकी घेणारं. हुर्योऽऽ उडविणारं. असं का करतात कधी? संस्कार म्हणून काही गोष्टी असतात की नाही. अशी जाहीरपणे टर उडवतात का कधी कुणाची? नव्या पिढीतल्या या पोरांनाही ना काही कळत नाही! अरे, त्यांचं खरं असलं म्हणून काय झालं, राजकारणात वावरताना तुम्हाला बर्‍याचदा खोटं बोलावं लागतं, हे कळायला नको त्यांना? सत्ता हातून गेल्यापासून तुम्ही जरासे अस्वस्थ झाला आहात, त्यामुळे सरकारच्या कुठल्याच कामात तुम्हाला ‘राम’ दिसत नाही, त्यामुळे मोदींना अडचणीत आणण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवणं, हे पक्ष टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे, त्यामुळेच मग तुम्ही असले बाळबोध सवाल विचारता, हे समजून नको घ्यायला त्यांनी? तर नाही. लागलीच तुम्हाला निरुत्तर करणारी उत्तरं देऊन, तुमची टर उडवून मोकळी झाली मंडळी. छे! आपल्याला नाही आवडलं त्यांचं असलं वागणं. लोकांना त्यात तुमची फजिती दिसली असली तरी आम्हाला मात्र, तुमची प्रगल्भता दिसली त्या वेळी. त्यांनी टर उडवल्यावर तुम्ही वाईट नाही वाटून घेतलं. उलट सर्वांसमोर मान्य केलंत की, हो! मोदींचे स्वच्छता अभियान देशात प्रभावीपणे काम करीत आहे आणि त्याचे परिणामही दिसताहेत. याला म्हणतात मनाचा मोठेपणा. विरोधी पक्षात राहून सरकारच्या कामाला दाद द्यायला मन मोठं असावं लागतं. प्रगल्भता असावी लागते. ती तुम्ही दाखवलीत. पण, मग आधीचा तो सवाल झक मारायला विचारला होता का, असा सवाल काही नतद्रष्ट लोक विचारतील. पण, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. जळतात सारे तुमच्यावर. 


प्रिय राहुलबाबा,
सप्रेम नमस्कार!
बर्‍याच दिवसांनी पत्र लिहितोय्. तशी सर्वसामान्यांची दखल घेण्याची प्रथा नाही आपल्या पक्षात. पण, जमलंच तर ती प्रथा मोडून, घ्या माझ्या या पत्राची दखल. जमलंच तर त्यातल्या भावना समजून घेण्याचाही प्रयत्न करा.
गेल्या लोकसभा निवडणुकीत जी हाराकिरी पक्षाच्या वाट्याला आली, त्यानंतर गळून पडलेलं अवसान परवाच्या बिहारच्या निवडणुकीत हाती लागलेल्या थोड्याशा यशानंतर अंगात संचारल्याचे जाणवतेय् अलीकडे तुमच्या वागण्या-बोलण्यावरून. भाषणात केवढा जोश असतो तुमच्या! काय जोरकसपणे आव्हान देता तुम्ही मोदींना. अभिमानाने ऊर भरून येतो आमचा. तुमच्याकडे कौतुकाने बघताना आणि तुमच्या भाषणातली आव्हानं ऐकताना छाती कशी छप्पन इंचाची होते आमची, आमच्याही नकळत. कालपर्यंत आईच्या मागे मागे फिरणारं पोर, आज केवढी आव्हानं देत सुटलाय् थोरामोठ्यांना! ज्यांनी या देशावर इतकी वर्षं राज्य केलं, त्या गोर्‍यांच्या देशात जाऊन एखादा कारखाना काढायचा, हे काय येरागबाळ्याचे काम आहे? नाहीच! लय भारी काम आहे ते! तुम्ही ते करून दाखवताय्. आम्हाला भारी अभिमान आहे तुमचा. काही लोक आरडाओरड करतील, आपला देश सोडून तिकडे जाताय् कारखाना सुरू करायला म्हणून. आपल्या देशात नाही का सुरू करता आला असता एखादा उद्योग, असाही सवाल करतील ते. त्यावरून तुमच्या देशभक्तीवरही प्रश्‍नचिन्ह उभे होतील. तिकडे असले ‘उद्योग’ करायला जाता म्हणूनच इकडे संसदेत उपस्थित राहात नाही का, असा सवालही विचारतील. त्यांचं जाऊ द्या राहुलजी! नतद्रष्ट लोक आहेत ते. तुम्ही काही केलं तरी विरोधच करणार. तुम्ही चालू द्या तुमचे उद्योग. तिकडे विदेशात उद्योग उभारून पैसा कमावलात तरी या देशात निवडणुकी लढून जिंकण्यात कुठलाच अडथळा येणार नाही तुम्हाला कधी. त्याबाबत अगदी निश्‍चिंत राहा तुम्ही. तसेही दिल्लीत राहून अमेठीची निवडणूक जिंकताच की! आता लंडनमध्ये राहूनही अमेठी सर करता येईल. इतकी वर्षे आपल्या पक्षानं मूर्ख बनवलं लोकांना, पुढेही बनवता येईल की! तेव्हा राहुलबाबा, त्याची चिंता अजीबात नको! राहिला प्रश्‍न संसदेतल्या उपस्थितीचा, तर तुम्ही हजर-गैरहजर राहिल्यानं पक्षाच्या कामगिरीत फारसा फरक पडेल असे वाटत नाही कॉंग्रेस पक्षातील कुणाला.
ते सुब्रमण्यम स्वामी का कोण, काय काय आरोप करीत सुटलेत तुमच्यावर. म्हणतात, राहुल गांधींनी इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले आहे. त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करा! हे हे रे! काय गंमत वाटली का यांना तुमचे नागरिकत्व रद्द करणे म्हणजे? चुकूनही ‘गांधी’ नसलेल्या फिरोज यांचे नातू तुम्ही. पण, ‘गांधी’ नावाचा महिमा कळल्यावर, तर आपली भगिनीही लग्न होऊन सासरी गेली तरी ते आडनाव सोडायला तयार नाही अजून! तर अशा घरातून आलेल्या, लोकशाही पद्धतीने घराणेशाही चालवण्याची किमया करणार्‍या गांधी घराण्याचे प्रतिनिधी आपण. आपले नागरिकत्व ही या देशाची शान आहे. कुणीतरी सुब्रमण्यम स्वामी ती शान मोडीत काढायला निघाले असतील, तर हा देश कदापि गप्प बसणार नाही!
आणि हो! परवा तुम्ही चांगलेच खडसावले त्या स्वामींना. थेट मोदींना आव्हान देऊन टाकलं या प्रकरणात. म्हणालात, करा चौकशी! हिंमत असेल, तर घाला मला जेलमध्ये. खरंच राहुलबाबा कमाल आहे तुमची. पाऽऽर कोंडीत पकडलं त्या भाजपावाल्यांना. कायपण तो खडा आवाज. काय तो तोरा. काय तो आवेश. आणि सरकारला आव्हान देण्याची ती तुमची तर्‍हा! व्वा! राहुलबाबा, व्वा! मानलं तुम्हाला. चुका करूनही मुजोरी करावी ती अशी!
परवा बंगळुरूमधील त्या कॉलेजातल्या भाषणात केवढ्या उत्साहाने सवाल केलात तुम्ही. पण, ती पोरं भलतीच हुशार निघाली. ‘‘जेवढ्या जोशात सांगितले जाताहे, तेवढ्या स्तरावरून खरंच या देशात स्वच्छता अभियान सुरू आहे असं वाटत मात्र नाही. तुम्हाला वाटतं तसं?’’ तुमच्या या प्रश्‍नावर सरळ नाऽऽही म्हणून उत्तर द्यावं ना त्यांनी? पण, गलबला झाला होऽऽचा! आता आली का पंचाईत! तुमचीही ना थोडीशी गल्लतच झाली बघा राहुलबाबा! तुम्हाला वाटलं समोर सारे कॉंग्रेसचे कार्यकर्ते बसलेत, बुद्धी बासनात गुंडाळून आपल्या हो ला हो म्हणणारे. आपण निघालो की मागेमागे धावणारे. पण झालं भलतंच. तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर समोरून आलंच नाही. जे उत्तर आलं ते तुमचीच फिरकी घेणारं. हुर्योऽऽ उडविणारं. असं का करतात कधी? संस्कार म्हणून काही गोष्टी असतात की नाही. अशी जाहीरपणे टर उडवतात का कधी कुणाची? नव्या पिढीतल्या या पोरांनाही ना काही कळत नाही! अरे, त्यांचं खरं असलं म्हणून काय झालं, राजकारणात वावरताना तुम्हाला बर्‍याचदा खोटं बोलावं लागतं, हे कळायला नको त्यांना? सत्ता हातून गेल्यापासून तुम्ही जरासे अस्वस्थ झाला आहात, त्यामुळे सरकारच्या कुठल्याच कामात तुम्हाला ‘राम’ दिसत नाही, त्यामुळे मोदींना अडचणीत आणण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवणं, हे पक्ष टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे, त्यामुळेच मग तुम्ही असले बाळबोध सवाल विचारता, हे समजून नको घ्यायला त्यांनी? तर नाही. लागलीच तुम्हाला निरुत्तर करणारी उत्तरं देऊन, तुमची टर उडवून मोकळी झाली मंडळी. छे! आपल्याला नाही आवडलं त्यांचं असलं वागणं. लोकांना त्यात तुमची फजिती दिसली असली तरी आम्हाला मात्र, तुमची प्रगल्भता दिसली त्या वेळी. त्यांनी टर उडवल्यावर तुम्ही वाईट नाही वाटून घेतलं. उलट सर्वांसमोर मान्य केलंत की, हो! मोदींचे स्वच्छता अभियान देशात प्रभावीपणे काम करीत आहे आणि त्याचे परिणामही दिसताहेत. याला म्हणतात मनाचा मोठेपणा. विरोधी पक्षात राहून सरकारच्या कामाला दाद द्यायला मन मोठं असावं लागतं. प्रगल्भता असावी लागते. ती तुम्ही दाखवलीत. पण, मग आधीचा तो सवाल झक मारायला विचारला होता का, असा सवाल काही नतद्रष्ट लोक विचारतील. पण, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. जळतात सारे तुमच्यावर. तुमच्या चुकांवर नजर ठेवून असतात ते. तरी बरं एवढे प्रयत्न करूनही तुम्हाला पंतप्रधान नाही करता आलं सोनिया मॅडमना. आता नजीकच्या भविष्यात तरी तुम्ही त्या पदावर विराजमान होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. गेल्या निवडणुकीत तुमच्या नेतृत्वात पक्षाच्या एवढ्या चवचिंध्या झाल्या, तरी पुन्हा तुम्हालाच नेतृत्व सोपविण्याची तयारी चालवलीय् ‘मातोश्रीं’नी! त्यांना नकार देण्याची जराशी हिंमत नसलेल्या नंदीबैलांच्या संमतीने पक्षाची धुरा आपल्याकडे येणार लवकरच. पण, या बैलांकडे दुर्लक्ष करून, सभोवतालच्या चमच्यांना दूर सारण्याचा जो सल्ला आपण परवा पंतप्रधानांना दिलात ना, राहुलजी! व्वा! क्या बात है! एकदम लाजबाव! नोंदविणार्‍यांना नोंदवू देत आक्षेप. करणार्‍यांना करू देत टीका. कॉंग्रेसच्या नेत्यांना केव्हापासून चमच्यांचे वावडे जाणवू लागलेय्, असे बोचरे प्रश्‍नही विचारतील काही लोक आता. मग इंदिरा, राजीव यांच्या भोवती कायम होती किंवा आता सोनियांच्या भोवती असते ती गर्दी कुणाची, असे जिव्हारी लागणारे प्रश्‍नही इतिहासाचे दाखले देत विचारतील काही लोक. राहुलबाबा, दुर्लक्ष करा असल्या अडचणीच्या प्रश्‍नांकडे. कर्मदरिद्री लोक आहेत ते! दर वेळी तुमच्यातल्या उणिवा चव्हाट्यावर आणण्याची संधी शोधत असतात लेकाचे. बाकी आप, लगे रहो! एकदम सही जा रहे हो!
आपला,
एक चाहता

Monday, November 23, 2015

अस्वस्थ शहरे आणि सचिंत गावे

इथल्यांना तिथल्या अव्यवस्थेचा तिटकारा तर तिथल्यांना इथल्या झगमगाटाचे आकर्षण. ते शेतावरच्या मेहनतीत रमलेले तर हे यांच्या धावपळीत. खूश कोणीच नाही. लोडशेडिंगने पिचलेलेही नाखूश अन् विजेच्या झगमगाटात रमलेलेही नाखूशच! गावाकडची युवा पिढी चौकावरच्या पान टपरीवर चकाट्या पिटत वेळेचा अपव्यय करताना दिसते, तर शहरातली तरुणाई बीयरबार किंवा हुक्का पार्लरमध्ये धूर हवेत सोडत बिनधास्तपणे पैशाचा अपव्यय करताना. ही पिढी शार्प आहे, हुशार आहे. संगणक हाताळणीत ती निपूण आहे. पण तरीही तिच्या व्यवहारकुशलतेबाबत प्रश्‍नचिन्ह आहेतच. ‘एन्जॉयमेंट’च्या पलीकडे आयुष्य जगण्याची दुसरी कुठलीच कारणे या पिढीतील सदस्यांना सापडत नसतील, सामूहिक बलात्कार हे कुणाच्या बेपर्वा वागणुकीचे परिणाम असतील, अविवाहीत मुली गर्भवती राहण्याच्या प्रमाणात झालेली आश्‍चर्यजनक वाढ हा या कथित आधुनिक युगातील ‘मोकळ्या’ वर्तणुकीचा परिणाम असेल, तर मग शहरात आलेल्या एका खेडूत शेतकर्‍याला गावातल्या ‘फसले’पेक्षाही शहरातील ‘नस्ले’ अधिक संकटात असल्याचे जाणवले असेल, तर दोष कुणाचा?
एक किसान गाव छोडकर शहर आ गया था
फिक्र वहा भी थी, फिक्र यहा भी है|
वहा तो सिर्फ फसले खतरे मे थी
यहा तो पुरी नस्ले खतरे मे है...॥

शहरी वातावरणाचे सध्याचे भीषण वास्तव मांडणार्‍या या चार ओळी कुठेतरी वाचण्यात आल्या. त्यावर जरासा विचार करावा म्हटलं तर परवा न्यायालयात महिलांवरील बलात्काराबाबत करण्यात आलेल्या एका युक्तिवादाच्या बातमीचे कात्रण कुणीतरी समोर आणून ठेवले. पूर्वीच्या काळात घातले जात नव्हते अशा, महिलांच्या आताच्या सर्व प्रकारच्या आधुनिक कपड्यांमध्ये बलात्काराची कारणे शोधण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला होता. हे सारे कमी होते की काय म्हणून एका अहवालातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. महिलांच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्करणार्‍या पुरुषांचा या देशातला वर्षाकाठचा आकडा आता दीड लाखांच्या घरात पोहोचला आहे... 
शेतकर्‍यांच्या आत्महत्या, त्यामागील कारणे, त्याची कारणमीमांसा, त्यावरचे उपाय याबाबतची चर्चा तर नेहमी होतेच अलीकडे. अशा प्रकरणात बर्‍याचदा सरकारी यंत्रणेवर दोषारोपण करून मोकळे होता येते आपल्याला. पण दिवसागणिक बिघडत चाललेल्या सामाजिक व्यवस्थेचे दोष कुणाला द्यायचेत, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र गवसत नाही कित्येकदा. शेतकरी आत्महत्येमागे केवळ सिंचनाचा अभाव, डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर, सावकारी पाश एवढीच कारणे आहेत, की दूरचित्रवाणी, चित्रपटातून सतत झळकणार्‍या स्वप्नवत झगमगाटाच्या मागे धावण्याच्या शर्यतीत पदरी पडलेल्या अपयशाचाही तो एक परिणाम आहे, याचाही विचार व्हायला हवा. जे त्याच्या कधी वाट्याला आलं नाही, जे वाट्याला येण्याची कल्पना तो स्वप्नातही करू शकत नाही ते, दिवस-रात्र काबाडकष्ट करूनही वाट्याला न आलेलं सुख इतर कुणीतरी उपभोगताना दिसलं, त्यातही राजकीय क्षेत्रातल्या नेत्यांची आपल्याच जीवावर विनासायास चाललेली चैन बघितली, सरकारी तिजोरीतल्या पैशावर चाललेली सरकारी अधिकार्‍यांची मौज बघितली की, तो नैराश्याच्या गर्तेत जाणं स्वाभाविकच. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबाबत निदान व्यवस्थांचा अभाव, गरिबी, भ्रष्टाचार अशी वेगवेगळी कारणं तरी गवसतात. पण दीड लाख पुरुषांच्या आत्महत्यांमागे कुठली कारणं पुढे करायची? कारण यातील एक घटक सुविधांच्या आणि पैशाच्या अभावाच्या कारणांमुळे आत्महत्या करू पाहतोय्, तर दुसरा घटक त्या सार्‍या बाबी उपलब्ध असतानाही आत्महत्येचा मार्ग स्वीकारतोय्.
हा दरदिवशी बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम आहे? तो केवळ पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाचा परिपाक आहे? आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही आमच्याही नकळत अंगीकारलेल्या जीवनशैलीच्या परिणामस्वरूप ही स्थिती उद्भवली आहे? की विभक्त कुटुंब व्यवस्था आणि एकूणच संस्कारांच्या अभावातून घडतोय् हा सारा प्रकार?
तब्बल ६८ टक्के प्रकरणात बलात्कारांची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविली जात नसलेल्या या देशात बलात्काराची दाखल झालेली प्रकरणे २.९३ लाखांच्या घरात पोहोचतात, हे कशाचे लक्षण मानायचे? इथे बाता तर सारे आधुनिकतेच्या मारतात. स्त्रीयांना समान हक्क बहाल करण्याबाबतही अलीकडे सकारात्मक भूमिका घेताना दिसतो हा समाज. तिला ‘चूल आणि मूल’च्या चौकटीबाहेर काढण्याबाबतही ना नाहीच इथे कुणाची. ‘यत्र नार्यस्तू पूज्यन्ते’चा मंत्र जपणारेही आम्हीच असतो. मग बलात्काराच्या प्रसंगात सहभागी होणार्‍या नराधमांना नाही होत यापैकी कुठल्याच गोष्टीचे स्मरण? आणि आता तर न्यायालयापुढे युक्तिवाद करताना मुलींनी अंगावर घातलेल्या कपड्यांवर ठपका ठेवत नराधमांच्या बेमूर्वतखोर वागणुकीचे आडमार्गाने समर्थन करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय्. बलात्काराच्या प्रकरणात इथला सामान्य माणूस कसा विचार करतो, हे जाणून घेण्यासाठी परवा मुंबई उच्च न्यायालयाने चंद्रकांत पालव यांची बाजू ऐकून घेतली तेव्हा हे तर्कट न्यायाधीशांच्या कानावर पडले. हे तर्क जर खरे मानले आणि महिलांवरील बलात्काराची कारणं या एवढ्या छोट्याशा चौकटीत बंदिस्त केली तर मग, शारीरिक संबंधांना नकार देणार्‍या एका पुतण्यावर काकूने रागाच्या भरात ब्लेडने वार केल्याच्या परवाच्या त्या नालासोपार्‍यातल्या घटनेतनं कुठला अर्थ काढायचा?
एकूणच, उपरोक्त ओळीतील ‘पुरी नस्ले खतरेमे’चा इशारा देणारीच परिस्थिती आहे.
कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली. पैश्याच्या हव्यासापोटी म्हणा वा मग गरजेपोटी, पण माणसं कामासाठी घराबाहेर पडली अन् इकडे घरातली मुलं मायबापांच्याच प्रेमाला पारखी झाली. मुलांचे विश्‍व मोबाईलवरील गेम्स-इंटरनेट-टीव्हीने व्यापले, नाश्त्याची जागा जंक फूडने घेतली अन् आईची जागा आयाने. दिवसदिवसभर आई-वडील उपस्थित नसलेल्या, आजी-आजोबांचा पत्ता नसलेल्या घरात संस्कार होतील कसे? अन् ते करणार कोण? शिवाय काळाचा महिमा आहेच. जे कालपर्यंत बोलायलाही कुणी धजावत नव्हतं, ते सारं आज इंटरनेटवर बघायला सहज उपलब्ध आहे. ‘हम दो-हमारा एक’च्या कल्चरने नात्यांची वीण केव्हाच सैल केली आहे. वाचन कमी झालेले. व्यवहार काडीचा कळत नसला तरी नव्या पिढीचे मोबाईल-संगणक लीलया हाताळणे अधिक कौतुकाचे ठरू लागले. रात्री उशिराची बारमधली गर्दी आणि तरुणाईच्या नजरेत वेल्थ, वाईन, सेक्सच्या चौकटीत बंदिस्त झालेले एन्जॉयमेंटचे संदर्भ...
एकीकडे शहरातल्या माणसांना खेडी बकाल झाल्याचे जाणवते, तिथे ‘काहीच राहिले नसल्याची’ प्रतिक्रिया तो सहजपणे व्यक्त करतो. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठीही तो या परिस्थितीलाच दोषी मानतो आणि त्याच खेड्यातून शहरात आलेल्या माणसाला मात्र त्याच्या तुलनेत शहरातले मानवी जीवन अधिक धोक्यात आले असल्याच्या निष्कर्षाप्रत यावेसे वाटते! इथल्यांना तिथल्या अव्यवस्थेचा तिटकारा तर तिथल्यांना इथल्या झगमगाटाचे आकर्षण. ते शेतावरच्या मेहनतीत रमलेले तर हे यांच्या धावपळीत. खूश कोणीच नाही. लोडशेडिंगने पिचलेलेही नाखूश अन् विजेच्या झगमगाटात रमलेलेही नाखूशच! गावाकडची युवा पिढी चौकावरच्या पान टपरीवर चकाट्या पिटत वेळेचा अपव्यय करताना दिसते, तर शहरातली तरुणाई बीयरबार किंवा हुक्का पार्लरमध्ये धूर हवेत सोडत बिनधास्तपणे पैशाचा अपव्यय करताना. ही पिढी शार्प आहे, हुशार आहे. संगणक हाताळणीत ती निपूण आहे. पण तरीही तिच्या व्यवहारकुशलतेबाबत प्रश्‍नचिन्ह आहेतच. ‘एन्जॉयमेंट’च्या पलीकडे आयुष्य जगण्याची दुसरी कुठलीच कारणे या पिढीतील सदस्यांना सापडत नसतील, सामूहिक बलात्कार हे कुणाच्या बेपर्वा वागणुकीचे परिणाम असतील, अविवाहीत मुली गर्भवती राहण्याच्या प्रमाणात झालेली आश्‍चर्यजनक वाढ हा या कथित आधुनिक युगातील ‘मोकळ्या’ वर्तणुकीचा परिणाम असेल, तर मग शहरात आलेल्या एका खेडूत शेतकर्‍याला गावातल्या ‘फसले’पेक्षाही शहरातील ‘नस्ले’ अधिक संकटात असल्याचे जाणवले असेल, तर दोष कुणाचा?

Friday, November 13, 2015

मॅगी पुन्हा बाजारात...

न्यायालयाने मॅगीच्या पुनर्तपासणीचे आदेश दिले होते. काय झाले त्याचे? कधी झाली ही तपासणी? तपासणीचा निकाल लागलाही इतक्या लवकर? फक्त सर्वसामान्य लोकांचीच प्रकरणे निकाली लागत नाहीत इथे इतक्या त्वेरेने. गर्भश्रीमंतांची प्रकरणे बरी तातडीने निकाली लागतात! दुसरा प्रश्‍न असा की, बंदीमुळे बाजारात मालच येत नव्हता, तर तपासणी कशाची झाली? आणि आधीचे रिपोर्टस् खोटेही ठरले लागलीच? आणि आता न्यायालयाने बंदी उठविण्याचीच देर की, पाच मिनिटांत साठ हजार पॉकिटं विकली जातील एवढा माल बाजारात आणलाही या कंपनीने? इतक्या कमी वेळात तयार होऊ शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात हा माल? आणि देशभरातल्या बाजारपेठेत तो उपलब्धही होऊ शकतो अल्पावधीत? याचा अर्थ हे उत्पादन तयार करण्याची प्रक्रिया गेले काही दिवस सुरू राहिली होती. बंदी अंमलात असताना माल तयार कसा झाला? कशाच्या जोरावर? न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार, या विश्‍वासाच्या बळावर? आला कुठून हा विश्‍वास? कुठून आली शासकीय यंत्रणेला खोटं ठरविण्याची ताकद? आणि आम्ही मूर्ख लोक! यापैकी एकही सवाल निर्माण होत नाही आमच्या मनात? जणूकाय गेल्या सहा महिन्यांत मॅगी खाल्ली नाही, तर जीव चालला होता आमचा, अशा थाटात तुटून पडतोय् आम्ही आता मॅगीवर? 
आज चाळीशीत असलेली आणि त्यापूर्वीचीही पिढी मॅगी खाऊनच लहानाची मोठी झाली. त्यांना बाळकडू पाजले गेले ते मॅगीचेच! त्या वेळी आजी नातवाला मांडीवर बसवून घास भरवायची ते मॅगीचे आणि आई कौतुकानं खाऊ घालायची तीही मॅगीच! या पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या तमाम मंडळींना मॅगीशिवाय काही म्हणून काहीच दुसरं ठाऊक नव्हतं. बस्स! मॅगी, मॅगी आणि मॅगीच...!!
काय म्हणता, हे सारं खोटं आहे? यातलं काही म्हणून काहीच खरं नाही? पण, ती टीव्हीवरची बया तर तेच सांगतेय्. तिच्या लेखी तर तुमची-आमची पिढी जगलीच मुळात मॅगी खाऊन! तिच्या लेखी आपल्या जीवनातली आजवरची सारी परिवर्तनं मॅगीनंच घडविली. या जाहिरातीतल्या दाव्यानुसार, मॅगीएवढा लोकप्रिय दुसरा कुठलाच पदार्थ कधी अस्तित्वातच नव्हता आणि ज्या कारणावरून हा खाद्य पदार्थ परवा बाजारातून हटविण्यात आला, ती सारी कारणं तद्दन फालतू आहेत. बंदी लादली जाण्याचा तो सारा घटनाक्रम खोटा आहे. लहान मुलांचा एकमेव आवडता पदार्थ म्हणून ज्यांनी स्वत:ची ख्याती करून घेतली, त्या मॅगीचा आऊटडेटेड माल बाजारात सापडला तो आरोप खोटा, त्यात शिशाचे प्रमाण एका मर्यादेबाहेर आढळले ती वस्तुस्थिती खोटी, या देशाचे अन्न व औषधी प्रशासन खोटे. फक्त नेस्ले नामक कंपनीचे या उत्पादनाचे उत्पादक तेवढे खरे! त्यांचे दावे तर काय, बावन्नकशी सोनेच!! बाकी या देशातल्या नागरिकांच्या आरोग्याचं काय, त्याच्याशी तर कुणालाही खेळ मांडता येतो इथे. मग कोकाकोलात कीटकनाशक सापडलं काय किंवा कॅडबरीच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्या काय, त्यानं कुणाचंच काही बिघडत नाही. व्हीव्हीआयपी नसलेल्या तमाम सर्वसामान्य लोकांचा जीव कुत्र्या-मांजरांसारखा मातीमोल असतो इथे. तो गेला काय किंवा राहिला काय, कुणाचंच काही बिघडत नाही. बहुधा म्हणूनच मग मॅगीसारखी उत्पादने चार-सहा महिन्यांच्या कालावधीतच स्वत:वरचे आरोप खोटे सिद्ध करून, स्वच्छ चारित्र्याची प्रमाणपत्रे स्वत:च स्वत:ला बहाल करवून घेत बाजारपेठेत दाखल होतात. लोकं काय, इतरांनी मूर्ख बनविण्यासाठीच जन्म झालाय् त्यांचा. एखादा अमिताभ आणून उभा केला की, अळ्या विसरून कॅडबरी स्वीकारली जाते अन् अभिनेत्री म्हणून स्मृती इराणी यांनी आवाहन केलं की, कीटकनाशक असलेला कोलाही धडाधड विकला जातो. आता मॅगीवरही उड्या पडताहेत. यंदा तर कुठलाही ब्रॅण्ड ऍम्बॅसेडर वापरण्याचीही गरज पडली नाही मॅगीच्या उत्पादकांना. त्यावरूनही पाठ थोपटून घेताहेत नेस्ले कंपनीचे मालक. बंदी उठल्यानंतर त्यांनी बाजारात आणलेल्या ‘वेलकम कीट’ला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद बराच बोलका आहे. स्नॅपडीलच्या काऊंटर्सवर ठेवल्या ठेवल्या साठ हजार मॅगी किट्‌स विकल्या गेल्याची बातमी आहे. गेले सहा महिने या देशातले लोक बेचैन झाले होते. जणू ते मॅगीची आतुरतेने वाट बघत ताटकळत उभे राहिले होते, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. निदान नेस्लेच्या मालकांनी चित्र तरी तसेच निर्माण केले आहे.
ज्या देशात लक्षावधी केसेस वर्षानुवर्षे सुनावणी अन् निकालासाठी खितपत पडल्या आहेत, अगदी तीन वर्षांपूर्वीच्या दिल्लीतल्या त्या गाजलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींनाही अद्याप शिक्षा सुनावली गेलेली नाही, त्या देशात मॅगीच्या मालकांनी दाखल केलेली केस मात्र तातडीने दखल घेण्याजोगी ठरते. त्यावरचा निकालसुद्धा तेवढ्याच तत्परतेने लागतो. ‘अपेक्षेप्रमाणे’ निकाल नेस्लेच्या बाजूनं लागला. ते ‘निर्दोष’ ठरवले गेले. ज्यानं या उत्पादनांवर बंदीची कारवाई केली, ज्यांच्या आदेशाबरहुकूम मॅगी देशभरातील बाजारपेठेतून मागे घेण्यात आली, ती सरकारी यंत्रणा कुचकामी, खोटी ठरवली गेली. त्यांच्या लायकी आणि विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उभे केले गेले. अर्थात, सरकारी व्यवस्थेच्या अशा दयनीय अवस्थेसाठी इथे कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. नेस्लेच्या मालकांना तर नाहीच नाही. आमच्याही लेखी ती यंत्रणा पायदळी तुडवण्याच्याच लायकीची राहिली आहे.
न्यायालयाने मॅगीच्या पुनर्तपासणीचे आदेश दिले होते. काय झाले त्याचे? कधी झाली ही तपासणी? तपासणीचा निकाल लागलाही इतक्या लवकर? फक्त सर्वसामान्य लोकांचीच प्रकरणे निकाली लागत नाहीत इथे इतक्या त्वेरेने. गर्भश्रीमंतांची प्रकरणे बरी तातडीने निकाली लागतात! दुसरा प्रश्‍न असा की, बंदीमुळे बाजारात मालच येत नव्हता, तर तपासणी कशाची झाली? आणि आधीचे रिपोर्टस् खोटेही ठरले लागलीच? आणि आता न्यायालयाने बंदी उठविण्याचीच देर की, पाच मिनिटांत साठ हजार पॉकिटं विकली जातील एवढा माल बाजारात आणलाही या कंपनीने? इतक्या कमी वेळात तयार होऊ शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात हा माल? आणि देशभरातल्या बाजारपेठेत तो उपलब्धही होऊ शकतो अल्पावधीत? याचा अर्थ हे उत्पादन तयार करण्याची प्रक्रिया गेले काही दिवस सुरू राहिली होती. बंदी अंमलात असताना माल तयार कसा झाला? कशाच्या जोरावर? न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार, या विश्‍वासाच्या बळावर? आला कुठून हा विश्‍वास? कुठून आली शासकीय यंत्रणेला खोटं ठरविण्याची ताकद? आणि आम्ही मूर्ख लोक! यापैकी एकही सवाल निर्माण होत नाही आमच्या मनात? जणूकाय गेल्या सहा महिन्यांत मॅगी खाल्ली नाही, तर जीव चालला होता आमचा, अशा थाटात तुटून पडतोय् आम्ही आता मॅगीवर?
खरंच मॅगी खाऊन लहानाच्या मोठ्या झाल्या या देशातल्या पिढ्या? त्यात प्रमाणाबाहेर धातू वापरला गेल्याच्या आरोपाची कुणालाच चिंता नाही, त्यांना आनंद होतोय्, तो आरोप खोटा ठरविला गेल्याचा आहे. कारण आता त्यांना नाक वर करून बाजारात आपलं उत्पादन आणता येणार आहे. त्यावर तुटून पडणार्‍या वेड्यांची इथे कमतरता नाही, हे तर तेही ओळखून आहेत. लोकांना मूर्ख बनवणे फार सोप्पे आहे, हेही ते जाणून आहेत. म्हणूनच आरोग्याला घातक असलेली शीतपेये इथे बिनदिक्कतपणे विकली अन् पिली जातात. आता मॅगीही तशीच विकली अन् खाल्ली जाईल. त्यासाठी लोकांच्या भावनांना हात घालणार्‍या जाहिराती तयार झाल्या आहेत. त्याचा माराही एव्हाना सुरू झाला आहे. आपली आजी आपल्याला काही विष खाऊ घालत नव्हती, ती तर मॅगी खाऊ घालत उलट आपलं संगोपन करीत होती, अशा आशयाची ती जाहिरात लवकरच आपल्या मनोविश्‍वावर ताबा मिळवेल. आणि बंदीसाठी कारणीभूत ठरलेले शिसे किंवा एक्सपायरी डेट संपल्यानंतरही नेस्लेची उत्पादने विक्रीसाठी बाजारात ठेवून आपल्या आरोग्याचा त्यांनी मांडलेला बाजार क्षणात विस्मरणात जाईल लोकांच्या. सहा महिन्यांपूर्वी गेलेली पत पुन्हा मिळवेल मॅगी. राहिला प्रश्‍न लोकांची पत आणि त्यांच्या विश्‍वासाचा, तर त्याची किंमत आहे कुणाच्या लेखी इथे? ती सर्वांच्याच दृष्टीने कवडीमोल आहे. सरकार, सरकारी यंत्रणा, मॅगीची उत्पादक कंपनी आणि खुद्द लोकांच्याही लेखी...!

Saturday, November 7, 2015

ही तर विरोधकांची हुकूमशाही!

एकीकडे लोकशाहीचा उच्चरवात जयघोष करायचा अन् प्रत्यक्षात मात्र हुकूमशाहीचे कित्ते गिरवायचे, हा या घराण्यातील सदस्यांचा तमाशा गेली कित्येक वर्षे सारा देश केवळ अनुभवतच नाही, तर सहन करतोय्. बिटिशांंची संसदीय प्रणाली ज्यांनी कधीच धुडकावून लावली होती, त्या महात्मा गांधींशी भांडून, तडजोडी करून संसदीय लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आणायला गांधींना भाग पाडणार्‍या कॉंग्रेसने, स्वत:च्या पक्षात तरी ही व्यवस्था कधी स्वीकारली? त्या व्यवस्थेची पत्रास त्यांनी कधी अन् किती बाळगली? अन्यथा सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर लोकशाही मार्गाने लोकांच्या मतांच्या माध्यमातून निवडून आलेल्या पक्षाध्यक्षाला, केवळ पंडित नेहरूंच्या इच्छेखातर राजीनामा का द्यावा लागावा? पंतप्रधानपदावर नरसिंह राव नसते, तर अयोध्येत बाबरी ढाचा कोसळला नसता, या प्रतिक्रियेचा आडमार्गाने निघणारा अर्थ काय? आपल्याच पक्षाच्या सरकारने तयार केलेला अध्यादेशाचा एक मसुदा पत्रकारांसमोर टराटरा फाडून डॉ. मनमोहनसिंगांची ‘लायकी’ सिद्ध करण्याची राहुल गांधींची केविलवाणी धडपड दुसरे- तिसरे काय सांगून जाते? या घराण्याला आपल्यापलीकडे कुणी या देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेले सहन होत नाही, हाच त्याचा अर्थ आहे. ना नेहरूंनी कधी ते होऊ दिले, ना इंदिरा गांधींनी. नंतरच्या काळातला राजीव गांधींचा प्रवासही त्याच दिशेने राहिला.
नेहरू-गांधी घराण्याच्या पलीकडे कुणाच्या हातात सत्ता गेल्याची बाब कधी त्यांच्या पचनीच पडली नाही. मग खुद्द कॉंग्रेस पक्षाच्या नरसिंह रावांवर झालेले आरोप असोत, की डॉ. मनमोहनसिंगांच्या नशिबी आलेली अपमानास्पद गच्छंती! त्याचा प्रत्यय वारंवार अनुभवला गेलाय् आजवर. आता तर त्यांच्यालेखी विचारांनी अगदीच विरोधक असलेले लोक सत्तेवर आहेत. ते कसे खपेल यांना? सध्या निर्माण झालेली असहिष्णुतेची खदखद हा गांधी-नेहरू घराण्याच्या हातून सत्ता गेल्याने निर्माण झालेल्या असंतोषाचा परिणाम आहे. सत्ता आपल्या हातात नसणे आणि त्यातही ती विरोधकांच्या हातात असणे, ही बाब न मानवलेले लोक त्याच मुद्याच्या आडून थयथयाट करत सुटले आहेत. संसदेच्या आगामी अधिवेशनात कामकाज चालू न देण्याची राहुलबाबांची धमकीही त्याच थयथयाटाच्या नाट्याचा एक भाग आहे.
एकीकडे लोकशाहीचा उच्चरवात जयघोष करायचा अन् प्रत्यक्षात मात्र हुकूमशाहीचे कित्ते गिरवायचे, हा या घराण्यातील सदस्यांचा तमाशा गेली कित्येक वर्षे सारा देश केवळ अनुभवतच नाही, तर सहन करतोय्. बिटिशांंची संसदीय प्रणाली ज्यांनी कधीच धुडकावून लावली होती, त्या महात्मा गांधींशी भांडून, तडजोडी करून संसदीय लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आणायला गांधींना भाग पाडणार्‍या कॉंग्रेसने, स्वत:च्या पक्षात तरी ही व्यवस्था कधी स्वीकारली? त्या व्यवस्थेची पत्रास त्यांनी कधी अन् किती बाळगली? अन्यथा सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर लोकशाही मार्गाने लोकांच्या मतांच्या माध्यमातून निवडून आलेल्या पक्षाध्यक्षाला, केवळ पंडित नेहरूंच्या इच्छेखातर राजीनामा का द्यावा लागावा? पंतप्रधानपदावर नरसिंह राव नसते, तर अयोध्येत बाबरी ढाचा कोसळला नसता, या प्रतिक्रियेचा आडमार्गाने निघणारा अर्थ काय? आपल्याच पक्षाच्या सरकारने तयार केलेला अध्यादेशाचा एक मसुदा पत्रकारांसमोर टराटरा फाडून डॉ. मनमोहनसिंगांची ‘लायकी’ सिद्ध करण्याची राहुल गांधींची केविलवाणी धडपड दुसरे- तिसरे काय सांगून जाते? या घराण्याला आपल्यापलीकडे कुणी या देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेले सहन होत नाही, हाच त्याचा अर्थ आहे. ना नेहरूंनी कधी ते होऊ दिले, ना इंदिरा गांधींनी. नंतरच्या काळातला राजीव गांधींचा प्रवासही त्याच दिशेने राहिला. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उफाळलेल्या शीखविरोधी दंगलींचा त्यांनी ज्या शिताफीने सत्ता काबीज करण्यासाठी उपयोग करून घेतला आणि त्यानंतरही, लोकांनी भावनावेगात बहाल केलेल्या अतिरेकी सत्तेचा दुरुपयोग करीत त्यांनी विरोधकांची कशी मुस्कटदाबी केली, तो इतिहासही अजून विस्मरणात गेलेला नाही लोकांच्या. उदाहरणे आणिबाणीच्या काळात माजवल्या गेलेल्या अराजकाची असोत वा मग १९८४ मध्ये विरोधकांवर गुदरलेल्या लाजिरवाण्या परिस्थितीची, त्यातून बाब एकच स्पष्ट होते, ती कॉंग्रेसच्या सत्तेसाठीच्या हव्यासाची! तेव्हा त्यांनी सत्तेत राहून हुकूमशाही चालवली होती. आता ते विरोधात बसून हुकूमशाही चालविण्याचा प्रयत्न करताहेत. तेव्हा त्यांनी विरोधकांना गुंडाळून ठेवण्याची षडयंत्रे रचली, आता ते सत्ताधार्‍यांना नामोहरम करायला निघालेत.
भाजपाच्या सध्याच्या सरकारच्या काळात सार्‍या जगाला भारताच्या नेतृत्वाचा, त्याच्या आगळ्या कार्यशैलीचा, त्याच्या व्यापक दृष्टीचा परिचय होत असताना, भेटी आणि बोलणीचा परिणाम म्हणून जगभरातील उद्योजक भारतात येण्याबाबत जरा कुठे सकारात्मक होत असल्याचे चित्र असताना कॉंग्रेसच्या नेत्यांना, विशेषत: राहुल गांधींना मात्र या देशात काहीच बरे चालले नसल्याचा जावईशोध लागला आहे. त्याबाबत ते अद्वातद्वा बोलत सुटले आहेत. संसदेच्या आगामी अधिवेशनात कामकाज होऊ न देण्याचा चंग त्यांनी आतापासूनच बांधला आहे. सत्तेत एकतर आम्ही, नाही तर कुणीच नाही, हे त्यांचे हुकूमशाहीदर्शक धोरण राबवायला ते सरसावले आहेत. लढाईच्या नावावर चाललेली त्यांची नौटंकी त्याचाच प्रत्यय देते.
सरकारविरुद्धच्या या कांगाव्यात एकटे कॉंग्रेसचे टोळकेच सामील नाही. कम्युनिस्टांची त्याला साथ आहे. ‘तिसर्‍या’ श्रेणीत मोडणारी काही मंडळीही दिमतीला आहेच. सर्वांनी मिळून घाट घातला आहे. असहिष्णुततेच्या नावावर केंद्रातल्या सरकारविरुद्ध सध्या सार्‍या देशात सुरू असलेला थयथयाट हा त्याचाच परिपाक आहे. महाराष्ट्रातही त्याच नाटकाचा कमी-अधिक फरकाने प्रयोग सुरू आहे. यांच्या दृष्टीने आज देशात कुठेच, काहीच चांगले सुरू नाही. सर्वदूर वाईट-वाईटचाच बोलबाला आहे. जणूकाय कालपर्यंत हे दीडशहाणे गांधींच्या कल्पनेतले ‘रामराज्यच’ चालवत होते अन् आता जणूकाय लोक अराजक अनुभवत आहेत, असल्या थाटातली सारी बेताल वर्तने चालली आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंबाजात झालेल्या सभेत हिंदुत्ववाद्यांना चिरडून टाकण्याची नेहरूंची ‘ती’ भाषा नसली, तरी यांचे उपद्‌व्याप अजून त्याच दिशेने चाललेले दिसताहेत. आपल्या विरोधात सत्तेत आलेल्यांना कामच करू न देण्याचा अगदी पहिल्या दिवसापासून यांनी बांधलेला चंग तेच संकेत देतो.
केंद्रातले सध्याचे सरकार लोकशाही मार्गाने, लोकसभेत तीनशेपेक्षा अधिक जागा मिळवून, यांची दशकाची सत्ता उलथवून, यांच्या नाकावर टिच्चून सत्तेत आले आहे. या घडामोडीत यांना लोकसभेतले विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याच्या लायकीचेही ठेवले नाही लोकांनी. कधीकाळी चारशेपेक्षा अधिक जागा मिळवून मुजोर झालेल्या कॉंग्रेस नावाच्या ‘राष्ट्रीय’ पक्षाला ४४ वर आणून ठेवत पाऽऽर जेरीस आणले लोकांनी. तरीही आता वस्तुस्थिती स्वीकारून सत्तेतून बाजूला होण्याची आणि निवडून आलेल्यांना सुखाने कारभार करू देण्याची तयारी नाही यांची. अर्थात, ज्यांनी आपल्याच पक्षाच्या डॉ. मनमोहनसिंगांना सुखासुखी कारभार चालवू दिला नाही, ते भाजपाच्या नरेंद्र मोदींना अडथळ्याविना शर्यत पार करू देतील, याची अपेक्षा तरी कशी बाळगायची म्हणा! स्वातंत्र्योत्तरकाळात बहुतांश काळ या देशावर सत्ता गाजविल्यानंतरही लोकांनी यंदा खालच्या पायरीवर आणून ठेवलेला कॉंग्रेस नावाचा, शतकाची परंपरा जोपासणारा पक्ष, त्याच्या साथीला उभे राहत सध्याच्या सत्ताधार्‍यांविरुद्ध कंठशोष करणारे डावे, उजवे, तिसरे, चौथे... या सर्वांनी मिळून असहिष्णुतेचे मोहोळ उठवीत पुकारलेला बंड, हा त्याच षडयंत्राचा भाग मानला पाहिजे. ज्यांना वैचारिकदृष्ट्या संघ, जनसंघ, भाजपा कधी पटला नाही, त्या कथित पुरोगाम्यांनाही या निमित्ताने अचानक एक मंच उपलब्ध झाला आणि तेही या कथित लढ्यात, नव्हे, कटात सामील झाले. लेखक-कलावंत लोक कधीकाळी सन्मानार्थ मिळालेले पुरस्कार शासनाला परत करू लागले. ज्या लोकशाहीचा आपण कालपर्यंत जयघोष करीत आलो, त्याच लोकशाहीच्या मार्गाने सत्तेत आलेले एक सरकार कुठलेही सबळ कारण नसताना उलथवून लावण्याच्या कुणाच्या तरी षडयंत्रात हातभार लावून त्याच लोकशाहीचा आपण यातून धडधडीत अपमान करतोय्, हे विसरून गेली ही मंडळी. कालपर्यंतच्या कित्येक गंभीर प्रसंगात आपण मौन बाळगले, साधा निषेधही नोंदवता आला नाही आपल्याला, हे विसरून, त्या तुलनेत अगदीच किरकोळ बाबींचा बाऊ करून सरकार अपयशी ठरवायला निघाले हे लोक. ज्यांनी काल आणिबाणी लादली ते आता पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटायला निघाले आहेत; तर दुसरीकडे कालपर्यंत ज्यांना कंठ फुटला नाही, ते कथित पुरोगामी आता पोपटासारखे बोलू लागले आहेत...