Tuesday, October 14, 2014

जळफळाट अन् धास्ती

या संपूर्ण प्रकाराचा अर्थ एकच. हुतूतूच्या खेळाप्रमाणे सारे मिळून एका तगड्या गड्याला घेरताहेत. त्याच्यावर तुटून पडताहेत. प्राण कंठाशी आणून त्याला बाद करण्याचा प्रयत्न करताहेत. पण तो मर्द गडी इरेला पेटलाय्. तो कुणालाच दाद देत नाहीय्. सर्वांना हुलकावणी देऊन, हात लावून कबड्डी, कबड्डी म्हणत मधल्या रेषेवर हात ठेवून तो आपल्या टीममध्ये परतणार याबाबत सारेच आश्‍वस्त आहेत. बॉऊंड्रीवर हात ठेवून तो परतला की पलीकडच्या चमूची दाणादाण उडणार आहे. चेहरे हिरमुसले होणार आहेत सर्वांचे. पण करणार काय? त्यांच्या आजवरच्या पापाची फळं म्हणजे यंदाच्या निवडणुकीतला त्यांचा पराभव असणार आहे. पराभव निश्‍चित असला, तो डोळ्यांदेखत दिसत असला तरी राजकारणात हातपाय गाळायचे नसतात. हार अशी सहज पत्करायची नसते. कित्येकदा पराभवाचे वास्तव पोटात दडवून विजयाचे भाव चेहर्‍यावर उमटवायचे असतात. विजयाच्या वाटेवर असलेल्या खेळाडूंचे मनोधैर्य जमेल तेवढे खच्ची करण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यासाठी उसने अवसान आणायचे असते... पवारांपासून चव्हाणांपर्यंत अन् उद्धवपासून राजपर्यंत सारे तेच करताहेत सध्या...
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अजून एक दिवस आणि त्याच्या निकालाला अद्याप चार दिवस शिल्लक असले, तरी या राज्यातल्या काही राजकीय पक्षांचा ‘निकाल’ आधीच लागला असल्याचे आणि काहींचे भवितव्यही आताच ‘निकाली’ निघाले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पराभवाच्या गर्तेत गटांगळ्या खात असलेले काही नेते अक्षरश: बावचळल्यागत वागू लागले आहेत. बेताल बोलू लागले आहेत. भाजपाला, विशेषत: पंतप्रधानांना लक्ष्य करून मनातली गरळ ओकू लागले आहेत. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतोय्, निवडणूक निकालांचे अंदाज वर्तविणारे अहवाल जसजसे प्रसिद्ध होताहेत, तसतशी या संतापाची तीव्रता दिवसागणिक वाढतेय्. कुणाला नरेंद्र मोदींमधल्या अवगुणांचा परिचय अलीकडेच होऊ लागला आहे, तर कुणाला दिल्लीत अगदी काल-परवा सत्तेत आलेल्या सरकारचा नाकर्तेपणा अचानक तीव्रतेनं जाणवू लागला आहे. ते सरकार अपयशी ठरले असल्याचा कांगावा ते हिरिरीने करताहेत. ज्यांना आघाडीतल्या घटकपक्षांची मोट बांधून ठेवता आली नाही, पंधरा वर्षे टिकलेली आघाडी तुटण्यापासून वाचविण्याचे कसब ज्यांना पणाला लावता आले नाही, महाराष्ट्रातली सत्ता चार वर्षे नीट सांभाळता आली नाही, ते पृथ्वीराज चव्हाणही आता एकहाती सत्ता मिळाली, तर या राज्यात विकासाची किमया करून दाखवतो म्हणताहेत. मोदी आणि त्यांची टीम हा महाराष्ट्र संपवायला निघाले असल्याचा त्यांचा आरोप नव्हे, दावा आहे.
कॉंग्रेसच्या युवराजांच्या बोबड्या बोलाचे कौतुक काय वर्णावे? त्यांनाही लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वीकारलेल्या मौनव्रतानंतर परवा अचानक कंठ फुटला. फार संतापलेत ते भाजपाच्या कामावर. या शंभर दिवसात कुठं नेऊन ठेवलात देश माझा, असं विचारताहेत! प्रचंड आवेशाने हा सवाल विचारताना रागाने सारे शरीर थरथरत होते त्यांचे. म्हणाले, केंद्रातले सरकार गांधींच्या विचारांविरुद्ध वागताहे. हे बरे नव्हे! हे लोक केवळ गांधींच्या समाधीपुढे नतमस्तक होतात. बाकी काम सारे गांधींच्या विचारांना तिलांजली वाहणारे करतात. आता, कॉंग्रेसने दिल्लीत दहा वर्षे सत्ता गाजवताना घोटाळ्यांचा जो इतिहास रचला, तो गांधी विचारांच्या कोणत्या अध्यायात बसतो, हे सांगता येईल युवराज राहुलबाबूंना? आपल्या बापजाद्यांची मालमत्ता समजून देशाची संपत्ती असलेल्या कोळसा खाणींची जी खिरापत कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वर्तुळातील मर्जीतल्या लोकांना मातीमोल भावात वाटली, ती देश लुटण्याची कृती गांधी विचारांशी कशी मेळ खाते याचे विवेचन करता येईल राहुलबाबूंना? मोदी सरकारच्या काळातील जीवनरक्षक औषधींच्या दरवाढीने झालेल्या वेदनाही त्यांनी उद्धृत केल्या आहेत. परवा परवापर्यंत दर महिन्या-दोन महिन्यात गॅस सिलेंडरचे दर वाढायचे तेव्हा कधी कॉंग्रेसच्या युवराजांनी नक्राश्रू ढाळल्याचे स्मरत नाही. पण मोदींच्या काळातील घटनाक्रमाने जीव कसा कासावीस झालाय् त्यांचा. अचानक गांधींचे, त्यांच्या विचारांचे स्मरण झाले आहे त्यांना.
एकूण काय, पायाखालची वाळू सरकू लागल्याने सर्वांचाच तीळपापड होत आहे सध्या. युती, आघाडी तोडताना नको तेवढी मुजोरी करून झाली. उभे करायला उमेदवार सापडत नाहीत, अशी दैनावस्था असताना पक्षासाठी अधिकाधिक जागा मिळवण्याच्या शर्यतीत नको तेवढे धावून झाले. आता निवडणुकीचे संभाव्य निकाल समोर दिसताहेत. त्यातून सत्तेचे गणित चुकण्याची दाट शक्यता डोळ्यांसमोर उभी राहिली आहे. त्यामुळे जीव कासावीस होतोय् सत्ताधार्‍यांचा. त्यामुळेच की काय, पण या सार्‍यांना आता अचानक महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे स्मरण होऊ लागले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या तत्त्वांची, विचारांची पोटलीही आता निवडणुकीच्या मुहूर्तावर उघडली गेली आहे. इथले घोटाळे उघडकीला आणल्याने आणि हे राज्य इतके दिवस माघारलेले राहिल्याचे पितळ उघडे पाडल्याने अकारण महाराष्ट्राची देशभरात बदनामी होत असल्याचे रडगाणे परवा पवारांनी गायले. त्यांच्या पुतण्याच्या मंत्रालयात एका दशकात सत्तर हजार कोटींचा चुराडा होऊन राज्याच्या सिंचनात एक टक्क्याचीही वाढ होऊ न शकल्याची बाब समोर आली ती काय सार्‍या देशासाठी भूषणावह होती? त्यातून नाही झाली महाराष्ट्राची बदनामी? यांनी घोटाळे केले तर देशाची शान राखली जाते अन् दुसर्‍यांनी ते उघडकीला आणले तर बदनामी होते राज्याची? अजब तर्कट आहे पवारांचे. लोकांना सिंचनाची सुविधा द्यायचे सोडून तलावात मुतण्याची निलाजरी भाषा वापरणारे दादा, लोकांना निवडणुकीनंतर बलात्कार करण्याचा सल्ला देणारे आबा काय या महाराष्ट्राची शान वाढवताहेत पवार साहेब? असल्या नेत्यांचे पितळ उघडे पाडले, तर बदनामी होते या राज्याची? अन् त्यांच्या बेताल बडबडीने कोणती बुज राखली गेली या महाराष्ट्राची?
या राज्याला खड्‌ड्यात घालणार्‍यांचा पर्दाफाश केला, तर चेहरे उघडे पडले सर्वांचे. रंग उडाला त्यांच्या चेहर्‍यांवरचा. लोक नाना प्रश्‍न विचारू लागलेत. जाब मागू लागलेत. लोकांना उत्तर देण्याची नामुष्की ओढवली, तर मोदी अन् भाजपावर बरसताहेत सारे. दिल्लीत सोडून मोदी या राज्यात प्रचाराला आले तरी पोटं दुखू लागली आहेत कित्येकांची. तिकडे पाकिस्तानच्या सीमेवर गोळीबार सुरू आहे आणि मोदी मात्र महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, असे अनमोल विधान राज ठाकरेंनी केले आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत गुजरातेत झुल्यावर झुलले, त्यावरही बालिश आक्षेप नोंदवलाय् राहुल गांधींनी. बाळासाहेबांच्या पश्‍चात् शिवसेनेचे अस्तित्व शक्य तितक्या लवकर संपविण्याचा ध्यास घेतलेले आणि त्या दिशेने कार्यही सुरू केलेले उद्धव ठाकरे यांना तर काय, मोदींमध्ये अफझलखान दिसला. त्याच ‘अफझलखानाच्या’ नेतृत्वात शिवसेनेचे अठरा सदस्य दिल्लीत किल्ला लढवताहेत याचे तरी भान राहायला हवे होते ना उद्धवजींना!
राहिला प्रश्‍न सत्ताधार्‍यांचा, तर त्यांच्याबद्दल काय बोलावे? जे त्यांना स्वत:ला दिल्लीत दहा वर्षांत अन् महाराष्ट्रात पंधरा वर्षे सत्तेत राहून करता आले नाही, तो चमत्कार मोदींकडून तीन महिन्यात घडलेला हवाय् या नतद्रष्टांना.
एकूण, महाराष्ट्रातल्या बदलत्या वार्‍याने सैरभैर झालेले दिसताहेत सारे. वार्‍याची ही दिशा ओळखत स्वत:ला सावरण्यापेक्षाही विजयाची घोडदौड करणार्‍यांचे पाय ओढण्यात गुंग झालेले दिसताहेत सारे. एखाद्या खेळात, विशेषत: राजकारणाच्या सारिपाटात, नियमाने सोंगट्या मांडायचे सोडून कुणी रडीचा डाव खेळत असेल, तर त्याचा अर्थ काय, हे सारेच जाणतात. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपाविरोधकही असाच रडीचा डाव खेळताना दिसताहेत. त्याचा अर्थ न कळण्याइतके इथे कुणी भाबडे नाही, बावळट नाही की मूर्खही नाही.
या संपूर्ण प्रकाराचा अर्थ एकच. हुतूतूच्या खेळाप्रमाणे सारे मिळून एका तगड्या गड्याला घेरताहेत. त्याच्यावर तुटून पडताहेत. प्राण कंठाशी आणून त्याला बाद करण्याचा प्रयत्न करताहेत. पण तो मर्द गडी इरेला पेटलाय्. तो कुणालाच दाद देत नाहीय्. सर्वांना हुलकावणी देऊन, हात लावून कबड्डी, कबड्डी म्हणत मधल्या रेषेवर हात ठेवून तो आपल्या टीममध्ये परतणार याबाबत सारेच आश्‍वस्त आहेत. बॉऊंड्रीवर हात ठेवून तो परतला की पलीकडच्या चमूची दाणादाण उडणार आहे. चेहरे हिरमुसले होणार आहेत सर्वांचे. पण करणार काय? त्यांच्या आजवरच्या पापाची फळं म्हणजे यंदाच्या निवडणुकीतला त्यांचा पराभव असणार आहे. पराभव निश्‍चित असला, तो डोळ्यांदेखत दिसत असला तरी राजकारणात हातपाय गाळायचे नसतात. हार अशी सहज पत्करायची नसते. कित्येकदा पराभवाचे वास्तव पोटात दडवून विजयाचे भाव चेहर्‍यावर उमटवायचे असतात. विजयाच्या वाटेवर असलेल्या खेळाडूंचे मनोधैर्य जमेल तेवढे खच्ची करण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यासाठी उसने अवसान आणायचे असते... पवारांपासून चव्हाणांपर्यंत अन् उद्धवपासून राजपर्यंत सारे तेच करताहेत सध्या...

No comments:

Post a Comment