कुणीही कायदा हातात घेऊ नये असे ज्यांना कालपर्यंत वाटत होते, तेच तेजपाल आता कायद्यातल्या पळवाटा शोधत आहेत. आपण कॅमेराबद्ध केला म्हणजे समोरचा माणूस गुन्हेगार ‘सिद्ध झाल्याचा’ निर्णय स्वत:च्या पातळीवर एकतर्फी जाहीर करून सार्या जगापुढे त्याला आरोपीच्या पिंजर्यात उभे करणार्यांना आता का हवीय् कायदेशीर कारवाईतली सवलत? आपण तेवढे शहाणे म्हणवत उर्वरित विश्वाला थिटे समजणार्यांना आता का पळ काढावा लागत आहे? कालपर्यंत हे उंटावर बसून शेळ्या हाकत होते आणि स्वत:वर शेकली तर तो त्यांना अन्याय वाटू लागला आहे? आता कोण उडवतोय् कायद्याची खिल्ली? यांनी रचले तर ते डावपेच अन् दुसर्यांनी रचले की षडयंत्र? यांची वागणूक म्हणजे पत्रकारितेची कार्यपद्धती आणि दुसर्यांची वर्तणूक म्हणजे काळावरचा आघात? इतके दिवस कोणाच्या जिवावर चालला तहलका? कोणी खर्च केला त्यासाठीचा पैसा? आता का कपिल सिब्बल तेजपालशी संबंध नाकारत आहेत? तहलकात साठ टक्क्यांची गुंतवणूक तृणमूलच्या खासदाराने का केली? असे कित्येक सवाल लोकांच्या मनात आहेत.
मोठ्या लोकांची तर्हाच काही और असते बघा.
त्यांचं गाडं कधीच कुठे अडत नाही. ना प्रशासनात त्यांचे कुठले काम अडत, ना
कुठला कायदा कधी त्यांच्या आड येत. सारी यंत्रणा कशी अदबशीरपणे सलाम
ठोकायला सिद्ध असते. अशांवर पोलिस कारवाई होण्याचा तर प्रश्नच उद्भवत
नाही. एखादवेळी चुकून, नाईलाजाने अटक झालीच तरी लागलीच छातीत कळा येतात
त्यांच्या आणि सरकारी दवाखान्यातल्या आयसीयूतला पलंगही रिकामाच असतो
त्यांच्यासाठी. आता आपल्या तेजपाल साहेबांचंच बघा ना. एका केंद्रीय
मंत्र्यांशी जवळीक असल्याची, एका तृणमूल खासदाराची ‘तहलका’मधील साठ
टक्क्यांच्या गुंतवणुकीची नुसती बातमीच बाहेर आली, तर सारी यंत्रणा कशी मान
तुकवून सेवेत हजर झालीय् त्यांच्या. सार्या जगाला त्यांच्या गुन्ह्याची
खबर लागली असताना पोलिसांना हुलकावणी देत तेजपाल तोंड लपवत फरार होतात,
त्यांच्या वतीने वकील कोर्टात येऊन जामिनाचा अर्ज सादर करतो, पण पोलिसांना
मात्र, ते गवसत नाहीत. बलात्कार प्रकरणात गोवा सरकार आणि पोलिसांनी
कारवाईचा निर्णय जाहीर केला खरा. पण, पीडित मुलीचा तक्रारअर्जच नसल्याने
कारवाईस विलंब झाला. पण, तक्रार आली गुन्हा दाखल होताच, तेजपाल यांनी पळून
जाणेच श्रेयस्कर मानले. ते निर्दोष आहेत, असे जर त्यांना वाटत असेल तर मग
पोलिस चौकशीला ते कशासाठी घाबरत आहेत?
एक काळ होता की ‘तहलका’ म्हटलं की घाम
फुटायचा लोकांना. कोणाकोणाच्या खाजगी आयुष्यात नाही डोकावले तरुणबाबू? याची
लफडी, त्याची थेरं, एकाचा भ्रष्टाचार, दुसर्याचे काळे धंदे यांनी उघडे
पाडायचे. स्टिंग ऑपरेशन की काय म्हणतात ते करायचे. लोकांना गाठायचे.
लपूनछपून त्यांची बोलणी कॅमेराबद्ध करायची. मग त्यातून उघड होणार्या
‘आतल्या’ गोष्टी ‘बातमी’ म्हणून जगजाहीर करायच्या. आणि जगातली सर्वात
महत्त्वाची माहिती उजेडात आणल्याच्या थाटात स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची.
अशा पद्धतीने तेजपाल यांचा कारभार तब्बल काही वर्षे चालत राहिला. यांच्या
कारनाम्यांनी लोक दबकत गेले अन् यांची माजोरी वाढत गेली. इतकी की, सहकारी
पत्रकारावर बलात्कार केल्यावरही त्यांना त्याची खंत वाटेनाशी झाली. दोन जीव
एकत्र आल्यावर जे व्हायचे तेच आमच्यात घडल्याचे निर्लज्जपणे सांगण्यातही
त्यांना कमीपणा वाटला नाही.
आता तर त्यांना एखाद्याबाबत वावड्या उठवणे
योग्य नसल्याचे शहाणपण सुचले आहे. कालपर्यंत ज्यांनी लोकांना कैचीत पकडून
त्यांच्या इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगली, त्यांना आता स्वत:च्या
इभ्रतीबाबत मात्र तसे झालेले मुळीच नको आहे. कालपर्यंत यांनी लोकांविरुद्ध
षडयंत्रं रचली ते चाललं, पण आता त्यांच्याविरुद्ध चाललेल्या कारवाया म्हणजे
कारस्थान असल्याचा आरोप करत त्यांचा संताप अनावर होत चालला आहे.
आपल्याविरुद्धची कारवाई म्हणजे सुनियोजित कट असल्याचा आरोप करणार्या
तेजपालांनी लोकांची अंडीपिल्ली काय नियोजित कटाविनाच बाहेर काढली? फरक
एवढाच आहे, की कालपर्यंत ते जे करत होते, त्यात त्यांना भूषण वाटत होते.
आता बाजू त्यांच्यावर उलटल्यावर त्यांना त्यात काळेबेरे दिसू लागले आहे.
त्यामागील कटाचा वास येऊ लागला आहे.
आपल्या कार्यालयातल्या एका सहकार्यावर
बलात्कार केल्याचा आरोप स्वत: मान्य करून, त्याबाबात माफी मागून प्रकरण
‘निपटविण्याचा’ प्रयत्न त्यांनी करून पाहिला. पण त्यानेही काही जमत नाही
म्हटल्यावर ते त्या मुलीवरच उलटले. तिच्यावरच प्रत्यारोप करत सुटले. कुणीही
कायदा हातात घेऊ नये असे ज्यांना कालपर्यंत वाटत होते, तेच तेजपाल आता
कायद्यातल्या पळवाटा शोधत आहेत. आपण कॅमेराबद्ध केला म्हणजे समोरचा माणूस
गुन्हेगार ‘सिद्ध झाल्याचा’ निर्णय स्वत:च्या पातळीवर एकतर्फी जाहीर करून
सार्या जगापुढे त्याला आरोपीच्या पिंजर्यात उभे करणार्यांना आता का
हवीय् कायदेशीर कारवाईतली सवलत? आपण तेवढे शहाणे म्हणवत उर्वरित विश्वाला
थिटे समजणार्यांना आता का पळ काढावा लागत आहे? कालपर्यंत हे उंटावर बसून
शेळ्या हाकत होते आणि स्वत:वर शेकली तर तो त्यांना अन्याय वाटू लागला आहे?
आता कोण उडवतोय् कायद्याची खिल्ली? यांनी रचले तर ते डावपेच अन्
दुसर्यांनी रचले की षडयंत्र? यांची वागणूक म्हणजे पत्रकारितेची
कार्यपद्धती आणि दुसर्यांची वर्तणूक म्हणजे काळावरचा आघात? इतके दिवस
कोणाच्या जिवावर चालला तहलका? कोणी खर्च केला त्यासाठीचा पैसा? आता का कपिल
सिब्बल तेजपालशी संबंध नाकारत आहेत? तहलकात साठ टक्क्यांची गुंतवणूक
तृणमूलच्या खासदाराने का केली? असे कित्येक सवाल लोकांच्या मनात आहेत. लोकं
मोठी असली, मंत्र्या-संत्र्यांशी त्यांचे लागेबांधे असले, मोठ्या
वर्तुळातल्या चारचौघात त्यांची ऊठबस असली की मग कोणीच त्यांच्या वाट्याला
जाण्याची हिंमत करत नाही. अगदी कायदा सुद्धा...! असा समज एव्हाना
सर्वसामान्य लोकांच्या मनात घर करून बसला आहे. तेजपाल अगदी सहजपणे फरार होऊ
शकल्याने हा समज खरा ठरण्याची शक्यता आहे. केवळ त्यांंनी कॅमेराबद्ध केले
म्हणून बंगारू लक्ष्मणांचे एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद गेलेे.
त्यांना हवे होते, तर मग आता एका महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून कारवाई
झालेली तेजपालांना का नको आहे? ते सोडून इतर सारे कायद्यापुढे समान
असल्याचा गैरसमज तर झालेला नाही त्यांना? हा समज त्यांच्या आणि लोकांच्याही
मनातून काढून टाकणारी कारवाई आता पोलिस आणि न्याय व्यवस्थेकडून अपेक्षित
आहे...