Friday, May 27, 2016

पिंपळाच्या रोपासारखं, पाषाणावर टिकलं पाहिजे...!

कधीकाळी प्राधान्यक्रमावर असलेली शेती आता प्रत्येकाच्याच लेखी दुय्यम ठरते आहे. आपल्या पोरानं शेती करावी, असं खुद्द शेतकर्‍यालाही वाटेनासे झाले आहे. त्यामुळे गावातली पोरं ‘साहेब’ बनण्यासाठी शहरात दाखल होताहेत अन् गावाकडच्या शेतजमिनीचे ‘प्लॉट्‌स’ तयार होऊन विकायला काढले जाताहेत. कालपर्यंत स्वत: पिकवून बाजारात विकणारी माणसंच आता पोटापुरतं पिकवून उर्वरित गरज बाजारातून भागविण्याच्या बाता करू लागली. जगाचा पोशिंदा हताश, हतबल झाल्याचा तो परिणाम असला, तरी भविष्याच्या दृष्टीने हे चित्र काही तितकंसं चांगलं नाही. त्याच्या मनाला नवी उभारी दिली पाहिजे. तुझ्या भरवशावर सारा देश जगणार असल्याची बाब ध्यानात आणून दिली पाहिजे अन् त्याला त्याच्या जबाबदारीचे स्मरणही करून दिले पाहिजे. तोच खचला, तोच मनातून असा कोसळला तर सारेच संपेल, हेही त्याला सांगितलं पाहिजे. सार्‍या जगाच्या आशा पल्लवीत करण्याची ताकद त्याच्यात आहे, याची जाणीव त्याला करून दिली पाहिजे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे ऍड. अनंत खेळकरांच्या दीर्घ रचनेतील या ओळी आहेत,  

मधमाशीची दृष्टी ठेव
 फुलांची काही कमी नाही
 मधाच्या पोळासाठी मित्रा
 कोणतीच रोजगार हमी नाही


घरटे उडते वादळात
बिळा, वारुळात पाणी शिरते
कोणती मुंगी, कोणतं पाखरू
म्हणून आत्महत्या करते?

अकोल्याचे ऍड. अनंत खेळकर यांच्या, हृदयाला भिडणार्‍या या रचनेतून बळीराजाच्या मनाला उभारणी देण्याचा प्रयत्न झालाय्. त्याला त्याच्या ताकदीचे स्मरण करून देण्याचा, डोक्यावरच्या कर्जाच्या ओझ्यापायी स्वत:ची जीवनयात्रा संपविण्यापासून परावृत्त करण्याचा, त्याला नवी उमेद देण्याचा, मरण्यासाठीच्या कारणांची त्याच्या लेखी कितीही लांबलचक यादी असेल, पण सर्वांगसुंदर जीवन जगण्याचीही कारणे तेवढीच प्रबळ आहेत. चराचरातील जीवजंतूही संकटांची तमा न बाळगता जगण्यासाठी धडपड करीत असतातच. मग सर्व प्राणिजगतात स्वत:ला श्रेष्ठ मानणार्‍या मानवाने का त्या संकटांची भीती बाळगून मरण पत्करावे?
पॅकेज आले, गळ्याभोवती फास आवळून घेणार्‍यांच्या कुटुंबीयांना लाखालाखांची मदत झाली, सरकारने पुढाकार घेतला, समाजातली काही हळहळणारी माणसंही सरसावली, अगदी सत्तांतरदेखील झाले... पण, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबाबतचे चित्र फारसे बदलल्याची परिस्थिती मात्र नाही. याचाच अर्थ, या आत्महत्यांच्या मुळाशी इतरही अनेक कारणे दडली आहेत. ज्यातून बाहेर पडण्याची कुणाचीच तयारी नाही अशा पिकांच्या परंपरागत पद्धतींपासून, तर समाजातील रूढी-परंपरांपर्यंतच्या बाबीही शेतकर्‍यांचे मानसिक खच्चीकरण करण्यास कारणीभूत ठरताहेत. घरात खाण्याची ददात असताना, हातात फुटकी कवडी नसताना, उसनवारी करून तेरवीला गावभोजन देण्याचा अट्‌टहास एरवी कोण कशाला करतो? मध्यमवर्गीयांच्या महागाईबाबतच्या कल्पनाही शेतकर्‍यांसाठी मारकच ठरताहेत इथे. बाजारातल्या पाण्याच्या बॉटलची किंवा शीतपेयांची किंमत इथे कधीच कुणालाच जास्त वाटत नाही; पण कांदा, गहू, डाळीचे भाव जरासे वाढले की, मात्र महागाई वाढल्याची लागलीच ओरड होते. पिझ्झा खूप महाग असतो, अशी तक्रार झाल्याचे कुणी कधी ऐकले आहे? पण, कापसाच्या दरातील जराशी वाढ हा सरकारपुढे उभा ठाकलेला नेहमीचाच मोठा पेच ठरतो. कारण मुळातच उद्योजकांना ती वाढ नको असते. मोठ्या संख्येतील मध्यमवर्गीय समाज कुठल्याही सरकारसाठी मतांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक. त्यामुळे त्याची जराशी घालमेल झाली की, लागलीच राजकीय पातळीवर त्याची दखल घेतली जाते. याउलट, विविध राजकीय पक्षांच्या पाठीशी पैशाचे बळ उभे करणार्‍या व्यापारी-उद्योजकांना तर कच्चा माल कायम जमेल तेवढ्या कमी किमतीत हवा असतो. त्यांच्यादृष्टीने कापूस, ऊस, धान्य कवडीमोल दरातच त्यांच्या पदरी पडले पाहिजे. बाजारात महागड्या दरात विकण्यासाठीचे कापड तयार करण्याकरिता लागणारा कापूस मात्र त्यांना मातीमोल भावातला हवा असतो. साखरेचे दर आकाशाला भिडावेत म्हणून प्रयत्नात असलेल्या कारखानदारांना, शेतकर्‍यांच्या हातात उसाचे पैसे सोपवताना मात्र कायम जिवावर येते.
वर्षानुवर्षे हे असेच चालले आहे. बळीराजाच्या पाठीवर थाप ठेवायला हात कुठले उठतच नाहीत. खरं तर आत्महत्येनंतरच्या सांत्वनापेक्षाही ही थाप अधिक महत्त्वाची. मेल्यानंतरच्या आर्थिक मदतीपेक्षाही मरणाच्या दारात जाण्यापासून रोखण्यासाठीचा धीर महत्त्वाचा. पण, नेमके तेच घडत नाही. ‘कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी’ म्हणणारा सार्‍या जगाचा पोशिंदा कुणाकरवी नागवला गेला म्हणून आड्यावरचा दोर गळ्याभोवती आवळतो. आत्महत्या थांबाव्यात म्हणून पॅकेजच्या पैशाचा पाऊस पाडला गेला, दारापुढे जनावरे उभी झाली, सिंचनाच्या सोयी उभाराव्यात म्हणून प्रयत्न झालेत, इकडून-तिकडून पैशाच्या मदतीचे ओघही वाहिलेत, पण मनाने पाऽऽर खचलेल्या शेतकर्‍याला मानसिक बळ देण्याचे, त्याची हिंमत बांधण्याचे प्रयत्न जरासे तोकडेच पडले. अशात,
काळ्या आईचा लेक कधी
संकटांपुढे झुकला का?
कितीही तापला सूर्य तरी
समुद्र कधी सुकला का? 

अशी विचारणा करून, मृत्यू हाच शेवटचा पर्याय नसल्याचे त्याला कुणीतरी सांगायला हवे ना! सहनुभूती मिळत असली, तरी रडणारी माणसं शेवटी दुबळीच ठरतात. सामर्थ्यवान बनायचं तर लढायलाच शिकलं पाहिजे. म्हणूनच,
घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जीव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकावून सांग

असे मनाला धीर देणारे चार शब्द महत्त्वाचे. जगायला बळ देणारे. संकटांशी दोन हात करण्याची हिंमत देणारे. शोकसभेत उधळल्या जाणार्‍या खोट्याखोट्या स्तुतिसुमनांपेक्षाही लाखमोलाचे!
कधीकाळी प्राधान्यक्रमावर असलेली शेती आता प्रत्येकाच्याच लेखी दुय्यम ठरते आहे. आपल्या पोरानं शेती करावी, असं खुद्द शेतकर्‍यालाही वाटेनासे झाले आहे. त्यामुळे गावातली पोरं ‘साहेब’ बनण्यासाठी शहरात दाखल होताहेत अन् गावाकडच्या शेतजमिनीचे ‘प्लॉट्‌स’ तयार होऊन विकायला काढले जाताहेत. कालपर्यंत स्वत: पिकवून बाजारात विकणारी माणसंच आता पोटापुरतं पिकवून उर्वरित गरज बाजारातून भागविण्याच्या बाता करू लागली. जगाचा पोशिंदा हताश, हतबल झाल्याचा तो परिणाम असला, तरी भविष्याच्या दृष्टीने हे चित्र काही तितकंसं चांगलं नाही. त्याच्या मनाला नवी उभारी दिली पाहिजे. तुझ्या भरवशावर सारा देश जगणार असल्याची बाब ध्यानात आणून दिली पाहिजे अन् त्याला त्याच्या जबाबदारीचे स्मरणही करून दिले पाहिजे. तोच खचला, तोच मनातून असा कोसळला तर सारेच संपेल, हेही त्याला सांगितलं पाहिजे. सार्‍या जगाच्या आशा पल्लवीत करण्याची ताकद त्याच्यात आहे, याची जाणीव त्याला करून दिली पाहिजे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे ऍड. अनंत खेळकरांच्या दीर्घ रचनेतील या ओळी आहेत,
मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही

दरवेळी सरकारी मदतीकडे आस लावून बघण्याच्या भिकार प्रवृत्तीच्या पेकाटात लाथ मारण्याचाही प्रयत्न त्यातून झाला आहे.
सध्या मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पण, नैराश्येच्या दारात उभे असतानाही उत्सव ‘साजरे करणे’ मात्र संपले नाहीत. तेरवीला गावभोजन अन् सणवारी भंडार्‍यातल्या भोजनावळी, याबाबतीत दुष्काळाचे सावट कुठेही जाणवत नाही. ही तर्‍हा बदलली पाहिजे. प्रथा-परंपरांचा सन्मान राखलाच पाहिजे, पण काळानुरूप बदलही स्वीकारता आले पाहिजे.
नेमक्या पेरण्यांच्या मुहूर्तालाच बाजारात जाणवणारा खतं-बियाण्यांचा तुटवडा, शेतकर्‍याला लुबाडण्याचा नफेखोर व्यापार्‍यांचा डाव, शेतमालाला भाव मिळावा म्हणून रस्त्यावर उतरून करावी लागणारी आंदोलनं... अस्मानी संकटांच्या साथीला अजून इतरही खूप सारी संकटं उभी ठाकलेली असतात शेतकर्‍यांपुढे. एकूणच परिस्थितीशी लढायचे असते त्याला. मनावर दु:खाचे मणभर ओझे बाळगून परिस्थितीशी निकराचा लढा द्यायचा, तर ते इतकं सोपंही नाहीच. पण, तसा लढा देण्याची ताकद निसर्गाने त्यालाच प्रदान केली आहे, हे कसं विसरता येईल? हा कवीही बळीराजाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय्... तो म्हणतो,
कष्टकर्‍याची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपासारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे... 

Saturday, May 21, 2016

उद्धवसाहेब...!

एवढा राग मनात असेल एखाद्या ‘मित्र’पक्षाबद्दल, तर त्याच्या सोबतीने सत्तेत सहभागी तरी कशाला व्हायचे उद्धवसाहेब? खुशाल विरोधात बसायचे अन् करायची शिवीगाळ. पण आपलं कसं झालं ना साहेब, या राज्याची सत्ता एकहाती गवसली नसल्याची सलही मनात बाळगायची, ती संधी हिसकावून घेतली म्हणून भाजपाबद्दल रागही मनात ठेवायचा, त्यांनी सहजपणे सत्तेत सहभागी करून घेतले नाही याची खंत आहे ती वेगळीच, अशात एकीकडे मित्रपक्षही म्हणायचे अन् दुसरीकडे संधी मिळेल तेव्हा ओरखडेही काढायचे. स्पष्टवक्तेपणाचा मुलामा देऊन वर पुन्हा त्याचे समर्थनही करायचे, असे चालले आहे बघा शिवसेनेचे. सत्तेत राहून विरोधी पक्षात असल्यागत वागण्याची ही तर्‍हा राजकारणात चालतेच, असे आपल्याला वाटत असेलही कदाचित. पण हिंदुत्वाच्या कडव्या समर्थनाच्या शिवसेनेच्या एकेकाळच्या तर्‍हेवर प्रेम करणार्‍यांनाही आता वागण्याच्या तुमच्या या पद्धतीचा वीट येऊ लागला आहे. ‘मातोश्री’त बसून ‘संजय’च्या नजरेतून रणांगणावरचे दृश्य बघण्यापेक्षा अन् ‘संजय’च्याच पद्धतीने राजकारणाचे आकलन करण्यापेक्षा एकदा बाळासाहेबांच्या नजरेतून, त्यांच्या तर्‍हेने या परिस्थितीचे विश्‍लेषण करून बघा! कदाचित तुमचा निष्कर्षही बदललेला असेल अन् चाहत्यांना तुमची नवी तर्‍हाही भावलेली असेल... 
आसामात सत्ता लाभली तरी देशाच्या इतर भागांत कुठे भाजपाला यश मिळालं? तिथेतर कॉंग्रेसप्रमाणे भाजपाचाही धुव्वाच उडाला ना... पाच राज्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीच्या निकालांचे शिवसेना नेते सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेले हे विश्‍लेषण म्हणजे, स्वत:ला गाढे अभ्यासक म्हणवणार्‍या तमाम राजकीय विश्‍लेषकांच्या डोळ्यात त्यांनी घातलेले झणझणीत अंजनच आहे! निकाल लागल्यानंतर सर्व वाहिन्यांवर, देशभरातील जवळपास सर्वच वर्तमानपत्रांमधून या निकालांचा आपापल्या परीने अभ्यास करून त्याचे अर्थ, अन्वयार्थ सांगण्याचा प्रयत्न तमाम जनांनी करून पाहिला, पण एकालाही त्याची उद्धवसाहेबांसारखी मांडणी करता आली नाही! काय म्हणाले उद्धव साहेब? ते म्हणाले, आसामात भाजपाला यश मिळालं ते ठीक, पण केरळचं काय? तामिळनाडूत कुठे सत्ता मिळाली भाजपाला? तिकडे बंगालमध्ये ‘ममतामुक्त’ राज्याची कल्पना मांडली होती अमित शाहांनी, कुठे यश मिळाले भाजपाला तिकडेही? आणि पुद्दुचेरीत तर कॉंग्रेसचेच सरकार स्थापन होणार ना? मग भाजपाची स्थिती सुधारली कुठे? खरंय् साहेबांचं. एकूण सोळा सदस्यांचे संख्याबळ असलेल्या पुद्दुचेरी नामक एका केंद्रशासित प्रदेशात सत्ता स्थापन होण्यासारखं मोठ्ठं यश कॉंग्रेसच्या वाट्याला आलेलं असताना त्याच्या तुलनेत चार पट संख्याबळ असलेल्या आसामात भाजपाला सत्ता मिळाल्याचं काय एवढं कौतुक करायचं? 
भाजपाच्या सोबतीने राहून निवडणुकी लढवताना कायम जास्त जागा लढविण्याच्या अटी ठेवल्या, जास्त जागा जिंकल्या म्हणून शेखी मिरवली, मुख्यमंत्री असो की विरोधी पक्षनेता, महत्त्वाची पदं आपल्या वाट्याला यावीत यासाठी कायम झगडत राहिले. दोन वर्षांपूर्वी हे गणित विस्कटलं अन् शिवसेनेची मोठीच अडचण झाली. मिळून लढायचे तेव्हापेक्षा एकट्याने जास्त जागा लढल्यावरही यश काही तितकेसे हाती लागले नाही, तेव्हापासून तर सैरभैर झालेत या पक्षाचे शीर्षस्थ नेते. कालपर्यंतचा आपलाच मित्रपक्ष आपल्याशिवायही सत्तेत येऊ शकतो, सत्तेत आपल्याला सहभागी करून घ्यायचे की नाही हे दिमाखानं ठरवतो, महाराष्ट्रात कितीतरी दिवसपर्यंत आपल्याला सत्तेबाहेर खितपत ठेवतो, ही बाब अजूनही पचनी पडत नाहीय् या पक्षाच्या नेत्यांना, हेच खरे! 
मध्यंतरीच्या राजकीय स्थित्यंतरांत स्थानिक राजकीय पक्षांचे प्राबल्य विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले. देशपातळीवरील प्रमुख राजकीय पक्षांपुढेही स्थानिक पक्षांच्या सोबतीने राजकीय आराखडे तयार करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नाही. आसामपासून तर तामिळनाडूपर्यंत आणि महाराष्ट्रापासून तर आंध्रप्रदेशपर्यंत सर्वदूर त्याचा प्रत्यय सर्वांनी अनुभवला. दिल्लीतली सत्ता टिकवताना विविध राज्यांमधल्या स्थानिक राजकीय पक्षांच्या प्राबल्याला जराही धक्का पोहोचणार नाही, याचीही काळजी नाही म्हणायला सर्वांनाच घ्यावी लागली. शिवसेनेची भाजपासोबतची मुजोरीची भाषा अधिक तीव्र व्हायला तेही एक कारण होतेच, हे साहेबांना तरी कसे नाकारता येईल? तामिळनाडूतले अम्मांचे राज्य असो की मग बंगालमधील दीदींचे, ते असे सहजासहजी उलथून लावता येईल अशी परिस्थिती असती तर मग कारसेवकांनी बाबरी ढांचा उद्ध्वस्त केला असताना त्याचे श्रेय परस्पर लाटून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या शिवसेनेचे नंतरच्या काळात उत्तरप्रदेशात सरकारच स्थापन व्हायला हवे होते, नाही का उद्धवसाहेब? पण राजकारणात असे सारेकाही सहजपणे घडत नसते. वर्षानुवर्षांचे नियोजन लागते. स्थानिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उभी करावी लागते. अगदी खालच्या स्तरापर्यंत काम पोहोचवायचे तर तितकाच काळही जाऊ द्यावा लागतो. नुसती भाषणबाजी करून चालत नाही, प्रत्यक्षात जमिनीवर उतरून काम करावे लागते. प्रचंड मेहनत घेऊनही वाट्याला आलेले पराभव निमूटपणे पचवावे लागतात, हे निदान उत्तरप्रदेशातील अनुभवावरून तरी शिवसेनेच्या ध्यानात आले असेलच! मग जी उत्तरप्रदेशात स्वत:च्या बाबतीत मान्य होते, तीच बाब बंगालात भाजपाच्या बाबतीत आपल्याला मान्य होत नसेल ना उद्धवसाहेब, तर मग नक्कीच काहीतरी गडबड आहे. एकदा आपल्या विचारांची दिशा तपासून बघाच! 
कालपर्यंत जी राज्ये पूर्णपणे डाव्या विचारांनी भारावलेली होती. जाणीवपूर्वक स्वत:ची सेक्युलर प्रतिमा निर्माण करणार्‍या कॉंग्रेसलाही बंगाल आणि केरळात सत्तांतर झालेले बघायला कितीतरी वर्षे जावी लागली. तिथे हिंदुत्वाची पताका फडकवण्यात यश मिळाले, कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपा कार्यकर्त्यांना विधानभवनातील प्रवेश खुला झाला, या यशाचे कौतुक करायचे की पूर्ण सत्ता मिळाली नाही म्हणून भाजपाची खिल्ली उडवायची? जो पक्ष कालपर्यंत कुणाच्या स्पर्धेतही नव्हता, राजकीय विश्‍लेषक ज्याची कालपर्यंत इथल्या राजकारणात गणतीही करीत नव्हते, त्या पक्षाच्या नावापुढे आज निदान तक्त्यात टाकायला आकडे तरी गवसताहेत. हे ‘यश’ तुमच्यालेखी कवडीमोल असेल ना उद्धव साहेब, तर मग भाजपाकडे बघण्याच्या तुमच्या चष्म्याचा असूयेचा रंग बलण्याचीच गरज आता निर्माण झाली आहे! 
तसेही महाराष्ट्रातील सत्ता एकहाती मिळवण्याचे स्वप्न भंगल्यापासून तुमच्या वागण्या-बोलण्यातील तारतम्याचा अभाव सातत्याने जाणवू लागला आहे. सत्तेतील सहभागासाठीची बरीच प्रतीक्षा केल्यानंतर अगदी क्षणभरापूर्वी स्वीकारलेले विरोधी पक्षनेतेपद सोडून आपण सत्तेत सहभागी झालो, आजतागायत ती सत्ता कायम आहे, इथल्या सरकारमध्ये शिवसेनेचेही मंत्री काम करताहेत, याचा पूर्णपणे विसर पडल्यागत बोलत आणि वागताहात तुम्ही अन् तुमचे कार्यकर्ते. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांद्वारे भाजपावर केले जातात, तेवढे आरोप तर विरोधी पक्षात असलेले कॉंग्रेसचे नेतेही करीत नसतील! आता कालच्या निवडणूक निकालांच्या विश्‍लेषणाचीही तुमची दिशा तशीच आहे. विरोधकांना शोभणारी. नव्हे, त्यांनाही लाजवणारी. पण मग एवढा राग मनात असेल एखाद्या ‘मित्र’पक्षाबद्दल, तर त्याच्या सोबतीने सत्तेत सहभागी तरी कशाला व्हायचे उद्धवसाहेब? खुशाल विरोधात बसायचे अन् करायची शिवीगाळ. पण आपलं कसं झालं ना साहेब, या राज्याची सत्ता एकहाती गवसली नसल्याची सलही मनात बाळगायची, ती संधी हिसकावून घेतली म्हणून भाजपाबद्दल रागही मनात ठेवायचा, त्यांनी सहजपणे सत्तेत सहभागी करून घेतले नाही याची खंत आहे ती वेगळीच, अशात एकीकडे मित्रपक्षही म्हणायचे अन् दुसरीकडे संधी मिळेल तेव्हा ओरखडेही काढायचे. स्पष्टवक्तेपणाचा मुलामा देऊन वर पुन्हा त्याचे समर्थनही करायचे, असे चालले आहे बघा शिवसेनेचे. 
सत्तेत राहून विरोधी पक्षात असल्यागत वागण्याची ही तर्‍हा राजकारणात चालतेच, असे आपल्याला वाटत असेलही कदाचित. पण हिंदुत्वाच्या कडव्या समर्थनाच्या शिवसेनेच्या एकेकाळच्या तर्‍हेवर प्रेम करणार्‍यांनाही आता वागण्याच्या तुमच्या या पद्धतीचा वीट येऊ लागला आहे. ‘मातोश्री’त बसून ‘संजय’च्या नजरेतून रणांगणावरचे दृश्य बघण्यापेक्षा अन् ‘संजय’च्याच पद्धतीने राजकारणाचे आकलन करण्यापेक्षा एकदा बाळासाहेबांच्या नजरेतून, त्यांच्या तर्‍हेने या परिस्थितीचे विश्‍लेषण करून बघा! कदाचित तुमचा निष्कर्षही बदललेला असेल अन् चाहत्यांना तुमची नवी तर्‍हाही भावलेली असेल... 

Saturday, May 14, 2016

शेख-शुभम-शेख

हिंदू-मुस्लिम संघर्ष हा या देशाचा इतिहास आहे. आता तो कुठेच घडत नाही असे नसले, तरी अलीकडच्या काळात तसला संघर्ष हा अपवाद आहे. एरवी शेजारी राहणारे दोन वेगवेगळ्या धर्माचे लोक धर्माच्या मुद्यावरून दिवसभर एकमेकांशी फक्त भांडतच राहतात असे काही चित्र नाही. अगदी जिथल्या दंगलींवरून रान माजले होते, त्या गुजरातेतही हिंदू-मुस्लिम आज गुण्यागोविंदानेच राहताहेत. देशाच्या इतर भागातही त्यांच्यात दररोज बेबनाव निर्माण होत असल्याचे चित्र नाही. बरं याहीउपर, पुणे शहरातल्या तमाम वस्त्या मुस्लिमविरहित असल्याचीही वार्ता इथे कुणाच्या कानी नाही. मग अन्वरपुढे आसरा मिळविण्यासाठी पर्याय केवळ हिंदूंच्याच घरांचा शिल्लक राहिला होता, या निष्कर्षाप्रत तो कसा, कधी अन् का आला? मुळात इथे मुद्दा वेगळाच आहे. खरोखरीच अन्वरच्या वाट्याला हा अनुभव आला असेल, तर ते वाईटच. एकविसाव्या शतकाच्या दिशेने झेपावण्याच्या ईर्ष्येने निघालेल्या भारताला आता हे जाती-धर्माच्या चाकैटीत बंदिस्त राहिलेले मागासलेपण मानवणारे नाही. एका रिक्षाचालकाच्या मेहनती, होतकरू अन् हुशार मुलाच्या वाट्याला तर असला अनुभव कधीच येऊ नये हेही खरेच. पण, आता त्याच्या त्या विधानाचे राजकारण होऊ लागले आहे. काल आपला छोटासा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी स्वत:चे नाव बदलण्यास तयार झालेल्या अन्वरलाही आता आपली कहाणी सांगण्यात, नसलेल्या संघर्षाची त्याला जोड देण्यात भूषण वाटू लागले असल्याचे वास्तवही नाही म्हणायला दाहकच आहे. 
पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्याच्या अन्वर शेखला शिकत असतानाच्या काळात राहायला घर मिळत नव्हते, म्हणून नाव बदलून शुभम अशी ओळख द्यावी लागल्याची खंत व्यक्त करताच अन् आता मी शेख असल्याचे अभिमानाने सांगू शकतो, असे त्याने म्हणताच, या कथित अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली शेकडो माणसं पराचा कावळा करू लागली आहेत. या निमित्ताने कुणाला तरी झोडपून काढण्याची संधी अनायासेच हाती लागल्याच्या आनंदात चेकाळल्यागत वागू लागले आहेत काही लोक. एका रिक्षाचालकाचा मुलगा स्वत:च्या मेहनतीच्या बळावर एवढे मोठे यश संपादन करतो, याचे कौतुक आहेच. पण हे यश हाताशी लागताच, त्याला आपल्यावरील अन्यायाचे लागलीच स्मरण होते, त्याचा इश्यू करण्याचा तो प्रयत्न करतो अन् समाजातले काही लोक त्याच्यावरील या कथित अन्यायाविरुद्ध लढण्यास एव्हाना सरसावलेलेही असतात, हे चित्र निदान अन्वरच्या बाबतीत तरी विपर्यस्त ठरू पाहणारे आहे. जाती-धर्मावर आधारलेले भेद आपल्या समाजात अगदीच अस्तित्वात नाहीत हे म्हणण्याचे धाडस कोण करेल? पण, म्हणून राहायला घर मिळवण्यासाठी नाव बदलावे लागल्याचे अन्वरचे म्हणणे विनासायास मान्य होईल असेही नाही. 
पुण्याच्या ज्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये या विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो, त्याला तिथल्या वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, असे कसे होईल? चला, मान्य करू या की, त्याला वसतिगृहापेक्षा एखादी खाजगी खोली बघून तिथे राहणे अधिक सोयीचे होते. हेही मान्य करू या की एखाद् दुसर्‍या घरी त्याला, शेख या नावामुळे खोलीच्या बदल्यात नकार वाट्याला आला. पण, मग त्याने खोली मिळवण्यासाठी एखाद्या मुस्लिम व्यक्तीचा शोध का घेतला नाही? खोलीसाठी नाव बदलण्याची वेळ आलीच असेल, तर मग त्याने कॉलेजातही नाव बदलले होते का? मित्रांमध्ये त्याने कोणत्या नावाने ओळख दिली होती? युपीएससीची परीक्षा त्याने कोणत्या नावाने दिली? कॉलेजात किंवा मित्रांच्या समूहात नाव बदलून आपली ओळख लपविण्याची कधी गरज पडली नसेल, तर मग राहण्याकरिता एक खोली मिळवण्यासाठी त्याला नाव बदलावे लागले, यावर विश्‍वास कसा ठेवायचा? आणि त्याने तरी ‘अन्यायाच्या’ श्रेणीत जमा करून त्या मुद्याचा बाऊ करत सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न का करावा? 
पुण्यात जणूकाय खोल्यांची वानवा असल्यागत ती मिळवण्यासाठी स्वाभिमानी म्हणवणारा अन्वर आपले नाव बदलतो, त्याच्याच म्हणण्यानुसार घरमालकाशी खोटे बोलून खोली मिळवतो, युपीएससीच्या परीक्षेत यश मिळताच त्याला ही बाब ओरडून सार्‍या जगाला सांगाविशी वाटते, हा सारा प्रकार अविश्‍वसनीय वाटावा असा आहे. आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कालपर्यंत याबाबत चकार शब्द न काढलेल्या अन्वरमध्ये युपीएससी परीक्षेत मिळालेल्या यशामुळे घडून आलेला बदल, त्याला अचानक गवसलेले अवसान धक्कादायक आहे. आडनाव ‘शेख’ असल्यामुळे आपल्याला खोली नाकारली गेल्याचा त्याने जाहीर केलेला निष्कर्ष, परिणामी नाव बदलून ‘शुभम’ ठेवण्याचा, पण कालपर्यंत ज्याची कुठेच वाच्यता झाली नाही, असा त्याच्या लेखी त्याच्यावर ‘ओढावलेला’ प्रसंग, अतिशय नाट्यमय रीत्या, योग्य संधी बघून त्याची मांडणी करण्याचा झालेला प्रयत्न... या देशाच्या एका भावी कलेक्टरची दुर्दैवी मानसिकता स्पष्ट करणारा आहे. 
हिंदू-मुस्लिम संघर्ष हा या देशाचा इतिहास आहे. आता तो कुठेच घडत नाही असे नसले, तरी अलीकडच्या काळात तसला संघर्ष हा अपवाद आहे. एरवी शेजारी राहणारे दोन वेगवेगळ्या धर्माचे लोक धर्माच्या मुद्यावरून दिवसभर एकमेकांशी फक्त भांडतच राहतात असे काही चित्र नाही. अगदी जिथल्या दंगलींवरून रान माजले होते, त्या गुजरातेतही हिंदू-मुस्लिम आज गुण्यागोविंदानेच राहताहेत. देशाच्या इतर भागातही त्यांच्यात दररोज बेबनाव निर्माण होत असल्याचे चित्र नाही. बरं याहीउपर, पुणे शहरातल्या तमाम वस्त्या मुस्लिमविरहित असल्याचीही वार्ता इथे कुणाच्या कानी नाही. मग अन्वरपुढे आसरा मिळविण्यासाठी पर्याय केवळ हिंदूंच्याच घरांचा शिल्लक राहिला होता, या निष्कर्षाप्रत तो कसा, कधी अन् का आला? 
मुळात इथे मुद्दा वेगळाच आहे. खरोखरीच अन्वरच्या वाट्याला हा अनुभव आला असेल, तर ते वाईटच. एकविसाव्या शतकाच्या दिशेने झेपावण्याच्या ईर्ष्येने निघालेल्या भारताला आता हे जाती-धर्माच्या चाकैटीत बंदिस्त राहिलेले मागासलेपण मानवणारे नाही. एका रिक्षाचालकाच्या मेहनती, होतकरू अन् हुशार मुलाच्या वाट्याला तर असला अनुभव कधीच येऊ नये हेही खरेच. पण, आता त्याच्या त्या विधानाचे राजकारण होऊ लागले आहे. काल आपला छोटासा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी स्वत:चे नाव बदलण्यास तयार झालेल्या अन्वरलाही आता आपली कहाणी सांगण्यात, नसलेल्या संघर्षाची त्याला जोड देण्यात भूषण वाटू लागले असल्याचे वास्तवही नाही म्हणायला दाहकच आहे. असल्या प्रसंगांच्या कायम शोधात राहणार्‍यांनाही यातून बरेचकाही हाती लागले असल्याचा भास होऊ लागला आहे. धर्माने मुस्लिम असलेल्या अन्वरला राहण्यासाठी एक खोली मिळवण्यासाठी शुभम या हिंदू नावाचा आधार घ्यावा लागतो, यावरून अकांडतांडव करण्याचा प्रयत्न काही संधिसाधूंनी एव्हाना जोरकसपणे आरंभलाही आहे... इथेच खरी गोम आहे. हेच इथले सामाजिक वास्तव असल्याचे सांगण्याची काही लोकांनी चालवलेली धडपड या मुद्याला वेगळेच वळण देण्याचे प्रयत्न अधोरेखित करणारी आहे. 
अन्वरची कथित ‘दर्दभरी’ कहाणी ऐकून जर ‘अरेरे, बिच्चारा!’ असे शब्द कुणाच्या तोंडी येत असतील, तर मग ही परिस्थिती का उद्भवली, याचाही विचार झालाच पाहिजे. अमेरिकेच्या विमानतळावर इतर सार्‍या प्रवाशांना बाजूला ठेवून शाहरुख ‘खान’चीच तपासणी तीन तीन तास का होते, याचाही शोध अन्वरबाबत सहानुभूती दाखवणार्‍यांनी घ्यावा. नेहमी सर्वांचाच दोष असतो असे नाही, पण खूपदा सुक्यासोबत ओलेही जळते. अमेरिकेत झाडाझडती झालेल्या शाहरुखचा तरी दोष कुठे होता? पण, मुस्लिमांची जी काही प्रतिमा जागतिक पातळीवर झाली आहे, केवळ भारतातच नव्हे, तर एकूणच जागतिक पातळीवर दहशतवादाला जो हिरवा रंग मधल्या काही दशकांत चढला आहे, त्यावरून अमेरिकन सरकारने सुरक्षेचे कारण पुढे करत कठोर निर्णय घेतले. त्याचे परिणाम दोषी-निर्दोष, सार्‍यांनाच भोगावे लागताहेत. तिथल्या नियमांबद्दल कुणाचाच आक्षेप नसतो. अगदी पाकिस्तानी सरकारचीसुद्धा त्याविरुद्ध चकार शब्द काढण्याची हिंमत होत नाही. शाहरुखवरील अन्यायाविरुद्ध उठलेल्या आवाजाला केवळ भारतातच बळ मिळते अन् इथल्याच धरतीवर त्याचा धुराळा शांतपणे विसावतो. कारण इथे लोकशाही अस्तित्वात आहे. त्यामुळे फुटकळ बाबींवरही सरकारविरुद्ध, समाज आणि व्यवस्थेविरुद्ध बिनबोभाट ओरड करण्याची मुभा आहे. परीक्षेतले यश हाताशी लागताच अन्वरला फुटलेला कंठही, लोकशाही व्यवस्थेने प्रदान केलेल्या त्याच अधिकारांचे फलित आहे. उपरोक्त परिस्थितीत, नाव बदलावे लागण्याच्या त्याने बयाण केलेल्या कहाणीचे कुणीच समर्थन करणार नाही. त्यातून तो ‘जे’ सांगण्याचा प्रयत्न करतोय्, ते तर इथल्या समाजाचे मुळीच वास्तव नाही. खोलीसाठी कुठेतरी एक-दोन ठिकाणी नकार ऐकावा लागला म्हणून लागलीच कुणी स्वत:चे नाव बदलेल, हेही पटण्यासारखे नाही. शिवाय, खोली मिळवण्यासाठी खोटे बोलणारा, आता आपण अधिकारी होणार असल्याचे लक्षात येताच, धर्माभिमान जागृत झालेला एक तरुण भविष्यात या देशातील कुठल्याशा एका जिल्ह्याचा कारभार एकहाती सांभाळणार आहे, हेही वास्तव आहे. शेख-शुभम-शेख, अशी आपल्या संघर्षाच्या कहाणीची मांडणी करणार्‍या अन्वरने आणि त्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरू पाहणार्‍यांनीही हे वास्तव ध्यानात घेतलेच पाहिजे... 

Saturday, May 7, 2016

सैराट...!

मुद्दा, आम्ही लोक काय उचलून धरतो, कशाला भाव देतो, याचा आहे. आमच्या भावभावनांचा कुणीतरी त्याच्या धंद्यासाठी वापर करून घेतो, हाही मुद्दा आहेच. त्यामुळे चिंध्या विकायला सोनं पांघरून बसलेल्यांना कशाला दोष द्यायचा, दोष तर सोनं लेऊन बसणार्‍यांवर भाळणार्‍या ग्राहकांचा आहे. एखादा चित्रपट बघून आमच्या पिढ्या संस्कारित होतात किंवा कुठल्याशा चित्रपटामुळे आमची पोरं बिघडतात, हा ग्रह लोक का करून घेतात? ‘श्यामची आई’ बघून पोरं सुधारली असती, तर मग वृद्धाश्रमं दिसलीच नसती ना आज समाजात! अन् ‘बॉबी’ बघून ती बिघडली म्हणावं तर त्यावेळच्या कोवळ्या वयातली कित्येक माणसं आज समाजकार्याला वाहून घेणारी, लोकांसाठी आयुष्य वेचलं म्हणून नावारूपाला आली असल्याची उदाहरणेही आहेत! त्यामुळे एखाद्या चित्रपटातील कुठल्याशा विषयाचा किती बाऊ करायचा, त्याची किती चिंता वाहायची, त्यावरील चर्चेत किती वेळ दवडवायचा अन् त्यातून व्यापार्‍यांना कमाईची किती संधी उपलब्ध करून द्यायची हे आमचं आम्हीच ठरवण्याची वेळ आली आहे. हे उमगेल तो दिवस भारतीय जनमानसाच्या यशाचा... नाही तर यशोगाथा ‘सैराट’चीच असणार आहे...
दाखल झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात ‘लय भारी’ अन् नाना पाटेकरांच्या ‘नटसम्राट’चा रेकॉर्ड मोडत बारा कोटींचा धंदा करणार्‍या ‘सैराट’ची प्रसिद्धी चकित करणारी आहे. एका शुक्रवारी प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट दुसर्‍या आठवड्याच्या शुक्रवारपर्यंत ‘जगप्रसिद्ध’ झालेला असतो. तो बघण्यासाठी म्हणून लोकांनी चित्रपटगृहांवर उड्या टाकलेल्या असतात. तो बघायला मिळेल की नाही असे वाटून ‘बेचैन झालेल्यांसाठी’ त्याची पायरेटेड सीडीही एव्हाना तयार झालेली असते. तशी सीडी काढणारा कुणीतरी एकजण पोलिसांकरवी पकडलाही जातो. लागलीच त्याची बातमीही होते. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा त्या चित्रपटाची चर्चा होते. या चित्रपटाला किती डिमांड आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न होतो... नव्या युगात उपलब्ध असलेल्या प्रसिद्धीच्या झाडून सार्‍या तंत्रांचा सुयोग्य वापर केला, तर कसे ‘यश’ प्राप्त होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘सैराट’ आहे. व्यावसायिकांनी ते करणे यात गैर काहीच नाही. त्यावर कुणी आक्षेप नोंदविण्याचेही कारण नाही. इथे मुद्दा आहे तो रसिकांच्या मानसिकतेचा. प्रश्‍न आहे तो, लोकांनी या धंदेवाईकांच्या सापळ्यात अडकण्याचा. दरवेळी कुणीतरी लोकांच्या भावभावनांचा बाजार मांडतो, त्यांच्या खिशाला कात्री लावण्याच्या योजना तयार करतो, आपला माल त्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतो अन् भाबडी जनता दरवेळी कुणाच्यातरी योजनेला बळी पडते. संताप खरं तर याचा होतो. 
खरंच ‘सैराट’ इतका भन्नाट आहे? त्याच्या कथेची बीजं इतकी जगावेगळी आहेत? की कालपर्यंत कुणालाच जमली नाही अशी त्या कथानकाची मांडणी नागराज मंजुळेंनी त्यातून केली आहे? जात म्हणा वा मग पैसा, त्याआधारे निर्माण झालेल्या समाजातल्या दोन स्तरांतील मुला-मुलींचा एकमेकांवर जीव जडणे, हळुवारपणे फुलत गेलेल्या त्यांच्यातील नात्यांच्या प्रेमळ गुंफणीची तरुणाईला भुरळ पडणे, यात नवल कुठे आहे? कित्येक चित्रपटांच्या अशा कथानकातूनही काही जगावेगळे चित्र मांडले गेल्याची वस्तुस्थिती नाही. पण नव्या पिढीला भावतील, हळव्या मनाला साद घालतील अशा प्रेमकथांमधील नाजूक गुंतागुंतीला समाजातील जराशा वास्तवाची फोडणी दिली की चित्रपट हमखास चालतो, हे तर या धंद्याचे गमक आहे. जरासे मागे गेले तर बॉबी, एक दुजे के लिये, कयामत से कयामत तक पासून तर अगदी परवाच्या रांझणापर्यंत... तरुणांच्या किंवा तरुणाईत पदार्पण करणार्‍यांच्या या चित्रपटांवर पडलेल्या उड्या अगदी तशाच आहे, जशा आज ‘सैराट’वर पडताहेत. 
हॉलीवूडशी स्पर्धा करू बघणार्‍या हिंदी चित्रपटांच्या तोडीचे चित्रीकरण, जगातील अद्ययावत तंत्रज्ञानाने सजलेल्या स्टुडिओत झालेले त्याच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग, तसल्याच तंत्रज्ञानाच्या साह्याने झालेली सिनेमॅटोग्रॅफी, अजय-अतुलचे संगीत, चित्रपटातून झळकलेले नवे चेहरे, त्यांनी फुलवलेली प्रेमकहाणी आणि कथेचा या चित्रपटातला हृदयाला भिडणारा, अस्वस्थ करणारा शेवट... यामुळे ‘सैराट’ तुफान चालतोय्, असे कुणी म्हणत असेल, तर ते अर्धसत्य आहे. वास्तव हे आहे की या चित्रपटाच्या निर्मात्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेत प्रसिद्धी मिळवणे छान जमले आहे. आणि खरे तर त्यात वावगे काहीच नाही. तमाम हिंदी चित्रपट याच पद्धतीने प्रसिद्धी मिळवून धंदा करीत असतील, तर मराठी चित्रपट निर्मात्यांनी तरी का मागे राहावे? त्यांनीही तसे का करू नये? त्यांनी ते जरूर करावे, पण... तंत्रज्ञानाचा वापर त्यांनीही करावा, धंद्यासाठी आवश्यक त्या क्लृप्त्या त्यांनीही अनुसराव्यात, प्रसिद्धीच्या या तंत्रातून कोट्यवधीची कमाई त्यांनीही करावी. फक्त एकच... असल्या क्लृप्त्या करून मिळालेले पैसे म्हणजे चित्रपटाचे, त्याच्या कथानकाचे, कलावंतांच्या अभिजात अभिनयाचे यश असल्याचे सांगण्याचा प्रयत्न मात्र कुणी करू नये! 
एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रसिद्ध व्हावा, या ना त्या निमित्ताने त्याची चर्चा व्हावी, चित्रपट वादग्रस्त ठरावा म्हणून कुठल्याशा तद्दन फालतू मुद्यावर कुणीतरी कोर्टात धाव घ्यावी, या दृष्टीने निर्माता-दिग्दर्शकांनी प्रयत्न करावेत, त्याची पायरेटेड सीडी निघेल याची व्यवस्था करावी अन् त्याविरुद्धची तक्रारही त्यांनीच करावी आणि मग वेगवेगळ्या कारणांनी लोकांच्या त्यावर उड्या पडाव्या, परिणामत: निर्मात्यांचे गल्ले भरावेत, या बाबी आता नव्या राहिलेल्या नाहीत. नवलाईच्या तर मुळीच राहिलेल्या नाहीत. त्याच धर्तीवरची सैराटची सोशल मीडियावरची सकारात्मक आणि नकारात्मक प्रसिद्धी लक्षणीय ठरली आहे. लोकांनीच आपापसात चर्चा केली आणि सैराटच्या यशाचा मार्ग मोकळा करून दिला. कोवळ्या वयात मनात उमलणार्‍या भावभावनांची सैराटमधून झालेली मांडणी, नव्हे, त्यातून झालेले त्याचे उदात्तीकरण स्वीकारणार्‍यांपासून, तर ‘यातून काय संस्कार होतील नव्या पिढीवर’, असा प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांपर्यंत सारेच या चर्चेत सहभागी झाले आहेत. यात काय वावगे असे म्हणणार्‍यांपासून, तर प्रेमाच्या पलीकडे नव्या पिढीला सांगण्यासारखं आमच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही का? याच वयात सवंगड्यांची मोट बांधून शिवबाने हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला होता, याच वयात ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी रचली होती, हे नव्या पिढीला कुणी सांगायचं, असे रोख सवाल आपापल्या मित्र समूहाच्या परिघात एकमेकांना विचारणार्‍या पांढरपेशांनीही ‘सैराट’च्या प्रसिद्धीत खारीचा वाटा उचलला आहे. प्र्रत्यक्षात चित्रपटगृहापर्यंत जाऊन कितींनी सैराट बघितला ठावूक नाही, पण इतरांनी तो बघावा याची तजवीज मात्र यातील बहुतेकांनी केली. खरं तर ‘हेच’ सैराटचे यश आहे. व्हाट्‌सऍपपासून तर ट्वीटरपर्यंत एकूण एक माध्यमाचा पुरेपूर उपयोग करून घेता येणे, याबाबत ‘सैराट’च्या टीमला पैकीच्या पैकी गुण दिले पाहिजेत. पूर्वीच्या एकाच धाटणीतल्या चित्रपटांच्या तुलनेत अलीकडे मराठी चित्रपटांना चांगले दिवस येताहेत. खूप नवनवीन कल्पना, विषय, कथानक, आगळ्या पद्धतीची मांडणी घेऊन या चित्रपटांची निर्मिती होतेय्. त्यात सैराटचाही समावेश कुणी करू इच्छित असल्यास त्यावर आक्षेप नोंदविण्याचे कारण नाही. 
मुद्दा, आम्ही लोक काय उचलून धरतो, कशाला भाव देतो, याचा आहे. आमच्या भावभावनांचा कुणीतरी त्याच्या धंद्यासाठी वापर करून घेतो, हाही मुद्दा आहेच. त्यामुळे चिंध्या विकायला सोनं पांघरून बसलेल्यांना कशाला दोष द्यायचा, दोष तर सोनं लेऊन बसणार्‍यांवर भाळणार्‍या ग्राहकांचा आहे. एखादा चित्रपट बघून आमच्या पिढ्या संस्कारित होतात किंवा कुठल्याशा चित्रपटामुळे आमची पोरं बिघडतात, हा ग्रह लोक का करून घेतात? ‘श्यामची आई’ बघून पोरं सुधारली असती, तर मग वृद्धाश्रमं दिसलीच नसती ना आज समाजात! अन् ‘बॉबी’ बघून ती बिघडली म्हणावं तर त्यावेळच्या कोवळ्या वयातली कित्येक माणसं आज समाजकार्याला वाहून घेणारी, लोकांसाठी आयुष्य वेचलं म्हणून नावारूपाला आली असल्याची उदाहरणेही आहेत! त्यामुळे एखाद्या चित्रपटातील कुठल्याशा विषयाचा किती बाऊ करायचा, त्याची किती चिंता वाहायची, त्यावरील चर्चेत किती वेळ दवडवायचा अन् त्यातून व्यापार्‍यांना कमाईची किती संधी उपलब्ध करून द्यायची हे आमचं आम्हीच ठरवण्याची वेळ आली आहे. हे उमगेल तो दिवस भारतीय जनमानसाच्या यशाचा... नाही तर यशोगाथा ‘सैराट’चीच असणार आहे...