Saturday, November 11, 2017

मुलींचा जन्म नाकारणारी हीन मानसिकता...


हॉंगकॉंग, पटायामध्ये होणारे मुलींच्या जन्माचे स्वागतही, तेथील समाजाच्या हीन अभिरुचीची, विचारांच्या नीच दर्जाचीच फलश्रृती आहे. त्यामुळे केवळ दुर्गम, ग्रामीण भागातील माणसंच मागासलेली असल्याचा समज करून घेण्याचे कारण नाही. वर्तणुकीतून सिद्ध होणारे विचारांचे मागासलेपण तर दिल्ली, मुंबई, हॉंगकॉंग, पटायामध्येही आहे. पुढारलेपण मिरविणार्‍या या समाजाला मुलींचा जन्म नेमका का नको असतो, याचाही विचार झालाच पाहिजे कधीतरी. कधीतरी आम्हीही समजून घेत हे म्हटलं पाहिजे की,  अंजुम तुम अपने शहरके लडकोसे ये कहो पैरो की बेडीयां नाही, पायल है लडकीयाराणीच्या पोटी मुलगी जन्माला आली की, या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही अशा बेताने, झाकलेल्या माठात तो जीव ठेवून सूर्योदयापूर्वी दूर कुठे तरी नेऊन पुरण्याची कधीतरी ऐकलेली कहाणी धादांत खोटी असावी असं सारखं वाटत राहायचं परवा परवापर्यंत. माणसं एवढी थोडीच निष्ठूर असू शकणार आहेत, हा ओघानं डोकावणारा प्रश्‍न, तो समज खोटा ठरविण्यासाठी धडपडायचा. पण, परवा सोमलगुड्यातील ती घटना कानावर पडली अन् मातीत पुरल्या जाणार्‍या झाकलेल्या माठातील जीवंत मुलीची कहाणी खोटी ठरविण्याचे कारणच गवसेनासे झाले...
लडकियोंपे क्या गुजरी कुछ बता नही पाती जख्म उम्रभर का है और बेजबानी है... दिल्लीतील ते ‘जगप्रसिद्ध’ बलात्कार प्रकरण मुकाट्यानं सहन करून शेवटी स्वत:चा जीव गमावूनही ‘अनामिकच’ राहिलेल्या त्या तरुणीबाबत एका कवयित्रीच्या भावना शब्दातून अशा व्यक्त झाल्या, तर कुटुंबातील सर्वांनाच वंशाचा दिवा हवा असताना, कुणालाच नको असलेलं स्वत:चं अस्तित्व सिद्ध करायला जगात आलेली चिमुरडी एका वृद्धेनं निर्दयतेनं चिरडून टाकल्याची घटना तर अगदी परवाची आहे... खरंच प्रगत झालोय् आम्ही? की, आधुनिकतेची कास धरणे हा नुसता तोंडदेखलेपणा असतो अन् बुरसटलेल्या विचारांचंच गाठोडं उशाशी बाळगत जगतात लोक इथले? पोरगंच जन्माला घालण्याच्या खुळ्या हट्टापायी, घरात पाऊल ठेवलेल्या तिसर्‍या मुलीचा गळा घोटून अवघ्या सत्तावीस दिवसात तिची इहलोकीची यात्रा संपविण्याच्या कृत्याचं समर्थन अन्यथा कसं आणि का करायचं? एकविसाव्या शतकातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही मुलाचाच आग्रह धरणारी मानसिकता, नेमकी कुठे नेणार आहे या समाजाला? घरात दोन मुलींचा जन्म झाल्यानंतरही ‘मुलगा हवाच’चा दुराग्रह कायम राहिला अन् तरीही मुलगीच जन्माला आली तर मागासलेल्या विचारांच्या आजीनं संपवून टाकलं तिला एकदाचं. गुदमरून संपलेला जीव कापसाच्या ढिगाखाली सरकवून ती स्वत: मोकळा श्‍वास तरी कशी घेऊ शकली असेल? या प्रकरणात त्या आजीला अटक झाली आहे. आता पुढची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल. पोलिस ठाण्यापासून तर कोर्टापर्यंतच्या फेर्‍याही झडतील. कदाचित म्हातारीला कठोरातली कठोर शिक्षाही होईल. पण...पण इथे मुद्दा असा आहे की, आपल्या स्वयंघोषित पुढारलेल्या समाजाची मानसिकता केव्हा बदलेल? सेक्स टुरिझमसाठी प्रसिद्ध असलेल्या पटायासारख्या प्रदेशात मुलगी जन्माला आलेल्या घरात साजरा होणारा आनंदोत्सव वर्णनातीत असतो म्हणतात. दुर्दैव फक्त एवढंच असतं की, त्या आनंदामागे स्त्री-पुरूष भेद संपविण्याच्या दिशेनं पाऊल टाकण्यासाठीच्या प्रयत्नांचा अंशही नसतो. उलट, वयात येताच तिला बाजारात बसवून, तिच्या माध्यमातून घरासाठी पैसा कमाविण्याच्या योजनेचे गुपित त्यामागे दडलेले असते. मुलगी जन्माला आली की लागलीच नाकं मुरडणार्‍या मातीमोल भारतीय मानसिकतेच्या तुलनेत हा आनंदोत्सव काही फार उंचीवर नेऊन ठेवण्याच्या लायकीचा असतो, अशातला भाग नाही. उलट, उपभोगाच्या पलीकडे स्त्रियांची उपयोगिता शून्य ठरविण्याच्या निम्नस्तरीय विचारशैलीचा तो परिपाक असतो. भारतीय समाजही विचारांची तीच नीच पातळी गाठण्यासाठी धडपडतोय् की काय, असे वाटू लागले आहे अलीकडे. एकीकडे भेदरहित समाज रचनेची कल्पना मांडायची. त्यासाठीचा कमालीचा आग्रह धरायचा. पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांनी रचलेल्या इतिहासाचे, त्यांनी स्वकर्तृत्वातून निर्माण केलेल्या नवनवीन परिमाणांचे कवित्व गायचे, खांद्याला खांदा लावून चालण्याच्या त्यांच्या कर्तबगारीचे कौतुक करायचे, चूल आणि मूल संकल्पनेपलीकडच्या कल्पना रंगवून मांडायच्या. पण प्रत्यक्षात त्यानुसार वागण्याची वेळ आली की, तेव्हा मात्र सरड्यासारखा रंग बदलत आपल्या कूपमंडूक वृत्तीचे प्रदर्शन निलाजरेपणाने घडवायचे. असे असतानाही तरीही सामाजिक धारणा बदलत चालल्या असल्याची ग्वाही देत, मिरवणार आम्ही? जराशी लाज वाटत नाही इथे कुणालाच, कालपर्यंतच्या विविध समस्यांचे सामाजिक आशय आता बदलत चालले असल्याचा दावा करताना? पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्राच्या सुदूर टोकावर आडवळणावरील सोमलगुडा नावाच्या एका छोट्याशा गावातील ही घटना दुर्दैवी तर आहेच, पण ती तेवढीच अनाकलनीयही आहे. समाजाच्या आकलनाच्या मर्यादित कक्षा हळूहळू रुंदावत चालल्या असल्याचे, मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोनही एव्हाना बदलत चालला असल्याचेही कुणी ठामपणे सांगू शकणार नाही. खरंच, कशासाठी घोटला असेल त्या थेरडीनं २७ दिवसांच्या अर्भकाचा गळा? बरं तशीही ती नात होती तिची. तिच्या आईवडिलांनी जर तिचा स्वीकार केला होता, तर मग आजीचं काय घोडं मारलं गेलं होतं, नातीचा जीव घ्यायला? खरं तर या घटनेनं अनेक प्रश्‍न निर्माण केले आहेत. वैयक्तिक विचारांच्या स्तराबाबत, सामाजिक प्रघातांच्या निकषांबाबत, प्रगतीच्या आमच्या टुकार दाव्यांबाबत, जुन्या-टाकावू रुढी, परंपरांवर आसूड ओढतानाही त्या पदराचा एक टोक धरून ठेवण्यासाठी चाललेल्या आमच्या लज्जास्पद, अर्थविहीन धडपडीबाबत, ‘यत्र नार्यस्तु पूज्यते’ चा मंत्र जपताना ज्यांची जीभ जराही अडखळत नाही, त्यांनीच चालविलेल्या स्त्री-सुलभ भावनेच्या थट्टेबाबत... एकीकडे महिलांना लक्ष्मी-दुर्गा-महाकालीच्या स्थानी विराजमान करण्यासाठी सरसावणारी समाजातली हीच माणसं वेळ आली की याच अवतारांच्या इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगतात, तेव्हा जीवाचा जो संताप होतो ना, अगदी तीच स्वाभाविक भावना परवा सोमलगुडाच्या त्या घटनेनं सर्वदूर झाली आहे. अर्थात, इवलासा, नाजुकसा तो जीव निर्दयीपणे असा एका क्षणात संपवून टाकण्याची ही घटना काही अशी अचानक थोडीच घडली असणार? कुठल्याशा एका क्षणी तोल जाऊन त्या म्हातारीनं ते बाळ चिरडून टाकले असण्याचीही शक्यता कमीच. मुळात घरात आधीच दोन मुली असतानाही या यंदा कुटुंबाला मुलगाच हवा होता. पण तिसर्‍याहीवेळी मुलगी झाल्याचा राग हा अशा पद्धतीनं व्यक्त झाला. हवा असतानाही वंशाचा दिवा मिळाला नसल्याचा त्रागा या तर्‍हेने व्यक्त झाला. तो त्रागा, तो राग, वर्षानुवर्षे मानगुटीवर बसलेल्या परंपरागत विचारांच्या पगड्यातून तयार झाला असल्याचे धगधगते वास्तव नाकारता कसे येईल कुणाला? सोमलगुडाच कशाला, हा परिणाम तर बड्या शहरांमधूनही दिसतोच आहे सगळीकडे. भारतातील पाचशेपेक्षा अधिक मोठ्या नगरांमधील दरहजारी पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण केवळ ९०२ एवढे आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत या देशातील तमाम बड्या शहरांमधील घसरलेला मुलींचा जन्मदर, हा कशाचा परिणाम समजायचा एरवी? वर म्हटल्याप्रमाणे हॉंगकॉंग, पटायामध्ये होणारे मुलींच्या जन्माचे स्वागतही, तेथील समाजाच्या हीन अभिरुचीची, विचारांच्या नीच दर्जाचीच फलश्रृती आहे. त्यामुळे केवळ दुर्गम, ग्रामीण भागातील माणसंच मागासलेली असल्याचा समज करून घेण्याचे कारण नाही. वर्तणुकीतून सिद्ध होणारे विचारांचे मागासलेपण तर दिल्ली, मुंबई, हॉंगकॉंग, पटायामध्येही आहे. पुढारलेपण मिरविणार्‍या या समाजाला मुलींचा जन्म नेमका का नको असतो, याचाही विचार झालाच पाहिजे कधीतरी. कधीतरी आम्हीही समजून घेत हे म्हटलं पाहिजे की, अंजुम तुम अपने शहरके लडकोसे ये कहो पैरो की बेडीयां नाही, पायल है लडकीया राणीच्या पोटी मुलगी जन्माला आली की, या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही अशा बेताने, झाकलेल्या माठात तो जीव ठेवून सूर्योदयापूर्वी दूर कुठे तरी नेऊन पुरण्याची कधीतरी ऐकलेली कहाणी धादांत खोटी असावी असं सारखं वाटत राहायचं परवा परवापर्यंत. माणसं एवढी थोडीच निष्ठूर असू शकणार आहेत, हा ओघानं डोकावणारा प्रश्‍न, तो समज खोटा ठरविण्यासाठी धडपडायचा. पण, परवा सोमलगुड्यातील ती घटना कानावर पडली अन् मातीत पुरल्या जाणार्‍या झाकलेल्या माठातील जीवंत मुलीची कहाणी खोटी ठरविण्याचे कारणच गवसेनासे झाले...

Saturday, November 4, 2017

तो वेडा, वाचायला लावतोय् लोकांना!

एकदा रात्री एक फोन आला. फोन एका युवतीचा होता. अमृतच्या आवाजाचा गोडवा अजूनही तिच्या कानात रुंजी घालत असावा बहुधा. ती म्हणाली, मी तुझ्या क्लिप्स नेहमी ऐकते. छान असतात. तुझ्यामुळे कितीतरी पुस्तकं मला ऐकता आली आहेत. तिचा ‘ऐकण्या’वरचा भर ऐकून तो म्हणाला. अगं नुसतं ऐकतेस काय, कधीतरी वाचतही जा...! ती म्हणाली, अरे मी आंधळी आहे. मला वाचता नाही येत... म्हणूनच ‘ऐकते’ मी, तू पाठविलेली पुस्तकं. एकच क्षण... तिचं ते एकच वाक्य... काळीज चिरून गेलं... क्षणभर थबकलाच तो. आणि आता भारतातल्या सुशिक्षित अंधांना ही पुस्तकं कशी वाचता येतील यासाठीची धडपड सुरू केलीय् त्यानं... तो म्हणतो आता मी एकही पैसा कमावत नाही. तरीही समाधान मात्र लाखमोलाचं मिळवतो...
जेमतेम पस्तिशीतला तो तरुण, वाचनसंस्कृती लोप पावत चाललेल्या भारतीय तरुणाईला चक्क वाचनाचं वेड लावतोय्. लोकही वेडे होताहेत त्याच्या त्या आगळ्या प्रयोगानं. त्यासाठी त्यानं भरपूर पगाराची नोकरी सोडली. सीएची प्रॅक्टिस सोडली. आता तो भरपूर पुस्तकं वाचतो. स्वत:साठी नाही, लोकांसाठी. हो! लोकांसाठीच. त्यासाठी त्यानं वाचनासाठीच्या स्वत:च्या आवडीनिवडी बदलल्या. व्यक्तिमत्त्व विकासापर्यंतच मर्यादित असलेल्या त्या विषयांची व्याप्ती एव्हाना त्याच्याही नकळत लव्हस्टोरी, कथा-कादंबर्‍यांपर्यंत येऊन पोहोचली. दर आठवड्यात एक पुस्तक वाचायचं. कुठलंही. अगदी कुठलंही. भारतातल्या टी. रंगराजनपासून तर अमेरिकेतल्या स्टीफन कॉवेपर्यंतच्या कोणत्याही लेखकाचं पुस्तक त्याला भुरळ घालते. पुस्तक हातात पडलं की, झपाटल्यागत पानामागून पानं पलटवत तो पुढे सरकतो. कारण आठवडाभरात ते वाचून पूर्ण करायचं असतं. बरं, पुस्तक नुसतं वाचून संपवणं एवढाच त्याच्या मिशनचा भाग नसतो. नंतर वाचलेल्या पुस्तकाची ‘समरी’ लिहून काढायची. हजारो लोकांना ती व्हाट्‌स ऍप वरून पाठवायची. मग यानं वाचलेल्या शंभर, दोनशे, तीनशे पानांच्या पुस्तकाचं ते छोटेखानी टिपण लोक वाचतात. त्यातून त्यांना त्या पुस्तकाची कल्पना येते. संपूर्ण पुस्तक वाचणं शक्य नसलेल्या लोकांना या सारांशातून पुस्तकाचा आशय कळतो. आतापर्यंत जवळपास चार लाख लोक जुळलेत त्याच्या या ‘मिशन मेक इंडिया रीड’ मध्ये... ठाण्याचा अमृत देशमुख. शिक्षण आणि व्यवसायानं सीए. भरपूर पैसा कमावण्याची ऊर्मी असल्यानं वयाच्या पंचविशीतच त्यानं शिक्षणाला अनुरूप असं, स्टॉक मार्केटमध्ये रीसर्च ऍनालिस्टचं काम सुरू केलं. सुरुवातीला पैसा कमावण्याचं अप्रूप वाटलं. पण काहीच दिवस. मग त्याचं त्यालाच वाटायला लागलं की, अरे, एवढा पैसा कमावूनही आपण जेवतोय् तर तेवढंच जेवढं कालपर्यंत जेवत होतो. आपल्या वैयक्तिक आवडी-निवडीतही त्या पैशांमुळे फार बदल घडून आलेला नाही. मग बदल नेमका घडला कुठे? तर, त्याच्या ध्यानात आलं की, बदल आपल्या आनंदाच्या परिमाणात घडून आलाय्. इतका पैसा कमावला तरी तो आनंद, ते समाधान काही केल्या मिळत नाहीय्. मग अमृतनं, खोर्‍यानं पैसा देणारा तो जॉब एका क्षणात सोडला. मग भटकंती सुरू झाली, सॅटिस्फॅक्शन देऊ शकणार्‍या नव्या जॉबची. सुरुवातीला गरजू तरुणांसाठी सीएची शिकवणी विनामूल्य सुरू केली. अमृतला वाचनाची आवड तशी सुरुवातीपासूनच. त्या वेळी स्टीफन कॉवेच्या ‘सेव्हन हॅबीट्‌स ऑफ इफेक्टिव्ह पीपल’ या पुस्तकाचं वाचन चाललेलं होतं. एक दिवस एका मित्रासोबत चित्रपट बघण्याचा प्लान झाला. तिकीट आधीच बूक केलं होतं. दोघेही चित्रपटगृहात पोहोचले तेव्हा चित्रपट सुरू व्हायला अजून बराच अवकाश असल्याचं लक्षात आल्यावर मित्राबरोबर गप्पा सुरू झाल्या. साहजिकच गप्पांचा विषय, त्याचं वाचन सुरू असलेल्या ‘सेव्हन हॅबीट्‌स’वर येऊन पोहोचला. तेवढ्या अल्पशा वेळात त्या पुस्तकातील मजकुराचं वर्णन अमृतनं ज्या पद्धतीनं केलं ते अक्षरश: कल्पनेपलीकडचं होतं. तो मित्र तर ती इत्थंभूत माहिती ऐकून भारावून गेला होता. हा प्रयोग तू इतर पुस्तकांबाबत का करीत नाहीस, असा सवालच त्यानं विचारला. अरे, वाचन किती कमी झालंय् आताशा लोकांचं. काहींना वाचनाची आवड असली, तरी सवड होत नाही कामाच्या धबडग्यात. अशात एखाद्या पुस्तकाचा सारांश अशा पद्धतीनं थोडक्यात जर का त्यांच्यासाठी उपलब्ध झाला, तर लोक आवर्जून वाचतील ते. आणि महत्त्वाची, वाचनीय असूनही धूळ खात पडून राहिलेली कित्येक दुर्लक्षित पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवता येतील या निमित्तानं. एवढं सांगून तो मित्र तर चित्रपटाच्या मूडमध्ये गेला, पण चित्रपटगृहात शिरूनही अन् स्क्रीनवर चित्रपट सुरू असूनही अमृत मात्र त्यात रमू शकला नव्हता. एका अभिनव कल्पनेनं त्याला पुरतं अस्वस्थ करून सोडलं होतं. इतकं, की त्या दिवशी कुठलीशी खोटी सबब सांगून, चित्रपट अर्ध्यात सोडून तो माघारी वळला होता. ती कल्पनाच इतकी भन्नाट होती की, त्या रात्री अमृतला झोपच लागेना. खरंतर पुस्तकं वाचण्याचा संकल्प यापूर्वीही केला होता. कित्येकदा. विशेषत: नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला तर तो संकल्प हमखास व्हायचा अन् हवेतही विरायचा कधीच. आपण स्वत:साठी वाचू शकलो नाही, ती सारी पुस्तकं आता दुसर्‍यांसाठी वाचायची, असा निर्धार मनाशी झाला तेव्हा कुठे शांत झोप लागली. दुसर्‍याच दिवशी एक मिशन मनात तयार झालं. ‘मिशन मेक इंडिया रीड...’ भारताला वाचायला लावण्याचं ध्येय समोर ठेवून ठाण्यातला अमृत देशमुख नावाचा तरुण सरसावला होता. टी-२०, फास्ट फूड, शब्दांचे शॉर्ट कट्‌स, असा वेगवान आणि थोडक्यातचा प्रघात सर्वदूर प्रचलित होत असताना पुस्तक वाचनाच्या क्षेत्रातही त्याचा प्रयोग साकारायला काय हरकत आहे? झालं. ठरलं. पहिलं पुस्तक वाचलं. त्याचा सारांश तयार केला आणि प्रयोग म्हणून आपल्या संपर्कातल्या पन्नासेक जणांना त्यानं तो व्हॉट्स् ऍपवर पाठवला. त्या पन्नास जणांनी त्यांच्या मित्रांना, त्यांनी त्यांच्या... असं करत करत हा पहिलाच प्रयोग हजारेक लोकांपर्यंत पोहोचला. त्या अनाहूत प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद उदंड म्हणावा असाच होता. त्यातून मिळालेली ऊर्जा पुढील प्रवासाठीची दिशा आणि प्रेरणा देणारी होती. ‘मेक इंडिया रीड’ मिशनलाही हळूहळू आकार प्राप्त होऊ लागला. अमृतचे काम आपसूकच वाढले होते. दर आठवड्यात एका पुस्तकाचा फडशा पाडायचा. मग त्यातील मजकुराचा सारांश शब्दबद्ध करायचा. तो हजारो लोकांना पोस्ट करायचा... कामं काय थोडी होती या उपक्रमात? पण, सहज म्हणून एकदा आढावा घेतला तर लक्षात आलं की, पुस्तकं वाचण्याचा कंटाळा करणारी माणसं वेगवेगळी कारणं पुढे करत, हा सारांश वाचायचाही कंटाळाच करताहेत. यावर उपाय शोधायला हवा असं वाटू लागलं. या गरजेतून एका नव्या कल्पनेचा जन्म झाला. आता पुस्तकांचा लिखित स्वरूपातील सारांश ऑडिओ क्लिपच्या माध्यमातूनही पाठवला जाऊ लागला. महिलांना स्वयंपाक करता करता, कुणाला गाडीत, बसमध्ये... असे कुठेही, सवडीनुसार पुस्तक ‘ऐकण्याची’ सोय उपलब्ध झाली. या प्रयोगानं तर धमालच केली. मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांच्या उड्या पडू लागल्या. दरम्यान, व्हॉटस् ऍपवरून मजकूर पाठविण्याच्या मर्यादेचे तांत्रिक कारणही आडवे आले. काही काळासाठी त्याचा नंबरही ब्लॉक करण्यात आला. पण, आयटी क्षेत्रातील काही तज्ज्ञ मित्रांच्या मदतीने त्यावरचा उपाय शोधला गेला. ‘बुकलेट’ नावाच्या मोबाईल ऍपची निर्मिती, ही या समस्येच्या उत्तराच्या शोधादाखल झालेल्या धडपडीची देण... ऑडिओ क्लिप आणि ऍपमुळे वाचलेली पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचविणं सोपं झालं आणि या मिशनशी जोडल्या गेलेल्यांची संख्याही त्यामुळे वाढली. या कामी मदत करण्याकरिता अमृतच्या साथीला फरीद सय्यद आणि सुशील धनावडे यासारखे मित्र उभे राहिले. हातातल्या नोकर्‍या सोडून... पुस्तकं निवडण्यापासून तर ऑडिओ क्लिप तयार करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत त्याला मदत करू लागले. या मिशनची कीर्ती ऐकल्यानंतर अमृतच्या ठाण्याच्या पत्त्यावर स्वत:हून पुस्तकं पाठवून देणार्‍या लेखक, प्रकाशकांची संख्याही एव्हाना वाढली. अगदी, घरात लायब्ररी तयार व्हावी इतकी... एकदा रात्री एक फोन आला. फोन एका युवतीचा होता. अमृतच्या आवाजाचा गोडवा अजूनही तिच्या कानात रुंजी घालत असावा बहुधा. ती म्हणाली, मी तुझ्या क्लिप्स नेहमी ऐकते. छान असतात. तुझ्यामुळे कितीतरी पुस्तकं मला ऐकता आली आहेत. तिचा ‘ऐकण्या’वरचा भर ऐकून तो म्हणाला. अगं नुसतं ऐकतेस काय, कधीतरी वाचतही जा...! ती म्हणाली, अरे मी आंधळी आहे. मला वाचता नाही येत... म्हणूनच ‘ऐकते’ मी, तू पाठविलेली पुस्तकं. एकच क्षण... तिचं ते एकच वाक्य... काळीज चिरून गेलं... क्षणभर थबकलाच तो. आणि आता भारतातल्या सुशिक्षित अंधांना ही पुस्तकं कशी वाचता येतील यासाठीची धडपड सुरू केलीय् त्यानं... तो म्हणतो आता मी एकही पैसा कमावत नाही. तरीही समाधान मात्र लाखमोलाचं मिळवतो...