कालौघात घडून आलेला हा बदल असेल कदाचित, पण कुठलेही काम पदाविना, पैशाशिवाय, त्याआडून मिळणार्या मानसन्मानाशिवाय करण्यात रस राहिलेला नाही आताशा इथे लोकांना. घरादारावर तुळशीपत्र ठेवून, क्वचितप्रसंगी बंडाचे निशाण फडकावून वैचारिक लढे लढायला, चळवळी उभारायला, आपले ईप्सित साध्य करायला बाहेर पडलेल्या, त्यासाठी सर्वपरित्याग करत स्वत:ला झोकून देणार्या लढवय्यांच्या त्या झुंडी काही औरच होत्या. आता तर अंधाराच्या पखाली वाहणार्या सूर्यांची गर्दी झालीय् सगळीकडे! तळपणार्या तलवारीची धार लाभलेल्या शब्दांतून अंगार फुलविण्याची क्षमता ठायी असलेल्या साहित्याची, सारा आसमंत व्यापून टाकण्याची ताकद लाभलेल्या काव्यप्रतिभेची, रसिकांच्या मनाचा ठाव घेण्याचे बळ लाभलेल्या अभिरुचिसंपन्न कलेची उपासना करणार्या कलावंतांची जराशीही उणीव नसताना, राज ठाकरे म्हणतात तशी, व्यवस्थेला भीक न घालता कुठल्याशा मुद्यावर ठाम भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणार्या मंडळींची जाणवणारी वानवा खरोखरीच मनं अस्वस्थ करणारी आहे.
‘‘एक काळ असा होता की, महाराष्ट्रात घडणार्या वेगवेगळ्या सामाजिक घडामोडींवर इथले लेखक, साहित्यिक, कवी, कलावंत ठाम भूमिका घ्यायचे. गरज पडली तर रस्त्यावर उतरायचे. आता तसे साहित्यिकच राहिले नाहीत. जे आहेत ते कुठली भूमिकाच घेत नाहीत…’’
बोचरी टीका म्हणा वा मग तसलीच काहीशी खंत, ती या शब्दांत व्यक्त झाली आहे. मनसेचे सर्वेसर्वा आणि व्यंग्यचित्रकार म्हणून कलावंतांच्या श्रेणीत बसणारे राज ठाकरे यांच्या बोलण्यातून ही भावना परवा जाहीरपणे व्यक्त झाली. कार्यक्रमाचे स्वरूप ध्यानात घेत, त्यानुरूप भाषणं करण्याची शैली इथल्या राजकारण्यांना चांगलीच साधली आहे एव्हाना. तरीही राज ठाकरेंच्या या विधानातले केवळ गांभीर्यच नाही, तर मर्मही दखलपात्र म्हणावे असेच आहे. समाजातली ही कथित सुजाण मंडळी अनेक मुद्यांवर जाणीवपूर्वक मौन बाळगते. त्यांनी स्वीकारलेल्या त्यांच्या भूमिकेत त्या क्षणीची सोय असते अनेकदा. कित्येकदा त्या भूमिकेला राजकीय अँगल असतो. काही वेळेला ती गरज असते… त्या क्षणाची. अशी, गरज पाहून, वेळ पाहून भूमिका ठरवणारे लोक कुठल्याशा एखाद्या मुद्यावर ठामपणे लढा देतीलच कसे?
दरवर्षी शासनदरबारी याचना करून मिळवलेल्या अनुदानाच्या भरवशावर साजर्या होणार्या साहित्य संमेलनांच्या मंचावरून कुठल्याशा विचारांची ठाम मांडणी करीत कुणी व्यवस्थेविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची भाषा बोलेल, याची अपेक्षाच खरं तर चुकीची. तशा वृत्तीचे प्रदर्शन घडविण्यासाठी लागणार्या करारी बाण्याचीच मुळात वानवा जाणवतेय् अलीकडे. अंगात ती रग नाही असे नाही. धमण्यांतले रक्त सळसळत नाही असे नाही. पण, व्यवस्थेच्या माध्यमातून वाट्याला येणार्या किंवा येण्याची शक्यता असलेल्या मानमरातबीचा, साधन-सुविधांचा विचार नुसता मनाला शिवला, तरी तो बाणा नकळत क्षीण होत जातो. कायम शासकीय पुरस्कारांच्या रांगेत स्वत:ला बघणारी, पद्म पुरस्कारांकडे आस लावून बसलेली मंडळी कुठल्या लढाऊ बाण्याने सामाजिक मुद्यांवर भूमिका घेऊन रस्त्यांवर उतरणार बोला? इथे तर साहित्यवर्तुळातली नावाजलेली कर्तबगार मंडळीही राजकारणातल्या बड्या मंडळींच्या दरबारात हजर होताना, त्यांच्या सोबतीने उभे राहताना कशी हरखून गेलेली दिसते. तेवढ्यानेच त्यांची कॉलर नाही म्हटली तरी ताठ झालेली, चेहर्यावर नकळत एक प्रकारची चमक उमटलेली दिसते कित्येकांच्या. याला ना कवी-लेखकांचा अपवाद, ना नावाजलेल्या कलावंतांचा. मग राज ठाकरे म्हणतात तशी ठाम भूमिका घेणार कोण?
बरं, राजकारणात वावरणार्यांना तरी अशी ठाम भूमिका घेणारी माणसं आवडतात कुठे? त्यांनाही त्यांच्या शिरस्त्यात बसणारी, हुजरेगिरी करणारी, कारण असो वा नसो; टाळ्या पिटत कायम दाद देणारी माणसं हवी असतात त्यांना त्यांच्या दरबारात. अनेकदा तर शासकीय पुरस्कारांसाठीचे निकषही संबंधितांच्या लाळघोटेपणाच्या तीव्रतेवर ठरतात. अशा, राजकारण्यांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या मंडळीकडूनही कुठल्या क्रांतीची अपेक्षा बाळगायची? शेवटी हे खरेच की, जेव्हा एखाद्याच्या प्रवासाची दिशा सभोवतालची सत्ता निश्चित करते, तेव्हा त्याच्या विचारांचे पांगळेपण अटळ असते. तलवारीची धार बोथट अन् लढे मिळमिळीत होत जातात.
इथे मुद्दा, बदललेल्या परिस्थितीत बदललेल्या माणसांचाही आहेच. खरं तर विविध विचारधारांचे अबाधित स्थान, ही या देशाची मोठी ताकद राहिली आहे. तरीही आपण कुठल्याच विचारांचे पाईक नसल्याचे सांगण्यात रमलेली आणि तरीही त्या विचारांचे मोठेपण आपल्यात पुरेपूर सामावले असल्याचे सिद्ध करण्यासाठी धडपडण्यात धन्यता मानणारी मंडळी या समाजात संख्येने बरीच आहे. कालौघात घडून आलेला हा बदल असेल कदाचित, पण कुठलेही काम पदाविना, पैशाशिवाय, त्याआडून मिळणार्या मानसन्मानाशिवाय करण्यात रस राहिलेला नाही आताशा इथे लोकांना. घरादारावर तुळशीपत्र ठेवून, क्वचितप्रसंगी बंडाचे निशाण फडकावून वैचारिक लढे लढायला, चळवळी उभारायला, आपले ईप्सित साध्य करायला बाहेर पडलेल्या, त्यासाठी सर्वपरित्याग करत स्वत:ला झोकून देणार्या लढवय्यांच्या त्या झुंडी काही औरच होत्या. आता तर अंधाराच्या पखाली वाहणार्या सूर्यांची गर्दी झालीय् सगळीकडे! तळपणार्या तलवारीची धार लाभलेल्या शब्दांतून अंगार फुलविण्याची क्षमता ठायी असलेल्या साहित्याची, सारा आसमंत व्यापून टाकण्याची ताकद लाभलेल्या काव्यप्रतिभेची, रसिकांच्या मनाचा ठाव घेण्याचे बळ लाभलेल्या अभिरुचिसंपन्न कलेची उपासना करणार्या कलावंतांची जराशीही उणीव नसताना, राज ठाकरे म्हणतात तशी, व्यवस्थेला भीक न घालता कुठल्याशा मुद्यावर ठाम भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणार्या मंडळींची जाणवणारी वानवा खरोखरीच मनं अस्वस्थ करणारी आहे.
मनाच्या संवेदनेतून आणि क्षितिजापलीकडे बघण्याच्या द्रष्टेपणातून दूरवरचा विचार करण्याची क्षमता लाभलेल्या सावरकरांचा विचार आणि त्यासाठीचा त्यांचा आग्रह एखाद् वेळी परिस्थितीशी विसंगत वाटत असेलही कदाचित, पण त्यात दशकांच्या पलीकडचा विचार करण्याचे सामर्थ्य होते. बहुधा म्हणूनच त्यांच्या भूमिकेला अर्थ होता. वैचारिक प्रगल्भतेच्या वलयातून लाभलेली ताकद त्याच्या ठायी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात जवळपास सर्वांच्याच बाबतीत ही बाब लक्षात यायची. इंग्रजांविरुद्धचा लढा सशस्त्र लढायचा की नि:शस्त्र, एवढाच काय तो मतभेदाचा मुद्दा होता. बाकी सर्वांचे उद्दीष्ट समान होते. त्या वेळी सशस्त्र लढ्याचा आग्रह धरणारी मंडळी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वत:हूनच नि:शस्त्र लढ्याची भाषा बोलू लागली. कारण आता लढे स्वकीयांविरुद्धचे होते. एवढा ‘बदल’ सोडला, तर विचारांची तीव्रता आणि त्याच्या ठायी असलेले तत्त्वांचे अधिष्ठान तसूभरही ठिसूळ झालेले नव्हते. अन्यायाविरुद्धची चीड, त्याविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेला तो करारी बाणा अजूनही तसाच होता. बहुधा म्हणूनच कुठल्याही सामाजिक मुद्यावर स्वत:ची भूमिका ठामपणे मांडताना, त्यासाठीचा आग्रह तेवढ्याच तीव्रतेने धरताना ही मंडळी कायम अग्रेसर असायची. जराही डगमगायची नाही. विरोधी मतांचा आदर करतानाही ही मंडळी कधी माघारल्याचे चित्र नव्हते.
काळ बदलत गेला, तसतशी माणसं स्वत:भोवती केंद्रित होऊ लागली. नि:स्वार्थपणे लढण्याची, लढ्यात स्वत:ला झोकून देण्याची भूमिका यशापयशाची, फायद्या-तोट्याची गणितं मांडून घेतली जाऊ लागली. सामाजिक लढे वैयक्तिक चौकटीत बंदिस्त झाले. साधनशुचितेपेक्षाही साधनसुविधा अधिक प्रभावी ठरू लागल्या. सरकारविरुद्ध बोललं, तर मग साहित्यपरिषदेच्या पुरस्कारांच्या यादीतून आपले नाव वगळले जाण्याची भीती, काय करावे अन् काय नको, ते ठरवू लागली. पद्म पुरस्कारांची आस अन्यायाविरुद्ध मूग गिळून गप्प बसण्यास भाग पाडू लागली अन् मग करारी बाणे आपसूकच क्षीण होत गेले. वैचारिक मतभेदांची पातळी रसातळाला गेली. राजकारणापुढे राष्ट्रकारण थिटे ठरले अन् मग देशविरोधात भूमिका घेणारा कन्हैयाही हिरो ठरवला गेला! तसे झाले तरी त्याविरुद्ध ब्र काढायचा नाही! बोललात की लागलीच लोक तुम्हाला कुठल्याशा विचारधारेच्या चौकटीत बंदिस्त करणार. बाजूने बोलणार्यांच्या विचारांची कूस आधीच जगजाहीर झालेली. याही परिस्थितीत मौन साधणार्यांनी-राज ठाकरेंच्या भाषेत भूमिकाच न घेणार्यांनी- नेमके काय साधले, त्यांचे त्यांनाच ठाऊक! पण, अशांची संख्या दिवसागणिक वाढतेय्, हे मात्र खरे! ज्यांच्या साहित्यनिर्मितीत, कलेत अजूनही निखार्यांची धग कायम आहे, त्यांना दावणीला बांधण्याचे प्रयत्न कधी राजकीय व्यवस्थेने केले, तर कधी परिस्थितीने त्यांना हतबल केले. पण या स्थितीत, कशालाही न बधता, कशाचीही तमा न बाळगता, स्वत:चा मार्ग चोखाळणारी मंडळी, संख्येने कमी असली, तरी आपला बाणा आणि अस्तित्व कायम राखून आहे अजूनही… राज ठाकरेंनी व्यक्त केलेली सल, ती खंत… बाद ठरविण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी आता…