Friday, November 25, 2016

बोथट धार अन् क्षीण लढे…

कालौघात घडून आलेला हा बदल असेल कदाचित, पण कुठलेही काम पदाविना, पैशाशिवाय, त्याआडून मिळणार्‍या मानसन्मानाशिवाय करण्यात रस राहिलेला नाही आताशा इथे लोकांना. घरादारावर तुळशीपत्र ठेवून, क्वचितप्रसंगी बंडाचे निशाण फडकावून वैचारिक लढे लढायला, चळवळी उभारायला, आपले ईप्सित साध्य करायला बाहेर पडलेल्या, त्यासाठी सर्वपरित्याग करत स्वत:ला झोकून देणार्‍या लढवय्यांच्या त्या झुंडी काही औरच होत्या. आता तर अंधाराच्या पखाली वाहणार्‍या सूर्यांची गर्दी झालीय् सगळीकडे! तळपणार्‍या तलवारीची धार लाभलेल्या शब्दांतून अंगार फुलविण्याची क्षमता ठायी असलेल्या साहित्याची, सारा आसमंत व्यापून टाकण्याची ताकद लाभलेल्या काव्यप्रतिभेची, रसिकांच्या मनाचा ठाव घेण्याचे बळ लाभलेल्या अभिरुचिसंपन्न कलेची उपासना करणार्‍या कलावंतांची जराशीही उणीव नसताना, राज ठाकरे म्हणतात तशी, व्यवस्थेला भीक न घालता कुठल्याशा मुद्यावर ठाम भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणार्‍या मंडळींची जाणवणारी वानवा खरोखरीच मनं अस्वस्थ करणारी आहे.

‘‘एक काळ असा होता की, महाराष्ट्रात घडणार्‍या वेगवेगळ्या सामाजिक घडामोडींवर इथले लेखक, साहित्यिक, कवी, कलावंत ठाम भूमिका घ्यायचे. गरज पडली तर रस्त्यावर उतरायचे. आता तसे साहित्यिकच राहिले नाहीत. जे आहेत ते कुठली भूमिकाच घेत नाहीत…’’
बोचरी टीका म्हणा वा मग तसलीच काहीशी खंत, ती या शब्दांत व्यक्त झाली आहे. मनसेचे सर्वेसर्वा आणि व्यंग्यचित्रकार म्हणून कलावंतांच्या श्रेणीत बसणारे राज ठाकरे यांच्या बोलण्यातून ही भावना परवा जाहीरपणे व्यक्त झाली. कार्यक्रमाचे स्वरूप ध्यानात घेत, त्यानुरूप भाषणं करण्याची शैली इथल्या राजकारण्यांना चांगलीच साधली आहे एव्हाना. तरीही राज ठाकरेंच्या या विधानातले केवळ गांभीर्यच नाही, तर मर्मही दखलपात्र म्हणावे असेच आहे. समाजातली ही कथित सुजाण मंडळी अनेक मुद्यांवर जाणीवपूर्वक मौन बाळगते. त्यांनी स्वीकारलेल्या त्यांच्या भूमिकेत त्या क्षणीची सोय असते अनेकदा. कित्येकदा त्या भूमिकेला राजकीय अँगल असतो. काही वेळेला ती गरज असते… त्या क्षणाची. अशी, गरज पाहून, वेळ पाहून भूमिका ठरवणारे लोक कुठल्याशा एखाद्या मुद्यावर ठामपणे लढा देतीलच कसे?
दरवर्षी शासनदरबारी याचना करून मिळवलेल्या अनुदानाच्या भरवशावर साजर्‍या होणार्‍या साहित्य संमेलनांच्या मंचावरून कुठल्याशा विचारांची ठाम मांडणी करीत कुणी व्यवस्थेविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची भाषा बोलेल, याची अपेक्षाच खरं तर चुकीची. तशा वृत्तीचे प्रदर्शन घडविण्यासाठी लागणार्‍या करारी बाण्याचीच मुळात वानवा जाणवतेय् अलीकडे. अंगात ती रग नाही असे नाही. धमण्यांतले रक्त सळसळत नाही असे नाही. पण, व्यवस्थेच्या माध्यमातून वाट्याला येणार्‍या किंवा येण्याची शक्यता असलेल्या मानमरातबीचा, साधन-सुविधांचा विचार नुसता मनाला शिवला, तरी तो बाणा नकळत क्षीण होत जातो. कायम शासकीय पुरस्कारांच्या रांगेत स्वत:ला बघणारी, पद्म पुरस्कारांकडे आस लावून बसलेली मंडळी कुठल्या लढाऊ बाण्याने सामाजिक मुद्यांवर भूमिका घेऊन रस्त्यांवर उतरणार बोला? इथे तर साहित्यवर्तुळातली नावाजलेली कर्तबगार मंडळीही राजकारणातल्या बड्या मंडळींच्या दरबारात हजर होताना, त्यांच्या सोबतीने उभे राहताना कशी हरखून गेलेली दिसते. तेवढ्यानेच त्यांची कॉलर नाही म्हटली तरी ताठ झालेली, चेहर्‍यावर नकळत एक प्रकारची चमक उमटलेली दिसते कित्येकांच्या. याला ना कवी-लेखकांचा अपवाद, ना नावाजलेल्या कलावंतांचा. मग राज ठाकरे म्हणतात तशी ठाम भूमिका घेणार कोण?
बरं, राजकारणात वावरणार्‍यांना तरी अशी ठाम भूमिका घेणारी माणसं आवडतात कुठे? त्यांनाही त्यांच्या शिरस्त्यात बसणारी, हुजरेगिरी करणारी, कारण असो वा नसो; टाळ्या पिटत कायम दाद देणारी माणसं हवी असतात त्यांना त्यांच्या दरबारात. अनेकदा तर शासकीय पुरस्कारांसाठीचे निकषही संबंधितांच्या लाळघोटेपणाच्या तीव्रतेवर ठरतात. अशा, राजकारण्यांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या मंडळीकडूनही कुठल्या क्रांतीची अपेक्षा बाळगायची? शेवटी हे खरेच की, जेव्हा एखाद्याच्या प्रवासाची दिशा सभोवतालची सत्ता निश्‍चित करते, तेव्हा त्याच्या विचारांचे पांगळेपण अटळ असते. तलवारीची धार बोथट अन् लढे मिळमिळीत होत जातात.
इथे मुद्दा, बदललेल्या परिस्थितीत बदललेल्या माणसांचाही आहेच. खरं तर विविध विचारधारांचे अबाधित स्थान, ही या देशाची मोठी ताकद राहिली आहे. तरीही आपण कुठल्याच विचारांचे पाईक नसल्याचे सांगण्यात रमलेली आणि तरीही त्या विचारांचे मोठेपण आपल्यात पुरेपूर सामावले असल्याचे सिद्ध करण्यासाठी धडपडण्यात धन्यता मानणारी मंडळी या समाजात संख्येने बरीच आहे. कालौघात घडून आलेला हा बदल असेल कदाचित, पण कुठलेही काम पदाविना, पैशाशिवाय, त्याआडून मिळणार्‍या मानसन्मानाशिवाय करण्यात रस राहिलेला नाही आताशा इथे लोकांना. घरादारावर तुळशीपत्र ठेवून, क्वचितप्रसंगी बंडाचे निशाण फडकावून वैचारिक लढे लढायला, चळवळी उभारायला, आपले ईप्सित साध्य करायला बाहेर पडलेल्या, त्यासाठी सर्वपरित्याग करत स्वत:ला झोकून देणार्‍या लढवय्यांच्या त्या झुंडी काही औरच होत्या. आता तर अंधाराच्या पखाली वाहणार्‍या सूर्यांची गर्दी झालीय् सगळीकडे! तळपणार्‍या तलवारीची धार लाभलेल्या शब्दांतून अंगार फुलविण्याची क्षमता ठायी असलेल्या साहित्याची, सारा आसमंत व्यापून टाकण्याची ताकद लाभलेल्या काव्यप्रतिभेची, रसिकांच्या मनाचा ठाव घेण्याचे बळ लाभलेल्या अभिरुचिसंपन्न कलेची उपासना करणार्‍या कलावंतांची जराशीही उणीव नसताना, राज ठाकरे म्हणतात तशी, व्यवस्थेला भीक न घालता कुठल्याशा मुद्यावर ठाम भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणार्‍या मंडळींची जाणवणारी वानवा खरोखरीच मनं अस्वस्थ करणारी आहे.
मनाच्या संवेदनेतून आणि क्षितिजापलीकडे बघण्याच्या द्रष्टेपणातून दूरवरचा विचार करण्याची क्षमता लाभलेल्या सावरकरांचा विचार आणि त्यासाठीचा त्यांचा आग्रह एखाद् वेळी परिस्थितीशी विसंगत वाटत असेलही कदाचित, पण त्यात दशकांच्या पलीकडचा विचार करण्याचे सामर्थ्य होते. बहुधा म्हणूनच त्यांच्या भूमिकेला अर्थ होता. वैचारिक प्रगल्भतेच्या वलयातून लाभलेली ताकद त्याच्या ठायी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात जवळपास सर्वांच्याच बाबतीत ही बाब लक्षात यायची. इंग्रजांविरुद्धचा लढा सशस्त्र लढायचा की नि:शस्त्र, एवढाच काय तो मतभेदाचा मुद्दा होता. बाकी सर्वांचे उद्दीष्ट समान होते. त्या वेळी सशस्त्र लढ्याचा आग्रह धरणारी मंडळी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वत:हूनच नि:शस्त्र लढ्याची भाषा बोलू लागली. कारण आता लढे स्वकीयांविरुद्धचे होते. एवढा ‘बदल’ सोडला, तर विचारांची तीव्रता आणि त्याच्या ठायी असलेले तत्त्वांचे अधिष्ठान तसूभरही ठिसूळ झालेले नव्हते. अन्यायाविरुद्धची चीड, त्याविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेला तो करारी बाणा अजूनही तसाच होता. बहुधा म्हणूनच कुठल्याही सामाजिक मुद्यावर स्वत:ची भूमिका ठामपणे मांडताना, त्यासाठीचा आग्रह तेवढ्याच तीव्रतेने धरताना ही मंडळी कायम अग्रेसर असायची. जराही डगमगायची नाही. विरोधी मतांचा आदर करतानाही ही मंडळी कधी माघारल्याचे चित्र नव्हते.
काळ बदलत गेला, तसतशी माणसं स्वत:भोवती केंद्रित होऊ लागली. नि:स्वार्थपणे लढण्याची, लढ्यात स्वत:ला झोकून देण्याची भूमिका यशापयशाची, फायद्या-तोट्याची गणितं मांडून घेतली जाऊ लागली. सामाजिक लढे वैयक्तिक चौकटीत बंदिस्त झाले. साधनशुचितेपेक्षाही साधनसुविधा अधिक प्रभावी ठरू लागल्या. सरकारविरुद्ध बोललं, तर मग साहित्यपरिषदेच्या पुरस्कारांच्या यादीतून आपले नाव वगळले जाण्याची भीती, काय करावे अन् काय नको, ते ठरवू लागली. पद्म पुरस्कारांची आस अन्यायाविरुद्ध मूग गिळून गप्प बसण्यास भाग पाडू लागली अन् मग करारी बाणे आपसूकच क्षीण होत गेले. वैचारिक मतभेदांची पातळी रसातळाला गेली. राजकारणापुढे राष्ट्रकारण थिटे ठरले अन् मग देशविरोधात भूमिका घेणारा कन्हैयाही हिरो ठरवला गेला! तसे झाले तरी त्याविरुद्ध ब्र काढायचा नाही! बोललात की लागलीच लोक तुम्हाला कुठल्याशा विचारधारेच्या चौकटीत बंदिस्त करणार. बाजूने बोलणार्‍यांच्या विचारांची कूस आधीच जगजाहीर झालेली. याही परिस्थितीत मौन साधणार्‍यांनी-राज ठाकरेंच्या भाषेत भूमिकाच न घेणार्‍यांनी- नेमके काय साधले, त्यांचे त्यांनाच ठाऊक! पण, अशांची संख्या दिवसागणिक वाढतेय्, हे मात्र खरे! ज्यांच्या साहित्यनिर्मितीत, कलेत अजूनही निखार्‍यांची धग कायम आहे, त्यांना दावणीला बांधण्याचे प्रयत्न कधी राजकीय व्यवस्थेने केले, तर कधी परिस्थितीने त्यांना हतबल केले. पण या स्थितीत, कशालाही न बधता, कशाचीही तमा न बाळगता, स्वत:चा मार्ग चोखाळणारी मंडळी, संख्येने कमी असली, तरी आपला बाणा आणि अस्तित्व कायम राखून आहे अजूनही… राज ठाकरेंनी व्यक्त केलेली सल, ती खंत… बाद ठरविण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी आता…

Friday, November 18, 2016

रांगेत कधी नव्हतो आम्ही?

     रांगेत उभे राहावे लागलेल्यांच्या हिताची भाषा बोलणारे लोक त्यांच्या स्वार्थाचे राजकारण करताहेत. या निमित्ताने सरकारला विरोध करण्याची संधी साधताहेत. कालपर्यंत त्यांनी किती बूज राखली होती या सर्वसामान्य लोकांची? अन् आज अचानक का हृदयं पिळवटून निघताहेत त्यांची गरिबांसाठी? वर म्हटल्याप्रमाणे, रांगेत कधी नव्हते या देशातले सामान्य लोक? याच्या उलट, राहुल गांधींच्या वाट्याला कधी आले असे रांगेत उभे राहणे सांगा? तिरुपती मंदिरात की एखाद्या सरकारी रुग्णालयात? कुठे रांग लावावी लागली गांधींना आजवर? दुसरीकडे, सामान्यांच्या नशिबी आलेल्या रांगा, हे तर कॉंग्रेसच्या कालपर्यंतच्या राजवटीचे दुष्परिणाम आहेत. याच सामान्यांच्या जिवावर चालणारी राजकीय नेत्यांची चैन काय बघितली नाही आम्ही? आमच्याच अंगावर धुराळा उडवून निघून जाणारे यांच्या गाड्यांचे ताफे काय बघितले नाहीत आम्ही? कालपर्यंंत कधी वाहिली त्यांनी आमची चिंता? अन् आज अचानक घळाघळा अश्रू गळताहेत त्यांच्या डोळ्यांतून आमच्यासाठी? नौटंकीबाज लेकाचे!             
त्यांचा’ आक्षेप, सरकारने बंद केलेल्या नोटा जमा करण्यासाठी वा मग त्या बदलविण्यासाठी बँकांपुढे लागणार्‍या लांबलचक रांगांवर आहे. आपल्याच हक्काचा पैसा काढण्यासाठी नागरिकांना अशी रांग लावावी लागावी, तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागावे, हे ‘त्यांना’ मुळीच पटलेले नाही. या रांगेतील जनतेचा कधी नव्हे इतका कळवळा त्यांना आज आला आहे. या जनतेला कधीकाळी आपणच केरोसीनपासून तर गॅस सिलेंडरच्या लांबलचक रांगांमध्ये उभे राहायला भाग पाडले होते, याचाही त्यांना आता सोयिस्कर रीत्या विसर पडला आहे. जणूकाय हाश्श-हुश्श करत, कपाळावरचा घाम पुसत, प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत लोक पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलेत…! मुळात, पाचशे आणि हजाराच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याच्या निर्णयावर जो आनंदोत्सव सर्वदूर निर्माण झाला होता, त्या आनंदाच्या लाटेने काहींना उद्भवलेला पोटशूळ आता या कनवळ्यातून व्यक्त होतोय् की काय, असा प्रश्‍न पडतो.
बदलल्या नोटा. मग आला का काळा पैसा बाहेर? असले प्रश्‍न विचारताहेत ते. इतके दिवस स्वत: कधी या मुद्याला हात घातला नाही. पण, आता मात्र काळा पैसा चार दिवसांतच बाहेर आलेला हवाय् त्यांना! श्रीमंत लोक कुठे दिसताहेत बँकांपुढच्या रांगेत? इथे तर सारे गरीब, मध्यमवर्गीय लोकच रांगा लावून उभे आहेत असे म्हणत, हा निर्णय घेऊन सरकारने इथल्या सामान्य नागरिकांना रस्त्यांवर आणून कसे उभे केले, याचे अतिशयोक्त वर्णन करीत सुटले आहेत ते. शे-दोनशे कार्यकर्त्यांचा गराडा सोबतीला घेऊन, कुठल्याशा महागड्या गाडीने येऊन चार हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभे राहणे, ही तर राहुल गांधींची नौटंकी आहे. असली नौटंकी ही त्यांची राजकीय अपरिहार्यता असेलही कदाचित, पण एरवी या देशातला श्रीमंतवर्ग कधी कुठल्या रांगेत उभा राहिला आहे हो? उलट, त्यांच्यासाठी तर सार्‍या सुविधा दिमतीला उभ्या राहतात- अगदी रांगेत! अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा चुकून एखादा अपवाद सोडला, तर शिकायला म्हणून विदेशात गेलेली पोरं नेमकी कुठल्या घरातली होती याचा अंदाज घेतला, तर ही बाब सहज लक्षात येते. स्वातंत्र्योत्तर काळातही सामान्यांच्या मागचा रांगांचा ससेमिरा सुटला कुठे होता? केरोसीनपासून तर गॅस सिलेंडरपर्यंत अन् सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानापासून तर पेरण्यांसाठीचे कर्ज मिळविण्यापर्यंत… रांगा कुठे नव्हत्या सांगा ना! मुंबईसारख्या शहरात तर स्मशानघाटावर अंत्यसंस्कारासाठी प्रेतांच्याही रांगा लागतात! साध्या बसमधून प्रवास करण्यासाठीही स्टॅण्डवर आला की गुमान रांगेत उभा राहतो मुंबईकर माणूस. ही परिस्थिती बदलण्याची ज्यांना कधी गरज वाटली नाही ती सारी मंडळी, आज एका चांगल्या कारणासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागले, तर एवढा गहजब का माजवताहे? बेंबीच्या देठापासूनची ही ओरड नेमकी कुणाची, कुणासाठी अन् का सुरू आहे?
बरं, लोकांची मानसिकता तरी कुठे वेगळी आहे? देशाचं वाटोळं झालं तरी चालेल, पण आम्हाला झळ बसायला नको. बलिदान द्यायचं ते सीमेवर लढणार्‍या सैनिकांनी. आम्हाला दोन तास रांगेत उभे राहणेही नको. ताब्यात असलेला मसूद अझहरसारखा कुख्यात अतिरेकी सोडावा लागला तरी चालेल, पण अफगाणिस्तानात अपहरण झालेल्या विमानातून पहिले आमचे नातेवाईक सोडवा, असे म्हणणारे लोक पंतप्रधानांच्या घरासमोर धरणे देऊन बसतात. शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मेणबत्त्या पेटवण्याकरिता सरसावलेली जमातही दुर्दैवाने हीच असते. स्वातंत्र्यानंतर हीच मानसिकता तयार झालीय् आमची. समाजसेवा करणारे लोक वेगळे, राजकारण करणारी घराणी वेगळी, आमचा त्यांच्याशी सुतराम संबंध नाही. तो आमचा प्रांतही नाही, असे मानून स्वत:च्या बंदिस्त चौकटीत जीवन जगणारी पराभूत मानसिकतेची माणसं कालपर्यंतच्या इथल्या व्यवस्थेनं निर्माण केली आहेत. अशी मानसिकता जोपासणारे लोक ही नेहरू-गांधी घराण्याच्या राजकारणाची सोय आणि गरज असावी बहुधा. म्हणूनच ती जोपासण्याचाच प्रयत्न झाला आजवर. कारण सामान्य लोक रस्त्यावर उतरले, त्यांनी बंडाचे निशाण फडकावले, तर घडणार्‍या परिणामांची झळ कुणाला बसेल, याबाबत यत्किंचितही शंका त्यांच्या मनात नव्हतीच कधी. म्हणून, हा सामान्य माणूस त्याच्याच विवंचनेत कसा गुंतलेला राहील, स्वत:च्या समस्यांपलीकडे तो कसला विचारही करू शकणार नाही, याची तजवीज कॉंग्रेसच्या राज्यकर्त्यांनी कालपर्यंत केली. आणि दुर्दैव असे की, मतांच्या पलीकडे ज्यांनी या लोकांना कधी कवडीची किंमत दिली नाही, तेच लोक आता याच त्यांच्यासाठी गळा काढताहेत.
आणि समजा नोटा बदलविण्यासाठी चार तास रांगेत उभे राहावे लागले, तर काय आभाळ कोसळले? देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या एका कठोर, पण चांगल्या निर्णयाची परिणती आहे ती. या निर्णयाचे चांगले परिणाम भविष्यात दिसणार आहेत सार्‍या देशाला. त्यात आमचे योगदान ‘एवढेच’ असणार आहे. त्यालाही विरोधच करणार असू, तर मग समाज अन् देश बदलण्याची भाषा बोलण्याचा अधिकार नाही आम्हाला. लक्षात घ्या, रांगेत उभे राहावे लागलेल्यांच्या हिताची भाषा बोलणारे लोक त्यांच्या स्वार्थाचे राजकारण करताहेत. या निमित्ताने सरकारला विरोध करण्याची संधी साधताहेत. कालपर्यंत त्यांनी किती बूज राखली होती या सर्वसामान्य लोकांची? अन् आज अचानक का हृदयं पिळवटून निघताहेत त्यांची गरिबांसाठी? वर म्हटल्याप्रमाणे, रांगेत कधी नव्हते या देशातले सामान्य लोक? याच्या उलट, राहुल गांधींच्या वाट्याला कधी आले असे रांगेत उभे राहणे सांगा? तिरुपती मंदिरात की एखाद्या सरकारी रुग्णालयात? कुठे रांग लावावी लागली गांधींना आजवर? दुसरीकडे, सामान्यांच्या नशिबी आलेल्या रांगा, हे तर कॉंग्रेसच्या कालपर्यंतच्या राजवटीचे दुष्परिणाम आहेत. याच सामान्यांच्या जिवावर चालणारी राजकीय नेत्यांची चैन काय बघितली नाही आम्ही? आमच्याच अंगावर धुराळा उडवून निघून जाणारे यांच्या गाड्यांचे ताफे काय बघितले नाहीत आम्ही? कालपर्यंंत कधी वाहिली त्यांनी आमची चिंता? अन् आज अचानक घळाघळा अश्रू गळताहेत त्यांच्या डोळ्यांतून आमच्यासाठी? नौटंकीबाज लेकाचे!
देश कुठलाही असो, वरच्या पातळीवर झालेल्या एखाद्या निर्णयाचे परिणाम, इच्छा असो वा नसो, सर्वसामान्य लोकांच्या पदरी पडतातच. याच कॉंग्रेसने लादलेला, कुण्या चार-दोन लोकांना हवा असलेला, देशाच्या फाळणीचा निर्णय इच्छा नसतानाही सहन केलाच की या देशाने! केवळ सहनच केला नाही, तर त्याची झळ सोसली, त्याच्या वेदनाही सहन केल्या. त्यावेळेपेक्षा काही वाईट परिस्थिती उद्भवलेली नाही इथे आज. तरीही कांगावा मात्र चालला आहे त्यांचा. शेवटी, हा समाज, हा देश जर माझा आहे, तर त्यासाठीची गरज म्हणून एवढे सहन करण्याची तयारी तर मी दाखवलीच पाहिजे ना! एखादी व्यवस्था मुळापासून बदलायची म्हटलं, तर जरासा त्रास होतोच. पंतप्रधानांच्या भाषेत सांगायचं झालं तर- ‘‘आपले घर स्वच्छ करायला घेतले तरी बाहेर येणारा कचरा आणि उडणार्‍या धुळीचा त्रास होतोच!’’ इथे तर सारा देश स्वच्छ करायचा आहे. पण, काही नतद्रष्ट लोक मात्र त्या त्रासाचेच राजकारण करायला निघाले आहेत. जे कालपर्यंत खिजगणतीतही नव्हते, त्या गरिबांसाठी श्रीमंतांचा एक वर्ग अन् त्यांच्या आडून राजकारण करणारे लोक कधी नव्हे एवढे कनवाळू झालेले दिसताहेत. लोकांना प्रत्यक्षात होणार्‍या त्रासापेक्षाही त्यांना झालेला पोटशूळ मोठा आहे. परिस्थिती बघून, राजकारणाची गरज असेल तेव्हा आणि फक्त तेव्हाच सामान्यजनांचा असा कळवळा येणार्‍यांना भीक किती घालायची, हे ठरवण्याची वेळ मात्र आली आहे…!

Friday, November 11, 2016

काश्मिरी मुलांसाठी…

सारंग गोसावी. पुण्यातला इंजिनीअर. लेफ्टनन जनरल पाटणकरांच्या त्या भाषणानं कासावीस झालेला. प्रभावित होऊन लागलीच काश्मिरात पोहोचलेला. समाजासाठीच्या समर्पणाच्या भावनेने झपाटलेला. त्याच धडपडीतून त्यानं सुरू केलेल्या एका प्रयोगाला एव्हाना दीड दशक पूर्ण झालं आहे. सुरुवातीला तो एकटाच जायचा काश्मिरात. मग सोबतीला काही लोकांना नेणं सुरू झालं. त्यांना काश्मिरातील धगधगत्या वास्तवासोबतच तिथल्या गरजा, तिथल्या लोकांची मानसिकता या विषयीची जाणीव करून देण्याचा उद्देश होता. सारीच नाही, तरी त्यातली बरीच मंडळी हळूहळू या कामाशी जोडली जाऊ लागली. गुजरातपासून तर दिल्लीपर्यंत अन् डोंबीवलीपासून तर सांगली-सातार्‍यापर्यंतची तरुणाई या कामासाठी एकत्र येऊ लागली. बघता बघता आज ८८ जणांचा एक छान ग्रुप जमला आहे. पस्तिशीतला सारंग हा त्यातला वयाने सर्वात मोठा सदस्य. इतर सारे त्याहून कमी वयाचे. सर्व जण आपापल्या ठिकाणी नोकरी करणारे आणि तरीही वेळात वेळ काढून काश्मीर आणि पूर्वांचलात काम करणारे. अर्थात आता तिकडे काश्मिरातही शंभरेक स्थानिक कार्यकर्त्यांची टीम तयार झाली आहे. पूर्वांचलात सहकार्यासाठी पुढे आलेल्या तरुणांची संख्याही एव्हाना पाव शतकाच्या समोर सरकलेली.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वीचा तो प्रसंग असेल. नुकताच अभियंता झालेल्या एका उमद्या तरुणाचा पुण्यातल्या एका कार्यक्रमात सत्कार झाला होता. त्या वेळी काश्मिरात लष्करप्रमुख म्हणून कार्यरत असलेले पाटणकर त्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थित होते. काश्मिरातली तेव्हाची परिस्थिती लक्षात घेता, अशा तरुणांनी तिकडे येऊन सेवा दिली पाहिजे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केलं होतं. खरं तर सत्कार काही या एकट्या अभियंत्याचा नव्हता अन् भाषण ऐकणाराही काही तो एकटाच नव्हता. पण, भाषणाचा मथितार्थ मनावर घेऊन तिथनं बाहेर पडलेला मात्र तो एकटाच असावा बहुधा. कारण तिथनं बाहेर पडतानाच त्यानं मनाशी पक्की गाठ बांधली होती- अस्वस्थ काश्मिरात जाण्याची… तिथं काम करण्याची… घरी विचारलं. साहजिकच परवानगी नाकारली गेली. तर, गोव्यात जातो म्हणून सांगून काश्मिरात पोहोचला तो. ज्यांचं भाषण एकून तिथपर्यंत पोहोचला त्या पाटणकरांची भेट घेतली. तुमच्या म्हणण्यावरून मी इथं आलोय् हे सांगितलं, तर त्यांचाही विश्‍वासच बसेना. काहीशा तांत्रिक अडचणींमुळे, नंतर यायला सांगून त्यांनी या तरुणाला परत जायला सांगितले. तो पुण्यात परतलाही. पण, तसे माघारी येणे पाऽऽर जिव्हारी लागले होते. काही दिवसातच तो पुन्हा काश्मिरात पोहोचला. पहिल्या वेळी निदान तिथं जाऊन कुणालातरी भेटायचं होतं. त्यांच्या मदतीनं, सल्ल्यानं काम करायचं मनात होतं. या वेळी तर कुणाचाच आधार नव्हता. वाटेतल्या गावागावांतून भटकंती सुरू झाली. नजरेस पडेल त्याच्याशी बोलायचं. त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायचा. एखादा शाळकरी पोरगा दिसला की, चेहर्‍यावरची कळी नकळत खुलायची. त्याच्याशी गप्पा मारण्यात वेळ निघून जायचा. नंतरच्या काळात तर हाच दिनक्रम होऊन बसला. त्यांच्या आवडीच्या विषयांवर विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्याचा. यातूनच अलफयाजमधली बंद पडलेली एक शाळा सुरू झाली आणि सारंग गोसावी या तरुणाच्या पुढाकारातून ‘असीम’चा पायाही रोवला गेला…
कारण कधी बुरहान वानीच्या मृत्यूचे असते, तर कधी कुठल्याशा गोष्टीवरून उद्भवलेल्या परिस्थितीचे. जराशी हूल पुरेशी असते. हाताला काम नसलेली तरुणाई रस्त्यावर उतरते. कधी खरा तर कधी तद्दन खोटा असा संताप व्यक्त करते. पुष्कळदा असे वागले की, समजावण्यासाठी पुढे येणारे अधिकारी हातात पैसे ठेवतात. अनेकदा तर त्या पैशासाठीच ही पोरं रस्त्यावर उरतलेली असतात. या घटनाक्रमात कधी दोन महिन्यांसाठी तर कधी चार महिन्यांसाठी शाळा, शिक्षण वार्‍यावर सुटल्याची बाब नवलाईची राहिलेली नाही इथे. वानी प्रकरणात तर काश्मिरातल्या २४ शाळा जाळल्या गेल्यात. कित्येक गावांत गेले चार महिने पोरं शाळेकडे फिरकलीही नाहीत. या मुलांना परीक्षा देता यावी म्हणून त्यांच्यासाठी केंद्रांची उभारणी करण्याची मागणी काही कार्यकर्त्यांनी नुकतीच राज्यकर्त्यांकडे केली आहे. आणि हो! एक आणखी प्रयोग होतोय्. उद्भवलेल्या या परिस्थितीत इच्छा असूनही शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे नेऊन शिकवण्याचा. दरवर्षी निदान पन्नास विद्यार्थी काश्मीर, जम्मू, लेहमधून पुण्यात आणले जातात. इथल्या ज्ञानप्रबोधिनी, मिलेनियम अशा शाळेत इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. त्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले जातात.
सारंग गोसावी. पुण्यातला इंजिनीअर. लेफ्टनन जनरल पाटणकरांच्या त्या भाषणानं कासावीस झालेला. प्रभावित होऊन लागलीच काश्मिरात पोहोचलेला. समाजासाठीच्या समर्पणाच्या भावनेने झपाटलेला. त्याच धडपडीतून त्यानं सुरू केलेल्या एका प्रयोगाला एव्हाना दीड दशक पूर्ण झालं आहे. सुरुवातीला तो एकटाच जायचा काश्मिरात. मग सोबतीला काही लोकांना नेणं सुरू झालं. त्यांना काश्मिरातील धगधगत्या वास्तवासोबतच तिथल्या गरजा, तिथल्या लोकांची मानसिकता या विषयीची जाणीव करून देण्याचा उद्देश होता. सारीच नाही, तरी त्यातली बरीच मंडळी हळूहळू या कामाशी जोडली जाऊ लागली. गुजरातपासून तर दिल्लीपर्यंत अन् डोंबीवलीपासून तर सांगली-सातार्‍यापर्यंतची तरुणाई या कामासाठी एकत्र येऊ लागली. बघता बघता आज ८८ जणांचा एक छान ग्रुप जमला आहे. पस्तिशीतला सारंग हा त्यातला वयाने सर्वात मोठा सदस्य. इतर सारे त्याहून कमी वयाचे. सर्व जण आपापल्या ठिकाणी नोकरी करणारे आणि तरीही वेळात वेळ काढून काश्मीर आणि पूर्वांचलात काम करणारे. अर्थात आता तिकडे काश्मिरातही शंभरेक स्थानिक कार्यकर्त्यांची टीम तयार झाली आहे. पूर्वांचलात सहकार्यासाठी पुढे आलेल्या तरुणांची संख्याही एव्हाना पाव शतकाच्या समोर सरकलेली.
तसं तर काम प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात चाललेले. पण, म्हणून इतर कामं करायचीच नाहीत, असा काही कुणाचा हेका नाही. दर वेळी छोट्या छोट्या गोष्टींवरून रस्त्यावर उतरणार्‍या, दगडफेक करणार्‍या तरुणांशी प्रेमाने, आस्थेने बोलून, मनाच्या तारा जोडण्याचा प्रयत्न केल्याचा परिणाम हा झाला की, अक्रोड आणि सफरचंदाच्या बिस्किटांचे तीन छोटे उद्योग मोहनपुरा, बांदीपूर आणि सोपोरमध्ये उभे राहिले आहेत. यातील एक उद्योग तर खुद्द लष्कराच्या आग्रहावरून सुरू झाला. काम नसलेल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. या उद्योग उभारणीपासून तर ऑनलाईन करीअर गायडन्सचे वेगवेगळे प्रयोग ‘असीम फाऊंडेशन’च्या माध्यमातून चालले आहेत. तिकडच्या एखाद्या विद्यार्थ्याला भविष्यात डॉक्टर व्हायचं असेल, तर इकडच्या एखाद्या वैद्यकीय विद्यार्थ्याशी त्याला जोडून दिले जाते. त्याला हवी ती माहिती, हवे ते गायडन्स देण्याचे काम हा नवा मित्र करतो. आजघडीला निदान शंभर विद्यार्थी ई-फ्रेण्ड म्हणून एकमेकांच्या संपर्कात आले आहेत. येत्या काळात हा आकडा हजाराच्या घरात जावा, असा प्रयत्न असीम फाऊंडेशनच्या ‘अभिलाषा’ नामक प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे. शिक्षणात व्यत्यय आलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना पुण्यात आणून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून देण्याचा प्रयत्नही त्याच भावनेतून साकारलेला. जवळपास आठ वर्षे झालीत. दरवर्षी सुमारे पन्नास विद्यार्थ्यांचा एक गट पुण्यात येतो. किंबहुना आणला जातो. आवश्यक तेवढे दिवस ते विद्यार्थी इथे राहतात. इतर मुलांच्या बरोबरीने अभ्यास करतात. पुन्हा काश्मिरात परत जातात. अलीकडेच पूर्वांचलातील विद्यार्थ्यांसाठीही एका होस्टेलची व्यवस्था पुण्यात उभारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या वाढीव संख्येच्या हिशेबाने लवकरच या व्यवस्थेचा व्याप विस्तारण्याचा मानस व्यक्त होतोय्.
सारंगच्या शब्दोत सांगायचं झालं, तर काश्मिरातील परिस्थिती अगदीच काही वाईट नाही. प्रश्‍नांची संख्या आणि त्याचा परीघ वाढविण्यापेक्षा लोकांशी बोलून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, तर खालच्या पातळीवरच ते सुटतात. त्यामुळे समस्यांच्या गांभीर्याच्या कक्षा विस्तारण्यापेक्षा ती सोडविण्याच्या दृष्टीने ही टीम काम करतेय्.
कधीतरी काश्मिरातले काम बघून नागालॅण्डमध्ये काम करण्याचे निमंत्रण मिळाले होते. आता थेट अफगाणिस्तानवरून बोलावणे आले आहे. तिथल्या काही मुलींना माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले ज्ञान ऑनलाईन देण्याचा प्रयोग सुरू आहे. भविष्यात तिथल्या काही विद्यार्थिनी भारतात येतील, त्या वेळी स्थानिक संस्थांच्या मदतीने त्यांच्या प्रशिक्षणाचा संकल्प पूर्ण होईल आणि त्याच क्षणी पाया रचला जाईल अफगाणिस्तानातील एका उद्योग उभारणीचा याच मुलींच्या सहभागातून! त्यांच्याही पाठीशी उभी असेल भारतीय तरुणांची असीम फाऊंडेशन. असीम. सर्वच प्रकारच्या सीमांची बंधने झुगारून समाजकार्यासाठी सरसावलेली तरुणांची एक टीम…

Friday, November 4, 2016

एक शाळा फूटपाथवरची…!

त्या काळात रविवारी नागपुरात राहाणं असायचं. एखाद्या चौकातल्या सिग्नलजवळ गाडी उभी राहिली की लागलीच, हात पुढे करून उभे राहिलेले केविलवाणे चेहरे नजरेस पडायचे. समाजातल्या या घटकासाठीही काहीतरी केलं पाहिजे. निदान शिक्षणाच्या दालनापर्यंत तरी त्यांना नेऊन सोडलं पाहिजे, असा विचार मनात आला. मग रविवारचा दिवस नागपुरातल्या बर्डी, यशवंत स्टेडियम अशा परिसरात जाऊ लागला. तिथल्या वस्त्यांमध्ये राहणार्‍या पालकांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. त्यांच्यासमोर कल्पना मांडली तर ती कुणालाच मानवेना. सुरुवातीला तर लोक जवळच येईनात. चार पैसे घरात येतात, तो भिकेचा ‘धंदा’ बंद करून बिनपैशाच्या शाळेत कोण आपल्या पोरांना पाठवेल? पण प्रयत्न मात्र थांबले नव्हते. खडगपूरच्या आयआयटीतून शिक्षण पूर्ण झालेला हा उच्चपदस्थ अधिकारी दर रविवारी या झोपड्यांच्या दाराशी उभा राहायचा. त्यांची नकारघंटा सहन करायचा. त्यांची समजूत काढायचा. सोडवता न येणारी त्यांची गार्‍हाणी गुमान ऐकून घ्यायचा. पोरांचं भवितव्य घडविण्यासाठी त्यांना शाळेत पाठवणं किती आवश्यक आहे ते सांगण्यासाठी धडपड चाललेली असायची त्याची. जवळपास एक ते दीड वर्षांचा काळ पालकांच्या मनधरणीत गेल्यावर, त्यांच्या मनात जरासा विश्‍वास निर्माण झाल्यानंतर काही लोक तयार झाले. सुरुवातीला तर बोटावर मोजण्याइतक्याच पोरांची ‘शाळा’ सुरू झाली. रस्त्याच्या कडेला. भिकार्‍यांची पोरं, त्यांच्या घाणेरड्या अवतारात एका रांगेत बसलेली अन् हे ‘मास्तर’ त्यांना शिकवीत असलेले… रस्त्याने ये-जा करणारे लोक कुतूहलाने बघायचे. चुकून कुणीतरी आस्थेनं चौकशी करून जायचा. असले चौकशी करणारे लोकच पुढे या कार्यात जुळत गेले.

मागण्यासाठी म्हणून कायम कुणातरी समोर पसरवले जाणारे हात आता प्रार्थनेसाठी जोडले जाताहेत. मदतीसाठी आलेल्या लोकांकडील सामान लूट माजवल्यागत ओढून-ओरबाडून नेणारे लोक आता शांतपणे रांगेत उभे राहून त्या मदतीचा स्वीकार करताहेत. अंगावरच्या घाणेरड्या कपड्यांची जागा आता, नवे नसले तरी स्वच्छ कपडे घेताहेत. सकाळचे स्नान हा त्यांच्या दिवसभरातील कामांतला एक महत्त्वाचा आणि आवश्यक भाग ठरू लागला आहे. सकाळी उठलं की आहे त्या अवतारात भीक मागण्यासाठी चौकातल्या सिग्नल्सकडे वळणारी पावलं आता शाळांच्या दिशेनं वळताहेत. गेली काही वर्षे झालेल्या सततच्या प्रयत्नांचे ते फलित आहे. इंग्रजीतले अल्फाबीट्‌स, मराठीतली बाराखडी, आकड्यांच्या पाढ्यांचे औपचारिक शिक्षण तर खूप दूर… इथे तर कपडे नीट घालण्यापासून तर ‘मागण्याची’ सवय सोडविण्यापर्यंतच्या प्राथमिक शिक्षणाचेच धडे गिरवायचेत अजून. धंदा तर ठरलेला, भीक मागण्याचा. त्यासाठी लोकांपुढे पसरायला हातांची संख्या वाढेल तितके चांगले. त्यामुळे कुटुंब नियोजनाच्या सार्‍या सरकारी योजना धुडकावून जन्माला आलेली पोरं ती. सरकारने तयार केलेला शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा आपल्यालाही लागू होतो, हे तर त्यांच्या गावीही नसते. सरकारी यंत्रणेने राबविलेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेतही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही कधी कुणी. राहिला प्रश्‍न स्वच्छतेचा, तर त्याच्याशीही इथे कुणाला सोयरसुतक नसते. उलट अवतार जितका ओंगळवाणा, भीक मागणे तेवढेच सोपे… पण अवैधरीत्या वसलेल्या झोपड्यांमधली पोरं आता, हा सारा इतिहास मागे टाकून शाळेत धाडली जाऊ लागली आहेत. औपचारिक शिक्षणासाठी ज्यांना शाळेत पाठवले जाऊ शकत नाही, अशा मुलांसाठी त्यांच्या वस्तीच्या शेजारीच कुठल्याशा मोकळ्या जागेवर एक शाळा चालवली जाते. तास-दोन तासांची, उघड्यावरची ती शाळा. त्यांनी नावंच दिलंय् त्याला-‘फूटपाथ शाळा.’
नागपूरपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मौद्याच्या एनटीपीसीत कार्यरत असलेले एक आयआयटीयन वरुण श्रीवास्तव यांच्या कल्पनेतून साकारलेली एक संस्था म्हणजे ‘उपाय.’ उपायच्या माध्यमातून साकारलेले दोन उपक्रम….एक फूटपाथ शाळेचा. दुसरा ‘रीच ऍण्ड टीच’चा.
झाशीजवळच्या एका छोट्याशा खेड्यात राहून आयआयटीपर्यंतचा खडतर प्रवास केल्यानंतर आपसुकच शिक्षणाच्या मार्गातले खाचखळगे जाणवले होते. असले अडथळे जाणवणार्‍या आपल्या नंतरच्या पिढीतल्या सहकार्‍यांना जमेल तेवढे साह्यभूत ठरण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे ‘उपाय.’ सुरुवातीला मौद्याजवळच्या कुंभारी नावाच्या एका छोट्या गावात एका उपक्रमाची सुरुवात झाली. आजूबाजूच्या गावातील निदान पाचशे शाळकरी पोरांना त्यांच्या शालेय शिक्षणात साह्यभूत ठरेल असा शिकवणीवर्ग सुरू झाला. गावाकडची गरीब घरातली, शेतकरी-शेतमजुरांची, कंत्राटी मजुरांची पोरं या वर्गात यायची. वरुण श्रीवास्तव आणि त्यांचे सहकारी अभियंते वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून या मुलांना शिकवायचे. सुरुवातीला फारसा बदल जाणवला नाही, पण हळूहळू या वर्गातली मुलंही नव्वद टक्क्यांच्या वर गुण मिळवून यशाची पताका झळकवू लागले तेव्हा या वर्गांचं महत्त्व प्रकर्षानं जाणवलं अन् त्याची व्याप्तीही वाढत गेली.
त्या काळात रविवारी नागपुरात राहाणं असायचं. एखाद्या चौकातल्या सिग्नलजवळ गाडी उभी राहिली की लागलीच, हात पुढे करून उभे राहिलेले केविलवाणे चेहरे नजरेस पडायचे. समाजातल्या या घटकासाठीही काहीतरी केलं पाहिजे. निदान शिक्षणाच्या दालनापर्यंत तरी त्यांना नेऊन सोडलं पाहिजे, असा विचार मनात आला. मग रविवारचा दिवस नागपुरातल्या बर्डी, यशवंत स्टेडियम अशा परिसरात जाऊ लागला. तिथल्या वस्त्यांमध्ये राहणार्‍या पालकांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. त्यांच्यासमोर कल्पना मांडली तर ती कुणालाच मानवेना. सुरुवातीला तर लोक जवळच येईनात. चार पैसे घरात येतात, तो भिकेचा ‘धंदा’ बंद करून बिनपैशाच्या शाळेत कोण आपल्या पोरांना पाठवेल? पण प्रयत्न मात्र थांबले नव्हते. खडगपूरच्या आयआयटीतून शिक्षण पूर्ण झालेला हा उच्चपदस्थ अधिकारी दर रविवारी या झोपड्यांच्या दाराशी उभा राहायचा. त्यांची नकारघंटा सहन करायचा. त्यांची समजूत काढायचा. सोडवता न येणारी त्यांची गार्‍हाणी गुमान ऐकून घ्यायचा. पोरांचं भवितव्य घडविण्यासाठी त्यांना शाळेत पाठवणं किती आवश्यक आहे ते सांगण्यासाठी धडपड चाललेली असायची त्याची. जवळपास एक ते दीड वर्षांचा काळ पालकांच्या मनधरणीत गेल्यावर, त्यांच्या मनात जरासा विश्‍वास निर्माण झाल्यानंतर काही लोक तयार झाले. सुरुवातीला तर बोटावर मोजण्याइतक्याच पोरांची ‘शाळा’ सुरू झाली. रस्त्याच्या कडेला. भिकार्‍यांची पोरं, त्यांच्या घाणेरड्या अवतारात एका रांगेत बसलेली अन् हे ‘मास्तर’ त्यांना शिकवीत असलेले… रस्त्याने ये-जा करणारे लोक कुतूहलाने बघायचे. चुकून कुणीतरी आस्थेनं चौकशी करून जायचा. असले चौकशी करणारे लोकच पुढे या कार्यात जुळत गेले. थोडे थोडके नव्हे, सुमारे दोनशे कार्यकर्त्यांची टीम गेल्या चार वर्षांच्या काळात वरुण यांच्या साथीने या उपक्रमात सहभागी झाली आहे. सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकार्‍यांपासून तर कॉलेजात शिकवणार्‍या तरुण प्राध्यापकांपर्यंत. या वस्त्यांच्या आसपासच्या भागात राहणार्‍यांपासून तर सेमिनरी हिल्स सारख्या पॉश एरियात राहणार्‍या लोकांचा सहभाग या कार्यात लाभला आहे. आजघडीला नागपुरात आठ वस्त्यांत अशी फूटपाथवरची शाळा चालते.
उपक्रमात सहभागी सारेच कार्यकर्ते उदरनिर्वाहासाठी कुठे ना कुठे काम करणारे. त्यामुळे त्यांची कार्यालये सुरू होण्यापूर्वी किंवा संपल्यानंतरची वेळ या मुलांच्या शाळेची. भीक मागण्यासाठी सिग्नलवरच्या गाडीच्या खिडकीपाशी समोर केले जाणारे हात फूटपाथवरच्या या शाळेत ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ म्हणताना जोडले जातात, एवढे परिवर्तन गेल्या चार वर्षांत या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून घडले आहे. नागपूर रेल्वे स्थानकाजवळच्या एका वस्तीतील जवळपास पंचेवीस मुलं एव्हाना नियमितपणे शाळेत जाऊ लागली आहेत. पुष्कळदा तर त्यांना शाळेत पाठविण्याची तयारी, अगदी त्यांची आंघोळ घालून देण्यापासूनची तयारी हे कार्यकर्तेच करतात. महिनेवारीने लावलेला ऑटोवाला या पोरांना शाळेत घेऊन जातो. शाळा सुटली की त्यांना परत आणून सोडतो… दोनशे कार्यकर्त्यांच्या सहभागातून उभ्या झालेल्या टीमच्या माध्यमातून केवळ नागपुरातच नाही, तर आता पुणे, गुडगाव, वाराणशी, नाशकातही फूटपाथ शाळेचा प्रयोग यशस्वीरीत्या साकारलाय्. एकूण वीस केंद्रांवरच्या मुलांची बाराशेची संख्या बघितली की ‘राईट टु एज्युकेशन’ची दयनीय अवस्था ध्यानात येते. आणि हो! लवकरच मुंबईत अशी शाळा सुरू होऊ घातली आहे. शाळा कसली, जगण्याचे प्राथमिक धडे देणारे केंद्र ते. सकाळी उठल्यावर दात घासायचे इथपासून तर अंगावरचे कपडे स्वच्छ असावेत यासाठीचा आग्रह हाच या शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग. पण या मुलांना औपचारिक शिक्षणासाठी शाळेच्या दाराशी नेऊन सोडण्याचा अट्टहास मात्र आहे. फूटपाथवरची शाळा हा त्याचा प्राथमिक टप्पा आहे. तर ‘रीच ऍण्ड टीच’ चा उपक्रम मात्र शाळेत पोहोचलेल्या पण तरीही साधन, सुविधांच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या वंचितांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात साह्यभूत ठरण्याचा एक प्रयत्न आहे. त्याचेही प्रयोग नागपूर आणि वाराणशीत चालले आहेत. जी मुलं वयाच्या दृष्टीने शाळेत जाण्यास अपात्र आहेत, त्यांना केश कर्तनापासून तर मोबाईल फोन सुधरवण्याचे प्रशिक्षण देऊन स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्नही चाललाय्. उद्देश एकच भीक मागणारे हात मेहनतीत गुंतले पाहिजेत… हा प्रयोग साकारणारी टीमही हीच. ‘उपाय’ची…