Wednesday, August 19, 2020

संगीत मार्तंडाचा अस्त!    

 pandit_1  H x W

सुमारे पाव शतकापूर्वीचा तो प्रसंग. स्थळ नागपुरातले. डिसेंबर महिन्याच्या ऐन थंडीत एका मैदानात मंडप टाकून एक मैफल आयोजित करण्यात आली होती. कार्तिक आणि मार्गशीर्षाचा संगम पावसाच्या अकाली हजेरीने खुलला होता खरं तर! पण आयोजकांसाठी मात्र परीक्षेची घडी होती. कमालीच्या त्या थंडीतही कानसेन मात्र गर्दी करून राहिले होते. एव्हाना पाऊस थांबला असला तरी त्याचा प्रभाव अजून कायम होता. सरोदाची तार जुळवता जुळवता आणि त्यातून अपेक्षित सूर प्रतिध्वनित करता करता दमछाक होत होती साथसंगत करण्यासाठी म्हणून आलेल्या कलावंतांची. एव्हाना रात्रीचे नऊ वाजले होते. मंडपाच्या कापडातून गळणार्‍या पाण्याच्या धारांपासून स्वत:चा बचाव करत, स्वत:ला नखशिखांत झाकून घेत थंडीचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला श्रोतृवर्ग बघून पंडित जसराज भारावले नसते तरच नवल. अगदी थोड्यावेळापूर्वीपर्यंत धो धो बरसलेला पाऊस अन्‌ गारठायला व्हावं इतकी थंडी असूनही संगीतसाधनेला दाद द्यायला उपस्थित झालेला मोठ्या संख्येतला रसिक बघून, शेवटी ते म्हणाले, मी आज पैशासाठी गाणार नाहीय्‌. मी आज गाणार आहे, ते या मायबाप रसिकांसाठी... आणि मग पंडितजींचे सूर आणि टाळ्यांचा कडकडाट. त्यांची गायकी अन्‌ रसिकांची दाद, असाच क्रम सुरू राहिला. इतक्या दिवसांची तपश्चर्या जणू आज फळाला आली होती. एकामागून एक अशा बहारदार गीतांना सूर-तालाचा साज चढत होता आणि कानसेन तृप्त होत होते. फर्माइशीवर फर्माइशी होत होत्या. रंगलेल्या मैफलीला भैरवीचा साज चढला तेव्हा रात्रीचा काळोख उगवतीच्या दिशेने झेपावू लागला होता...



पंडित जसराज गेले... वादन आणि गायन अशा दोन्ही क्षेत्रातील अजरामर कलाकृतीतून संगीतक्षेत्राला श्रीमंती बहाल करणारा जयपुरातील मेवाती घराण्यातला दीपस्तंभ हरपला. सौंदर्यदृष्टी असलेले, उच्चकोटीचे रसिकत्व ल्यालेले, संगीत क्षेत्रातील एक चालते-बोलते संस्थान असलेले संगीत मार्तंड परवा स्मृतिशेष झाले. विश्वख्यातीच्या या कलावंताचा मृत्यू सातासमुद्रा पलीकडे, दूरस्थ न्यू जर्सीत झाला; पण पोरकेपण मात्र भारतीय संगीत जगताच्या वाट्याला आले. खरं तर पंडित जसराज हे मुळात तबलावादक होते. वेगवेगळ्या मैफलीत गायकाचं गाणं सुरेल अन्‌ श्रवणीय करण्यासाठी आवश्यक असलेली साथसंगत त्यांनी कित्येकदा साकारली होती. पण, गायकाच्या तुलनेत, ही साथसंगत करणार्‍यांना मिळणारी दुय्यम, िंकबहुना तुच्छ वागणूक मनाच्या कुठल्याशा कोपर्‍यात घर करून जायची. खंतावून जायची. कलासाधनेत गायनाइतकेच महत्त्व असलेल्या वादनाला कमी लेखण्याची ही तर्‍हा चटका लावून जायची. शेवटी एक दिवस त्यांनी ठरवलं. आपणही गायचं. थोरले बंधू मणिरामजी जसराज तेवढ्याच खंबीरपणे त्यांच्या साथीला उभे राहिले. गायनाच्या जगतातले बारकावे त्यांनी शिकवले आणि मग सुरू झाला, एका तबलावादकाचा गायनाच्या वाटेवरचा प्रवास. कालपर्यंत, तबल्यावरून फिरताच ताल आणि लयीची जादू सिद्ध करायला हाताची बोटं सरसवायची. आता गळ्यात भिजलेला सूर कमाल दाखवू लागला होता. एका तबला वादकातला गायक, वेगवेगळ्या रागांमधून शब्दांची बांधणीरसिकजनांसाठी आगळ्या पद्धतीनं मांडू लागला. एक तबलजी म्हणून ताल आणि लयीचा झालेला अभ्यास त्यांना गायनासाठी साह्यभूत ठरू लागला. कालपर्यंत गाणार्‍यांच्या सूरात तबल्याची साथ बंदिस्त करणारा वादक आता स्वत:च गायक झाला होता.

ईश्वरीय तत्वाला आवाहन करण्यासाठी उत्पत्ती झालेल्या सामवेदाचा आधुनिक अविष्कार घडविण्याचे श्रेय देता येईल इतके मोठे योगदान पंडितजींनी भारतीय संगीत क्षेत्राला दिले आहे. ऋचांतील अर्थपूर्ण अक्षरांना संगिताची साथ मिळाली अन्‌ पंडितजींच्या गळ्यातून ताला-सूरात त्याची बांधणी झाली की मग तर विचारायलाच नको. त्यांना संगीत मार्तंडाची उपाधी बहाल झाली ती, घनगंभीर गायकीसाठी. या क्षेत्रातील त्यांच्या कित्येक दशकांच्या साधनेसाठी. नाही म्हणायला जसराजांना संगिताचा वारसा लाभला होता. राजस्थानातील मेवाती घराणं त्याचसाठी प्रसिद्धी पावलं होतं. वडील पंडित मोतीराम राजदरबारात गायचे. भावाने तर त्यांना गायकीचे धडे दिले होते. इतर बंधूवर्गही उत्तम गायक आहेत. फक्त व्यावसायिक वाटेनं जाता न आल्याने प्रसिद्धीयोग त्यांच्या पदरी पडला नाही एवढेच. मुलगा शारंगदेव आणि मुलगी दुर्गाही कलेच्या याच दरबारात साधना करताहेत. संस्कृत श्लोक असोत, वेदांतील ऋचा असोत की, पुराणातील मंत्र, पंडितजींनी ते आपल्या मधूर गायकीतून अजरामर केले आहेत. नव्या युगात, पैसा कमावण्यासाठी म्हणून ‘सारे काही’ गाण्याची तयारी असलेले कलावंत वेगळे आणि ज्या काळात ‘यातून’ पैसा मिळेलही की नाही सांगता येत नव्हते, अशा स्थितीत शास्त्रीय आणि भक्तीसंगीतासाठी आपली अभिजात कलासंपन्नता पणाला लावण्याचे धाडस जसराजांनी केले.

 

आपल्या अमोघ वाणीतून, गोड गळ्यातून, संगीताच्या सखोल ज्ञानातून, तपश्चर्येतून त्यांनी भक्तीसंगीत एका उंचीवर नेऊन ठेवले. ‘‘और राग सब बने बाराती, दुल्हा राग बना बसंत’’ असो की , भैरवी रागातले ‘‘सुमिरन कर ले’’, ‘‘ ओम नमो भगवते...’’ असो की हनुमान चालीसाचे आगळ्या रीतीने त्यांनी केलेले सादरीकरण असो... देवी कालिकेचे भजन असो की शिवाची आराधना, तीच तल्लीनता, तीच भावोत्कटता प्रकटते त्यांच्या संगीतातून. रसिकदरबारात भक्तीसंगीत अत्युच्च स्थानी विराजमान करण्याचे श्रेय पंडितजींना द्यावे, ते याचसाठी. सुमारे पाव शतकापूर्वीचा तो प्रसंग. स्थळ नागपुरातले. डिसेंबर महिन्याच्या ऐन थंडीत एका मैदानात मंडप टाकून एक मैफल आयोजित करण्यात आली होती. कार्तिक आणि मार्गशीर्षाचा संगम पावसाच्या अकाली हजेरीने खुलला होता खरं तर! पण आयोजकांसाठी मात्र परीक्षेची घडी होती. कमालीच्या त्या थंडीतही कानसेन मात्र गर्दी करून राहिले होते. एव्हाना पाऊस थांबला असला तरी त्याचा प्रभाव अजून कायम होता. सरोदाची तार जुळवता जुळवता आणि त्यातून अपेक्षित सूर प्रतिध्वनित करता करता दमछाक होत होती साथसंगत करण्यासाठी म्हणून आलेल्या कलावंतांची.

एव्हाना रात्रीचे नऊ वाजले होते. मंडपाच्या कापडातून गळणार्‍या पाण्याच्या धारांपासून स्वत:चा बचाव करत, स्वत:ला नखशिखांत झाकून घेत थंडीचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला श्रोतृवर्ग बघून पंडित जसराज भारावले नसते तरच नवल. अगदी थोड्यावेळापूर्वीपर्यंत धो धो बरसलेला पाऊस अन्‌ गारठायला व्हावं इतकी थंडी असूनही संगीतसाधनेला दाद द्यायला उपस्थित झालेला मोठ्या संख्येतला रसिक बघून, शेवटी ते म्हणाले, मी आज पैशासाठी गाणार नाहीय्‌. मी आज गाणार आहे, ते या मायबाप रसिकांसाठी... आणि मग पंडितजींचे सूर आणि टाळ्यांचा कडकडाट. त्यांची गायकी अन्‌ रसिकांची दाद, असाच क्रम सुरू राहिला. इतक्या दिवसांची तपश्चर्या जणू आज फळाला आली होती. एकामागून एक अशा बहारदार गीतांना सूर-तालाचा साज चढत होता आणि कानसेन तृप्त होत होते. फर्माइशीवर फर्माइशी होत होत्या. रंगलेल्या मैफलीला भैरवीचा साज चढला तेव्हा रात्रीचा काळोख उगवतीच्या दिशेने झेपावू लागला होता...

पंडित जसराज म्हणजे व्ही. शांताराम यांचे जावई. शांताराम यांची कन्या मधुरा आणि जसराज यांचा प्रेमविवाह झालेला. एकदा व्ही. शांताराम आजारी असताना, जसराज रुग्णालयात त्यांच्या सुश्रृषेसाठी थांबले होते. तेव्हाचे माहिती आणि नभोवाणी मंत्री वसंतराव साठे एकदा शांताराम यांना भेटायला रुग्णालयात गेले. त्याही स्थितीत गप्पांचा फड रंगात आला होता. अशात तिथे जसराजांना बघून वसंतराव म्हणाले, ‘‘अरे तुम्ही इथे कसे?’’. त्यावर शांतारामांनीच उत्तर दिलं,.‘‘ अहो जावई आहेत ते माझे. ’’ ‘‘इतका मोठा जावई?’’ ...साठेंच्या भावना आणि आश्चर्य अवघ्या तीन शब्दांच्या त्या प्रश्नातून व्यक्त झाले होते. त्याला व्ही. शांतारामांनी दिलेलं उत्तरही तितकंच बाणेदार होतं. ते म्हणाले, ‘‘अहो, जावयाचं काय घेऊन बसलात, सासरा बघा की किती मोठा आहे ते...’’ व्ही. शांताराम यांचं मोठेपण कोण नाकारेल? पण, जसराजांचं व्यक्तीमत्व मात्र, वसंतराव साठेंच्या ‘‘इतका मोठा जावई?’’ या प्रश्नाला साजेसंच होतं, हे ही तितकंच खरं.

तबला सोडून गायनविश्वात मुशाफिरी करताना सर्वात खालचा स्वर म्हणजे खर्ज कसा लागतो, याचा अभ्यास करण्यात तासन्‌तास घालवणारे पंडित जसराज नंतरच्या काळात संगीत अकादमीपासून तर पद्मविभूषणपर्यंतच्या कितीतरी पुरस्कारांचे मानकरी ठरले. मंगळ आणि गुरूच्या मध्ये असलेल्या एका नव्या ग्र्रहाला त्यांचे नाव देण्याचा आंतरराष्ट्रीय खगोल संघाचा निर्णय, पंडितजींचे संगीत जगतातील योगदान अधोरेखित करणारे आहे. अवघे रसिकविश्व आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारे, भक्ती संगीताला केवळ प्रतिष्ठाच प्राप्त करून दिली असे नाही तर ते अजरामर करणारे, तबलजी असताना गाणार्‍याच्या सुरात तबला वाजविणारे आणि गात असताना सोबत्यांच्या वादनाच्या लयीने सूर प्रवाहीत करणारे पंडितजी आयुष्याच्या उत्तरार्धात भारतात का नव्हते, तेच कशाला बव्हतांश भारतीय कलावंत मैफली भारतात आणि जीवन व्यापन युरोप-अमेरिकेत का करतात, हा काहीसा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. असो. एक खडतर, पण अविस्मरणीय अशी संगीत साधना आता थांबली आहे. एक संगीत मार्तंड कायमचा विसावला आहे. भारतातल्या हिस्सार जिल्ह्यातील पिली मांदोरी इथनं सुरू झालेला एक प्रवास न्यू जर्सीत स्थिरावला आहे. बाराती नव्हे, तर ‘दुल्हा’ असलेला राग ‘बसंत’ यापुढे त्यांच्या स्वरांतून बहरणार नाही. वेदांतील ऋचांना, पुराणातील मंत्रांना पुन्हा स्वरसाज चढणार नाही.






Thursday, March 26, 2020

इथे वांधा शिकलेल्यांचाच आहे!


आता कोरोनाच्या प्रकरणात तरी काय वेगळे घडताहे? परवा, पंतप्रधानांचे भाषण संपल्याबरोबर सर्वात जास्त गर्दी किराणा दुकानात झाली होती. जणू काय उद्यापासून कुठल्याच वस्तू उपलब्ध राहणार नसल्याचा गैरसमज करून घेत, जमेल तितके साठवण्याच्या इराद्याने सारे पटापटा बाहेर पडले होते. पंधरा मिनिटांपूर्वीचे सोशल डिस्टंिंसगचे पंतप्रधानांचे आवाहन विसरून लोक गर्दी करून सामान विकत घेत होते. मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर लागलेला कालचा बाजार अन्‌ ‘असेच वागत राहिलात तर कोणीही वाचणार नाही हे लक्षात ठेवा’ या शब्दांतले पोलिस अधिकार्‍यांचे काकुळतीचे आवाहन, अमरावती जिल्ह्यात एका ठिकाणी लागलेला बाजार अन्‌ तिथे खरेदीदारांनी केलेली गर्दी...सारंच अजब, अतर्क्य अन्‌ अनाकलनीय आहे. दुर्दैव हे की शिकलीसवरलेली माणसंच अशी बेजबाबदार वागताहेत. शिक्षणातून माणसं घडतात म्हणे! वैचारिक उन्नती, विचारांची उंची गाठता येते म्हणे शिक्षणातून. चार पुस्तकं वाचली की जबाबदारीचे भान येते म्हणे माणसांत. पण इथे तर कशाचेच दर्शन घडत नाही या माणसांच्या वर्तनातून! की असला बेजबाबदारपणा हीच ओळख झालीय्‌ अलीकडे सुशिक्षितांची? 



कोरानाच्या पार्श्वभूमीवर तमाम जगतातील कथित सुशिक्षित, समंजस, सुजाण लोकांची वागण्याची जी विशुद्ध अनाकलनीय पद्धत वैश्विक पातळीवर सिद्ध होतेय्‌, ती बघितल्यावर इथे वांधा शिकलेल्या लोकांचाच असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. तिकडे रशियात लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून सरकारने सिंह रस्त्यावर सोडल्याची वार्ता असो की मग, कोरानामुळे अपरिहार्यपणे वाट्याला येऊ घातलेल्या लॉकडाऊनच्या धास्तीने बाजारपेठेत टायलेट पेपरवर तुटून पडलेल्या लोकांचा अमेरिकेतला किस्सा असो की मग भारतात, गेल्या रविवारी एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी झाल्याच्या उत्साहात रस्त्यावर गर्दी करून मोर्चे काढणार्‍या आणि पंतप्रधानांनी घरात बसायला सांगितले, त्यामागील उद्देशालाच हरताळ फासणार्‍या दीड शहाण्यांची रीत असो, याच वास्तवाची प्रचीती वारंवार येते आहे. विशेषत: अशा गंभीर प्रसंगातील भारतीयांचे बेजबाबदार वागणे तर संतापजनक ठरते आहे. लोकांनी एकमेकांपासून दूर राहावे यासाठी, अर्थव्यवस्था मोडीत निघण्याचा धोका पत्करून लॉकडाऊन जाहीर केले, पंतप्रधान, मुख्यमंत्री अतिशय गांभीर्याने घरात राहण्याचा, अगदीच अपरिहार्यतेशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करीत असताना, लोक घराबाहेर नेमके कशासाठी पडत आहेत? रस्त्यांवरची वर्दळ काय, बाजारपेठांमधली गर्दी काय, मैदानावर चाललेल्या शिकल्या सवरलेल्या, आयटी क्षेत्रातील ज्ञानामुळे ‘हुशार’ ठरलेल्या तरुणाईच्या क्रिकेट मॅचेस काय... जणू काय एन्जॉय करायला लाभलेल्या सरकारी सुट्‌ट्यांचा हा काळ असल्यागत वागताहेत सारे!
तीन-चार वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. न्यूयॉर्कच्या विमानतळावरून मुंबईसाठीचे विमान सुटणार होते. तिथल्या नियम व पद्धतीनुसार प्रवाशांची आसक्रमांकानुसार विविध गटांत विभागणी करण्यात आली होती. त्या गटानुसारच बोिंर्डग पासधारकांनी विमानात प्रवेश करायचा होता. त्याचप्रमाणे पुकाराही होत होता. पण बहुतांश भारतीयांनी गटनिहाय व्यवस्था धुडकावून काऊंटरवर गर्दी केली होती. प्रत्येकाच्या हातात बोर्डिंग पास होता. प्रत्येकाचे आसनक्रमांक सुनिश्चित होते. अगदी शेवटच्या प्रवाशाला घेतल्याशिवाय विमान जागचे हलणार नव्हते. मग एकमेकांना मागे पाडून धडपडत पुढे सरकून विमानात शिरण्याची भारतीय प्रवाशांना झालेली घाई नेमके काय दर्शवित होती? कर्तव्यावर तैनात असलेली तिथली माणसं हा सारा तमाशा बघून हैराण होती. यांना आवरावं कसं हा प्रश्न तर होताच, पण हे लोक ‘असे’ का वागताहेत, हा खरा प्रश्न होता. शिकायला गेलेल्या तरुणांपासून तर फिरायला गेलेल्या जोडप्यांपर्यंत अन्‌ मुलांकडे राहायला म्हणून आल्यावर आता परतीच्या प्रवासाला असलेल्या आजी-आजोबांपासून तर लहान चिल्ल्यापाल्यांपर्यंत सार्‍यांचेच वागणे एकसारखे होते. बेजबाबदारपणाचे !
आता कोरोनाच्या प्रकरणात तरी काय वेगळे घडताहे? परवा, पंतप्रधानांचे भाषण संपल्याबरोबर सर्वात जास्त गर्दी किराणा दुकानात झाली होती. जणू काय उद्यापासून कुठल्याच वस्तू उपलब्ध राहणार नसल्याचा गैरसमज करून घेत, जमेल तितके साठवण्याच्या इराद्याने सारे पटापटा बाहेर पडले होते. पंधरा मिनिटांपूर्वीचे सोशल डिस्टंिंसगचे पंतप्रधानांचे आवाहन विसरून लोक गर्दी करून सामान विकत घेत होते. मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर लागलेला कालचा बाजार अन्‌ ‘असेच वागत राहिलात तर कोणीही वाचणार नाही हे लक्षात ठेवा’ या शब्दांतले पोलिस अधिकार्‍यांचे काकुळतीचे आवाहन, अमरावती जिल्ह्यात एका ठिकाणी लागलेला बाजार अन्‌ तिथे खरेदीदारांनी केलेली गर्दी...सारंच अजब, अतर्क्य अन्‌ अनाकलनीय आहे. दुर्दैव हे की शिकलीसवरलेली माणसंच अशी बेजबाबदार वागताहेत. शिक्षणातून माणसं घडतात म्हणे! वैचारिक उन्नती, विचारांची उंची गाठता येते म्हणे शिक्षणातून. चार पुस्तकं वाचली की जबाबदारीचे भान येते म्हणे माणसांत. पण इथे तर कशाचेच दर्शन घडत नाही या माणसांच्या वर्तनातून! की असला बेजबाबदारपणा हीच ओळख झालीय्‌ अलीकडे सुशिक्षितांची?
थुंकू नका म्हटलं तिथेच थुंकायचं. नेमक्या नो-पार्किंग झोनमध्येच गाड्या पार्क करायच्या. तसे करतानाही, आधी उभ्या असलेल्या गाड्या काढताना संबंधितांना अडचण होईल याची हमखास काळजी घ्यायची. तिकिटांपांसून तर प्रसादापर्यंतच्या प्रत्येकच गोष्टीसाठी रांगा तुडवून गर्दी करायची. रंगवू नका म्हटलं त्याच िंभती रंगवायच्या. तोंडातल्या पानाच्या पिचकार्‍यांनी लिफ्ट्‌स चे कोपरे रंगवायचे... वागण्याची हीच तर रीत आहे आपली. आणि आता कोरोना प्रकरणात सोशल डिस्टंिंसगचा नियम मोडून ढोलताशे बडवत गर्दी करून रस्त्यावर उतरलेत शहाणे? तपासण्या टाळून दवाखान्यातून पळून जाताहेत लोक? अरे! या विषाणूची साखळी मोडायची असेल, तर एकमेकांच्या संपर्कात येण्याचे टाळावे लागेल. म्हणून तर घराच्या बाहेर पडू नका म्हणून सांगताहेत सारे! त्यासाठीच तर सरकारी कार्यालयांपासून तर खाजगी उद्योगांपर्यंत सारेकाही बंद करून प्रचंड आर्थिक नुकसानीचा धोका देखील पत्करण्याची तयारी केलीय्‌ सरकारने. वैश्विक पातळीवरही या विषाणूचा संसर्ग रोखण्याचा सोशल डिस्टंिंसग ‘हाच एकमेव’ पर्याय मानला गेला आहे. मग आपल्याला कळत नाहीय्‌ का पंतप्रधान, मुख्यमंत्री, डॉक्टर्सच्या आवाहनाचे मर्म? चीन, इटलीतले भीषण चित्र बघून भीती वाटत नाही का लोकांना? की या विषाणूच्या संसर्गाची भीषणता ध्यानातच येत नाहीय्‌ इथे कुणाच्या? महिनामहिनाभराच्या कालावधीसाठी जगरहाटी ठप्प होण्याची वेळ आलीय्‌ इथे. घरातही एकमेकांपासून अंतर ठेवायला सांगताहे वैद्यकीय क्षेत्रातली तज्ज्ञमंडळी अन्‌ सुशिक्षित तरुणाई मैदानावर क्रिकेटच्या मॅचेस खेळून ‘सुट्‌ट्या एन्जॉय’ करीत आहे? लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन, गर्दी करून सामान खरेदी करताहेत? अरे तुम्ही एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून रेल्वेपासून तर एसटीपर्यंत सारंकही बंद करण्यात आलं आहे. आता तर विमानंही बंद केली जाताहेत. तरीही परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात येत नसेल, आमच्या तर कठीण आहे सारंच. आता फक्त घराबाहेर पडू नका म्हणून प्रशासनाने प्रत्येकाच्या पाया पडायचे बाकी राहिले आहे. बरं सारंच बंद असताना रस्त्यांवर गर्दी करून लोक नेमके चाललेत कुठे? जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतील याची ग्वाही दिल्यावरही इतके अस्वस्थ का होताहेत सारे? की स्वत:ची जबाबदारी कळत नाहीय्‌ आपल्याला? खरंच, एकवेळ पूर्ण अशिक्षित परवडले. पण, सुशिक्षितांचा मूर्खपणा म्हणजे कहर आहे...
====

Saturday, December 7, 2019

हैदराबाद चकमकीच्या आनंदाचा अन्वयार्थ!

disha_1  H x W:

 दिल्ली काय, उन्नाव काय, कठुआ काय नि हैदराबाद काय? इथली न्यायव्यवस्था पीडितांना न्याय मिळवून देते, असा दावा करण्याजोगी परिस्थिती आहे कुठे? हैदराबादमध्ये बलात्काराचे आरोपी पोलिसांकरवी मारले गेल्याचा जनमानसातला आनंद या परिस्थितीच्या पेकाटात लाथ मारणारा नाही, असे कसे म्हणता येईल? त्या आनंदापुढे एन्काऊंटरच्या खर्‍या-खोट्याचा प्रश्न दुय्यम ठरविण्याचा लोकमानस नेमके काय दर्शवितो? लोकांना झालेला हर्ष एकूणच व्यवस्थेच्या, न्यायप्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. समाजातील काही अध्वर्यूंचा अपवाद वगळता, कुणालाच त्यात वावगे वाटू नये, उलट बहुतांश लोकांना शिक्षेची ‘हीच’ रीत योग्य वाटावी, याचा अन्वयार्थ व्यवस्था चालविणार्‍या धुरीणांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. जगाच्या पाठीवर अनेक देशांत या गुन्ह्यासाठी शिक्षा देणारे कठोर कायदे अस्तित्वात आहेत. इराण, सौदी अरेबिया आदी देशांत जाहीर मृत्युदंड दिला जातो. अफगाणिस्तानसारख्या देशात, ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या हातून गुन्हेगाराला सरेआम मृत्युदंड दिला जातो. एकदा असल्या एखाद्या उपायाबाबत विचार करता येईल आपल्याला? अर्थात, केवळ व्यवस्थेच्या माथी खापर फोडूनही भागणार नाही. बलात्कार करण्याची िंहमत होऊ नये यासाठीच्या कठोर कायद्यांसोबतच, ‘सातच्या आत घरात’ हा नियम स्त्रियांसाठी अंमलात आणताना, तिच्याकडे उपभोगवादाच्या परिघाबाहेर बघण्याचे पुरुषांवरील संस्कारही तितकेच महत्त्वाचे ठरतात...


गेला पंधरवडाभर गाजलेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांकरवी एन्काऊंटरमध्ये मारले गेल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली अन्‌ या लोकशाहीप्रधान देशातील कथित शहाणे अन्‌ वास्तवात जगणार्‍यांच्या विचारशैलीतील दरी कधी नव्हे एवढी उघड झाली. चार आरोपी आणि पोलिसांदरम्यान घडलेली फिल्मी स्टाईलची चकमक खरी असेल, याबाबत शंका मनात असूनही त्या नराधमांना झालेली हीच शिक्षा योग्य असल्याची भावना एकीकडे, पिसाळलेल्या कुत्र्यांना असेच संपवायचे असते असे मानणारा वर्ग एकीकडे, तर झालं ते योग्य नव्हतं, कायद्याला धरून नव्हतं अशी भूमिका मांडणारा वर्ग दुसरीकडे, अशी ही दरी आहे.
 शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ या चार जणांनी एका डॉक्टर युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा जीव घेतला आणि त्याहून कहर म्हणजे नंतर तिला जाळूनही टाकले. महत्प्रयासाने ते पोलिसांच्या तावडीत सापडले. एरवी आपला समाज अचेत असतो. त्याला कशाशीच काही घेणे-देणे नसते. त्याला पोलिसांचा ससेमिरा नको असतो, कोर्टाची पायरी चढायची नसते, कुठल्या प्रकरणात साक्षीदार व्हायचे नसते, कायद्याचा कचाटा नको असतो. त्याला राजकारणाच्या फंदातही पडायचे नसते अन्‌ अन्यायाच्या कुठल्या मुद्यावर संघर्षही करायचा नसतो. अरे, तो तर महागाईनं पिचला, सरकारी यंत्रणेनं तुडवला तरी चकार शब्द काढत नाही कधी! अन्याय सहन करीत मुकाट्याने जगतो. अलीकडे मात्र तो व्यक्त होऊ लागलाय्‌. समाजमाध्यमातून उमटणारी त्याची प्रतिक्रिया तर अगदीच बोलकी असते! एखादी 26/11ची घटना, एखादे निर्भया प्रकरण घडले की मात्र तो जथ्याने एकत्र येतो. निषेध व्यक्त करतो. मेणबत्त्या पेटवून संताप व्यक्त करतो. आता हैदराबाद बलात्कार प्रकरणातही तो याच पद्धतीने अभिव्यक्त होऊ लागला होता. घटनेविरुद्धचा त्याचा संताप, रस्त्यांवरच्या मोर्चांतून व्यक्त होऊ लागला होता. बलात्कार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना मांडू लागला होता. अशात चारही आरोपी पोलिसांसोबतच्या चकमकीत मारले गेल्याच्या वार्तेने अचानक चर्चेला पेव फुटले. कुठे कायद्याची बूज राखण्याच्या गरजेचे प्रतिपादन, तर कुठे, झालं तेच योग्य झाल्याचं स्पष्टीकरण.
 
 भारतीय समाजाचं जाऊ द्या. फार विसरभोळा आहे तो. तो व्यक्तिपूजकही आहे. आणिबाणी लादणार्‍या नेत्यांना पराभूत करण्याइतका तो कठोरही आहे अन्‌ चार-दोन वर्षांतच त्यांना माफ करण्याइतका तो दिलदारही आहे. 2012 मध्ये घडून आलेल्या दिल्लीतील निर्भया प्रकरणात तो बराच चवताळून उठला होता. दस्तुरखुद्द पंतप्रधानांना दखल घ्यावी लागावी, असा रुद्रवातार त्याने धारण केला होता. पण, नंतरच्या सात वर्षांत निर्भया प्रकरणातील एकाही आरोपीला शिक्षा होऊ शकलेली नसल्याबद्दल कुठे उमटली नाही त्याची संतप्त प्रतिक्रिया! उलट, त्या प्रकरणाचा जणू विसर पडल्यागत वागणे चालले आहे समाजाचे. त्यात हैदराबाद प्रकरणाची भर पडली आणि लोकांच्या संतापाला मोकळी वाट मिळाली. सात वर्षांपूर्वीच्या निर्भया प्रकरणाला यानिमित्ताने नव्याने उजाळा मिळाला, एवढेच काय ते फलित.
 
 भारतीय समाज भावनेच्या लाटेत वाहून जाणारा आहे. एखाद्या नेत्याचा मृत्यू, निवडणुकीतील मतदानाचा त्याचा कल बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो. भारावलेल्या अवस्थेत तो, पोलिसांनी चार आरोपींना ठार मारण्याच्या घटनेचे समर्थनही करू शकतो. या दोन्ही प्रकरणातील सारासार विचार करण्याची, योग्यायोग्यतेचे निकष निश्चित करण्याची त्याची मती कुंठित होते. कारण, मुळातच सारा बाजार भावनेचा मांडलेला असतो. हैदराबाद प्रकरणात आरोपी िंहमत बांधून, पोलिसांची शस्त्रे हिसकावून पळून जाण्याच्या बेतात होते, म्हणून त्यांचा पाठलाग करताना त्यांच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्यात ते मारले गेलेत, ही कहाणी खरी का खोटी, यापेक्षाही युवतीवर बलात्कार करणार्‍या आरोपींना शिक्षा झाली आणि पीडितेला न्याय मिळाल्याची भावना अधिक प्रभावी ठरली. त्याचा आनंद साजरा करणारा समाज काल लोकांनी अनुभवला. अॅड. उज्ज्वल निकम यांच्यासह कित्येकांनी या संदर्भात नाराजीही जाहीर केलीय्‌. झाला प्रकार न्यायोचित नाही. पोलिस अशाप्रकारे त्यांच्या पातळीवर ‘न्याय’ करू लागले, तर सारीच व्यवस्था कोलमडून पडेल, हे या विशिष्ट प्रकरणात योग्य वाटत असले तरी इतर वेळी त्याचे समर्थन कोण, कसे करू शकणार? आणि अशा अनिर्बंध वागण्याने विस्कळीत झालेली परिस्थिती सावरणे किती जिकिरीचे होऊन बसेल, हे त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षिण्याजोगे नाहीतच. त्यांच्या संयत प्रतिपादनाचे स्वतंत्र महत्त्व आहेच. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले ते नक्की या प्रकरणातील आरोपी होते का, इथपासून तर पहाटे अंधारात भर जंगलात ही चकमक कशी काय घडू शकली इथपर्यंतचे अनेकानेक सवाल अद्याप अनुत्तरीत आहेत. पण तरीही, सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त झालेला, या आरोपींच्या मृत्यूचा आनंद बोलका आहे.
 
 ही चकमक खरी की खोटी, योग्य की अयोग्य, हा भाग अलहिदा, पण आपल्या येथील न्यायव्यवस्थेवरील अविश्वास त्यातून ध्वनित होतो, तो वेगळाच. आणि का होऊ नये? ज्या तर्‍हेने आपली न्यायप्रणाली काम करते, ज्या पद्धतीने तिथे कायद्याची थट्‌टा उडविली जाते, ते बघता न्याय मिळण्याची, तो वेळेत मिळण्याची तर अपेक्षाही राहिलेलीच नाही आताशा कुणाला. सात वर्षे झालीत दिल्लीतील निर्भया प्रकरणाला. अजून आरोपींना शिक्षा झालेली नाही. निर्भयावर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकली की, आजही काटा उभा राहतो अंगावर. संताप अनावर होतो. आरोपी ताब्यात आहेत, त्यांनी गुन्हा केला हे स्पष्ट झाले, तरीही त्यांना फासावर लटकवायला लागणारा उशीर अनाकलनीय आहे. खरंतर, निर्भया प्रकरणापर्यंत बलात्काराची प्रकरणं फार गांभीर्यानं घेण्याची रीत नव्हती इथे. एकतर, जिच्यावर अन्याय झाला तिलाच गुन्हेगारासारखी वागणूक देण्याची तर्‍हा. तिलाच गुन्हेगार ठरवून वाळीत टाकण्याची अफलातून पद्धत अंमलात आणत राहिलाय्‌ हा समाज असल्या प्रकरणात. त्यामुळे प्रत्यक्षात घडणार्‍या गुन्ह्यांपेक्षाही पोलिसांकडे दाखल होणार्‍या तक्ररींची संख्या तशीही कमी. त्यातही न्याय मिळण्याची शक्यता, गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण त्याहून कमी. आजही पंच्याहत्तर टक्के गुन्हेगारांना विविध कारणांमुळे शिक्षा होतच नाही. निर्भया प्रकरणानंतर द्रुतगती न्यायालये स्थापन झालीत, कठोरातील कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात झाली, तरीही परिस्थितीत जराही बदल घडून आलेला नाही. हा, पीडितांनी पोलिसांपर्यंत पोहोचण्याचे, तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण जरूर वाढले. बलात्काराच्या निदान चाळीस टक्के प्रकरणात कोवळ्या वयाच्या मुला-मुलींवर अत्याचार होत असल्याची बाबही यातून स्पष्ट झाली. आजतारखेला बलात्काराची सुमारे दीड लाखांहून अधिक प्रकरणे न्यायालयात सुनावणीच्या प्रक्रियेत अन्‌ न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, निर्भयाप्रकरणासह...
 
 दिल्ली काय, उन्नाव काय, कठुआ काय नि हैदराबाद काय? इथली न्यायव्यवस्था पीडितांना न्याय मिळवून देते, असा दावा करण्याजोगी परिस्थिती आहे कुठे? हैदराबादमध्ये बलात्काराचे आरोपी पोलिसांकरवी मारले गेल्याचा जनमानसातला आनंद या परिस्थितीच्या पेकाटात लाथ मारणारा नाही, असे कसे म्हणता येईल? त्या आनंदापुढे एन्काऊंटरच्या खर्‍या-खोट्याचा प्रश्न दुय्यम ठरविण्याचा लोकमानस नेमके काय दर्शवितो? लोकांना झालेला हर्ष एकूणच व्यवस्थेच्या, न्यायप्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. समाजातील काही अध्वर्यूंचा अपवाद वगळता, कुणालाच त्यात वावगे वाटू नये, उलट बहुतांश लोकांना शिक्षेची ‘हीच’ रीत योग्य वाटावी, याचा अन्वयार्थ व्यवस्था चालविणार्‍या धुरीणांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. जगाच्या पाठीवर अनेक देशांत या गुन्ह्यासाठी शिक्षा देणारे कठोर कायदे अस्तित्वात आहेत. इराण, सौदी अरेबिया आदी देशांत जाहीर मृत्युदंड दिला जातो. अफगाणिस्तानसारख्या देशात, ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या हातून गुन्हेगाराला सरेआम मृत्युदंड दिला जातो. एकदा असल्या एखाद्या उपायाबाबत विचार करता येईल आपल्याला? अर्थात, केवळ व्यवस्थेच्या माथी खापर फोडूनही भागणार नाही. बलात्कार करण्याची िंहमत होऊ नये यासाठीच्या कठोर कायद्यांसोबतच, ‘सातच्या आत घरात’ हा नियम स्त्रियांसाठी अंमलात आणताना, तिच्याकडे उपभोगवादाच्या परिघाबाहेर बघण्याचे पुरुषांवरील संस्कारही तितकेच महत्त्वाचे ठरतात...

Friday, October 25, 2019

नेमकं काय, कुठे चुकलं?



संख्याबळाचे गणित जुळवताना काही तडजोडी निश्चितपणे कराव्या लागतात. एका मर्यादेत केलेल्या तडजोडींना कुणाचीच ना नसते. प्रश्न मर्यादाभंग झालाकीच उपस्थित होत असतो. यंदा पराभव वाट्याला आलेल्या दिग्गजांनी, याबाबतीत एकदा स्वत:ला यासंदर्भातील प्रश्न विचारून बघावेत. पदरी पडलेल्या पदांमुळे डोक्यात हवा तर शिरली नव्हती ना आपल्या, हा प्रश्न तर एकदा विचारावाच प्रत्येकाने स्वत:ला. कार्यकर्त्यांना दिलेल्या वागणुकीपासून तर मतदारसंघात केलेल्या कामांपर्यंत, जनसंपर्कापासून तर लोकांना वागवण्याच्या स्वत:च्या तर्‍हेपर्यंत, सार्‍याच बाबी एकदा तपासून घेण्याची गरज या निकालांनी निर्माण केली आहे. ‘पेड वर्कर्स’ची टूम निघाली आहे सध्या सर्वच राजकीय पक्ष अन्‌ सामाजिक संघटनांमध्ये. केलेल्या कामांचा मोबदला महिन्याच्या शेवटी मोजून घेणारे ‘वर्कर्स’ ही काळाची गरज असेलही कदाचित! इतरांच्या तुलनेत त्यांना चार गोष्टी जास्त कळत असतील. कार्पोरेट कल्चरमध्ये रुळलेली ही माणसं, काही बाबी अधिक शिताफीनं अन्‌ सफाईदारपणे करू शकत असतीलही कदाचित! पण म्हणून, कधीकाळी कच्चा चिवडा खाऊन, प्रसंगी उपाशी राहून खास्ता खात ज्यांनी पक्ष बांधला, त्या ‘कार्यकर्त्यां’च्या तळमळीची सर या ‘वर्कर्स’च्या व्यवहारी वागण्याला कशी येईल सांगा? त्यामुळे या दोहोतला भेद जाणला पाहिजे सर्वांनीच. पक्ष, यातील नेमका कुणाच्या भरवशावर उभा राहात असतो, याचे उत्तर त्यातूनच गवसणार आहे शेवटी.



नेमकं काय आणि कुठे चुकलं, याचा विचार आता करावाच लागेल. विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्णपणे जाहीर झालेले आहेत. आता लागलेल्या निकालांचे वस्तुस्थितिदर्शक विश्लेषण, ही सर्वच पक्षांची, जय-पराजय पदरी पडलेल्या सर्व उमेदवारांची जबाबदारी ठरेल. निवडणूक लढविण्याच्या पद्धती आताशा हायटेक झाल्या आहेत, समाजमाध्यमांच्या अत्याधुनिक अस्त्रांंचा वापर कुशलतेनं करता येणं, हीदेखील आता अपरिहार्यता ठरते आहे. प्रचाराच्या तर्‍हाही एव्हाना कात टाकून नव्या स्वरूपात उभ्या ठाकल्या आहेत. पण, तरीही लोकांच्या मनाला भिडणार्‍या जनसंपर्काला, त्यांच्याशी जपल्या गेलेल्या भावनिक नात्यांना आजही पर्याय नाही, हेदेखील नाकारता येणार नाही असे वास्तव आहे. एखादी लाट, विरोधकांना परास्त करू शकतील असे मुद्दे कामी येतातच निवडणुकीत. पण, म्हणून स्वत:ची कुठलीच कर्तबगारी लागत नाही, विधानसभेत उपस्थित राहिलं काय नि न राहिलं काय, तिथे लोकांचे प्रश्न उपस्थित केले काय नि न केले काय, काही फरक पडत नाही, असा समज बाळगून बसलेल्यांना यंदा लोकांनी धडा शिकवला आहे. एकूण, मतपेट्यांच्या माध्यमातून लोकांनी सोपवलेली जबाबदारी ज्याने इमानेइतबारे पार पाडली, त्याला यश दाराशी खेचून आणणे फार जिकिरीचे ठरत नाही. अन्यथा, फक्त गुर्मीत निवडणुकी लढवणार्‍यांचा ‘उदयन राजे’ होतोे, एवढाच या निकालांचा अन्वयार्थ! कॉंग्रेसपासून तर राष्ट्रवादीपर्यंतच्या बहुतांश पक्षातील नेत्यांना यंदा भाजपाशी घरठाव करावासा वाटला. या पक्षानेही येणार्‍या सर्वांकरिता दारे सताड उघडी केली. कालपर्यंत आपल्याला शिवीगाळ करणारा, भाजपाचे संघटनकार्य रोखून धरण्यासाठी पुढाकार घेणारा नेता, डोक्यावर घेऊन मिरवण्याची वेळ तळागाळातल्या कार्यकर्त्यांवर आली की मग लोक त्यांच्या भावना, संधी मिळाली की अशा मतपेट्यांमधून व्यक्त करतात, हे या निमित्ताने सिद्ध झाले.
 2014 ची निवडणूक वेगळ्या पार्श्वभूमीवर लढली गेली होती. तेव्हा बर्‍याच प्रमाणात ‘मोदी लाट’ होती. भाजपाच काय, सेनेचेही बरेच लोक त्या लाटेत तरले होते तेव्हा. शिवाय, तत्कालीन सरकारच्या भ्रष्टाचार आणि मनमानी कारभारालाही लोक कंटाळले होते. त्याचेही उत्तर लोकांनी मतपेट्यांमधून दिले. यंदाच्या निवडणुकीत मात्र चित्र काहीसे वेगळे होते. पंतप्रधानांबद्दलचा दांडगा विश्वास लोकांच्या मनात होताच, पण ज्यात कुणीही तरून जाईल अशी ‘लाट’ मात्र नव्हती कुठे. परिणामी, राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा जनतेसमोर मांडत पुढे जायचे होते. सुरुवातीच्या काळातले अल्पमतातले सरकार, नंतर पािंठबा देताना आणि पािंठबा दिल्यावरही शिवसेनेने मांडलेला छळ, राजीनामे खिशात ठेवून फिरण्याची त्यांची मुजोर भाषा, दुष्काळाचे अस्मानी संकट या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून नेमके तेच केले. प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली. दुसरीकडे, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पराभव स्वीकारावा लागणार याची पूर्ण मानसिक तयारी केली होती. जनमत चाचण्यांच्या बहुतांश अंदाजांनी, सत्तेत कोण येणार, हा प्रश्न निकाली काढला होता. संख्याबळाचा तेवढा प्रश्न शिल्लक होता. पवारांसारख्या चाणाक्ष नेत्याने, याही परिस्थितीत हाती लागण्यासारखे काय आहे, याचा शोध घेत व्यूहरचना आखली. जर दोनशे जागा सत्ताधार्‍यांच्या वाट्याला गेल्यात, तर निदान विरोधी पक्षनेतेपद तरी आपल्या वाट्याला यावं, यासाठी आवश्यक असलेल्या 50 जागांवरील विजयाची खात्री त्यांनी निश्चित केली. त्या दृष्टीने ‘फोकस’ निश्चित केला. प्रचारार्थ राज्यभर फिरले, तरीही त्यांचे सारे लक्ष, लक्ष्य असलेल्या त्या निवडक जागांवर होते. हाती आलेल्या निकालांवर नजर टाकली, तर पवार त्यांच्या रणनीतीत यशस्वी झाल्याचे स्पष्ट होते. राज ठाकरेंनी निदान मजबूत विरोधी पक्ष म्हणून निवडून देण्याचे नुसते आवाहन केले. पवारांनी त्या दृष्टीने प्रत्यक्षात प्रयत्न केलेत. त्या तुलनेत कॉंग्रेस मात्र पहिल्या दिवसापासूनच शस्त्र खाली ठेवून लढाई लढायला निघाली असल्याचे चित्र होते. म्हणूनच हताश मनाच्या कॉंग्रेसला मिळालेले यशही अधोरेखित करण्याजोगे आहे. कायम भूमिका बदलत राजकारण करणार्‍या राज ठाकरेंच्या मनसेला अन्‌ समाजातील विशिष्ट समूहातील एकगठ्‌ठा मतं ही आपलीच मक्तेदारी असल्याच्या गुर्मीत कुणाच्याही खुंट्याला ती बांधण्याचा खेळ खेळणार्‍या वंचित बहुजन आघाडीला यंदा जनतेनेच धडा शिकवला आहे, हेही खरंच.
 उमेदवाराच्या विजयात महत्त्वाची भूमिका कोण बजावत असतो? तांत्रिकदृष्ट्या, ‘मतदार’ हे या प्रश्नाचं उत्तर असू शकेल. पण, वस्तुत: कार्यकर्ता त्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडीत असतो. यंदाच्या निवडणुकीच्या निकालांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, नेता कुठल्याही पक्षाचा असो, ज्याने मतदारसंघात संपर्क ठेवला नाही, कार्यकर्ता जोपासला नाही... अपवाद वगळता, त्या सर्वांच्या वाट्याला पराभव आला आहे. पक्षाने लादलेला बाहेरचा उमेदवार नाकारण्याचा मुद्दा असो वा स्वपक्षीय नेत्याने केलेली उपेक्षा असो, कार्यकर्त्याच्या भूमिकेत जगणार्‍यांनीही त्यांच्या परीनं, त्यांच्या पद्धतीनं सर्वांना ‘जागा’ दाखवली असल्याने, त्याला गृहीत धराल तर याद राखा, असा इशारा दिल्याचे स्पष्ट होते. भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीपासून तर वंचित बहुजन आघाडीपर्यंत... कुणीही याला अपवाद नाही. विनासायास ‘गृहप्रवेश’ झालेल्या आयारामांना परत पाठवण्यापासून तर पक्षातील बंडखोरांच्या गळ्यात विजयाची माळ घालण्यापर्यंत, सर्वदूर तोच गर्भित इशारा आहे!
निवडणुकीत विजयाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. बहुमताला डोकी मोजून मांडलेल्या आकड्यांच्या गणितापलीकडे दुसरा कुठलाही निकष नसतो. त्या परिस्थितीत संख्याबळाचे गणित जुळवताना काही तडजोडी निश्चितपणे कराव्या लागतात. एका मर्यादेत केलेल्या तडजोडींना कुणाचीच ना नसते. प्रश्न मर्यादाभंग झालाकीच उपस्थित होत असतो. यंदा पराभव वाट्याला आलेल्या दिग्गजांनी, याबाबतीत एकदा स्वत:ला यासंदर्भातील प्रश्न विचारून बघावेत. पदरी पडलेल्या पदांमुळे डोक्यात हवा तर शिरली नव्हती ना आपल्या, हा प्रश्न तर एकदा विचारावाच प्रत्येकाने स्वत:ला. कार्यकर्त्यांना दिलेल्या वागणुकीपासून तर मतदारसंघात केलेल्या कामांपर्यंत, जनसंपर्कापासून तर लोकांना वागवण्याच्या स्वत:च्या तर्‍हेपर्यंत, सार्‍याच बाबी एकदा तपासून घेण्याची गरज या निकालांनी निर्माण केली आहे. ‘पेड वर्कर्स’ची टूम निघाली आहे सध्या सर्वच राजकीय पक्ष अन्‌ सामाजिक संघटनांमध्ये. केलेल्या कामांचा मोबदला महिन्याच्या शेवटी मोजून घेणारे ‘वर्कर्स’ ही काळाची गरज असेलही कदाचित! इतरांच्या तुलनेत त्यांना चार गोष्टी जास्त कळत असतील. कार्पोरेट कल्चरमध्ये रुळलेली ही माणसं, काही बाबी अधिक शिताफीनं अन्‌ सफाईदारपणे करू शकत असतीलही कदाचित! पण म्हणून, कधीकाळी कच्चा चिवडा खाऊन, प्रसंगी उपाशी राहून खास्ता खात ज्यांनी पक्ष बांधला, त्या ‘कार्यकर्त्यां’च्या तळमळीची सर या ‘वर्कर्स’च्या व्यवहारी वागण्याला कशी येईल सांगा? त्यामुळे या दोहोतला भेद जाणला पाहिजे सर्वांनीच. पक्ष, यातील नेमका कुणाच्या भरवशावर उभा राहात असतो, याचे उत्तर त्यातूनच गवसणार आहे शेवटी.
खरंतर, कॉंग्रेस-राष्ट्रवादीद्वारे मोठं करून सांगितलं जातंय्‌ तेवढं यश शरद पवारांनी खेचून आणलेलं नाही. पाऽर पराभवाच्या गर्तेत हे दोन्ही पक्ष सापडले नाहीत, एवढीच काय ती पवारांची किमया. मनसेपासून तर वंचितपर्यंत, सर्वांचेच ‘तारे जमींपर’ आले आहेत. त्या तुलनेत, तसं म्हटलं तर सत्ता हातून गेलेली नाही युतीच्या. देदीप्यमान म्हणता येईल असे नसले, तरी बहुमत मिळवण्याचे युतीचे यश तर दखल घेण्याजोगे आहे. पण, तरीही गेल्यावेळचे आकडे गाठता न आल्याने दोन्ही पक्षांसाठी हा विजयही ‘साजरा करण्याजोगा’ राहिलेला नाही. सर्वच राजकीय पक्षांनी, त्याच्या नेत्यांनी बोध घ्यावा असे निकाल, जनमताच्या कौलातून समोर आले आहेत. सत्ता कुणाला द्यायची, हेही निश्चितपणे स्पष्ट केलं आहे आणि तसं करताना, ती किती मर्यादेत द्यायची, याबाबतही भूमिका स्पष्ट केली आहे. हेच विरोधकांच्या बाबतीतही घडले आहे. राज ठाकरेंनी मोदींवर केलेले बेछूट आरोप ऐकताना, त्यांच्या हिमतीला टाळ्या पिटून दाद देणारी जनता, त्यांना मतांची मात्र भीकही घालत नाही, हे लक्षण मतदारांच्या सुजाणतेचे आहे. आता, आपलं नेमकं काय अन्‌ कुठे चुकलं, हे राजकीय पक्षांनी शोधायचं आहे...

Thursday, September 12, 2019

या रे या, सारे या...!


एक काळ होता, भाजपाचे लोकसभेतले संख्याबळ केवळ दोन होते. भविष्यात कधी आपण ‘त्या’ बाजूने बसू, असा विचारही तत्कालीन नेत्यांच्या मनात भीत भीतच येत असावा. हीच स्थिती कम्युनिस्टांची. बोटावर मोजण्याइतकी संख्या असायची त्यांचीही संसदेतली. इंदिरा हत्येनंतर तर सारे विरोधक एका मुठीत मावावेत एवढेच उरले होते. पण, म्हणून लढण्याची ऊर्मी संपली नाही कुणाचीच. हे विचारांसाठी, तत्त्वांसाठी लढणं वगैरे फालतू असल्याचे वाटले नाही त्यांच्यापैकी कुणालाच कधी. की, यापेक्षा काँग्रेस पक्षात प्रवेश करून सत्ता उपभोगण्याचा विचारही शिवला नाही कधी कुणाच्या मनाला. उलट, वाट्याला आलेला संघर्ष हेच प्राक्तन असल्याचे समजून, हाती असेल ते गोड मानून सत्ताधार्‍यांशी झगडत राहिलेत तत्कालीन नेते. लोकांनी खिल्ली उडवली तरी विचार सोडला नाही. पराभव समोर दिसत आहे म्हणून लढणं सोडलं नाही त्यांनी कधीच. त्याच्या नेमकी उलट परिस्थिती आज उद्भवली आहे. इथे विरोधी पक्ष म्हणून कुणालाच काम करायचे नाहीय्‌. सर्वांना येनकेनप्रकारेण सत्तेत भागीदार व्हायचे आहे. सत्ता उपभोगायची आहे.


या रे या, सारे या. लगबग करा. पटापट या...! इतर कुठेही जाऊ नका! सध्या सत्तेत येण्याची शक्यता केवळ आणि केवळ भाजपा-सेनेचीच असल्याने, धरायचीच झाली तर फक्त त्याच पक्षांची कास धरा. निवडणूक तोंडावर असल्याने घाई करा. लवकरात लवकर निर्णय घ्या. नवीन पक्षात प्रवेश करून स्वत:ची उमेदवारी अन्‌ आमदारकी आरक्षित करून घ्या. तसेही, विचारांचे लोढणे खांद्यावर वाहिले नव्हतेच तुम्ही कधी. त्यामुळे, कालपर्यंत ज्याला शिवीगाळ केली, ज्याच्या नावानं कडाकडा बोटं मोडली, ज्यांचं नाव निघालं तरी नाकं मुरडलीत, ज्यांच्यावर कायम जातीयवादाचा शिक्का मारला, त्यांच्या पक्षात प्रवेश करा. शेवटी काय, सत्ता महत्त्वाची! पक्ष अन्‌ विचारधारेचं काय, अंगावरची वस्त्रं बदलण्याइतकं सोपं झालंय्‌ आताशा या व्यवहारी जगात विचारधारा बदलणं. 

शिवाय त्याचे ओझे वाहायला सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत की, सर्वदूर! भल्या मोठ्या संख्येत. त्यांना भारी आकर्षण असतं बरं, त्या विचारांचं! वृथा अभिमानही असतो त्यांना, ते चालत असलेल्या कंटकाकीर्ण मार्गाचा. त्यांनी अनुसरलेल्या विचारांचा, नीती, तत्त्वांचा. त्यासाठी करावयाच्या त्याग, बलिदान, साधनेचा. पण, राजकारणात प्यादी केवळ लढण्या अन्‌ मरण्याच्या कामाची असतात. नेत्यांचं मात्र तसं नसतं. त्यांना पदं भूषवायची असतात. राज्यकारभाराचा शकट हाकायचा असतो. त्यासाठी सत्ता आवश्यक असते. काँग्रेस-राष्ट्रवादीतली कितीतरी माणसं एव्हाना तरबेज झाली आहेत या कामात. काही नावं बघाना! सत्ता कुणाची, तिथली माणसं कोणती, कुठल्या विचारांशी त्यांची बांधिलकी आहे, वगैरे सारे प्रश्न केराच्या टोपलीत टाकून त्यांनी आजवर आपल्या राजकारणाचा डोलारा सांभाळला. दिल्ली-मुंबईत हुजरेगिरी केली अन्‌ मंत्रिपदं मिळवलीत. त्यांना आता नव्याने सत्तेची हाव निर्माण झाली आहे. त्यामुळे, कालपर्यंत अंगावर पांघरलेली झूल झुगारून त्यांचा राजकीय प्रवास नव्या दिशेने सुरू झाला आहे.
 
 
वेगवेगळ्या घोटाळ्‌यांचे साक्षीदार सोबतीला घेऊन राबवलेल्या सत्तेचा दुष्परिणाम काँग्रेसने निवडणुकीतील पराजयाच्या रूपात पाच वर्षांपूर्वी भोगला. प्रचंड भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, सत्तेचा माज, अशी विविधांगी कारणंही त्याला साह्यभूत ठरली. लोकांनी राज्यकारभाराची जबाबदारी सोपवत भाजपा व मित्रपक्षांवर विश्वास व्यक्त केला. प्रचंड मेहनत, सुयोग्य नियोजन, स्वच्छ कारभार, पारदर्शी शासन, विकासाचा ध्यास, हे राष्ट्र वैभवसंपन्न करण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍यांनी तो विश्वास सार्थ ठरवत घोडदौड आरंभली. त्याचा परिणाम हा की, जनतेनेही पुन्हा एकदा सत्ता अन्‌ विश्वासाची दुरुक्ती केली. परिणामस्वरूप, सत्तेतली माणसं अधिक वेगाने, झापटल्यागत कामं करू लागली. त्याचे परिणाम स्थानिक, राष्ट्रीयच काय, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिसू लागले. अर्थक्षेत्रापासून तर अंतराळक्षेत्रापर्यंत त्या ध्येयवेडेपणाची छाप उमटली.
 
 
सार्‍या देशात सकारात्मक चित्र निर्माण होऊ लागले. जनमानसातला सरकारबद्दलचा विश्वास दुणावला. आता, पुढची काही वर्षे सत्तेची धुरा सांभाळणारे खांदे बदलणार नाहीत, हे दिवसागणिक स्पष्ट होऊ लागले. तशी खात्री पटू लागली तसतशी, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील अस्वस्थता वाढू लागली. सत्तेविण कासावीस झालेली माणसं सैरभैर झाली. वाट मिळेल तशी सुसाट पळू लागली. कालपर्यंत विरोधकांना कमजोर म्हणून हिणवणार्‍या बड्याबड्या नेत्यांवर, स्वत:च्या ताकदीवर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हांकडे हतबलपणे बघण्याची वेळ आली. कधीकाळी विरोधकांच्या अल्पशा संख्येवरून त्यांची खिल्ली उडवणार्‍यांना आज आपापले तंबू शाबूत ठेवणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. मुळात, ते विचारांसाठी जगलेच नव्हते कधी. नीतिमत्तेची चाड, हा तर त्यांच्यासाठी हसण्यावारी नेण्याचा विषय होता. जे नेत्यातच नाही, ते कार्यकर्त्यात कसे येणार? तेही आता कशाचीही पत्रास न बाळगता, सुसाट सुटले आहेत. ज्या पवारांनी स्वत:च काँग्रेस पक्षाची शकले करत स्वत:चा वेगळा राजकीय घरठाव मांडला, ते आता आपल्या सहकार्‍यांना कसे रोखणार? सत्तेची गणितं मांडण्यातच हयात खर्ची घातलेल्या काँग्रेसजनांना तरी स्वत:ची पडझड कशी रोखता येणार आहे?
 
 
एक काळ होता, भाजपाचे लोकसभेतले संख्याबळ केवळ दोन होते. भविष्यात कधी आपण ‘त्या’ बाजूने बसू, असा विचारही तत्कालीन नेत्यांच्या मनात भीत भीतच येत असावा. हीच स्थिती कम्युनिस्टांची. बोटावर मोजण्याइतकी संख्या असायची त्यांचीही संसदेतली. इंदिरा हत्येनंतर तर सारे विरोधक एका मुठीत मावावेत एवढेच उरले होते. पण, म्हणून लढण्याची ऊर्मी संपली नाही कुणाचीच. हे विचारांसाठी, तत्त्वांसाठी लढणं वगैरे फालतू असल्याचे वाटले नाही त्यांच्यापैकी कुणालाच कधी. की, यापेक्षा काँग्रेस पक्षात प्रवेश करून सत्ता उपभोगण्याचा विचारही शिवला नाही कधी कुणाच्या मनाला. उलट, वाट्याला आलेला संघर्ष हेच प्राक्तन असल्याचे समजून, हाती असेल ते गोड मानून सत्ताधार्‍यांशी झगडत राहिलेत तत्कालीन नेते. लोकांनी खिल्ली उडवली तरी विचार सोडला नाही. पराभव समोर दिसत आहे म्हणून लढणं सोडलं नाही त्यांनी कधीच. त्याच्या नेमकी उलट परिस्थिती आज उद्भवली आहे. इथे विरोधी पक्ष म्हणून कुणालाच काम करायचे नाहीय्‌. सर्वांना येनकेनप्रकारेण सत्तेत भागीदार व्हायचे आहे. सत्ता उपभोगायची आहे.
 
 
लोकशाहीव्यवस्थेत विरोधी पक्षाचेही स्वत:चे एक स्थान आहे. महत्त्व आहे. त्याचीही एक ताकद आहे. जबाबदारी आहे. संख्याबळाचे गणित ज्याच्या पारड्यात त्यानं कारभार करावा. उर्वरितांनी त्याला मदत करावी. त्याच्यावर नजर ठेवावी. चुका ध्यानात आणून द्याव्यात. प्रसंगी कडवा विरोधही करावा, हेच विरोधी पक्षाचे काम. पण, आज परिस्थिती अशी की, ते नकोय्‌ कुणालाच! राजकारण सत्तेसाठी करायचे असते हे मान्य. पण, सत्ता हातात नसेल तरीही जनहितार्थ करण्याजोगी बरीच कामं असतात. विशेषत: जनतेच्या आवाजाला बळकटी देण्याची एक मोठी जबाबदारी विरोधी पक्षाची असते. आजच्या सत्ताधार्‍यांनी अगदी परवापरवापर्यंत ती जबाबदारी पार पाडली आहे. सध्या मात्र, नेमकी तीच जबाबदारी टाळण्याची धडपड चालली आहे इथे. विरोधी बाकांवरची थोडीथोडकी माणसं सोडली, तर सारीच सत्तेच्या दिशेने वाहवत सुटली आहेत. कृपाशंकर सिंह, 370 च्या मुद्यावर काँग्रेसने विरोध केला नाही म्हणून त्रागा करतात अन्‌ ते हटविण्याचा निर्णय घेणार्‍या भाजपाच्या खेम्यात बसण्याची तयारीही दर्शवितात, ही नौटंकी तर राजकारणालाही न शोभणारी.
 
 
परवा कुणीतरी म्हणालं, या देशातला विरोधी पक्ष इतका कमजोर होणे ही हसण्यावारी नेण्याची नव्हे, तर चिंतेची बाब आहे. केवळ सत्तेसाठी इकडून तिकडे वा तिकडून इकडे भ्रमण करणारी राजकीय जमात सत्ता नसतानाच्या काळात साथीला उभी राहीलच, याची शाश्वती नाही. अशा स्थितीत सर्वांसाठीच कवाडं सताड उघडी करून बसलेल्या भाजपा अन्‌ शिवसेनेनेही एकदा, दाराशी आलेल्या प्रत्येकाचेच स्वागत करायचे किंवा कसे, याचा निर्णय घेण्याची गरज आहे. कारण अशा संधिसाधूंमुळे संख्याबळ भलेही वाढेल. पक्ष‘बळ’ कधीच वाढणार नाही. एकतर, या दोन्ही राजकीय पक्षांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या संघर्षातून ही ताकद कमावली आहे. सत्ता हाताशी नसतानाच्या काळातील त्यांची लढाई विसरणे योग्य ठरणार नाही... म्हणूनच, या रे या, सारे या! असे म्हणणे बंद झाले पाहिजे आता... 

Saturday, August 24, 2019

श्रीकृष्ण


भारतीय तत्विंचतकांनी देवत्व बहाल करूनही, एका असामान्य मनुष्याच्या रुपातच श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा आणि त्याचे तत्विंचतन जगापुढे मांडले आहे. बहुधा म्हणूनच ते लोभस रुप इतरेजनांनाही भावले आहे. मृत्यूनंतरचा काळ कल्पून त्याबरहुकूम वागण्याची शिकवण, सोबतच जिवंत असेपर्यंत कसे वागायचे हे सांगणारा कर्मसिद्धांत म्हणजे श्रीकृष्ण आहे. अर्जुनाला गीतेतून उपदेश करेपर्यंतच तो ‘भगवंत’ आहे. रणांगणावर विराट रूपदर्शन घडवित असतानाच तो आपण जगन्नियंता असल्याचे सांगतो. एरवी तो सवंगड्यांसोबत शिंक्यातले लोणी पळवणारा, सत्याच्या बाजूने उभे राहणारा, मित्राच्या मदतीला धावून जाणारा, द्रौपदीच्या हाकेला ओ देणारा, अर्जुनाला कर्णाची महती सांगणारा, स्वत:च्या ताकदीची कल्पना असतानाही पांडवांना यशापयाशाचे, सुख-दु:खाचे अडथळे पार करीत परिस्थितीला, प्रसंगी युद्धाला सामोरे जाण्याचा सल्ला देणारा, त्यांच्या अरण्यवासाच्या काळात धैर्य देणारा, वेळ बाका आला तर त्यातून बाहेर पडण्याच्या क्लृप्त्या सांगणारा, सोबती असतो. तो अभयंकर असतो. तो अद्वैत असतो. तो अप्रमेय असतो. तो ज्योतिरादित्य असतो. तो केयूर असतो... त्याला राधाही कळते अन्‌ कंसही. त्याला विदुरही ठावूक असतो अन्‌ दुर्योधनही. भगवंत स्वत:चं वर्णन अर्जुनासमोर करतात, तेव्हा या सृष्टीतील जे जे म्हणून उदार, उन्नत, उत्तम, महत्मधूर असेल, ते ते ‘मी’ असल्याचे सांगतात. ऋतुत मी कुसुमाकर आहे, मासांत मागशीर्ष, पर्वतात मेरू, शिखरात कैलास, महर्षींमध्ये भृगु, सिद्ध पुरूषांत कपिल मुनी असल्याचे सांगत असताना नरांत मात्र आपण धनंजय, म्हणजेच अर्जुन असल्याचे भगवंत खुद्द अर्जुनाला सांगतात. इतर उदाहरणांच्या पंक्तीत ‘अर्जुन’ विराजमान करताना कौंतेयाची प्रतिमा, त्याचे धैर्य उन्नत करीत त्याच्यातील विश्वास जागवण्याचाही तो प्रयत्न असतो.



अमेरिकेत घडविल्या गेलेल्या जगातल्या पहिल्या अणुस्फोटाच्या चाचणीनंतर जे दृश्य साकारले ते बघितल्यावर, चाचणी करणार्‍या ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर नामक शास्त्रज्ञाने व्यक्त केलेले मत अद्भूत आहे. महाभारतात युद्धादरम्यान, समोर उभ्या ठाकलेल्या आप्त, स्वकीयांविरुद्ध लढण्यास नकार देणार्‍या अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून जे ज्ञानामृत भगवंतांनी दिले, त्यानंतर आपल्या विराट रुपाचे जे दर्शन श्रीकृष्णाने घडवले, त्याचे वर्णन अर्जुनाने केले आहे. एकाचवेळी हजारो सूर्य चमकत असल्याचा भास व्हावा इतका लख्ख प्रकाश त्यावेळी आसमंतात जाणवत होता. मीच या सृष्टीचा निर्माता, मीच त्याचा पालनकर्ता अन्‌ मीच विनाशक ... ज्युलियस रॉबर्ट म्हणतात, अणूचाचणीनंतर जो स्फोट झाला, सारा परिसर प्रकाशमय झाला, तेव्हा मला महाभारतात वर्णन असलेले श्रीकृष्णाचे विराट रुपदर्शन आठवले. अर्जुनाने विशद केलेल्या भगवंतांच्या शब्दांसह...
ते व्यक्तिमत्व खरोखरीच विलक्षण आहे. भगवंतापेक्षाही, मनुष्यरुपात सर्वसामान्य जीवन जगत तो जो, असामान्यतेचा परिचय देतो, ते तर त्याहून आगळं असतं. त्याने अधरावर धरलेल्या बासरीतून बाहेर पडणारे सप्तस्वर तर जणू सार्‍या आसमंताला मोहीनी घालतात. तो युद्धही तेवढ्याच शिताफीनं लढतो. त्याचवेळी तो हिकमतीही असतो. त्या अर्थाने तो बुद्धिवान, मुत्सद्दीही असतो. एरवी युद्धकौशल्य आणि बुद्धिचातुर्याचा संगम सहसा गवसत नाही. पण भगवंतांच्या ठायी तो मीलाफही लीलया साधला गेलाय्‌. त्याचवेळी तो भक्तवत्सल, कनवाळूही असतो. त्याला प्राणीशास्त्र कळते. गायींच्या सान्निध्यात वावरताना वर्तनातून त्याला गायही उमगते अन्‌ सारथ्याच्या भूमिकेत वावरताना घोड्याच्या वेगापासून तर रागापर्यंतच्या बाबींचाही अभ्यास झालेला असतो. खरं तर, शल्य, नकुल, सहदेवांचा अपवाद वगळता इतर कुणालाही ते कसब सिद्ध करता आलेले नसते. मृत अभिमन्यूच्या डोक्याला लाथ मारणार्‍या जयद्रथाचे अस्तित्व संपविण्याची अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण व्हावी म्हणून खग्रास सूर्यग्रहणाच्या मुहूर्तानुरूप सुदर्शनचक्राआड सूर्य जाईल अन्‌ सूर्यास्त झाल्याचा भास होऊन अर्जुनाला जयद्रथावर बाण चालवता येईल याचे अचूक गणित मांडून घडलेल्या घडामोडी भगवान श्रीकृष्णाच्या खगोलशास्त्राच्या ज्ञानाचीही साक्ष देतात. स्वत:ची नारायणी सेना कौरवांच्या बाजुने उभी करून स्वत: नि:शस्त्र पांडवांच्या साथीला उभे राहण्याची भूमिका त्यांच्यातला आत्मविश्वास स्पष्ट करते. एकाचवेळी चक्र, गदा, पद्म धारण करण्याची शक्ती एव्हाना कुणाच्याही वाट्याला येईल, असे होणे अशक्यप्राय. भगवंतांनी स्वत:च्या अफाट कर्तृत्वातून, क्षमतेतून ती शक्ती कमावली होती. सृष्टीनिर्मात्याच्या विविध रुपांतले श्रीकृष्णाचे रूप मुळातच मनुष्याला भावणारे. जवळचे वाटणारे. कारण त्याच्यातल्या रसिकाग्रणीपासून तर दही-लोण्यासाठीच्या खोडकरपणापर्यंत अन्‌ राधेच्या सोबतीने वावरण्यापासून तर युद्धभूमीवर अर्जुनाला कर्मयोग सांगण्यापर्यंत... त्याचे जगणे, वागणे, त्याच्या सार्‍या भूमिका लोकांना खर्‍याखुर्‍या वाटतात. ‘आपल्या’ वाटतात.
 
स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर असे तीन भाग आहेत. व्यक्ती स्वत:, साधन सामुग्रीसह आणि इतकेच नव्हे तर स्वत:ची बुद्धिमत्ता, धैर्यादी गुणांसह एखाद्याच्या पाठीशी किंवा सोबतीने उभी राहते, ते महत्वाचे. सुदामा असो, अर्जुन असो वा मग विदुर. श्रीकृष्ण मित्र म्हणून त्यांच्या समवेत राहिले ते स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर, या तीनही अंगाने. कुठेही, कशाचीही उणिव मागे न ठेवता, किंतू-परंतु न बाळगता, ठामपणे सोबतीने उभा राहणारा सखा म्हणजे कृष्ण. तो मृत्यूचे वास्तवही मांडतो अन्‌ तोच जीवनाचे मर्मही सांगतो. जीर्ण झालेली वस्त्र सहज बाजूला टाकून नवी वस्त्र परिधान करावीत तसेच आत्मा एक शरीर त्यागून नवीन शरीर धारण करतो, हे गंभीर वास्तव सहजतेने मांडणारे भगवान श्रीकृष्ण दुसरीकडे जीवन हा उत्सव असल्याचे स्पष्ट करीत, ते जगण्याच्या नाना तर्‍हा अधोरेखित करतात. क्षण रंगोत्सवाचा असो, दहीहांडीचा, की मग टिपर्‍यांच्या खेळाचा... आनंदाची उधळण करत, विखुरलेल्या क्षणांची मनमुराद लयलूट करीत हृदयाच्या कप्प्यात त्याची साठवण करीत पुढे जाण्याची न्यारी तर्‍हा त्यांनी जागापुढे मांडली आहे. जीवन आणि मृत्यूची महती एकाच व्यक्तीद्वारे एकाचवेळी विवेचित होण्याची उदाहरणे अन्यथा विरळाच. पण श्रीकृष्णाने त्याचीही सांगड लीलया घातलेली दिसते. म्हणूनच की काय पण, भारतीय समाजाला केवळ जगण्याची दिशाच नव्हे तर, तत्वज्ञानाची बैठकही त्यांनी दिली असल्याचेही स्पष्ट होते. अमेरिकेत 1945मध्ये पहिली अणुचाचणी घेणार्‍या शास्त्रज्ञालाही त्याने संशोधनातून घडविलेल्या स्फोटाच्या दृश्यातून दूरस्त भारतात मान्यता पावलेल्या भगवंतांच्या प्रतिमेचे, त्यांच्या वचनाचे स्मरण व्हावे, हा परिणाम श्रीकृष्णाच्या भावलेल्या प्रतिमेचा, त्यांच्या प्रभावी विचारांचा, ओजस्वी वाणीतून प्रकटलेल्या वचनांचा असतो. न्यू मेक्सिकोतील ‘फादर ऑफ द अॅटोमिक बॉम्ब’ ही उपाधी लाभलेल्या एका शास्त्रज्ञाचे हे विधान, विज्ञानाचा मार्ग अनुसरणे म्हणजे परमेश्वरी शक्तीचे अस्तित्व झुगारण्याची पहिली पायरी असल्याचा ग्रह करून बसलेल्या तमाम भारतीय मंडळीच्या थोबाडीत हाणणारे ठरावे.
 
प्रत्येक काळाची एक भाषा असते. स्वाभाविकच महाभारत काळाचीही एक भाषा होती. गीतेतील भाषा त्या तुलनेत अर्वाचीन मानली जाते. महाभारतात साधरणपणे द्रौपदी स्वयंवराच्या आसपास अवतरणारे कृष्णाचे पात्र, हरिवंशातून उमगणारी त्याची व्यक्तिरेखा, सुबक, सुंदर, मनमोहक, सर्वगुण संपन्न, दिसायला सावळे पण तरीही तेजस्वी असे रूप. मथुरेतला जन्म. उज्जैनच्या परिसरातील सांदिपनी आश्रमात शिक्षण. ते पूर्ण करून परतल्यावर मथुरेवरची जरासंधाची किमान सतरा आक्रमणं, युद्धाची सारे कौशल्य पणाला लावून परतवण्यात यश संपादन केल्यानंतर मथुरेवरील वारंवारची संकटं टाळण्यासाठी अजून दूरवर द्वारका नगरी वसविण्याचा निर्णय... अक्रुराने दिलेल्या निमंत्रणामागील घातपाताच्या शक्यतेची पूर्ण कल्पना असतानाही, त्यांच्या सोबत जाणे, त्यांनी केलेल्या आघाताला त्याच तोडीचे प्रत्युत्तर देणे, निकराने लढणे ... सारेच अद्भूत आहे. म्हणूनच की काय, पण भारतीय तत्विंचतकांनी देवत्व बहाल करूनही, एका असामान्य मनुष्याच्या रुपातच श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा आणि त्याचे तत्विंचतन जगापुढे मांडले आहे. बहुधा म्हणूनच ते लोभस रुप इतरेजनांनाही भावले आहे. मृत्यूनंतरचा काळ कल्पून त्याबरहुकूम वागण्याची शिकवण, सोबतच जिवंत असेपर्यंत कसे वागायचे हे सांगणारा कर्मसिद्धांत म्हणजे श्रीकृष्ण आहे. अर्जुनाला गीतेतून उपदेश करेपर्यंतच तो ‘भगवंत’ आहे. रणांगणावर विराट रूपदर्शन घडवित असतानाच तो आपण जगन्नियंता असल्याचे सांगतो. एरवी तो सवंगड्यांसोबत शिंक्यातले लोणी पळवणारा, सत्याच्या बाजूने उभे राहणारा, मित्राच्या मदतीला धावून जाणारा, द्रौपदीच्या हाकेला ओ देणारा, अर्जुनाला कर्णाची महती सांगणारा, स्वत:च्या ताकदीची कल्पना असतानाही पांडवांना यशापयाशाचे, सुख-दु:खाचे अडथळे पार करीत परिस्थितीला, प्रसंगी युद्धाला सामोरे जाण्याचा सल्ला देणारा, त्यांच्या अरण्यवासाच्या काळात धैर्य देणारा, वेळ बाका आला तर त्यातून बाहेर पडण्याच्या क्लृप्त्या सांगणारा, सोबती असतो. तो अभयंकर असतो. तो अद्वैत असतो. तो अप्रमेय असतो. तो ज्योतिरादित्य असतो. तो केयूर असतो... त्याला राधाही कळते अन्‌ कंसही. त्याला विदुरही ठावूक असतो अन्‌ दुर्योधनही.
 
भगवंत स्वत:चं वर्णन अर्जुनासमोर करतात, तेव्हा या सृष्टीतील जे जे म्हणून उदार, उन्नत, उत्तम, महत्मधूर असेल, ते ते ‘मी’ असल्याचे सांगतात. ऋतुत मी कुसुमाकर आहे, मासांत मागशीर्ष, पर्वतात मेरू, शिखरात कैलास, महर्षींमध्ये भृगु, सिद्ध पुरूषांत कपिल मुनी असल्याचे सांगत असताना नरांत मात्र आपण धनंजय, म्हणजेच अर्जुन असल्याचे भगवंत खुद्द अर्जुनाला सांगतात. इतर उदाहरणांच्या पंक्तीत ‘अर्जुन’ विराजमान करताना कौंतेयाची प्रतिमा, त्याचे धैर्य उन्नत करीत त्याच्यातील विश्वास जागवण्याचाही तो प्रयत्न असतो. श्रीकृष्णाच्या आयुष्यभरातील यशाचं गमक काय असेल? असं म्हणतात की श्रीकृष्णाने आपला क्रोध उजव्या पायाच्या अंगठ्यात दाबून ठेवला होता. संपूर्ण अवतारकाळात केवळ तीन वेळा तो अंगठा उंचावला गेला. जेव्हा तसं घडलं तेव्हा रणकंदनच झालं. पण एरवी, तो जगन्नियंता सार्‍या प्रश्नांना हसतमुखाने सामोरा गेला. मानवी समुहाला तरी त्याचे यापेक्षा वेगळे काय सांगणे आहे?

Friday, July 26, 2019

ढिंग एक्सप्रेस!

आपला समाज मात्र कोत्या मनाचाच निघाला. एकतर क्रिकेटच्या पलीकडेही खेळ अन्‌ खेळाडू आहेत, हे मान्य करायला त्याला खूप वेळ लागतो आणि दुसरी बाब अशी की, झगमगाटाच्या पलीकडे त्याला बघताच येत नाही. यशापयशाचे एकसारखे मापदंड तो सगळीकडे वापरतो. या पोरीला धड इंग्रजी बोलता, लिहिता येत नाही, यावरूनही तिची टर उडवली गेली. धावण्याच्या स्पर्धेतील यशामुळे ‘ढिंग एक्सप्रेस’ ठरली तरी तिचं शिक्षण कमी असण्याचा मुद्दा लोकांनी चर्चिला. जर कपिल देव, सचिन तेंडुलकरच्या यशाआड त्यांचे शिक्षण येत नाही, तर हिमाच्या यशाच्या आड तरी ते का यावे, या प्रश्नाचे उत्तर काहीकेल्या गवसत नाही. क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळांचे महत्त्व कमी जोखण्याच्या भारतीय जनतेच्या सवयीचा तो परिणाम मानावा? एका गुणी खेळाडूचा कालपर्यंतचा संघर्ष मातीमोल ठरवण्यासाठी आणि एकामागून एक अशी पदकं खेचून आणेपर्यंत तिच्या यशाची दखलही न घेतली जाण्यासाठी माध्यमांना जवाबदार ठरवायचे, की समाजभान हरवून बसलेल्या रसिक चाहत्यांना?


सुमारे दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. आसामच्या राजधानीत आंतरजिल्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ॲथ्लेटिक्सच्या सहभागातून वेगवेगळ्या स्पर्धा एकामागून एक याप्रमाणे पार पडत होत्या. यातील शंभर व दोनशे मीटर दौड स्पर्धेत ‘ती’पण सहभागी झाली होती. वर्णाने सावळी, शरीरयष्टी हाडकुळी. घरच्या अठराविश्वे दारीद्र्याची साक्ष तिच्या अंगावरचे कपडेच देत होते. पायातले बूट तर क्रीडाजगताच्या प्रचलित ऐटीला न शोभणारे. स्वस्त. म्हणून परवडणारे. म्हणून विकत घेतलेले. लौकिकार्थाने चारचौघांचे लक्ष जावे असे काही नव्हतेच तिच्यात. साहजिकच सर्वार्थाने दुर्लक्षित राहिलेले ते व्यक्तिमत्त्व होते. पण... स्पर्धा सुरू झाली. धावण्याचा इशारा देणारे बिगुल वाजले. एकमेकांना मागे टाकण्याच्या ईर्ष्येने पेटून उठलेले खेळाडू जिवाच्या आकांताने पळत सुटलेत. मोजून अवघ्या काही सेकंदांची स्पर्धा ती, पण निकाल लागला आणि क्षणभरापूर्वी कुणाच्याच दृष्टीने लक्ष देण्याजोगं नसलेलं ‘ते’ व्यक्तिमत्त्व आता मात्र सर्वांसाठीच आकर्षणाचे केंद्र ठरले! कारण या दोन्ही स्पर्धा आसामच्या त्या लेकीनं जिंकल्या होत्या. नुसत्या जिंकल्या नाही, तर नवनवीन विक्रम प्रस्थापित केले तिनं. खरंतर त्या स्पर्धेनंतरच्याही काळात जयपराजयाच्या गर्तेत गटांगळ्या खात तिचा प्रवास सुरू राहिला होता. परिस्थितीवर मात करण्याची
तीच जिद्द. पुन:पुन्हा उठून उभे राहण्यासाठीची तीच धडपड. आकाशाच्या दिशेने झेप घेण्याची तीच ईर्ष्या...
हिमा दास! गेला महिनाभर भारतीय जनतेच्या तोंडी असलेले एक नाव. माणसं यशाच्या शिखरावर पोहोचली, तरच त्याची दखल घेण्याची सवय जडलेल्या भारतीय समूहाने चालवलेल्या हिमाच्या कोडकौतुकाचे आश्चर्य नाहीच इथे कुणाला. सुवर्णपदकांची एकामागून एक अशी आरास मांडत निघालेल्या हिमाच्या यशापेक्षाही, कुठल्याशा आमदाराच्या पोरीने घरून पळून जाण्याची ‘ब्रेिंकग न्यूज’ करण्यात अक्कल पाजळणार्‍या माध्यमजगतातील हुशार मंडळींच्या बुद्धीची कीव करण्यापलीकडे उरते तरी काय सामान्य बापुड्यांच्या हातात? पण, हिमाने यशाची विविधांगी क्षेत्रे पादांक्रांत केली अन्‌ सारेच चित्र बदलले. माध्यमांना त्यांच्या बातम्यांची दिशा बदलावी लागली. जागोजागी तिच्या यशाची चर्चा घडू लागली. दरम्यान, हाती पडलेल्या बक्षिसापैकी अर्धी रक्कम आपल्या राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याच्या तिच्या घोषणेने तर जणू जादू, जादू कसली, क्रांतीच केली! सारा देश तिला डोक्यावर घेऊन नाचू लागला. चाहत्यांनी बहाल केलेल्या लोकप्रियतेच्या भरवशावर कोट्यवधी रुपयांचे घबाड कमावणार्‍यांना सुचू नये ते या 19 वर्षांच्या नवख्या खेळाडूला सुचणे कौतुकास्पदच होते.
 पदकांची आरास मांडण्याचा इतिहास तिच्या कर्तबगारीतून घडत गेला, तसतसा तिच्या संघर्षाचा आलेखही जगापुढे येऊ लागला. तरुणाईला तिच्या कर्तृत्वाची भुरळ पडली. एव्हाना लोक नेटवर हिमा दास हे नाव ‘सर्च’ करून तिच्याबद्दल उत्सुकतेने जाणून घेऊ लागले. गरिबीसोबतच विपरीत परिस्थितीशी तिने दिलेली कडवी झुंज जगजाहीर होऊ लागली.
आसामातील नागाव जिल्ह्यातलं ढिंग नावाचं एक छोटंसं गाव. हिमा तिथलीच. रणजीत आणि जोनाली दास यांच्या संसारवेलीवर बहरलेलं शेंडेफळ. तिच्यासह पाच भावंडांच्या संसाराचा गाडा हाकण्याची आई-वडिलांची कसरत आणि ती करताना होणारी त्यांची दमछाक सार्‍या गावाच्या परिचयाची. पदरची ‘दो बिघा’ जमीन जोतून पिकवलेल्या धानातून कुटुंबाचं कसंबसं चाललं असताना हिमाच्या मनात फुलणारी स्वप्नं, खेळाकडे असलेली तिची ओढ कुणाच्या खिजगणतीत असणार होती? सुरुवातीला फुटबॉलचे आकर्षण वाटायचे. पण, मग धावण्याच्या क्षेत्राकडे तिचा कल वाढत गेला. समस्यांचे काय, त्या तर मार्गात सर्वदूर विखुरल्या होत्या. पण, भांडवल करण्यापेक्षा त्या समस्या पायाखाली तुडवत तिचा प्रवास अविरत सुरू राहिला. कधी फुटबॉलच्या मैदानावरील सुकलेल्या मातीवरून, तर कधी शेतातला चिखल तुडवत, धावण्याची जिद्द मार्गक्रमण करीत राहिली. सुरुवातीला तर अनवाणीच धावायची पोर. मग बुटं घालून धावण्याचा सराव सुरू झाला. इथं खायलाच पुरेसे नसताना पायातल्या बुटांसाठी जास्तीचे पैसे असणार कुठून? त्यामुळे, अंगातले कपडे, पायातले बुट यापेक्षा धावण्याकडे अधिक लक्ष दिले जाऊ लागले. त्याचा परिणाम हा होता की, आंतरजिल्हा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ती गोहाटीत दाखल झाली होती. तिथले तिचे बेभान धावणे, स्पर्धेत अजून कोणकोण दिग्गज उतरलेत याची जराशीही चिंता न बाळगता स्वत:च्या यशासाठी झेपावण्याची तिची जगावेगळी तर्‍हा, ती तळमळ, सामाजिक व्याप खूप मोठा राखण्याची इच्छा असली, तरी खेळाच्या मैदानावर मात्र आपला ट्रॅक अन्‌ आपण, एवढा मर्यादित विचार करायलाही ती शिकली. ही पोरगी भविष्यात नाव काढेल, हा विश्वास प्रशिक्षक निपुण दास यांच्या मनाला शिवला. गोहाटीच्या शिबिरात राहून तिने धावण्याचा शास्त्रीय पद्धतीने सराव करावा यासाठीचा त्यांचा अट्‌टहास होता. पण, तिथला खर्च पेलवणार कसा? परिस्थिती तर जणू निष्ठुरतेने क्षणाक्षणाला परीक्षा बघत होती. बरं, याही स्थितीत, संघर्षाचा इरादा इतका बुलंद की, यश हमखास गाठीशी बांधले जायचे. इथेही मार्ग निघालाच. हिमाच्या आर्थिक जबाबदारीचे ओझे निपुण दास यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतले अन्‌ प्रशिक्षणाचा तिचा मार्ग मोकळा केला. निपुण सरांनी दाराशी आणून ठेवलेल्या संधीचे सोने करणे, एवढेच तिच्या हाती होते आणि तिने ते केलेही. धावण्याचा सराव, वेग वाढू लागला. मग सरांनी मर्यादा वाढवली. दोनशे मीटरऐवजी चारशे मीटरच्या स्पर्धेसाठी तिच्याकडून तयारी करवून घेण्याचा प्रयोग एव्हाना सार्थ ठरू लागला. कधीकाळी शेतात धावणारी पोरगी आता आंतराष्ट्रीय स्पर्धेत खर्‍याखुर्‍या मैदानावर धावू लागली. सुरुवातीला अपयशाचा ससेमिरा काही सुटला नाही. तिही समर्थपणे त्याला तोंड देत राहिली- न डगमगता. यश पायाशी खेचून आणण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीनेच लढण्याचे बळ दिले. त्याच्याच भरवशावर हिमा यशाचा पाठलाग करीत राहिली. इतका, की शेवटी नियतीलाही यशाचे दान तिच्या पदरात टाकावेच लागले!
 
बँकॉंकमधील युथ चॅम्पियनशिप ट्रॉफी असो, की ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ गेम्स असोत, तिथे वाट्याला आलेल्या अपयशाचा लवलेशही हिमाच्या नंतरच्या सरावादरम्यान दिसत नव्हता कुठेच. त्याचाच परिणाम असावा बहुधा, पण आता तिचे धावणे जणू पदकांसाठीच असल्याचा अलिखित नियम झाला. गेल्या एकवीस दिवसांत अॅथ्लेटिक्स स्पर्धांमध्ये सहा सुवर्ण भारतासाठी मिळवून देण्याची किमया हिमा दास हिने केली आहे. लोकांच्या तोंडी आपले नाव यायला इतिहास निर्माण करावा लागतो. हिमाने तो केला आहे. चॅम्पियन्स वेगळेच असतात. त्यांची जिद्द, पेहराव, विचार, वर्तन... सारेच वेगळे असते. ती चॅम्पियन आहे, हे तिने या सर्वच बाबतीत सिद्ध केले आहे. खेळाच्या मैदानात आणि मैदानाबाहेरही.
आपला समाज मात्र कोत्या मनाचाच निघाला. एकतर क्रिकेटच्या पलीकडेही खेळ अन्‌ खेळाडू आहेत, हे मान्य करायला त्याला खूप वेळ लागतो आणि दुसरी बाब अशी की, झगमगाटाच्या पलीकडे त्याला बघताच येत नाही. यशापयशाचे एकसारखे मापदंड तो सगळीकडे वापरतो. या पोरीला धड इंग्रजी बोलता, लिहिता येत नाही, यावरूनही तिची टर उडवली गेली. धावण्याच्या स्पर्धेतील यशामुळे ‘ढिंग एक्सप्रेस’ ठरली तरी तिचं शिक्षण कमी असण्याचा मुद्दा लोकांनी चर्चिला. जर कपिल देव, सचिन तेंडुलकरच्या यशाआड त्यांचे शिक्षण येत नाही, तर हिमाच्या यशाच्या आड तरी ते का यावे, या प्रश्नाचे उत्तर काहीकेल्या गवसत नाही. क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळांचे महत्त्व कमी जोखण्याच्या भारतीय जनतेच्या सवयीचा तो परिणाम मानावा? एका गुणी खेळाडूचा कालपर्यंतचा संघर्ष मातीमोल ठरवण्यासाठी आणि एकामागून एक अशी पदकं खेचून आणेपर्यंत तिच्या यशाची दखलही न घेतली जाण्यासाठी माध्यमांना जवाबदार ठरवायचे, की समाजभान हरवून बसलेल्या रसिक चाहत्यांना?